Saturday, April 16, 2022

🛑 पियाबिना बसिया बाजेना

🛑 पियाबिना बसिया बाजेना

          प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याची पत्नी खंबीरपणे उभी असते. ती असते म्हणून तो यशस्वी होत असतो. तिने त्याच्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केलेला असतो. आपला कारभारी नेहमीच यशस्वी होत राहावा असे तिला मनस्वी वाटत असते. पतीच्या यशाची बीजं पत्नीच्या कार्यात असतात. ती त्या पतीसाठी जीवाचं रान करायला सक्षम असते. ती अबला असली तरी पतीसाठी सबला होते. त्याच्यासाठी ती जगाचा विरोध अंगावर ओढून घेऊ शकते. पतीसाठी ती कोणाचीही पर्वा करणार नाही. एकनिष्ठ पती पत्नी असतील त्यांना हे लागू पडते. 

          अचानक संकटे येतात. त्यावर मात करताना पत्नी पुढाकार घेते. ती मिळवती नसली तरी ' झाशीची राणी ' बनते. पतीचा आत्मविश्वास वाढवणारी तीच असते. ती असते म्हणून संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकला जात असतो. ती नसली तर सारेच शून्य. हे एकच शून्य नसेल ती असंख्य शून्ये असतील. पती आणि पत्नी ही एकाच रथाची दोन चाके असल्याचे म्हटले जाते. रथ कधी एका चाकाने चालणारही नसतो. त्यासाठी दोन्ही चाकांचं एकसारखं फिरणं गरजेचं असतं. 

          पत्नीच्या चाकाला चाक लागते. तिचं चाक निखळतं. एक आणि एकच चाक शिल्लक राहतं. ते पतीचं चाक असतं. रथासाठी दुसऱ्या चाकाची व्यवस्था केली जाते. दुसरं चाक येऊन बसतं. ते पत्नीचं चाक नव्याने सुरु झालेलं असतं. ही दोन्ही चाकं पुन्हा नेटानं फिरु लागतात. रथ पुन्हा होता तसा दिसायला लागतो. चाकं मॅच व्हायला थोडा वेळ लागतो. अखेर चाकं पूर्वीसारखी मॅच होतात. 

          हे नवीन चाक नव्या उमेदीनं पहिल्या चाकाला सांभाळून घेत असतं. तसं ते खूपच अवघड असतं. रथ धावताना थोडा आवाज जरुर येत असतो. याचा अर्थ प्रत्येक पतीला आणि पत्नीला एकमेकांची किती आवश्यकता आहे हे मला इथे मुद्दाम नमूद करायचे आहे. 

          हे उलटं झालं असतं तर ? म्हणजे नवऱ्याचं चाक आधी निखळलं तर ? तर पत्नीसाठी दुसरं चाक शोधावं लागेल ना ? पती नावाचं. तिला किती गरज असते पतीची याचा कधी विचार केला आहे का ? तो फक्त तिनेच करायचा ? आणि समजा तिने केला तर तिला काय म्हणायचे ? 

          आता विविध मालिकांमधून असे प्रकार दाखवले जातात. काही ठिकाणी असे घडतही असेल. पुरुषाने केले तर बोलले जात नाही. बाईने केले की तिला नकोसे करुन सोडणारी अनेक तोंडे असतात. पुरुषाला जशी गरज असते , तशी तिलाही गरज असते. तिने कशाला आजन्म विधवा होऊन राहायचं ? तिने कोणता गुन्हा केलाय ? 

          माझी पत्नी गेली. त्यानंतर मलाही माझ्यासाठी आणि मुलीसाठी दुसऱ्या लग्नासाठी कित्येकांनी आग्रह धरला. मी मनापासून तयार नव्हतोच. त्यावेळी मी माझ्या घरच्यांना हा प्रश्न विचारला होता , " माझे काही बरेवाईट झाले असते तर माझ्या पत्नीचे तुम्ही दुसरे लग्न लावून दिले असते का ? " या प्रश्नावर सगळेच गंभीर झालेले दिसले होते. कारण या प्रश्नाला यांच्याकडे उत्तरच नव्हते. त्यांनी जसा माझा विचार केला तसा तिचा केला असता का ? मी त्यांचा मुलगा होतो म्हणून असा सकारात्मक विचार !!! ती त्यांची सून होती म्हणून ते तिचाही तसाच विचार करायला हवे होते ना ? 

          माझे कुटुंब जर याचे उत्तर देऊ शकत नाही तर दुसऱ्या घरांमधूनही मला याचे समर्पक उत्तर मिळेल असे वाटत नाही. तिने बिचारीने आपले विधवेचे जीवन जगत राहावे एवढेच तिच्या नशिबात लिहिले असेल का ? 

          जगात अशा अनेक ' ती ' असतील. ती तिचे पुढील आयुष्य जगताना आपल्या पतीचं स्मरण करत दररोज मरण भोगीत राहील. तिने आता स्वतः आपल्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. तिच्या नातेवाईकांनी तिच्या लग्नाचा विचार केल्यास तिचे जीवन ती पूर्ववत जगू शकते. ती तिचे पूर्वीचे क्षण आठवेलही. ते आठवून नवीन संसार थाटताना तिला त्याच्यात पूर्वीचा नवरा बघणं अपेक्षित आहे. एकूणच काय दोन्ही चाके महत्त्वाचीच आहेत. रथ सुरु राहिला की दोन्ही चाकांना गती येते. शेवटी तो आयुष्याचा रथ आहे ना ? 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

🛑 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

          शिक्षक समितीच्या एका सत्कार समारंभात मला एक पुस्तक भेट म्हणून मिळाले होते. घरी आल्या आल्या ते पुस्तक बघितले. ते ' कारटो ' नावाचे पुस्तक होते. अशी अनेक पुस्तके आपल्या घरी येऊन पडतात. ती वाचायची राहूनच जातात. माझ्या लेखिका मैत्रिणीने हे पुस्तक लिहिले होते याचा मला अभिमान असला तरी पुस्तक वाचलेच नव्हते. तिने लिहिलेले पुस्तक म्हणून मी माझ्या वर्गातील सर्व मुलांसाठी पुस्तके घेऊन ती मुलांना मोफत दिली होती. पुस्तकाची किंमत फक्त पंधरा रुपये असल्याने मला ती परवडली असेल. त्यावेळी मी त्यातले पहिले दोन तीन लेख वाचून दाखवले होते. तेव्हा माझ्या शाळेतील मुले खळखळून हसलीही होती. पण त्यापुढे पुस्तक वाचायचे राहूनच गेले होते.

          वर्तमानपत्रात , फेसबुकवर ' कारटो ' पुस्तकाची प्रसिद्धी वरचेवर येत होती. तरीही पुस्तक हातात घेतले जात नव्हते. मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तके वाचताना आपण आपल्या सोबतच्या लेखिकेला कमी लेखत होतो ही माझी चूकच होती हे माझ्या आज लक्षात आले. एकत्र दोन वर्षे शिकल्यामुळे ' ही ' काय लिहिणार असेही वाटून गेले असेल. आपण स्वतः लिहितोय तेच बरोबर आणि दुसऱ्यांचे ते चूकच असा दृष्टिकोन तर निर्माण होत नाही ना आपल्यात असे वाटून माझेच मला हसू आले. तेव्हा माझी मैत्रिण कल्पना मलये मला खूप मोठी लेखिका असल्याचे जाणवले. एक एक करत मी सगळं पुस्तकच बसल्या बैठकीत वाचून फडशाच पाडला. 

          ' कारटो ' पुस्तक हाती घेतलं की त्याचं मुखपृष्ठ आकर्षित करणारं आहे हे ध्यानात येतं.  झाडावर उलटा लटकलेला ' कॅश ' लहानांचे आणि मोठ्यांचेही लक्ष वेधून घेणारा आहे. मालवणी भाषेत कथा लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. मालवणीत सावंतवाडी , मालवण , कणकवली , वेंगुर्ले , कुडाळ अशा सर्व तालुक्यातील भाषेत थोडा थोडा फरक आहे. तो लक्षात घेऊन लिहायचे असते हे लेखिकेने अभ्यासलेले आहे. डॉ. विजया वाड यांनी केलेले प्रास्ताविक शॉर्ट बट स्वीट आहे. लेखिकेची मालवणीवर श्रद्धा आणि पकड आहे. त्या सर्रास मालवणीच बोलतात. भाषण देताना त्यांचा एकही शब्द मालवणी येत नाही हे विशेष.

          ही एका खोडकर आणि समंजस मुलाची कहाणी आहे. त्यात तो खराखुरा दाखवला आहे. सभ्यपणाचे सर्व बुरखे त्याने फाडले आहेत. वाचणाऱ्या प्रत्येकाला आम्ही लहान असताना तसेच होतो इतके हुबेहूब पटावे असे लेखन करणाऱ्या कल्पना मलये यांना म्हणूनच नव्या पिढीतील जाणकार मालवणी लेखिकेचा सन्मान द्यायला हवा. लेखिका स्वतःच्या जीवनात परखड आहेत , तशीच स्पष्ट भाषा त्यांच्या कादंबरीत उतरली आहे. त्यांना खोटे अजिबात आवडत नाही. 

          मालवणी भाषेचे अलंकार म्हणजे मालवणी म्हणी. या शिवराळ वाटणाऱ्या म्हणींचा त्यांनी केलेला चपखल वापर त्यांच्या मालवणी भाषेचं प्रदर्शन घडवतात. त्यांनी दिलेली शीर्षके प्रत्येक कथेला अगदी बरोबर वाटतात. 

          एक कारटा तुम्हाला तुमच्यासमोर येऊन काहीतरी गमतीजमती सांगत असल्याचा भास वाचकाला शेवटपर्यंत होण्यासाठी लेखिकेने विशेष प्रयत्न केलेले दिसतात. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी , रटाळ वाटत नाही. 

          यातील सर्व पात्रे आपल्या सर्वांच्याच घरात वावरत असल्यासारखे वाटत राहते. मालवणी भाषेची हिच लज्जत वाढवत नेऊन कल्पना मलये यांनी मालवणी भाषेचा सन्मान अधिकाधिक वाढवला आहे. 

          आज जर मच्छिन्द्र कांबळी असते तर त्यांनी कल्पना मलयेंच्या या पुस्तकाचे कोडकौतुक केले असते. मालवणी शब्दकोश बनवायचा झाला तर त्यांनी या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करायला काहीच हरकत नाही. 

           हे पुस्तक वाचताना  ' बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत , कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ' असे शीर्षकगीत असलेल्या ' गोट्या ' मालिकेची आठवण येत राहते. त्यातील गोट्या मराठी भाषा बोलणारा होता , हा कारटा मालवणी आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या ' बोक्या सातबंडे ' या बालचित्रपटाचीही प्रकर्षाने आठवण येत राहते.

          ही कादंबरी म्हणजे फक्त गंमत गोष्ट नसून लहानांप्रमाणे मोठ्या माणसांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरु शकते. विनोदाची झालर असली तरी प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तुम्हाला धडा मिळतो ही जमेची बाब आहे. 

          श्रद्धा , अंधश्रध्दा , शिवाशिव पाळणे , किशोरवयीन मुलींचे शिक्षण , शैक्षणिक वातावरण , सहल अशा अनेक गोष्टींवर यांत हसत हसत प्रकाश पाडल्याचे दिसून येते. यातल्या बाई , गुरुजी आपलेच शिक्षक वाटतात. 

          ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी ते नक्कीच खरेदी करुन वाचावे , वाचले असेल त्यांनी पुन्हा एकदा जरुर वाचून बघा. शाळेत एकपात्री प्रयोग करण्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे एक अतिशय उत्तम लेखसंग्रह आहे असे म्हटले तरी तुम्हीही त्याला दुजोरा द्याल. अशा या पुस्तकाच्या लेखिकेला लेखनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )



Friday, April 15, 2022

🛑 गिल्बर्ट फर्नांडिस : एक अभ्यासू शिक्षक नेते

🛑 गिल्बर्ट फर्नांडिस : एक अभ्यासू शिक्षक नेते

          आम्ही डीएडला होतो. गिल्बर्ट फर्नांडिस त्यावेळी एस. एम्. ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत होते. परीक्षेच्या वेळी आम्ही जवळच्या बेंचवर बसलो असू. तेथे त्यांची माझी पहिली वहिली भेट. त्यांचा त्यावेळचा उत्साह अजून तसाच आहे. 

          नंतर त्यांनीही डीएडला प्रवेश घेतला. त्यांचा परिचय वाढत गेला. त्यांच्यातील नेतृत्वगुण तेव्हापासून दिसायला लागले होते. परिपाठात एखादा मुद्दा ठासून मांडण्यात ते पटाईत असल्याचे दिसले. प्रशासनाकडून काही चुकत असल्यास किंवा त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना काही शैक्षणिक सुविधा हव्या असल्यास गिल्बर्ट कायमच पुढे असत. समस्येवर सन्माननीय तोडगा मिळेपर्यंत त्यांनी त्याची पाठ सोडलेली नसे. त्यांना अनेकदा विरोधाला तोंड द्यावे लागले असेलच , पण त्यांनी त्या विरोधाची कधीही पर्वा केली नव्हती. त्यांचा बारीक आवाज असला तरी त्यातील ताकद मोठी होती. 

          आम्ही रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला असताना येता जाताना भेट होई. सिंधुदुर्ग जिल्ह्यात येण्याची ओढ मला होतीच , त्यांना ती अधिक होती. अखेर तो दिवस उजाडला. आमच्या अनेक मित्र मैत्रिणींना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक नेमणुका मिळाल्या. गिल्बर्ट सरांची आपल्या भूमीत येण्यासाठी घाई सुरु झाली. ते येताना प्रवासात एका संकटात सापडले होते. त्यांचा अपघात झाला होता. त्यांना त्याचा अजूनही त्रास जाणवत असेल. पण म्हणून त्यांनी कधीही जिद्द सोडली नाही. 

          सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम भागात गिर्ये शाळेत त्यांना पहिली नेमणूक मिळाली. सोबत त्यांचे जिवलग मित्र होतेच. त्यांनी आपला मित्रसमूह कधीही सोडला नाही. शैक्षणिक गोष्टी करीत असताना त्यांच्या मनात संघटनात्मक कार्य करण्याची उर्मी निर्माण झाली. त्यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे कार्य करण्यास सुरुवात केली. मोठमोठ्या नेत्यांनी त्यांची कामाची धडाडी बघितली. कणकवलीत आल्यानंतर त्यांनी तालुकाध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळली. कणकवली शाखेला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. शिक्षकांची वैयक्तिक प्रशासकीय कामे , सेवा पुस्तके पूर्ण करणे या कामांचा सपाटाच त्यांनी लावला होता. शालेय कामकाज करुन झाल्यानंतर त्यांचे शिक्षकांसाठीचे काम सुरु होई. त्यांचे हे काम मी अगदी जवळून बघितले आहे. पूर्वी मी त्यांना एकेरीत हाक मारत असे. आता मला त्यांना तशी हाक मारणे आवडत नाही. ते आज शिक्षकनेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेले आहेत. राज्याचे पदाधिकारी त्यांना ' एक धडाडीचा समितीचा नेता ' म्हणून ओळखतात. 

          गिल्बर्ट सरांनी तळागाळातील शिक्षकांची कामे केली आहेत. माझीही अनेक कामे त्यांनी पूर्णत्वास नेली आहेत. कधीही वाटेत भेटले तर तेच आम्हाला विचारतील , " अरे प्रवीण , तुझं काय काम असेल तर सांग. करुन टाकू. " मेडिकल बिल , सेवा पुस्तक , पेन्शन केस , अपूर्ण नोंदी , महाराष्ट्र दर्शन आणि इतर अनेक कामे करण्याचा त्यांचा हातखंडा दांडगा आहे. ते सांगतील तसे करतील अशा स्वभावाचे आहेत. 

          प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक असतानाही त्यांनी अनेक नवनवीन संकल्पना सुरु करुन तडीस नेल्या आहेत. मी वैभववाडी तालुक्यातील मांगवली नं.१ शाळेत असताना गिल्बर्ट सर आमच्या शाळेत दोनवेळा तरी आले असतील. त्यावेळी त्यांच्या भाषणांना झालेला टाळ्यांचा कडकडाट मी अनुभवला आहे. त्यांची भाषणे मुद्देसूद असतात. एका नेत्याने कसे भाषण द्यावे हे त्यांचे भाषण ऐकून नक्कीच समजू शकते. शासन निर्णय , आयोग आणि विविध शैक्षणिक धोरणे यांवर त्यांचा दांडगा अभ्यास आहे. त्यांचे भाषण ऐकताना आम्ही नेहमीच तल्लीन होत असतो. आमच्यापेक्षा थोडे वयाने लहान असले तरी ते संघटनेतील मोठे नेते आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. प्रत्येकवेळी प्रत्येकाला यश मिळेल याची खात्री देता येत नाही. गिल्बर्ट सरांनी अनेक अपयशे पचवून त्यांचा नेटाने सामना करण्याची नेहमीच तयारी दाखवली आहे ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. त्यांच्याकडे बघून संघटनेतील अनेक कार्यकर्ते तयार झाले आहेत. गिल्बर्ट सर सगळ्या कार्यकर्त्यांना नेहमीच प्रोत्साहनपर मार्गदर्शन करत असतात. 

          शिक्षक आणि मित्र म्हणून त्यांचे काम पाहिले की आम्हालाही लाजल्यासारखे होते. गिल्बर्ट सरांसारखे धडाडीचे मित्र , नेतृत्व आणि शिक्षकनेते आम्हाला लाभले हे आमचेही भाग्यच म्हणायला हवे. त्यांचा सुवास आणि सहवास दोन्हींचा लाभ झाला हेही माझ्यासाठी सदैव स्मरणीयच असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



🛑 वर्सलीची सल

 🛑 वर्सलीची सल

          सध्या वर्सल संस्कृती वाढत चालली आहे. माफ करा. मला संस्कृती नव्हे पद्धती म्हणायचे आहे , पण ती संस्कृती असल्याप्रमाणे रुजू पाहत आहे. म्हणून आपसूकच तसा विचार येऊन गेला. काय आहे ही वर्सल ? मुळात हा शब्द इंग्रजी आहे की मराठी तेच समजताना कठीण जातंय. तसा तो शब्दकोशात न सापडणारा शब्द आहे. वर्सल हा शब्द वर्षलचे अपभ्रंश रुप असावे असे वाटते. वर्षल म्हणजे दरसाल. प्रत्येक वर्षी. 

          आपण सर्रास वर्सल हा शब्द वापरुन मोठमोठ्या घरात या पद्धतीने धार्मिक कामे करण्याची प्रथा सुरु केलेली दिसून येत आहे. 

          पूर्वी आपली एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यात एकाच घरात अनेक कुटुंबे राहात असत. आजी, आजोबा त्यांचे मुलगे , त्यांच्या सुना , त्यांची नातवंडं , त्यांची पतवंडं आणि त्यांची खापर पतवंडं !!! ( हे जरा जास्त होत असेल तर पुढचं वाचू नका.) ही एवढी मंडळी घरात असे. ज्यांची लग्ने झालेली नसत , त्यांचाही समावेश यात असे. त्यामुळे घरातल्या माणसांची संख्याही वाढतच राही. 

          पूर्वी एखादा पुरुष दोन , तीन विवाह करत असे. त्यामुळे होणाऱ्या मुलांची संख्या वाढत जाई हे आणि वेगळेच. त्यामुळे एखादे कुटुंब शंभर माणसांचेही असू शकते हा ! त्याहीपेक्षा जास्त सदस्यसंख्या असण्याची संख्या नाकारता येत नाही. 

          त्यावेळी ' हम दो , हमारे दो ' चा नारा आला नव्हता. तो आल्यानंतर तो नारा पाळला जाऊ लागला कदाचित. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी कमी होऊ लागली. ही सगळी एका कुटुंबातील एवढी मंडळी एकाच छताखाली राहात होती आणि एका चुलीवरचे जेवण जेवत होती. एखादे घर म्हणजे एखादी शाळा म्हटली तरी ते चुकीचे ठरु नये. ही माणसं एकमेकांसाठी जीवाला जीव देणारी असत. ' मी माझा ' असा संकुचित विचार त्यांनी त्यावेळी करायला सुरुवात केली नसेल. त्यावेळी शिक्षणाचा प्रसार झालेला होताच. काही सुशिक्षित , काही अर्धशिक्षित , काही साक्षर तर काही निरक्षर अडाणी असली तरी एकत्र राहण्याची संस्कृती त्यांच्यात जन्मापासूनच रुजली होती. 

          हळूहळू ही ' एकत्र कुटुंब संस्कृती ' लोप पावताना दिसू लागली. तिने ' विभक्त कुटुंब ' ची जागा घेतली. कर्ते सवरते कुटुंबप्रमुख यातून निखळत गेले. एका घराची दहा दहा घरे झाली. मी , माझी बायको आणि फक्त माझीच मुलं हेच सदस्य त्यात दिसू लागले. त्यात ' हम दो हमारे दो ' हे वाक्य सतत पाठ करत राहिल्यामुळे प्रत्येक कुटुंबात चारच सदस्य जास्तीत जास्त दिसू लागले. कोणी नोकरीनिमित्त , व्यवसायनिमित्त घराबाहेर पडले होते. गेले तिथे आपापला राजा राणीचा संसार थाटून मोकळे झाले होते. कधीतरी आपल्या मुळघरी आलेच तर परत जाण्यासाठीच. पूर्वी महिन्याने घरी येणारे , नंतर तीन , सहा , नऊ आणि बारा महिन्यांच्या फरकाने येत राहिले. आता त्याची वर्षेही झाली असतील. घर सोडून जाताना लहान असलेली मुले लग्न होऊनच किंवा आपली मुलंबाळं घेऊनच येताना दिसत आहेत. घराचे आणि त्यांचे ऋणानुबंध नावापुरतेच किंवा समाजाला दाखवण्यापुरतेच राहिलेत की काय असा प्रश्न पडावा. 

          आता ही वर्सल ही पद्धती त्यातूनच जन्माला आली. एकटया कुटुंबप्रमुखानेच खर्च का करावा ? असे म्हणत त्या खर्चाचे विभाजन करण्याचे सूत्र आले. झालेला खर्च वितरित होऊ लागला. त्याहीपुढे जाऊन आता दरसाल एकाने खर्च करण्याचीही प्रथा अस्तित्वात येऊ लागली. त्यामुळे सर्व सण एका वर्षात एकानेच साजरे करण्याचे आगळेच सूत्र या माणसांनी सुरु केले. 

          यंदा गणपती मोठे बाबा आणणार , पुढच्या वर्षी मधले , त्याच्या पुढच्या वर्षी ....... असा गणपतीही विभागाला गेला. दरवर्षी वेळ असला तर कुटुंबातील सर्व मुले , माणसे येतात , नाहीतर त्यांची वर्सल असली तरच येतात. या वर्सल पद्धतीमुळे काही गोष्टी सोयीच्या झाल्या असतील. पण त्यात नातेसंबंधांची ताटातूट झालेली आहे हे कटुसत्य आहे. आजी , आजोबा , आत्या , काका , काकी , चुलत भावंडं आणि बरीच माणसे परकी होत चालली आहेत. नाती जपायची म्हणून चाललेला त्यांचा केविलवाणा प्रयत्न लक्षात येऊ लागला आहे. ' हे माझे , तेही माझेच '  या भांडणात आपलेपणाचा लवलेश निघून जात चालला आहे. या ' वर्सल ' नावाच्या अभिनव पद्धतीने नाती कोलमडली आहेत. पूर्वीचा निरागस जिव्हाळा राहिलेला नाही. जिव्हाळा आहे पण तो बेगडी म्हणजे दाखवण्यापुरताच राहिला आहे याची सल लागून राहिली आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.



Thursday, April 14, 2022

🛑 हृदयी वसंत फुलताना

🛑 हृदयी वसंत फुलताना

              ' अशी ही बनवाबनवी ' हा चित्रपट अनेकदा पाहिला असेन. त्यातील एक गाणं शरीर आणि मन दोघांनाही प्रसन्न करुन टाकतं. ' हृदयी वसंत फुलताना , प्रेमास रंग यावे ' हे शब्द कानी पडले की प्रत्येकाच्या मनात प्रेमरंग फुलत असतील. कवी शांताराम नांदगावकर यांनी किती निसर्गरम्य भाव या काव्यात पेरले आहेत !             

        निसर्ग आपलं चक्र सुरु ठेवत असतो. तसंच ऋतुचक्र फिरत राहतं. वसंताने या चक्राची सुरुवात होते. जणू सृष्टीवर नवचैतन्य पसरतं. झाडे , वेली , फुले , फळे आनंदाने डोलू लागतात. नवी हिरवाई जन्माला येत असते. शिशिर संपताना ' आला शिशिर संपत , पानगळती सरली ' हे कवयित्री इंदिरा संतांचे शब्द आठवू लागतात.           

        निसर्ग एक किमयागार आहे हे पटतं. धरतीला नवा शालू नेसून राहायचे असते. धरणी प्रफुल्लित होऊन वसंत ऋतूच्या आगमनाची आतुरतेने वाट बघत असते. झाडांना नवी पालवी फुटताना पाहून निसर्गदेवतेला सलाम करावासा वाटतो. पक्षी गुंजन करु लागतात. त्यांनाही निसर्ग बदलाची चाहूल लागलेली असते. ती त्यांच्या आनंदाची शीळ असते. त्यांचं कर्णमधुर गायन कान तृप्त करुन टाकणारं असतं.आपण सर्व पृथ्वीवासी मंत्रमुग्ध होऊन जातो.               गुढ्या , तोरणे उभारुन वसंताचे स्वागत केले जाते. एक नवीन आशेचा किरण सर्वांनाच खुणावू लागतो. प्रत्येकाच्या रोमारोमात वसंत संचारु लागतो. वसंत पंचमी उत्साहाने साजरी केली जाते. निसर्गाने केलेली पुष्पपर्णाची उधळण सर्वांचं मन मोहवून टाकते.              

        खेड तालुक्यातील जामगे सीमावाडी शाळेत शिक्षक होतो. जाता येताना वसंत खुल्या दिलाने माझे स्वागत करत असे. घनदाट वनराई , चिंचोळी वाट आणि मी एकटा. पण माझ्यासोबत वसंत नक्कीच सोबत करत असे. त्याने माझ्या निराशा घालवलेल्या असत. एकाकी जीवनाला पालवी देत चैतन्य निर्माण करणारा तोच तर होता.ऊन मी म्हणत असताना त्याची तीव्रता या वसंताने कमी केली होती. सर्व झाडे मला फळे काढण्यासाठी वाकून सांगत असत , " आमची फळे काढा हो , आम्हाला ती जड झालीत. " मी मग एखादा आंबा काढत असे. घरी त्याचे लोणचे होई. भाताबरोबर ते खाताना जणू वसंताची चव जिभेवर तरळत राही. खूप गोड आठवणी होत्या त्या. 

          शाळेत येताना मुले जास्वंदीची भरपूर फुले आणत. त्यांचा पुष्पहार शारदेला घालताना वसंताची माळ अर्पण केल्याचा आनंद होऊन जाई.सावरीच्या , पळसाच्या झाडाखाली फुलांचा सडा बघून त्यावर अलगद पाय ठेवताना गुदगुल्या होत. 

          परीक्षेचे वातावरण सुरु झालेले असे. एखाद्या बुटक्या झाडावर बसून अभ्यास करण्याची मजा काही औरच असे. दुपारनंतर वाडीतील पोरेसोरे गोळा होत. आंब्याचे , करवंदांचे खिरमाट बनवत. ते आंबटगोड असे. त्याची लज्जत आता येत नाही. तो वसंत वेगळाच होता. 

          परशुराम पांचाळ बुवांची भजने ऐकताना मंगलाचरण सुरु होई. ' आला वसंत घ्यारे नाम , हरी जय जय राम ' त्यात ते वसंत ऋतूत रामाला आळवावे असे सांगत. लवकरच रामनवमी , हनुमान जयंती साजरी होई. वासंतिक सुंठवडा मिळे. 

          वासंतिक व्याख्यानमाला सुरु होत. दिग्गज लेखक , कवींची व्याख्याने ऐकताना बौद्धिक वसंत फुलत राही. एखाद्या शाळेत मुले शिक्षकांना कलमाचे हापूस आंबे आणून देत. कदाचित त्या मुलांचा असा समज असेल की हे आंबे दिल्यानंतर आपले गुरुजी आपल्याला चांगल्या गुणांनी पास करतील. पिवळ्या रंगांची प्रगतीपत्रके बघून त्यांच्या मनाचा मोर नाचू लागे. 

          असा हा विविध रंगांचा आणि ढंगांचा वसंत ऋतू नित्यनेमाने येतच राहणार आहे. तो प्रत्येकाच्या आयुष्याचे सोने करु पाहत असतो. तो आपल्या जीवनाचे सोने करतोय हे समजण्याइतका आपला सकारात्मक दृष्टिकोन असला म्हणजे झाले. 


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली



🛑 नलावड्यांचे भाई : एक प्रेमळ माणूस

🛑 नलावड्यांचे भाई : एक प्रेमळ माणूस

          काही माणसं त्यांच्या प्रेमळ व्यक्तित्वामुळे लक्षात राहतात. प्रेमळ म्हणजे निर्मळ मनाने , जिव्हाळ्याने वागण्याचा उत्तम गुण. हा गुण प्रत्येकातच असेल हे सांगता येत नाही. अशा व्यक्तींच्या सहवासात आल्यानंतर यांचा मनाचा मोठेपणा सापडतो आणि त्यांची आपल्या मनातील आदरयुक्त प्रतिमा अधिक उंचावत जाते. कदाचित ही माणसे सामाजिक कार्य करण्यासाठीच जन्माला आलेली असावीत. 

          कणकवली नगर पंचायतीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या वडिलांना सगळेच भाई या नावाने ओळखतात. आमचेही ते भाईच होते.  ते सगळ्यांचेच भाई ठरले होते. 

          कणकवली रेशन दुकानाचे ते अनेक वर्षे चेअरमन होते. हे रेशन दुकान अजूनही कणकवली ढालकाठी परिसरात उभे आहे. आमचे सलून त्यावेळी याच परिसरात होते. भाई आमचे कस्टमर होते. आमच्या बाबांचे ते जिवलग मित्र होते. कधी काही आर्थिक संकट आले की भाई आम्हांला जमेल तशी मदत करत. त्यांना आम्ही अगदी जवळून अनुभवले आहे. आम्ही पाचही भावंडे त्यांना ओळखत होतो. बाबा त्यांच्याबद्दल नेहमी सांगत. त्यामुळे भाई आले की आमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एक आदर्श व्यक्तिमत्त्व बघत आहोत असाच असे. 

          भाई नलावडे आले की आम्ही चिडीचूप होऊ. ते नेहमी गडबडीत असत. दाढी करता करता ते बाबांशी बोलत राहत. वस्तरा लागेल याची मला भीती वाटे , पण आमचे बाबा त्यांची दाढी करताना त्यांना बोलू नका असे कधीच सांगत नसत. त्यांनी आमच्या बाबांना कायम मित्रासारखी वागणूक दिली होती. 

          कणकवली स्टेट बँकेखाली त्यांचे ' अलंकार भोजनालय ' होते. त्यावेळी असणाऱ्या प्रसिद्ध हॉटेलपैकी ते एक होते. मधली अनेक हॉटेल्स पार करुन काही शौकीन लोक भाई नलावडेंच्या ' अलंकार भोजनालयात ' जेवणाचा आस्वाद घेत असलेले मी पाहिले आहेत. 

          माझी मोठी बहीण ताई नुकतीच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन आमच्याच दुकानात टेलरिंग काम करत असे. बाबा कपडे कापून देत , आमची ताई कपडे शिवी. कॉलेजमध्ये असल्यापासून तिचे हे काम अव्याहतपणे सुरुच होते. भाईंनी हे बघितले होते. त्यांनी तिला आपल्या रेशन दुकानात सेल्समनची नोकरी दिली होती. त्यावेळी बाबांपेक्षा माझ्या ताईलाच खूप आनंद झालेला दिसत होता. ती सेल्समनपदी हजर झाली. तिला दरमहा पगार मिळू लागला होता. भाईंनी बहिणीला नोकरी दिल्याने आम्हां भावंडांचा आनंद द्विगुणित होत गेलेला होता. दिवाळीच्या सणाला ती आम्हांला नवीन कपडे घेऊ लागली होती. भाईंमुळे हे शक्य झाले होते. आम्ही त्यांना कायमच दुवा देत होतो. 

          ताईचे लग्न झाल्यानंतरही तिने नोकरी सोडली नव्हती. मी तिला सायकलने स्टँडवर नेहमी सोडत असे. ती गाडीत बसून कळसुली गावी जात असे. भावोजींनी डोंबिवली येथे रुम घेतल्यानंतर ताईला ही नोकरी सोडावी लागली तेव्हा ताई खूप रडली होती. नोकरी सोडण्याचे दुःख तिला जास्त होते. भाईंना हे नोकरी सोडणार आहे हे सांगतानाही तिला कठिण गेले होते. भाईनी आमच्या ताईच्या लग्नाला विशेष आर्थिक मदत केली होती. 

          आमची ताई त्यानंतर अनेक वर्षे ज्या ज्या वेळी गावी येई , त्या त्या वेळी रेशन दुकानात भाई आणि सर्वांना जाऊन भेटे. पुढे ताईला मंत्रालयात नोकरी मिळाली होती. ही गोष्ट समजताच भाईंना कितीतरी आनंद झाला होता. ते दरवेळी ताईची आपुलकीने चौकशी करत. 

          भाईंची सर्व मुले कणकवली नंबर तीन शाळेतच शिकली होती. आमच्या बरोबर लहानाची मोठी झाली होती. त्यापैकी समीर नलावडेसाहेब आमच्या पुढच्या वर्गात होते. त्यांनी हा भाईंचा मदतीचा वसा कायम ठेवला आहे. भाईंचे सामाजिक कार्य त्यांनी सुरु ठेवले आहे. 

          धी कणकवली को ऑपरेटिव्ह सोसायटीचा ( जुने रेशन दुकान ) आता मोठा वटवृक्ष बनला आहे. कणकवलीची आता मुंबई बनत चालली आहे. पण भाईंची ती जुनी सोसायटी अजून तशीच डोळ्यासमोर     येत राहते. भाई आता हयात नसले तरी त्यांच्या आठवणी आमच्या मनात तशाच ताज्या आहेत. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, April 9, 2022

🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर

 🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर

          काल आमच्या नातेवाईकांच्या लग्नाच्या गोंधळाला उपस्थित होतो. तसा हा माझ्या आयुष्यातील पहिला गोंधळ असेल. गोंधळाची गाणी ऐकली होती. जोगवा चित्रपट बघितला होता. अनेकदा गोंधळ झाल्यावर जेवायला गेलो असेन. संपूर्ण गोंधळ बघायला मिळाला नव्हता. 

          माहूरची रेणुका , तुळजापूरची  तुळजाभवानी , कोल्हापूरची अंबाबाई यांना बोलावणे धाडत गोंधळ मांडला जातो. माझे गोंधळ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होतं. त्यांनी सुंदर मांडणी केली होती. खणावर रांगोळीसारखे तांदळाचे यंत्र तयार करण्यात आले होते. दिवट्या पेटवल्या होत्या. कापडाचे काकडे बनवले होते. पाच ऊसाच्या दांड्या उभारण्यात आल्या होत्या. मध्यावर कलश ठेवण्यात आला होता. सुके खोबरे , नागवेलीची पाने , सुपाऱ्या , लिंबू , खारीक , बदाम , केळी , फळे आणि इतर पुजा साहित्य मांडून छान सजावट करण्यात आली होती. 

          बाहेर बोकड ओरडत होता. त्याचा बळी द्यायची वेळ आली होती. त्याचा काळही जवळ आलेला मला दिसत होता. त्याला देवीचा भंडारा लावण्यात आला. काहीच मिनिटांत त्या बिचाऱ्या बोकडाचा बळी देण्यात आला होता. त्याचे ओरडणे कायमचे थांबले होते. त्यावेळी मला एक ओळ सुचली होती , " देवीला शरण आणि बोकडाचं मरण "… 

          देवीच्या गोंधळात बोकडाच्या जीवावर आलेले दिसले. त्याच्या जीवनाचा गोंधळच झाला होता. परंपरेने चालत आलेल्या रूढी माणसं जोपासत होती. बोकडाचं मुंडकं आणि पाय हे अवयव देवीला वाहण्यात आले होते. 

          जोगवा मागणे सुरु झाले होते. सात ते नऊ घरांमध्ये यजमान गेले होते. त्यांनी प्रत्येक घराच्या दारात जाऊन ' जोगवा ' मागितला होता. जोगवा पूर्ण झाला होता. त्यानंतर देवीला गोंधळाला येण्यासाठी आळवणी करण्यात आली होती. त्यासाठीची गाणी गोंधळी बुवांनी ठसक्यात म्हटली होती. संबळ वाजवत गाणी तालासुरात म्हटली जात होती. 

          या गोंधळी समाजातील कलाकारांचे आवाज कर्णमधुर असतात. वेगळ्या धाटणीचा आवाज , चाली यामुळे माझ्यासारखा माणूस तिकडे आकर्षिला जातो. मी त्यांची सर्वच गाणी ऐकत राहिलो होतो. आता त्यांनी काही नवीन गाणीसुदधा म्हटली होती. 

          मला त्यावेळी कणकवलीच्या ' पाचंगे ' गोंधळी यांची आठवण आली होती. त्यांचे खायच्या पानांचे दुकान होते. मी लहान असताना त्यांच्या दुकानातून बाबांसाठी पाने घेऊन येत असे. त्यांचे काही ग्रुप असत. एप्रिल , मे या दरम्यान अनेक गोंधळ असत. त्यावेळी हे सगळे ग्रुप आमच्या सलूनमध्ये केस दाढी करण्यासाठी येत असत. त्यात किसन नावाचे एक गोंधळी खूप चांगले होते. त्यांचा आवाज सुरेल होता. गळ्यात सूरपेटी घालून ते गाणे म्हणत. ते आता हयात नाहीत. त्यांच्या आठवणी माझ्या मनात हयात आहेत. त्यात एक ' संतु ' नावाचा गोंधळ्यांच्या संबळवादक होता. त्याचा चेहरा कायम हसरा दिसे. त्याला कितीही बोला , त्याची कितीही चेष्टा करा , तो हसतच राही. तो आता कुठे हसत असेल देव जाणे ?   

          प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांची गोंधळाची गाणी ऐकली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कणकवली कॉलेज कणकवलीचे ते अभ्यासकेंद्र प्रमुख होते. अक्षरसिंधु संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी ही परंपरा जपली आहे. 

          लोककलाकार छगन चौगुले यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. लोककला जोपासना करताना यांना सलाम केलाच पाहिजे. 

          गोंधळ बघताना मी नवीन पाहतोय म्हणून आश्चर्याने भारावून गेलो होतो. गोंधळाचा विधी साग्रसंगीत पार पडला होता. हा दिवसाचा गोंधळ असल्यामुळे ' आख्यान ' झाले नाही. आरती व पाळणा गीते झाली. त्यातील शिवाजीचा पाळणा विशेष होता. 

          दुपारी शाकाहार झाला होता. सायंकाळी किंवा रात्री लोकांनी त्या बोकडाचे मटण प्रसाद म्हणून घेतले होते. कार्यक्रम अतिशय सुंदर , नियोजनबद्ध झाला होता. तरीही माझ्या डोळ्यासमोरुन तो बोकड काही जाता जात नव्हता. मीही या सर्व घटनेचा साक्षीदार असल्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत मला काहीही लिहिणे शक्यच होत नाही. मी सपशेल माघार घेतो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




Friday, April 8, 2022

🛑 काव्यप्रेमी मंच : उत्तम कविलेखकांचा संच

🛑 काव्यप्रेमी मंच : उत्तम कविलेखकांचा संच

          आज मला एका लेखकांच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील होऊन पंधरवडा झाला असेल. या ग्रुपमध्ये प्रतिभावंत लेखक , लेखिका , कवी , कवयित्री आहेत. यात सामील होण्यासाठी मला ओसरगावचे प्रकाश चव्हाण यांनी आग्रह धरला. मी लेखक किंवा कवी नाही. तेवढे मोठे होण्यासाठी मला अजून काही वर्षे लेखनक्षेत्रात कार्य करावे लागेल. मी लिहितो ते वाचकांना आवडते याचा अर्थ मी लेखक झालो असे मला स्वतःलाही वाटत नाही. मी एक साधा शिक्षक आहे. माझ्यामध्ये लेखनक्षमता जरुर आहे. त्यात खतपाणी घालण्याचे काम हा काव्यप्रेमी ग्रुप करत आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होत चाललेला आहे. त्याची पट वाढतच जाणार आहे याचीही मला खात्री आहे. 

          पूर्वी मी मला हवे तसे लिहीत असे. एखाद्या घटनेकडे बघत बघत सुचत गेले की मला भावेल तसे , वाटेल तसे लिहीत जाई. माझ्याकडे आधीच खूप शीर्षके तयार आहेत , त्यावर वेळ मिळेल तसे लेखन मी करत असतो. मी माझा फावला वेळ मुद्दाम काढतो आणि लिहिण्याची हौस भागवून घेतो. एखादी गोष्ट सुचली की ती लिहिल्याशिवाय राहवत नाही. मग जिथे असेन तिथे माझे लेखनकार्य सुरु राहते. ते लेखन वाचकांना पाठवले की त्यांचे अनेक उदंड प्रतिसाद मला अधिकाधिक लिहिण्यास प्रवृत्त करतात. मी लिहीत जातो , लिहीत राहतो , लिहूनच थांबतो. 

          आचार्य अत्रे यांनी आपले आत्मचरित्र लिहिले होते. ' कऱ्हेचे पाणी ' या आत्मचरित्राचे एक एक खंड केवढे जाडजूड होते. आश्चर्य वाटते , एवढे लेखन करण्यासाठी त्यांना किती वेळ लागला असेल ? त्यावेळी आजसारख्या सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी प्रचंड लेखन केले होते. त्यांनी लिहिलेली नाटके पाहताना , वाचताना त्यांच्याबद्दलचा आदर वाढत राहतो. त्यांनी त्यावेळी कित्येक भूमिका बजावल्या होत्या. प्राध्यापक , पत्रकार , लेखक , कवी , नाटककार , पटकथाकार , कथाकार , वक्ता आणि कितीतरी !!!! त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या पुस्तकांची पारायणे करावी लागतील , तरीही ते शक्य होईल असे वाटत नाही. त्यांच्या पासंगाला आपण पुरणार नाही हे कटुसत्य आहे. 

          काव्यप्रेमी शिक्षक मंच म्हणजे एक लेखन कार्यशाळाच आहे. यावर नियम आहेत. बंधने आहेत. शाबासकी आहे. प्रतिसाद आहेत. मार्गदर्शन आहे. नवनवीन लेखांचा संग्रह आहे. नवनिर्मिती आहे. सन्मान आहे. आणि असे बरेच उत्तमोत्तम आहे. मला पंधरवड्यात इतक्या गोष्टींचा शोध लागला आहे. 

          याद्वारे माझ्या लेखनाची गती वाढली आहे. वाचन वाढले आहे. कविता , चारोळी लिहिण्याची सुरुवात मी यामधूनच केली आहे. मी पत्रकारिता करतो , पण लेखनाचे हवे तसे बाळकडू मिळण्याचा स्रोत मला आता गवसला आहे. शब्दाची कोटी करणे , कोट्यवधी शब्दांमधून अचूक शब्द शोधून काढणे जमायला लागले आहे. मंचाने नवलेखकांना अशीच प्रेरणा देत राहावी म्हणजे माझ्यासारखे झाकलेले लेखक नक्कीच प्रथितयश लेखक बनतील यांत मुळीच शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )



Thursday, April 7, 2022

🛑 भाव अंतरीचे हळवे

🛑 भाव अंतरीचे हळवे

          सगळे शिक्षक नाटक सुरु होण्याची वाट बघत होते. त्या दिवशी वीजबाईने मात्र हिरमोड केला होता. ती एक दोन वेळा गायब झाली होती. आमच्या शिक्षक मित्रांचा दशावतार पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आतुर झालेले होतो. आणि एकदाचे नाटक सुरु झाले होते.

          पात्रे परिचय सुरु झाला होता. त्यावेळी अंगात दशावतार संचारु लागले होते. सगळे प्रेक्षागृह भारावले गेले होते. सुनिल गावकरबुवांची बोटे पेटीवर वेगाने फिरु लागली होती. त्यांचा तिसऱ्या पट्टीतील आवाज रंगमंचाच्या आसमंतात घुमू लागला होता. ते तल्लीन होऊन गात होते. माझे शिक्षक स्वतःचा दशावतार सादर करत होते , याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. प्रथमेश तांबे आणि उत्तम कदमांनी त्यांना उत्तम साथ दिली होती. 

          दिनेश सुद्रीकसरांनी केलेली रंगमंच व्यवस्था साजेशी होती. खूप कमी वेळात त्यांनी व्यासपीठाचे रूपांतर रंगमंचात केले होते. लेखक आणि दिग्दर्शक सुभाष तांबे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन नाटक बघताना तोंडात बोट घालायला भाग पाडत होतं. सर्व कलाकार शिक्षकांकडून त्यांनी त्यांच्या भूमिका अचूक वटवून घेण्यात बाजी मारली होती. कोणालाही स्टेजमागून प्रॉमटिंग केलेले दिसत नव्हते. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या रितीने वटवलेल्या दिसत होत्या. 

          संतोष तांबे यांनी साकारलेला भ्रमरासुर खरा भ्रमरासुर वाटत होता. त्यांची वेशभूषा , रंगभूषा , आवाजाची शब्दफेक , रंगमंचावरील वावर अप्रतिमच म्हणायला हवा. त्यांच्या प्रवेशाला जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 

          नाटक सुरु झालं होतं. मी जवळून शुटींग करत होतो. अचानक प्रेक्षागृहातूनच मला एका शिक्षकमित्राचा फोन आला होता. भ्रमरासुराची भूमिका करणारे कोण आहेत असे मला त्यांनी विचारले होते. इतके संतोष तांबे ओळखले जाऊ शकत नव्हते. याचा अर्थ त्यांनी साकारलेला भ्रमरासुर खराखुरा असुर ठरला होता. संतोष तांबे हे एक गुणी प्राथमिक शिक्षक आहेत. ते आमच्या किर्लोस आंबवणे गावच्या शाळेत होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांनी आमच्या गावातील अनेक विद्यार्थी घडवले आहेत. 

          कोणत्याही नाटकात नारदाची भूमिका करणारा कलाकार अवलिया लागतो. त्याच्यावर सर्व नाटकाची भिस्त असते. आपल्या महेंद्र पवारांनी  नारदाची इन्ट्री घेतली तेव्हा झालेला जल्लोष त्यांच्या कलेला केलेला सलामच होता. कसले भारी दिसत होते ते !!!  त्यांची मान हलवण्याची व हसण्याची पद्धत खऱ्या नारदालाही लाजवणारी होती. त्यांचे दशावतारी भाषेवर असलेले प्रभुत्व उल्लेखनीय होते. 

          त्यानंतर ब्रम्हराक्षस मोठ्या हास्याचा स्फोट करत आला होता. हा कोण आहे हे ओळखेपर्यंत ' मंगेश राणे ' सरांच्या नावाने टाळ्या आणि शिट्या वाजू लागल्या होत्या. त्यांनी केलेले युद्धनृत्य पुन्हा पुन्हा पाहावे असे होते. 

          कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन समारंभात ज्यांच्या बासरीवादनाने प्रेक्षक शिक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले होते ते सदाशिव राणेसर. नाटकात त्यांनी मारुतीची भूमिका उत्तम प्रकारे वटविली. सदाशिव सरांच्या सुप्तगुणांचा हा मुक्त आविष्कारच होता. 

          चंद्रकेतू राजाची भूमिका राजा भिसे सरांनी राजासारखी निभावली. खरंच राजा भिसे सामान्य जीवनात राजाच आहेत. चंद्रवंदना साकारणारा मसुरकर हा मूळ दशावतारी कलाकार होता. त्याने आमच्या सर्व कलाकारांना जे सांभाळून घेतले त्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच असतील. सुसंस्कृत स्त्रीच्या सर्व लकबी पाहताना हा पुरुष आहे असे कधीही वाटले नाही. 

          दशावतारी नाटकाची संकल्पना राबवणारे शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी घेतलेल्या मेहनतीचे ' भ्रमरासुर वध ' हे नाटक म्हणजे मधुर फळच म्हणायला हवे. पडद्याआड असणारे व पडद्यासमोर राहून नाटक पाहणारे शेवटपर्यंत थांबून असल्यामुळे नाटकाला चार चांद लागले. एक अविस्मरणीय नाट्यप्रयोग नाट्यगृहानेही नक्कीच पाहिला असेल असे म्हटले तरीही वावगे ठरु नये. 

          मी राधानगरीला एका गोंधळाला आलो असताना तिथे अजित कडकडेचे गाणे लागले होते. " तुझे नाम आले ओठी , सूर भारावले "  हे गाणे ऐकत असताना या ओळी ऐकायला मिळाल्या. " भाव अंतरीचे हळवे , जसे जुई फुल , स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल " या ओळी ऐकल्या आणि आमच्या समितीच्या कलाकारांचा नाट्यप्रयोग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. खरंच प्रत्येकाच्या अंतरीचे भाव असेच हळवे असायला हवे , तर आणि तरच स्वतःच्या सुगंधाची भूल पडून असे विलक्षण ' न भूतो , न भविष्यति ' नाट्य घडू शकते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 नको , नको हा उकाडा

🛑 नको , नको हा उकाडा

          टेरेस फ्लॅट असला की त्याखाली राहणारे उकाड्याने हैराण होतात. आम्ही सतत याचा अनुभव घेत आहोत. " कडाक्याची थंडी , मुसळधार पाऊस परवडला , पण उकाडा नको रे बाबा " असे सगळेच म्हणत असतील. दिवसातून कितीही वेळा आंघोळ करा , घाम यायचा काही थांबत नाही. 

          मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सकाळची शाळा असली असती तर बरे झाले असते असे वाटू लागते. शासनाच्या १६ मार्च पर्यंत वाट बघता बघता सकाळशिप सुरु होते. सकाळी लवकरचा अलार्म लावावा लागतो. गर्मीमुळे अलार्म वाजण्याच्या अगोदरच जाग येत राहते. नंतर झोपावे तर झोप लागत नसते. फॅनचा रेग्युलेटर पाचच्या पुढे करावासा वाटतो. तोही गरम झालेला असतो. नंतर लक्षात येते की पाचवर म्हणजे तो टॉपवर असतो. एवढा फास्ट असूनही उकाडा थांबत नसतो.

          एकदा उठल्यावर पुन्हा झोप येण्याची शक्यताच नसते. शाळेत साडे बारापर्यंत थांबायचे असते. शाळेत दिवसभर थांबायलाही आवडले असते , पण दुपारच्या ऐन कडावर मुलांना घरी जाताना जो त्रास होत असेल त्याची कल्पना करुनच घामाघूम व्हायला होते.

          सूर्य डोक्यावर राहून आग ओकत असतो. त्याच्याकडे बघणे म्हणजे डोळे फुटायची पाळी. उन्हातान्हात उभी असणारी झाडे कशी सहन करत असतील या उकाड्याला ? दुसऱ्यांना सावली देत स्वतः तप्त ऊन खाणारी झाडे म्हणूनच वाळवंटातील मृगजळ वाटत राहतात. 

          खेड्यातील मुलांना या उन्हाची सवय झालेली असते. भर उन्हात शेतात काम करणारे शेतकरी पाहिले की आपण उगाचच ' उकाडा वाढलाय ' असं म्हणतो त्याची लाज वाटते. रस्त्यावर अनवाणी चालणारी मुले , माणसे पाहिली की त्यांच्या पायांची कीव करावीशी वाटते. त्यांचे पाय भाजत असले तरी त्यांनी त्या भाजण्याची सवय करुन घेतली असेल. 

          हे सगळं पाहिलं की आम्हाला गाडीने जाताना कडक उन्हाचे चटके बसले तरी ते सुसह्य वाटू लागतात. मग बिचाऱ्या या सहनशील माणसांची देवाला दया येत असेल. मग तो अचानक पाऊस घेऊन येतो. पाऊस पडताना गारवा येतो. पाऊस पडून गेल्यावर पुन्हा अधिक उकाडा जाणवू लागतो. 

          थंड हवेची ठिकाणं खुणावू लागतात. ज्यांचे खिसे गरम असतात , ती लोकं थंड होण्यासाठी जातात. पैसे संपले की त्यांना गरम होऊ लागतं. हल्ली लोकांना वातानुकूलित घरात राहण्याची सवय झाली आहे. जातील तिथे एसी सुरु करण्याची ऑर्डर सोडतील. त्यामुळे शरीराला कृत्रिमतेची सवय होऊ लागते आहे. ही कृत्रिम हवा आरोग्यदायक नाही हे माणसाला समजत नाही. काहीवेळा एसी सुरु असतानाही फॅन सुरु ठेवणारी माणसे मी पाहिली आहेत. उकाडा असताना फॅन लावणे ठिक आहे. काही मुलांना , मोठ्या माणसांना थंडीच्या दिवसातही पाचवर फॅन लावल्याशिवाय झोपच लागत नाही. पाचवर फॅन लावतील आणि डोक्यावरुन पांघरुण घेऊन मगच गाढ झोपी जातील. आता या माणसांचे उन्हाळ्यात काय हाल होत असतील याची कल्पना केलेलीच बरी. 

          त्यापेक्षा बाहेर पडताना छत्री वापरा , गाडीवर हेल्मेट वापरा. पांढरी सुती टोपी वापरा. निसर्गाच्या सानिध्यात राहा. संध्याकाळी थोडे चाला. मातीच्या माठातलं थंडगार पाणी प्या. लिंबूपाणी पिऊन तहान भागवा. साध्या थंड पाण्यात रतांबे पिळून त्यात थोडी साखर टाकून कोकम सरबत प्या. आता ही सगळी पेये तयार मिळू लागली आहेत. कोल्ड्रिंक्सपेक्षा फळांचा ज्यूस पिणं केव्हाही चांगलंच. 

          विहिरीवर जाऊन ताज्या थंड पाण्याची मस्त आंघोळ करा. आता या आंघोळीची तहान आपण शॉवरखाली आंघोळ करुन भागवतो आहोत. उष्माघात होऊ नये म्हणून शरीर थंड ठेवाच , आणि तुमचं मनही तसेच थंड ठेवा. नाहीतर कितीही एसीत असलात तरी उकाडा जाणवल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, April 6, 2022

🛑 योगवसुधा आणि वसुधायोग

🛑 योगवसुधा आणि वसुधायोग

          हल्ली योग करणारी माणसं गावोगावी दिसू लागली आहेत. मला योगाची आवड आहे. हे योग योग्य प्रकारे करावे लागतात. नाहीतर त्याचे तोटे संभवतात. डीएडला असताना कणकवली कॉलेजच्या प्राध्यापक विलास पाटील सरांकडून योगा शिकण्याचा योग जुळून आला. सलग एकवीस दिवस योगाचे प्रात्यक्षिक अनुभवले. तेव्हा त्याचे विशेष वाटले नाही. नवीन काहीतरी शिकावे या हेतूने शिकलो होतो. त्याचे प्रमाणपत्र जपून ठेवले होते हे माझे योगनशीबच म्हणायला हवे. 

          त्या एका योगप्रवेश प्रमाणपत्रामुळे मला पहिली नोकरी मिळाली. माझी ही अतिरिक्त पात्रता कामी आली होती. चाळीसजणांमधून माझी निवड व्हायला केवळ योग कारणीभूत होता. योगायोगानेच मला नोकरी मिळाली होती हाही माझा भाग्ययोगच.  

          नोकरी मिळाल्यानंतर योग येईल तसा योग शिकवत होतो. नंतर प्रसंगानुरुप अभ्यासापुरता योग करत असे. तीन वर्षांपूर्वी योगशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करावा असे मनात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संलग्न डॉ. वसुधा योगा अकॅडमी वेंगुर्लेमध्ये प्रवेश निश्चित केला. 

          अकॅडमीच्या संचालिका डॉ. वसुधा मोरे ह्या स्वतः B.A.M.S. D. Yoga. M.S.Yoga (S -VYASA-Banglor) पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उच्च विद्यविभूषित डॉक्टर व योगशिक्षिका आहेत. त्यांना आयुष मंत्रालयाची मान्यता मिळालेली आहे. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या या विद्वत्तेचा अनुभव आला. त्यांचा योगाचा खोलवर असलेला अभ्यास आम्हाला थक्क करणारा होता. आम्हाला योगाच्या महागुरु मिळाल्या होत्या. 

          त्यांचे अध्यापन ऐकताना , त्यांच्यासोबत प्रात्यक्षिक करताना खूप शिकता आले. त्या खऱ्या अर्थाने योगगुरु आहेत. योगाचे यम आणि नियम त्यांनी नेहमीच पाळले आहेत. योगसिद्धांताचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या आवाजात मृदुता असते. सतत संयमाने जीवन जगण्यासाठी त्या आम्हाला प्रेरित करतात. त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून आम्ही खूप काही शिकत गेलो. त्यांनी डॉक्टर हा व्यवसाय सदैव पेशा म्हणून करण्याचे व्रत अंगिकारले आहे. त्यांच्या अर्ध्या तासांच्या मार्गदर्शनाने आपल्यात लक्षात येण्याइतका बदल घडू शकतो. मला त्यांचे तीस ते चाळीस पूर्ण दिवसांचे प्रत्यक्ष व ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. त्यांनी नेहमीच पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. पुस्तकातला योगा अंतरात उतरवला आहे. त्यांनी दिलेली योगनिद्रा अजूनही आठवते. दररोज नवनवीन हालचाली शिकवताना त्या आपले वय विसरुन जाताना दिसतात. ज्या हालचाली आम्हाला अजिबात जमत नव्हत्या , त्या हालचाली त्यांना लिलया जमत होत्या. आम्हाला कधीकधी आमचीच लाज वाटे. पण हळूहळू त्यांनी आमच्यात आत्मविश्वास रुजवला. आम्ही त्यांच्यासारखे करत गेलो नि घडत गेलो. त्यांची शाबासकी मिळत गेली. 

          त्यांचा दिवस सकाळी ५ वाजता सुरु होतो. त्या लंडनमधील लोकांचे ऑनलाईन क्लासेस घेतात. तसेच अमेरिका, युरोप आणि संपूर्ण भारतातुन मद्रास, कलकत्ता, गोवा,कर्नाटक,आंध्रप्रदेश ,हिमाचल ,उत्तराखंड येथील विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत. आपल्या शेजारील गोव्यातील अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार होत आहेत. सिंधुदुर्गातील अनेक डॉक्टर त्यांचे शिष्य आहेत. मी शिकत असताना माझ्यासोबत दहा ते बारा डॉक्टर्स देवगड , कुडाळ , सावंतवाडी , गोवा इथून शिकायला येत होते. 

          त्यांचे नावच वसुधा आहे. वसुधा म्हणजे पृथ्वी. ज्या पृथ्वीवर आपण राहतो , ती किती विशाल आहे. तसेच वसुधा मॅडमांचे योगातील ज्ञान विशाल पृथ्वीसारखे आहे. म्हणूनच त्या आमच्यासाठी सदैव ' योगवसुधा '  ठरतात. योगा शिकताना नेहमीच जमिनीला वंदन करावे लागते. वाकावे लागते. वसुधेला नतमस्तक व्हावे लागते. डॉ. वसुधा मोरे यांना आमचा नेहमीच साष्टांग सूर्यनमस्कार असणार आहे. 

          त्यांना नमस्कार करण्याचा अनमोल योग आमच्या जीवनात आला म्हणूनच आम्हाला या योगालाच ' वसुधायोग ' म्हणणे योग्य वाटते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, April 5, 2022

🛑 ऊनसाळा

 🛑 ऊनसाळा

           " ऋतू आला वसंत सांगायला हो , अन घुंगरु घ्या तुम्ही बांधायला " हे गाणे आम्ही खूप पूर्वी या मोसमात म्हणत असू. शाळेत शिकवत असू. मुले हे गाणे नाचून म्हणताना खूप आनंदित होऊन जात. वसंत ऋतू आला की निसर्गाच्या बदलाने तनमन प्रफुल्लित होऊन जाई. 

          सध्या वसंत ऋतू सुरु आहे. वातावरणात घडून येत असलेले बदल पाहून ऋतूच समजेनासे झाले आहेत. सकाळी लवकर उठून शाळेत जायची तयारी सुरु केली होती. आंघोळ करायला गेलो असेन , बाहेर पाण्याची टाकी ओव्हर फ्लो झाल्यासारखे वाटले. पण पावसाळ्यात जसा पाऊस पडतो तसा मुसळधार पाऊस सुरु झाला होता. शॉवरखाली मस्त थंड पाण्याचे भराभर फवारे घेत असताना बाहेर पावसाचा आवाज वाढत चालला होता. मी जणू पावसात न्हात असल्याचा अनुभव घेऊ लागलो होतो. एप्रिलच्या उन्हाळ्यात पावसाच्या सरी पडाव्यात हे खरे वाटत नव्हते. पण पाऊस धो धो कोसळत होताच. बाहेरचा दरवाजा उघडला तसा थंड वारा गडबडीने आत शिरला होता. 

          यावर्षी तिन्ही ऋतूंमध्ये पावसाने हजेरी लावल्याने कमालीचे आश्चर्य वाटत होते. पावसाळ्यात ठीक आहे , पण आता बारमाही पाऊस हे जरा जास्तच वाटत होतं. पण हे पावसाला माहीत नसावे. त्याने   कदाचित कधीही बरसायचा विडा उचललेला असावा. असा हा अनाहूत पाऊस हिवाळ्यात पडला त्यावेळी आम्ही त्याला ' हिवसाळा ' म्हटले होते. आता तो उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडण्याच्या दिवसात सकाळीच येऊन ठाण मांडून बसला होता. आता त्याला ' ऊनसाळा ' म्हटले तरी त्याला त्याचे काहीच वाटणार नव्हते. तो कुठे शाळेत जाणार होता शिकायला किंवा शिकवायला ? 

          शाळेत जायची घाई आणि पावसाची ही धिटाई. आलेयुक्त मस्त चहा समोर आला. गरमागरम असल्याने त्यावर फुंकर घालत पित पित पावसाच्या जाण्याची वाट बघितली. चहा पिऊन झाला आणि पाऊसही गेला. 

          मध्येच विजांच्या लख्ख रेषा आकाशात उजेड आणू पाहात होत्या. ' धुडूम म्हातारी ' जोराने ओरडत होती. ढगांच्या गडगडाटाला आम्ही ' घुडूम म्हातारी किंवा धुडूम म्हातारी ' म्हणत असू. लहानपणी आम्हाला या अक्राळविक्राळ म्हातारीची खूप भीती वाटे. तिच्या विचित्र असण्याची आम्ही विविध चित्रे मनात रंगवली होती. शाळेत गेल्यावर त्याचे शास्त्रीय कारण उमगले. वीजबाईने तोपर्यंत आमच्या शरीरातली वीज घालवून टाकली होती. 

          गडबडीत शाळेत निघालो. गाडीवर स्वार झालो. गाडीने आज आंघोळ केली होती. ती स्वच्छ दिसत होती. गाडी सुरु झाली. थोडे अंतर गेलो असेन , तोवर पुन्हा पावसाचे थेंब अंगावर कोसळत आहेत असे वाटले. मागे येऊन रेनकोट घ्यावा लागला. 

          सध्या छत्री आणि रेनकोट कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे ते लवकर हाताला मिळतील अशा जागी मुद्दाम ठेवावे लागतात. 

          नेहमीप्रमाणे भरधाव निघालो. दहा पंधरा मिनिटे पाऊस सोबत करत होता. मस्त वाटत होतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची , शिक्षकांची पावसाने त्रेधातिरपीट उडवून टाकली होती. मी आपला रेनकोट असल्याने मजेत निघालो होतो. पुढेही पाऊस पडून गेल्याची चिन्हे दिसत होती. 

          नंतर दिवसभर पाऊस दडून बसला होता. रात्रीच्या भोजनाच्या वेळी तो पुन्हा गडगडाट करत आलाच. थोड्या वेळापूर्वी जवळ वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीतरी फटाके वाजवले होते. फटाक्यांच्या आवाजाने पुन्हा पावसाला धडामधुडूम करत यावेसे वाटले. तो बाहेर बरसत राहिला तसा मीही शब्दरूपाने तसाच बरसत राहिलो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

          नुकतेच कणकवली शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाले. कार्यक्रमाची पूर्वतयारी , सभा , प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ,  शिलेदारांनी दिलेला वेळ व योगदान लक्षात घेण्यासारखे आहे. आपला सोहळा साजरा होत आहे ही प्रत्येक सदस्याच्या मनात असलेली भावना याला कारणीभूत आहे. स्वतःच्या घरातला सोहळा असावा तसे सर्वजण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. 

          आपली समिती ही पूर्वीपासूनच अशा धुरंधर शिलेदारांची खाणच आहे. त्यात आता महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे साथ द्यायला सुरुवात केल्यामुळे लढा भक्कम होत चालला आहे. सन १९६२ पासून स्थापन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला यंदा २०२२ साली साठ वर्षे पूर्ण होत आहेत या गोष्टीचा अत्यानंद आहे. 

          सकाळपासून त्रैवार्षिक अधिवेशनाची लगबग सुरु झाली होती. राज्याध्यक्ष उदय शिंदेसाहेब कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच उपस्थित झालेले दिसले. आपल्या शिलेदारांची होत असलेली धावपळ ते स्वतः बघत होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले होते. कणकवली तालुका शाखेचे उपक्रम पाहून ते अतिप्रसन्न झालेले दिसले. शाखेच्या शैक्षणिक , सामाजिक व संघटनात्मक कार्याची भलीमोठी यादी पाहून ते त्यावर भरभरुन बोलताना दिसले. त्यांनी कणकवली तालुका शाखेच्या शिलेदारांची विशेषतः तालुकाध्यक्ष , तालुका सरचिटणीस यांची पुनःपुन्हा नावे घेत  तोंड भरुन स्तुती केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन अनमोल असेच होते. म्हणूनच कणकवली शाखेचे उपक्रम राज्याला रोल मॉडेल ठरावेत असा त्यांनी पुनरुच्चार केला होता. 

          बासरीवादनाने कार्यारंभ झाल्याने सर्वांचे कान तृप्त झाले होते. दीपप्रज्वलन संपन्न होताना सर्वांच्याच चेहऱ्यावर भक्तिभाव फुलताना दिसला. त्याला जोड मिळाली ती महिला आघाडीने सादर केलेल्या ईश्वस्तवन व स्वागतपद्याची. सूर , लय आणि ताल यांचा त्रिवेणी संगम साधत वाद्यवृंदांनी दिलेली साथही अविस्मरणीय अशीच. 

          संपूर्ण प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी असताना सर्वांचेच लक्ष कार्यक्रमाकडेच होते , हातातल्या मोबाईलकडे नव्हते. कार्यक्रम चढत्या क्रमाने पुढे पुढे सरकत होता. राजेश कदम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे अक्षरशः खिळून राहिले होते. 

          सर्व मान्यवरांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी मुद्देसूद व भावणारे प्रास्ताविक सादर केले. त्यांच्या बोलण्यात विनम्रता होती. प्रत्येक उपक्रमाविषयी त्यांनी आपले अनमोल विचार मांडलेच , आणि व्यक्तींच्या नावांचाही उपक्रमानुरूप उल्लेख केला. सर्वांचीच नावे त्यांना घ्यायची इच्छा दिसत होती. म्हणूनच गेली तीन वर्षे त्यांनी केलेल्या अहोरात्र कामाची शाबासकी त्यांना राज्यात नक्की मिळेल असे राज्याध्यक्ष साहेबांनी सुचित केले आहे हीसुद्धा शाखेच्या उत्तम कार्याची पोचपावतीच म्हणायला हवी. 

          समितीचे पाईक असे आहेत की त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी ते आपले कार्य करीतच राहतात. सर्वसामान्य समिती शिलेदार म्हणूनच अधिक श्रेष्ठ ठरतो अशी प्रत्येक शिक्षक नेत्यांची निर्मळ भावना असते. समिती शिलेदारांच्या रोमारोमात " त्याग आणि सेवा " वास करत असते. समितीच्या सानिध्यात आल्यानंतर समजते की समिती काय चीज आहे ते ? न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगत समितीचे शिलेदार नेहमीच संघटनात्मक कार्य करण्यात अग्रस्थानी असतात. 

          विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना मुलांचा प्राधान्याने विचार केला तो समितीने. मुलांसाठी गाऊ आनंदे , लेट्स लर्न इंग्लिश , राष्ट्रभक्तीपर गीतगायन , खजिना कथांचा , कलांकुर असे अनेक अभिनव नवोपक्रम राबवले. सर्व बंधू भगिनींना सहभागी करुन घेतले. अभ्यासपूरक व ऑनलाईन उपक्रमांमुळे लॉकडाऊन काळातही विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास प्रवृत्त झाले. बावीस केंद्रातील गरीब होतकरु मुलांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देतानाही समितीचे दातृत्व लक्षात येते. कोविडमुळे अकाली निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना तातडीची रोख मदत देऊन ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' हा दिलेला दिलासा मानसिक आधार देणारा होता. मोफत शिष्यवृत्ती सराव  परीक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे बळ विद्यार्थ्यांना नेहमीच दिले आहे. क्रीडास्पर्धेत खेळताना जखमी झालेल्या मुलांना तातडीची मदत करण्याचे व्रत समितीने अंगिकारले आहे , त्यामुळे आकस्मिक निधी मिळून मदतीचा हात मुलांना , पालकांना प्रासंगिक सहकार्याचा ठरतो आहे. अशा प्रकारे शैक्षणिक , सामाजिक कार्य करत असताना शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्नही सोडवले जात आहेत. चेकपोस्टवर ड्युटी असताना समिती सदैव शिक्षकांच्या सोबत राहिली आहे. ऑक्सिजन प्लँट सारख्या मोठया आर्थिक घडामोडीत भरीव मदत करणारी समितीची सिंधुदुर्ग शाखा सामाजिक भान जपणारी संघटना ठरली आहे. 

          विविध तालुक्यांमध्ये समितीने अनेक माध्यमातून विद्यार्थी , पालक यांचे हित जपणारे उपक्रम नेहमीच राबवले आहेत. शिक्षकांच्या सांस्कृतिक , शैक्षणिक गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम , समितीचे दशावतारी कलाकार घेऊन नाटके सादर केली आहेत. समितीने अशी विविध रत्ने असलेले अवतारी शिक्षक निर्माण केले आहेत. समितीतील शिक्षक शिलेदारांची ही शैक्षणिक धडपड बघून कधी कधी वाटते , देवाने यांना शिक्षक रूपाचा अवतार घेऊन पृथ्वीतलावर पाठवले असावे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...