Thursday, April 7, 2022

🛑 नको , नको हा उकाडा

🛑 नको , नको हा उकाडा

          टेरेस फ्लॅट असला की त्याखाली राहणारे उकाड्याने हैराण होतात. आम्ही सतत याचा अनुभव घेत आहोत. " कडाक्याची थंडी , मुसळधार पाऊस परवडला , पण उकाडा नको रे बाबा " असे सगळेच म्हणत असतील. दिवसातून कितीही वेळा आंघोळ करा , घाम यायचा काही थांबत नाही. 

          मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सकाळची शाळा असली असती तर बरे झाले असते असे वाटू लागते. शासनाच्या १६ मार्च पर्यंत वाट बघता बघता सकाळशिप सुरु होते. सकाळी लवकरचा अलार्म लावावा लागतो. गर्मीमुळे अलार्म वाजण्याच्या अगोदरच जाग येत राहते. नंतर झोपावे तर झोप लागत नसते. फॅनचा रेग्युलेटर पाचच्या पुढे करावासा वाटतो. तोही गरम झालेला असतो. नंतर लक्षात येते की पाचवर म्हणजे तो टॉपवर असतो. एवढा फास्ट असूनही उकाडा थांबत नसतो.

          एकदा उठल्यावर पुन्हा झोप येण्याची शक्यताच नसते. शाळेत साडे बारापर्यंत थांबायचे असते. शाळेत दिवसभर थांबायलाही आवडले असते , पण दुपारच्या ऐन कडावर मुलांना घरी जाताना जो त्रास होत असेल त्याची कल्पना करुनच घामाघूम व्हायला होते.

          सूर्य डोक्यावर राहून आग ओकत असतो. त्याच्याकडे बघणे म्हणजे डोळे फुटायची पाळी. उन्हातान्हात उभी असणारी झाडे कशी सहन करत असतील या उकाड्याला ? दुसऱ्यांना सावली देत स्वतः तप्त ऊन खाणारी झाडे म्हणूनच वाळवंटातील मृगजळ वाटत राहतात. 

          खेड्यातील मुलांना या उन्हाची सवय झालेली असते. भर उन्हात शेतात काम करणारे शेतकरी पाहिले की आपण उगाचच ' उकाडा वाढलाय ' असं म्हणतो त्याची लाज वाटते. रस्त्यावर अनवाणी चालणारी मुले , माणसे पाहिली की त्यांच्या पायांची कीव करावीशी वाटते. त्यांचे पाय भाजत असले तरी त्यांनी त्या भाजण्याची सवय करुन घेतली असेल. 

          हे सगळं पाहिलं की आम्हाला गाडीने जाताना कडक उन्हाचे चटके बसले तरी ते सुसह्य वाटू लागतात. मग बिचाऱ्या या सहनशील माणसांची देवाला दया येत असेल. मग तो अचानक पाऊस घेऊन येतो. पाऊस पडताना गारवा येतो. पाऊस पडून गेल्यावर पुन्हा अधिक उकाडा जाणवू लागतो. 

          थंड हवेची ठिकाणं खुणावू लागतात. ज्यांचे खिसे गरम असतात , ती लोकं थंड होण्यासाठी जातात. पैसे संपले की त्यांना गरम होऊ लागतं. हल्ली लोकांना वातानुकूलित घरात राहण्याची सवय झाली आहे. जातील तिथे एसी सुरु करण्याची ऑर्डर सोडतील. त्यामुळे शरीराला कृत्रिमतेची सवय होऊ लागते आहे. ही कृत्रिम हवा आरोग्यदायक नाही हे माणसाला समजत नाही. काहीवेळा एसी सुरु असतानाही फॅन सुरु ठेवणारी माणसे मी पाहिली आहेत. उकाडा असताना फॅन लावणे ठिक आहे. काही मुलांना , मोठ्या माणसांना थंडीच्या दिवसातही पाचवर फॅन लावल्याशिवाय झोपच लागत नाही. पाचवर फॅन लावतील आणि डोक्यावरुन पांघरुण घेऊन मगच गाढ झोपी जातील. आता या माणसांचे उन्हाळ्यात काय हाल होत असतील याची कल्पना केलेलीच बरी. 

          त्यापेक्षा बाहेर पडताना छत्री वापरा , गाडीवर हेल्मेट वापरा. पांढरी सुती टोपी वापरा. निसर्गाच्या सानिध्यात राहा. संध्याकाळी थोडे चाला. मातीच्या माठातलं थंडगार पाणी प्या. लिंबूपाणी पिऊन तहान भागवा. साध्या थंड पाण्यात रतांबे पिळून त्यात थोडी साखर टाकून कोकम सरबत प्या. आता ही सगळी पेये तयार मिळू लागली आहेत. कोल्ड्रिंक्सपेक्षा फळांचा ज्यूस पिणं केव्हाही चांगलंच. 

          विहिरीवर जाऊन ताज्या थंड पाण्याची मस्त आंघोळ करा. आता या आंघोळीची तहान आपण शॉवरखाली आंघोळ करुन भागवतो आहोत. उष्माघात होऊ नये म्हणून शरीर थंड ठेवाच , आणि तुमचं मनही तसेच थंड ठेवा. नाहीतर कितीही एसीत असलात तरी उकाडा जाणवल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...