Thursday, April 14, 2022

🛑 नलावड्यांचे भाई : एक प्रेमळ माणूस

🛑 नलावड्यांचे भाई : एक प्रेमळ माणूस

          काही माणसं त्यांच्या प्रेमळ व्यक्तित्वामुळे लक्षात राहतात. प्रेमळ म्हणजे निर्मळ मनाने , जिव्हाळ्याने वागण्याचा उत्तम गुण. हा गुण प्रत्येकातच असेल हे सांगता येत नाही. अशा व्यक्तींच्या सहवासात आल्यानंतर यांचा मनाचा मोठेपणा सापडतो आणि त्यांची आपल्या मनातील आदरयुक्त प्रतिमा अधिक उंचावत जाते. कदाचित ही माणसे सामाजिक कार्य करण्यासाठीच जन्माला आलेली असावीत. 

          कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वडिलांना सगळेच भाई या नावाने ओळखतात. आमचेही ते भाईच होते.  ते सगळ्यांचेच भाई ठरले होते. 

          कणकवली रेशन दुकानाचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. हे रेशन दुकान अजूनही कणकवली ढालकाठी परिसरात उभे आहे. आमचे सलून त्यावेळी याच परिसरात होते. भाई आमचे कस्टमर होते. आमच्या बाबांचे ते जिवलग मित्र होते. कधी काही आर्थिक संकट आले की भाई आम्हांला जमेल तशी मदत करत. त्यांना आम्ही अगदी जवळून अनुभवले आहे. आम्ही पाचही भावंडे त्यांना ओळखत होतो. बाबा त्यांच्याबद्दल नेहमी सांगत. त्यामुळे भाई आले की आमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक आदर्श व्यक्तिमत्त्व बघत आहोत असाच असे. 

          भाई नलावडे आले की आम्ही चिडीचूप होऊ. ते नेहमी गडबडीत असत. दाढी करता करता ते बाबांशी बोलत राहत. वस्तरा लागेल याची मला भीती वाटे , पण आमचे बाबा त्यांची दाढी करताना त्यांना बोलू नका असे कधीच सांगत नसत. त्यांनी आमच्या बाबांना कायम मित्रासारखी वागणूक दिली होती. 

          कणकवली स्टेट बँकेखाली त्यांचे ' अलंकार भोजनालय ' होते. त्यावेळी असणाऱ्या प्रसिद्ध हॉटेलपैकी ते एक होते. मधली अनेक हॉटेल्स पार करुन काही शौकीन लोक भाई नलावडेंच्या ' अलंकार भोजनालयात ' जेवणाचा आस्वाद घेत असलेले मी पाहिले आहेत. 

          माझी मोठी बहीण ताई नुकतीच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन आमच्याच दुकानात टेलरिंग काम करत असे. बाबा कपडे कापून देत , आमची ताई कपडे शिवी. कॉलेजमध्ये असल्यापासून तिचे हे काम अव्याहतपणे सुरुच होते. भाईंनी हे बघितले होते. त्यांनी तिला आपल्या रेशन दुकानात सेल्समनची नोकरी दिली होती. त्यावेळी बाबांपेक्षा माझ्या ताईलाच खूप आनंद झालेला दिसत होता. ती सेल्समनपदी हजर झाली. तिला दरमहा पगार मिळू लागला होता. भाईंनी बहिणीला नोकरी दिल्याने आम्हां भावंडांचा आनंद द्विगुणित होत गेलेला होता. दिवाळीच्या सणाला ती आम्हांला नवीन कपडे घेऊ लागली होती. भाईंमुळे हे शक्य झाले होते. आम्ही त्यांना कायमच दुवा देत होतो. 

          ताईचे लग्न झाल्यानंतरही तिने नोकरी सोडली नव्हती. मी तिला सायकलने स्टँडवर नेहमी सोडत असे. ती गाडीत बसून कळसुली गावी जात असे. भावोजींनी डोंबिवली येथे रुम घेतल्यानंतर ताईला ही नोकरी सोडावी लागली तेव्हा ताई खूप रडली होती. नोकरी सोडण्याचे दुःख तिला जास्त होते. भाईंना हे नोकरी सोडणार आहे हे सांगतानाही तिला कठिण गेले होते. भाईनी आमच्या ताईच्या लग्नाला विशेष आर्थिक मदत केली होती. 

          आमची ताई त्यानंतर अनेक वर्षे ज्या ज्या वेळी गावी येई , त्या त्या वेळी रेशन दुकानात भाई आणि सर्वांना जाऊन भेटे. पुढे ताईला मंत्रालयात नोकरी मिळाली होती. ही गोष्ट समजताच भाईंना कितीतरी आनंद झाला होता. ते दरवेळी ताईची आपुलकीने चौकशी करत. 

          भाईंची सर्व मुले कणकवली नंबर तीन शाळेतच शिकली होती. आमच्या बरोबर लहानाची मोठी झाली होती. त्यापैकी समीर नलावडेसाहेब आमच्या पुढच्या वर्गात होते. त्यांनी हा भाईंचा मदतीचा वसा कायम ठेवला आहे. भाईंचे सामाजिक कार्य त्यांनी सुरु ठेवले आहे. 

          धी कणकवली को ऑपरेटिव्ह सोसायटीचा ( जुने रेशन दुकान ) आता मोठा वटवृक्ष बनला आहे. कणकवलीची आता मुंबई बनत चालली आहे. पण भाईंची ती जुनी सोसायटी अजून तशीच डोळ्यासमोर     येत राहते. भाई आता हयात नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्या मनात तशाच ताज्या आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...