Saturday, May 10, 2025

🔴 आता थांबायचं नाय - शिक्षणाच्या ज्योतीचा वणवा

🔴 आता थांबायचं नाय - शिक्षणाच्या ज्योतीचा वणवा

          सत्य घटनेवर आधारित 'आता थांबायचं नाय' हा चित्रपट केवळ बघण्यापुरता नाही, तर तो प्रत्येक शिक्षकाने आत्मसात करण्यासारखा आणि शिकलेल्या-न शिकलेल्या प्रत्येकाने पुन्हा पुन्हा अनुभवावा असा आहे. यात दाखवलेला शिक्षक म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेची खरी गरज आहे. 

          विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षणाची केवळ आवड नव्हे, तर एक धगधगता 'वणवा' पेटवण्याची क्षमता शिक्षकामध्ये हवी, हे हा चित्रपट प्रभावीपणे दाखवतो.

         या चित्रपटातील शिक्षकाने परिस्थितीपुढे हार मानलेली नाही. रात्रशाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून कसा सकारात्मक बदल घडवता येतो, याचे ते मूर्तिमंत उदाहरण आहेत. 

          एका ध्येयवेड्या शिक्षकाची तळमळ आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारा खोलवर परिणाम चित्रपट पाहिल्याशिवाय पूर्णपणे समजणार नाही. याची कथा सांगून त्यातील उत्कंठा कमी करण्यात अर्थ नाही. क्लायमॅक्स तर चित्रपटगृहात डोळे पुसताना अनुभवायचा विषय आहे.

         खरं शिक्षण कशासाठी घ्यायचं असतं, हे तेव्हा कळतं जेव्हा शिक्षणामुळे समाजात आदर मिळतो, जगण्याची दिशा सापडते. अनेकजण मोठे होत असताना घरच्या जबाबदारीमुळे शिक्षणापासून दूर राहतात. मनात असूनही शिक्षण घेता येत नाही आणि मग 'सातवी नापास' किंवा 'आठवी नापास' असं सांगतानाही संकोच वाटतो. 

          स्वतःला शिक्षण घेता आलं नसलं तरी, आपल्या मुलांनी इंग्रजी माध्यमात शिकावं, चांगलं भविष्य घड़वावं, असं प्रत्येक आई-वडिलांना वाटतं. मुलांच्या शिक्षणासाठी कर्जबाजारी होणाऱ्यांच्या व्यथा या चित्रपटात अत्यंत संवेदनशीलपणे मांडल्या आहेत. हा चित्रपट केवळ विद्यार्थ्यांबद्दल नाही, तर समाजात कचरा गोळा करणाऱ्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या जीवनावरही मार्मिक भाष्य करतो.

          आज 'नवसाक्षरता अभियान' मोठ्या प्रमाणावर सुरू आहे आणि आपले अनेक ज्येष्ठ व श्रेष्ठ नागरिक यात सक्रियपणे सहभागी होत आहेत. साक्षर झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अनुभवण्यासारखा आहे. 

          एक शिक्षक म्हणून मला याचा आनंद आहेच, पण हा चित्रपट पाहिल्यानंतर तर माझी छाती अभिमानाने आणखी फुलून आली आहे. शिक्षकाने जर मनात आणलं, तर तो आपल्या विद्यार्थ्यांना असं घडवू शकतो की त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलते. हे आयुष्य बदलण्याचं व्रत प्रत्येक शिक्षकाने जपायला हवं.        

          कारण शिक्षक हा केवळ एक पेशा नाही, तो एक आदर्श आहे आणि मी त्याचा एक भाग आहे याचा मला सार्थ अभिमान आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबल



No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...