Tuesday, April 5, 2022

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

          नुकतेच कणकवली शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाले. कार्यक्रमाची पूर्वतयारी , सभा , प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ,  शिलेदारांनी दिलेला वेळ व योगदान लक्षात घेण्यासारखे आहे. आपला सोहळा साजरा होत आहे ही प्रत्येक सदस्याच्या मनात असलेली भावना याला कारणीभूत आहे. स्वतःच्या घरातला सोहळा असावा तसे सर्वजण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. 

          आपली समिती ही पूर्वीपासूनच अशा धुरंधर शिलेदारांची खाणच आहे. त्यात आता महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे साथ द्यायला सुरुवात केल्यामुळे लढा भक्कम होत चालला आहे. सन १९६२ पासून स्थापन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला यंदा २०२२ साली साठ वर्षे पूर्ण होत आहेत या गोष्टीचा अत्यानंद आहे. 

          सकाळपासून त्रैवार्षिक अधिवेशनाची लगबग सुरु झाली होती. राज्याध्यक्ष उदय शिंदेसाहेब कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच उपस्थित झालेले दिसले. आपल्या शिलेदारांची होत असलेली धावपळ ते स्वतः बघत होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले होते. कणकवली तालुका शाखेचे उपक्रम पाहून ते अतिप्रसन्न झालेले दिसले. शाखेच्या शैक्षणिक , सामाजिक व संघटनात्मक कार्याची भलीमोठी यादी पाहून ते त्यावर भरभरुन बोलताना दिसले. त्यांनी कणकवली तालुका शाखेच्या शिलेदारांची विशेषतः तालुकाध्यक्ष , तालुका सरचिटणीस यांची पुनःपुन्हा नावे घेत  तोंड भरुन स्तुती केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन अनमोल असेच होते. म्हणूनच कणकवली शाखेचे उपक्रम राज्याला रोल मॉडेल ठरावेत असा त्यांनी पुनरुच्चार केला होता. 

          बासरीवादनाने कार्यारंभ झाल्याने सर्वांचे कान तृप्त झाले होते. दीपप्रज्वलन संपन्न होताना सर्वांच्याच चेहऱ्यावर भक्तिभाव फुलताना दिसला. त्याला जोड मिळाली ती महिला आघाडीने सादर केलेल्या ईश्वस्तवन व स्वागतपद्याची. सूर , लय आणि ताल यांचा त्रिवेणी संगम साधत वाद्यवृंदांनी दिलेली साथही अविस्मरणीय अशीच. 

          संपूर्ण प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी असताना सर्वांचेच लक्ष कार्यक्रमाकडेच होते , हातातल्या मोबाईलकडे नव्हते. कार्यक्रम चढत्या क्रमाने पुढे पुढे सरकत होता. राजेश कदम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे अक्षरशः खिळून राहिले होते. 

          सर्व मान्यवरांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी मुद्देसूद व भावणारे प्रास्ताविक सादर केले. त्यांच्या बोलण्यात विनम्रता होती. प्रत्येक उपक्रमाविषयी त्यांनी आपले अनमोल विचार मांडलेच , आणि व्यक्तींच्या नावांचाही उपक्रमानुरूप उल्लेख केला. सर्वांचीच नावे त्यांना घ्यायची इच्छा दिसत होती. म्हणूनच गेली तीन वर्षे त्यांनी केलेल्या अहोरात्र कामाची शाबासकी त्यांना राज्यात नक्की मिळेल असे राज्याध्यक्ष साहेबांनी सुचित केले आहे हीसुद्धा शाखेच्या उत्तम कार्याची पोचपावतीच म्हणायला हवी. 

          समितीचे पाईक असे आहेत की त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी ते आपले कार्य करीतच राहतात. सर्वसामान्य समिती शिलेदार म्हणूनच अधिक श्रेष्ठ ठरतो अशी प्रत्येक शिक्षक नेत्यांची निर्मळ भावना असते. समिती शिलेदारांच्या रोमारोमात " त्याग आणि सेवा " वास करत असते. समितीच्या सानिध्यात आल्यानंतर समजते की समिती काय चीज आहे ते ? न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगत समितीचे शिलेदार नेहमीच संघटनात्मक कार्य करण्यात अग्रस्थानी असतात. 

          विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना मुलांचा प्राधान्याने विचार केला तो समितीने. मुलांसाठी गाऊ आनंदे , लेट्स लर्न इंग्लिश , राष्ट्रभक्तीपर गीतगायन , खजिना कथांचा , कलांकुर असे अनेक अभिनव नवोपक्रम राबवले. सर्व बंधू भगिनींना सहभागी करुन घेतले. अभ्यासपूरक व ऑनलाईन उपक्रमांमुळे लॉकडाऊन काळातही विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास प्रवृत्त झाले. बावीस केंद्रातील गरीब होतकरु मुलांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देतानाही समितीचे दातृत्व लक्षात येते. कोविडमुळे अकाली निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना तातडीची रोख मदत देऊन ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' हा दिलेला दिलासा मानसिक आधार देणारा होता. मोफत शिष्यवृत्ती सराव  परीक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे बळ विद्यार्थ्यांना नेहमीच दिले आहे. क्रीडास्पर्धेत खेळताना जखमी झालेल्या मुलांना तातडीची मदत करण्याचे व्रत समितीने अंगिकारले आहे , त्यामुळे आकस्मिक निधी मिळून मदतीचा हात मुलांना , पालकांना प्रासंगिक सहकार्याचा ठरतो आहे. अशा प्रकारे शैक्षणिक , सामाजिक कार्य करत असताना शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्नही सोडवले जात आहेत. चेकपोस्टवर ड्युटी असताना समिती सदैव शिक्षकांच्या सोबत राहिली आहे. ऑक्सिजन प्लँट सारख्या मोठया आर्थिक घडामोडीत भरीव मदत करणारी समितीची सिंधुदुर्ग शाखा सामाजिक भान जपणारी संघटना ठरली आहे. 

          विविध तालुक्यांमध्ये समितीने अनेक माध्यमातून विद्यार्थी , पालक यांचे हित जपणारे उपक्रम नेहमीच राबवले आहेत. शिक्षकांच्या सांस्कृतिक , शैक्षणिक गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम , समितीचे दशावतारी कलाकार घेऊन नाटके सादर केली आहेत. समितीने अशी विविध रत्ने असलेले अवतारी शिक्षक निर्माण केले आहेत. समितीतील शिक्षक शिलेदारांची ही शैक्षणिक धडपड बघून कधी कधी वाटते , देवाने यांना शिक्षक रूपाचा अवतार घेऊन पृथ्वीतलावर पाठवले असावे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



1 comment:

  1. प्रविण भाई नमस्कार ,

    शिक्षक समितीच्या कार्याचा आलेख तुम्ही अतिशय मार्मिक शब्दात वर्णन केलाल .

    खरंच मित्रा , संघटनेबद्दल असलेली तुमची तळमळ यातून दिसून येते .

    काल दिवसभर कार्यक्रमाचा स्वतः जास्वाद न घेता इतरांकरीता मोबाईलद्वारे व्हीडीओ करून प्रसारीत केला त .

    ReplyDelete

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...