Saturday, April 9, 2022

🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर

 🛑 गोंधळ : देवीचा एक परिपूर्ण जागर

          काल आमच्या नातेवाईकांच्या लग्नाच्या गोंधळाला उपस्थित होतो. तसा हा माझ्या आयुष्यातील पहिला गोंधळ असेल. गोंधळाची गाणी ऐकली होती. जोगवा चित्रपट बघितला होता. अनेकदा गोंधळ झाल्यावर जेवायला गेलो असेन. संपूर्ण गोंधळ बघायला मिळाला नव्हता. 

          माहूरची रेणुका , तुळजापूरची  तुळजाभवानी , कोल्हापूरची अंबाबाई यांना बोलावणे धाडत गोंधळ मांडला जातो. माझे गोंधळ्यांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष होतं. त्यांनी सुंदर मांडणी केली होती. खणावर रांगोळीसारखे तांदळाचे यंत्र तयार करण्यात आले होते. दिवट्या पेटवल्या होत्या. कापडाचे काकडे बनवले होते. पाच ऊसाच्या दांड्या उभारण्यात आल्या होत्या. मध्यावर कलश ठेवण्यात आला होता. सुके खोबरे , नागवेलीची पाने , सुपाऱ्या , लिंबू , खारीक , बदाम , केळी , फळे आणि इतर पुजा साहित्य मांडून छान सजावट करण्यात आली होती. 

          बाहेर बोकड ओरडत होता. त्याचा बळी द्यायची वेळ आली होती. त्याचा काळही जवळ आलेला मला दिसत होता. त्याला देवीचा भंडारा लावण्यात आला. काहीच मिनिटांत त्या बिचाऱ्या बोकडाचा बळी देण्यात आला होता. त्याचे ओरडणे कायमचे थांबले होते. त्यावेळी मला एक ओळ सुचली होती , " देवीला शरण आणि बोकडाचं मरण "… 

          देवीच्या गोंधळात बोकडाच्या जीवावर आलेले दिसले. त्याच्या जीवनाचा गोंधळच झाला होता. परंपरेने चालत आलेल्या रूढी माणसं जोपासत होती. बोकडाचं मुंडकं आणि पाय हे अवयव देवीला वाहण्यात आले होते. 

          जोगवा मागणे सुरु झाले होते. सात ते नऊ घरांमध्ये यजमान गेले होते. त्यांनी प्रत्येक घराच्या दारात जाऊन ' जोगवा ' मागितला होता. जोगवा पूर्ण झाला होता. त्यानंतर देवीला गोंधळाला येण्यासाठी आळवणी करण्यात आली होती. त्यासाठीची गाणी गोंधळी बुवांनी ठसक्यात म्हटली होती. संबळ वाजवत गाणी तालासुरात म्हटली जात होती. 

          या गोंधळी समाजातील कलाकारांचे आवाज कर्णमधुर असतात. वेगळ्या धाटणीचा आवाज , चाली यामुळे माझ्यासारखा माणूस तिकडे आकर्षिला जातो. मी त्यांची सर्वच गाणी ऐकत राहिलो होतो. आता त्यांनी काही नवीन गाणीसुदधा म्हटली होती. 

          मला त्यावेळी कणकवलीच्या ' पाचंगे ' गोंधळी यांची आठवण आली होती. त्यांचे खायच्या पानांचे दुकान होते. मी लहान असताना त्यांच्या दुकानातून बाबांसाठी पाने घेऊन येत असे. त्यांचे काही ग्रुप असत. एप्रिल , मे या दरम्यान अनेक गोंधळ असत. त्यावेळी हे सगळे ग्रुप आमच्या सलूनमध्ये केस दाढी करण्यासाठी येत असत. त्यात किसन नावाचे एक गोंधळी खूप चांगले होते. त्यांचा आवाज सुरेल होता. गळ्यात सूरपेटी घालून ते गाणे म्हणत. ते आता हयात नाहीत. त्यांच्या आठवणी माझ्या मनात हयात आहेत. त्यात एक ' संतु ' नावाचा गोंधळ्यांच्या संबळवादक होता. त्याचा चेहरा कायम हसरा दिसे. त्याला कितीही बोला , त्याची कितीही चेष्टा करा , तो हसतच राही. तो आता कुठे हसत असेल देव जाणे ?   

          प्राध्यापक हरिभाऊ भिसे यांची गोंधळाची गाणी ऐकली आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कणकवली कॉलेज कणकवलीचे ते अभ्यासकेंद्र प्रमुख होते. अक्षरसिंधु संस्थेचे ते पदाधिकारी आहेत. त्यांनी ही परंपरा जपली आहे. 

          लोककलाकार छगन चौगुले यांच्या अनेक कथा ऐकल्या आहेत. लोककला जोपासना करताना यांना सलाम केलाच पाहिजे. 

          गोंधळ बघताना मी नवीन पाहतोय म्हणून आश्चर्याने भारावून गेलो होतो. गोंधळाचा विधी साग्रसंगीत पार पडला होता. हा दिवसाचा गोंधळ असल्यामुळे ' आख्यान ' झाले नाही. आरती व पाळणा गीते झाली. त्यातील शिवाजीचा पाळणा विशेष होता. 

          दुपारी शाकाहार झाला होता. सायंकाळी किंवा रात्री लोकांनी त्या बोकडाचे मटण प्रसाद म्हणून घेतले होते. कार्यक्रम अतिशय सुंदर , नियोजनबद्ध झाला होता. तरीही माझ्या डोळ्यासमोरुन तो बोकड काही जाता जात नव्हता. मीही या सर्व घटनेचा साक्षीदार असल्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबाबत मला काहीही लिहिणे शक्यच होत नाही. मी सपशेल माघार घेतो आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




Friday, April 8, 2022

🛑 काव्यप्रेमी मंच : उत्तम कविलेखकांचा संच

🛑 काव्यप्रेमी मंच : उत्तम कविलेखकांचा संच

          आज मला एका लेखकांच्या व्हाट्सएप ग्रुपमध्ये सामील होऊन पंधरवडा झाला असेल. या ग्रुपमध्ये प्रतिभावंत लेखक , लेखिका , कवी , कवयित्री आहेत. यात सामील होण्यासाठी मला ओसरगावचे प्रकाश चव्हाण यांनी आग्रह धरला. मी लेखक किंवा कवी नाही. तेवढे मोठे होण्यासाठी मला अजून काही वर्षे लेखनक्षेत्रात कार्य करावे लागेल. मी लिहितो ते वाचकांना आवडते याचा अर्थ मी लेखक झालो असे मला स्वतःलाही वाटत नाही. मी एक साधा शिक्षक आहे. माझ्यामध्ये लेखनक्षमता जरुर आहे. त्यात खतपाणी घालण्याचे काम हा काव्यप्रेमी ग्रुप करत आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे माझा उत्साह द्विगुणित होत चाललेला आहे. त्याची पट वाढतच जाणार आहे याचीही मला खात्री आहे. 

          पूर्वी मी मला हवे तसे लिहीत असे. एखाद्या घटनेकडे बघत बघत सुचत गेले की मला भावेल तसे , वाटेल तसे लिहीत जाई. माझ्याकडे आधीच खूप शीर्षके तयार आहेत , त्यावर वेळ मिळेल तसे लेखन मी करत असतो. मी माझा फावला वेळ मुद्दाम काढतो आणि लिहिण्याची हौस भागवून घेतो. एखादी गोष्ट सुचली की ती लिहिल्याशिवाय राहवत नाही. मग जिथे असेन तिथे माझे लेखनकार्य सुरु राहते. ते लेखन वाचकांना पाठवले की त्यांचे अनेक उदंड प्रतिसाद मला अधिकाधिक लिहिण्यास प्रवृत्त करतात. मी लिहीत जातो , लिहीत राहतो , लिहूनच थांबतो. 

          आचार्य अत्रे यांनी आपले आत्मचरित्र लिहिले होते. ' कऱ्हेचे पाणी ' या आत्मचरित्राचे एक एक खंड केवढे जाडजूड होते. आश्चर्य वाटते , एवढे लेखन करण्यासाठी त्यांना किती वेळ लागला असेल ? त्यावेळी आजसारख्या सुविधा उपलब्ध नसताना त्यांनी प्रचंड लेखन केले होते. त्यांनी लिहिलेली नाटके पाहताना , वाचताना त्यांच्याबद्दलचा आदर वाढत राहतो. त्यांनी त्यावेळी कित्येक भूमिका बजावल्या होत्या. प्राध्यापक , पत्रकार , लेखक , कवी , नाटककार , पटकथाकार , कथाकार , वक्ता आणि कितीतरी !!!! त्यांच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांच्या पुस्तकांची पारायणे करावी लागतील , तरीही ते शक्य होईल असे वाटत नाही. त्यांच्या पासंगाला आपण पुरणार नाही हे कटुसत्य आहे. 

          काव्यप्रेमी शिक्षक मंच म्हणजे एक लेखन कार्यशाळाच आहे. यावर नियम आहेत. बंधने आहेत. शाबासकी आहे. प्रतिसाद आहेत. मार्गदर्शन आहे. नवनवीन लेखांचा संग्रह आहे. नवनिर्मिती आहे. सन्मान आहे. आणि असे बरेच उत्तमोत्तम आहे. मला पंधरवड्यात इतक्या गोष्टींचा शोध लागला आहे. 

          याद्वारे माझ्या लेखनाची गती वाढली आहे. वाचन वाढले आहे. कविता , चारोळी लिहिण्याची सुरुवात मी यामधूनच केली आहे. मी पत्रकारिता करतो , पण लेखनाचे हवे तसे बाळकडू मिळण्याचा स्रोत मला आता गवसला आहे. शब्दाची कोटी करणे , कोट्यवधी शब्दांमधून अचूक शब्द शोधून काढणे जमायला लागले आहे. मंचाने नवलेखकांना अशीच प्रेरणा देत राहावी म्हणजे माझ्यासारखे झाकलेले लेखक नक्कीच प्रथितयश लेखक बनतील यांत मुळीच शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर। ( 9881471684 )



Thursday, April 7, 2022

🛑 भाव अंतरीचे हळवे

🛑 भाव अंतरीचे हळवे

          सगळे शिक्षक नाटक सुरु होण्याची वाट बघत होते. त्या दिवशी वीजबाईने मात्र हिरमोड केला होता. ती एक दोन वेळा गायब झाली होती. आमच्या शिक्षक मित्रांचा दशावतार पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आणि आतुर झालेले होतो. आणि एकदाचे नाटक सुरु झाले होते.

          पात्रे परिचय सुरु झाला होता. त्यावेळी अंगात दशावतार संचारु लागले होते. सगळे प्रेक्षागृह भारावले गेले होते. सुनिल गावकरबुवांची बोटे पेटीवर वेगाने फिरु लागली होती. त्यांचा तिसऱ्या पट्टीतील आवाज रंगमंचाच्या आसमंतात घुमू लागला होता. ते तल्लीन होऊन गात होते. माझे शिक्षक स्वतःचा दशावतार सादर करत होते , याचा मला सार्थ अभिमान वाटत होता. प्रथमेश तांबे आणि उत्तम कदमांनी त्यांना उत्तम साथ दिली होती. 

          दिनेश सुद्रीकसरांनी केलेली रंगमंच व्यवस्था साजेशी होती. खूप कमी वेळात त्यांनी व्यासपीठाचे रूपांतर रंगमंचात केले होते. लेखक आणि दिग्दर्शक सुभाष तांबे गुरुजींनी केलेले मार्गदर्शन नाटक बघताना तोंडात बोट घालायला भाग पाडत होतं. सर्व कलाकार शिक्षकांकडून त्यांनी त्यांच्या भूमिका अचूक वटवून घेण्यात बाजी मारली होती. कोणालाही स्टेजमागून प्रॉमटिंग केलेले दिसत नव्हते. सर्वच कलाकारांनी आपापल्या भूमिका चांगल्या रितीने वटवलेल्या दिसत होत्या. 

          संतोष तांबे यांनी साकारलेला भ्रमरासुर खरा भ्रमरासुर वाटत होता. त्यांची वेशभूषा , रंगभूषा , आवाजाची शब्दफेक , रंगमंचावरील वावर अप्रतिमच म्हणायला हवा. त्यांच्या प्रवेशाला जबरदस्त टाळ्यांचा कडकडाट झाला होता. 

          नाटक सुरु झालं होतं. मी जवळून शुटींग करत होतो. अचानक प्रेक्षागृहातूनच मला एका शिक्षकमित्राचा फोन आला होता. भ्रमरासुराची भूमिका करणारे कोण आहेत असे मला त्यांनी विचारले होते. इतके संतोष तांबे ओळखले जाऊ शकत नव्हते. याचा अर्थ त्यांनी साकारलेला भ्रमरासुर खराखुरा असुर ठरला होता. संतोष तांबे हे एक गुणी प्राथमिक शिक्षक आहेत. ते आमच्या किर्लोस आंबवणे गावच्या शाळेत होते. तेव्हापासून मी त्यांना ओळखतो. त्यांनी आमच्या गावातील अनेक विद्यार्थी घडवले आहेत. 

          कोणत्याही नाटकात नारदाची भूमिका करणारा कलाकार अवलिया लागतो. त्याच्यावर सर्व नाटकाची भिस्त असते. आपल्या महेंद्र पवारांनी  नारदाची इन्ट्री घेतली तेव्हा झालेला जल्लोष त्यांच्या कलेला केलेला सलामच होता. कसले भारी दिसत होते ते !!!  त्यांची मान हलवण्याची व हसण्याची पद्धत खऱ्या नारदालाही लाजवणारी होती. त्यांचे दशावतारी भाषेवर असलेले प्रभुत्व उल्लेखनीय होते. 

          त्यानंतर ब्रम्हराक्षस मोठ्या हास्याचा स्फोट करत आला होता. हा कोण आहे हे ओळखेपर्यंत ' मंगेश राणे ' सरांच्या नावाने टाळ्या आणि शिट्या वाजू लागल्या होत्या. त्यांनी केलेले युद्धनृत्य पुन्हा पुन्हा पाहावे असे होते. 

          कार्यक्रमाच्या दीपप्रज्वलन समारंभात ज्यांच्या बासरीवादनाने प्रेक्षक शिक्षक मंत्रमुग्ध होऊन गेले होते ते सदाशिव राणेसर. नाटकात त्यांनी मारुतीची भूमिका उत्तम प्रकारे वटविली. सदाशिव सरांच्या सुप्तगुणांचा हा मुक्त आविष्कारच होता. 

          चंद्रकेतू राजाची भूमिका राजा भिसे सरांनी राजासारखी निभावली. खरंच राजा भिसे सामान्य जीवनात राजाच आहेत. चंद्रवंदना साकारणारा मसुरकर हा मूळ दशावतारी कलाकार होता. त्याने आमच्या सर्व कलाकारांना जे सांभाळून घेतले त्याबद्दल त्याला धन्यवाद द्यावे तितके थोडेच असतील. सुसंस्कृत स्त्रीच्या सर्व लकबी पाहताना हा पुरुष आहे असे कधीही वाटले नाही. 

          दशावतारी नाटकाची संकल्पना राबवणारे शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , तालुकाध्यक्ष विनायक जाधव , तालुका सरचिटणीस सुशांत मर्गज यांनी घेतलेल्या मेहनतीचे ' भ्रमरासुर वध ' हे नाटक म्हणजे मधुर फळच म्हणायला हवे. पडद्याआड असणारे व पडद्यासमोर राहून नाटक पाहणारे शेवटपर्यंत थांबून असल्यामुळे नाटकाला चार चांद लागले. एक अविस्मरणीय नाट्यप्रयोग नाट्यगृहानेही नक्कीच पाहिला असेल असे म्हटले तरीही वावगे ठरु नये. 

          मी राधानगरीला एका गोंधळाला आलो असताना तिथे अजित कडकडेचे गाणे लागले होते. " तुझे नाम आले ओठी , सूर भारावले "  हे गाणे ऐकत असताना या ओळी ऐकायला मिळाल्या. " भाव अंतरीचे हळवे , जसे जुई फुल , स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल " या ओळी ऐकल्या आणि आमच्या समितीच्या कलाकारांचा नाट्यप्रयोग डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा राहिला. खरंच प्रत्येकाच्या अंतरीचे भाव असेच हळवे असायला हवे , तर आणि तरच स्वतःच्या सुगंधाची भूल पडून असे विलक्षण ' न भूतो , न भविष्यति ' नाट्य घडू शकते.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 नको , नको हा उकाडा

🛑 नको , नको हा उकाडा

          टेरेस फ्लॅट असला की त्याखाली राहणारे उकाड्याने हैराण होतात. आम्ही सतत याचा अनुभव घेत आहोत. " कडाक्याची थंडी , मुसळधार पाऊस परवडला , पण उकाडा नको रे बाबा " असे सगळेच म्हणत असतील. दिवसातून कितीही वेळा आंघोळ करा , घाम यायचा काही थांबत नाही. 

          मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच सकाळची शाळा असली असती तर बरे झाले असते असे वाटू लागते. शासनाच्या १६ मार्च पर्यंत वाट बघता बघता सकाळशिप सुरु होते. सकाळी लवकरचा अलार्म लावावा लागतो. गर्मीमुळे अलार्म वाजण्याच्या अगोदरच जाग येत राहते. नंतर झोपावे तर झोप लागत नसते. फॅनचा रेग्युलेटर पाचच्या पुढे करावासा वाटतो. तोही गरम झालेला असतो. नंतर लक्षात येते की पाचवर म्हणजे तो टॉपवर असतो. एवढा फास्ट असूनही उकाडा थांबत नसतो.

          एकदा उठल्यावर पुन्हा झोप येण्याची शक्यताच नसते. शाळेत साडे बारापर्यंत थांबायचे असते. शाळेत दिवसभर थांबायलाही आवडले असते , पण दुपारच्या ऐन कडावर मुलांना घरी जाताना जो त्रास होत असेल त्याची कल्पना करुनच घामाघूम व्हायला होते.

          सूर्य डोक्यावर राहून आग ओकत असतो. त्याच्याकडे बघणे म्हणजे डोळे फुटायची पाळी. उन्हातान्हात उभी असणारी झाडे कशी सहन करत असतील या उकाड्याला ? दुसऱ्यांना सावली देत स्वतः तप्त ऊन खाणारी झाडे म्हणूनच वाळवंटातील मृगजळ वाटत राहतात. 

          खेड्यातील मुलांना या उन्हाची सवय झालेली असते. भर उन्हात शेतात काम करणारे शेतकरी पाहिले की आपण उगाचच ' उकाडा वाढलाय ' असं म्हणतो त्याची लाज वाटते. रस्त्यावर अनवाणी चालणारी मुले , माणसे पाहिली की त्यांच्या पायांची कीव करावीशी वाटते. त्यांचे पाय भाजत असले तरी त्यांनी त्या भाजण्याची सवय करुन घेतली असेल. 

          हे सगळं पाहिलं की आम्हाला गाडीने जाताना कडक उन्हाचे चटके बसले तरी ते सुसह्य वाटू लागतात. मग बिचाऱ्या या सहनशील माणसांची देवाला दया येत असेल. मग तो अचानक पाऊस घेऊन येतो. पाऊस पडताना गारवा येतो. पाऊस पडून गेल्यावर पुन्हा अधिक उकाडा जाणवू लागतो. 

          थंड हवेची ठिकाणं खुणावू लागतात. ज्यांचे खिसे गरम असतात , ती लोकं थंड होण्यासाठी जातात. पैसे संपले की त्यांना गरम होऊ लागतं. हल्ली लोकांना वातानुकूलित घरात राहण्याची सवय झाली आहे. जातील तिथे एसी सुरु करण्याची ऑर्डर सोडतील. त्यामुळे शरीराला कृत्रिमतेची सवय होऊ लागते आहे. ही कृत्रिम हवा आरोग्यदायक नाही हे माणसाला समजत नाही. काहीवेळा एसी सुरु असतानाही फॅन सुरु ठेवणारी माणसे मी पाहिली आहेत. उकाडा असताना फॅन लावणे ठिक आहे. काही मुलांना , मोठ्या माणसांना थंडीच्या दिवसातही पाचवर फॅन लावल्याशिवाय झोपच लागत नाही. पाचवर फॅन लावतील आणि डोक्यावरुन पांघरुण घेऊन मगच गाढ झोपी जातील. आता या माणसांचे उन्हाळ्यात काय हाल होत असतील याची कल्पना केलेलीच बरी. 

          त्यापेक्षा बाहेर पडताना छत्री वापरा , गाडीवर हेल्मेट वापरा. पांढरी सुती टोपी वापरा. निसर्गाच्या सानिध्यात राहा. संध्याकाळी थोडे चाला. मातीच्या माठातलं थंडगार पाणी प्या. लिंबूपाणी पिऊन तहान भागवा. साध्या थंड पाण्यात रतांबे पिळून त्यात थोडी साखर टाकून कोकम सरबत प्या. आता ही सगळी पेये तयार मिळू लागली आहेत. कोल्ड्रिंक्सपेक्षा फळांचा ज्यूस पिणं केव्हाही चांगलंच. 

          विहिरीवर जाऊन ताज्या थंड पाण्याची मस्त आंघोळ करा. आता या आंघोळीची तहान आपण शॉवरखाली आंघोळ करुन भागवतो आहोत. उष्माघात होऊ नये म्हणून शरीर थंड ठेवाच , आणि तुमचं मनही तसेच थंड ठेवा. नाहीतर कितीही एसीत असलात तरी उकाडा जाणवल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, April 6, 2022

🛑 योगवसुधा आणि वसुधायोग

🛑 योगवसुधा आणि वसुधायोग

          हल्ली योग करणारी माणसं गावोगावी दिसू लागली आहेत. मला योगाची आवड आहे. हे योग योग्य प्रकारे करावे लागतात. नाहीतर त्याचे तोटे संभवतात. डीएडला असताना कणकवली कॉलेजच्या प्राध्यापक विलास पाटील सरांकडून योगा शिकण्याचा योग जुळून आला. सलग एकवीस दिवस योगाचे प्रात्यक्षिक अनुभवले. तेव्हा त्याचे विशेष वाटले नाही. नवीन काहीतरी शिकावे या हेतूने शिकलो होतो. त्याचे प्रमाणपत्र जपून ठेवले होते हे माझे योगनशीबच म्हणायला हवे. 

          त्या एका योगप्रवेश प्रमाणपत्रामुळे मला पहिली नोकरी मिळाली. माझी ही अतिरिक्त पात्रता कामी आली होती. चाळीसजणांमधून माझी निवड व्हायला केवळ योग कारणीभूत होता. योगायोगानेच मला नोकरी मिळाली होती हाही माझा भाग्ययोगच.  

          नोकरी मिळाल्यानंतर योग येईल तसा योग शिकवत होतो. नंतर प्रसंगानुरुप अभ्यासापुरता योग करत असे. तीन वर्षांपूर्वी योगशिक्षक अभ्यासक्रम पूर्ण करावा असे मनात आले. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ संलग्न डॉ. वसुधा योगा अकॅडमी वेंगुर्लेमध्ये प्रवेश निश्चित केला. 

          अकॅडमीच्या संचालिका डॉ. वसुधा मोरे ह्या स्वतः B.A.M.S. D. Yoga. M.S.Yoga (S -VYASA-Banglor) पदव्युत्तर पदवी घेतलेल्या उच्च विद्यविभूषित डॉक्टर व योगशिक्षिका आहेत. त्यांना आयुष मंत्रालयाची मान्यता मिळालेली आहे. प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या या विद्वत्तेचा अनुभव आला. त्यांचा योगाचा खोलवर असलेला अभ्यास आम्हाला थक्क करणारा होता. आम्हाला योगाच्या महागुरु मिळाल्या होत्या. 

          त्यांचे अध्यापन ऐकताना , त्यांच्यासोबत प्रात्यक्षिक करताना खूप शिकता आले. त्या खऱ्या अर्थाने योगगुरु आहेत. योगाचे यम आणि नियम त्यांनी नेहमीच पाळले आहेत. योगसिद्धांताचा त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यांच्या आवाजात मृदुता असते. सतत संयमाने जीवन जगण्यासाठी त्या आम्हाला प्रेरित करतात. त्यांच्या नेहमीच्या वागण्या बोलण्यातून आम्ही खूप काही शिकत गेलो. त्यांनी डॉक्टर हा व्यवसाय सदैव पेशा म्हणून करण्याचे व्रत अंगिकारले आहे. त्यांच्या अर्ध्या तासांच्या मार्गदर्शनाने आपल्यात लक्षात येण्याइतका बदल घडू शकतो. मला त्यांचे तीस ते चाळीस पूर्ण दिवसांचे प्रत्यक्ष व ऑनलाईन मार्गदर्शन लाभले. त्यांनी नेहमीच पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. पुस्तकातला योगा अंतरात उतरवला आहे. त्यांनी दिलेली योगनिद्रा अजूनही आठवते. दररोज नवनवीन हालचाली शिकवताना त्या आपले वय विसरुन जाताना दिसतात. ज्या हालचाली आम्हाला अजिबात जमत नव्हत्या , त्या हालचाली त्यांना लिलया जमत होत्या. आम्हाला कधीकधी आमचीच लाज वाटे. पण हळूहळू त्यांनी आमच्यात आत्मविश्वास रुजवला. आम्ही त्यांच्यासारखे करत गेलो नि घडत गेलो. त्यांची शाबासकी मिळत गेली. 

          त्यांचा दिवस सकाळी ५ वाजता सुरु होतो. त्या लंडनमधील लोकांचे ऑनलाईन क्लासेस घेतात. तसेच अमेरिका, युरोप आणि संपूर्ण भारतातुन मद्रास, कलकत्ता, गोवा,कर्नाटक,आंध्रप्रदेश ,हिमाचल ,उत्तराखंड येथील विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत. आपल्या शेजारील गोव्यातील अनेक विद्यार्थी त्यांच्या हाताखाली तयार होत आहेत. सिंधुदुर्गातील अनेक डॉक्टर त्यांचे शिष्य आहेत. मी शिकत असताना माझ्यासोबत दहा ते बारा डॉक्टर्स देवगड , कुडाळ , सावंतवाडी , गोवा इथून शिकायला येत होते. 

          त्यांचे नावच वसुधा आहे. वसुधा म्हणजे पृथ्वी. ज्या पृथ्वीवर आपण राहतो , ती किती विशाल आहे. तसेच वसुधा मॅडमांचे योगातील ज्ञान विशाल पृथ्वीसारखे आहे. म्हणूनच त्या आमच्यासाठी सदैव ' योगवसुधा '  ठरतात. योगा शिकताना नेहमीच जमिनीला वंदन करावे लागते. वाकावे लागते. वसुधेला नतमस्तक व्हावे लागते. डॉ. वसुधा मोरे यांना आमचा नेहमीच साष्टांग सूर्यनमस्कार असणार आहे. 

          त्यांना नमस्कार करण्याचा अनमोल योग आमच्या जीवनात आला म्हणूनच आम्हाला या योगालाच ' वसुधायोग ' म्हणणे योग्य वाटते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, April 5, 2022

🛑 ऊनसाळा

 🛑 ऊनसाळा

           " ऋतू आला वसंत सांगायला हो , अन घुंगरु घ्या तुम्ही बांधायला " हे गाणे आम्ही खूप पूर्वी या मोसमात म्हणत असू. शाळेत शिकवत असू. मुले हे गाणे नाचून म्हणताना खूप आनंदित होऊन जात. वसंत ऋतू आला की निसर्गाच्या बदलाने तनमन प्रफुल्लित होऊन जाई. 

          सध्या वसंत ऋतू सुरु आहे. वातावरणात घडून येत असलेले बदल पाहून ऋतूच समजेनासे झाले आहेत. सकाळी लवकर उठून शाळेत जायची तयारी सुरु केली होती. आंघोळ करायला गेलो असेन , बाहेर पाण्याची टाकी ओव्हर फ्लो झाल्यासारखे वाटले. पण पावसाळ्यात जसा पाऊस पडतो तसा मुसळधार पाऊस सुरु झाला होता. शॉवरखाली मस्त थंड पाण्याचे भराभर फवारे घेत असताना बाहेर पावसाचा आवाज वाढत चालला होता. मी जणू पावसात न्हात असल्याचा अनुभव घेऊ लागलो होतो. एप्रिलच्या उन्हाळ्यात पावसाच्या सरी पडाव्यात हे खरे वाटत नव्हते. पण पाऊस धो धो कोसळत होताच. बाहेरचा दरवाजा उघडला तसा थंड वारा गडबडीने आत शिरला होता. 

          यावर्षी तिन्ही ऋतूंमध्ये पावसाने हजेरी लावल्याने कमालीचे आश्चर्य वाटत होते. पावसाळ्यात ठीक आहे , पण आता बारमाही पाऊस हे जरा जास्तच वाटत होतं. पण हे पावसाला माहीत नसावे. त्याने   कदाचित कधीही बरसायचा विडा उचललेला असावा. असा हा अनाहूत पाऊस हिवाळ्यात पडला त्यावेळी आम्ही त्याला ' हिवसाळा ' म्हटले होते. आता तो उन्हाळ्यात कडाक्याचे ऊन पडण्याच्या दिवसात सकाळीच येऊन ठाण मांडून बसला होता. आता त्याला ' ऊनसाळा ' म्हटले तरी त्याला त्याचे काहीच वाटणार नव्हते. तो कुठे शाळेत जाणार होता शिकायला किंवा शिकवायला ? 

          शाळेत जायची घाई आणि पावसाची ही धिटाई. आलेयुक्त मस्त चहा समोर आला. गरमागरम असल्याने त्यावर फुंकर घालत पित पित पावसाच्या जाण्याची वाट बघितली. चहा पिऊन झाला आणि पाऊसही गेला. 

          मध्येच विजांच्या लख्ख रेषा आकाशात उजेड आणू पाहात होत्या. ' धुडूम म्हातारी ' जोराने ओरडत होती. ढगांच्या गडगडाटाला आम्ही ' घुडूम म्हातारी किंवा धुडूम म्हातारी ' म्हणत असू. लहानपणी आम्हाला या अक्राळविक्राळ म्हातारीची खूप भीती वाटे. तिच्या विचित्र असण्याची आम्ही विविध चित्रे मनात रंगवली होती. शाळेत गेल्यावर त्याचे शास्त्रीय कारण उमगले. वीजबाईने तोपर्यंत आमच्या शरीरातली वीज घालवून टाकली होती. 

          गडबडीत शाळेत निघालो. गाडीवर स्वार झालो. गाडीने आज आंघोळ केली होती. ती स्वच्छ दिसत होती. गाडी सुरु झाली. थोडे अंतर गेलो असेन , तोवर पुन्हा पावसाचे थेंब अंगावर कोसळत आहेत असे वाटले. मागे येऊन रेनकोट घ्यावा लागला. 

          सध्या छत्री आणि रेनकोट कधी लागेल सांगता येत नाही. त्यामुळे ते लवकर हाताला मिळतील अशा जागी मुद्दाम ठेवावे लागतात. 

          नेहमीप्रमाणे भरधाव निघालो. दहा पंधरा मिनिटे पाऊस सोबत करत होता. मस्त वाटत होतं. शाळेत जाणाऱ्या मुलांची , शिक्षकांची पावसाने त्रेधातिरपीट उडवून टाकली होती. मी आपला रेनकोट असल्याने मजेत निघालो होतो. पुढेही पाऊस पडून गेल्याची चिन्हे दिसत होती. 

          नंतर दिवसभर पाऊस दडून बसला होता. रात्रीच्या भोजनाच्या वेळी तो पुन्हा गडगडाट करत आलाच. थोड्या वेळापूर्वी जवळ वाढदिवसाच्या निमित्ताने कोणीतरी फटाके वाजवले होते. फटाक्यांच्या आवाजाने पुन्हा पावसाला धडामधुडूम करत यावेसे वाटले. तो बाहेर बरसत राहिला तसा मीही शब्दरूपाने तसाच बरसत राहिलो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

🛑 समितीचा शिक्षकावतार आणि शिक्षकाविष्कार

          नुकतेच कणकवली शिक्षक समितीचे त्रैवार्षिक अधिवेशन मोठ्या धुमधडाक्यात संपन्न झाले. कार्यक्रमाची पूर्वतयारी , सभा , प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी ,  शिलेदारांनी दिलेला वेळ व योगदान लक्षात घेण्यासारखे आहे. आपला सोहळा साजरा होत आहे ही प्रत्येक सदस्याच्या मनात असलेली भावना याला कारणीभूत आहे. स्वतःच्या घरातला सोहळा असावा तसे सर्वजण या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करताना दिसले. 

          आपली समिती ही पूर्वीपासूनच अशा धुरंधर शिलेदारांची खाणच आहे. त्यात आता महिलांनी झाशीच्या राणीप्रमाणे साथ द्यायला सुरुवात केल्यामुळे लढा भक्कम होत चालला आहे. सन १९६२ पासून स्थापन झालेल्या आपल्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीला यंदा २०२२ साली साठ वर्षे पूर्ण होत आहेत या गोष्टीचा अत्यानंद आहे. 

          सकाळपासून त्रैवार्षिक अधिवेशनाची लगबग सुरु झाली होती. राज्याध्यक्ष उदय शिंदेसाहेब कार्यक्रमाच्या वेळेपूर्वीच उपस्थित झालेले दिसले. आपल्या शिलेदारांची होत असलेली धावपळ ते स्वतः बघत होते. त्यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निरीक्षण केले होते. कणकवली तालुका शाखेचे उपक्रम पाहून ते अतिप्रसन्न झालेले दिसले. शाखेच्या शैक्षणिक , सामाजिक व संघटनात्मक कार्याची भलीमोठी यादी पाहून ते त्यावर भरभरुन बोलताना दिसले. त्यांनी कणकवली तालुका शाखेच्या शिलेदारांची विशेषतः तालुकाध्यक्ष , तालुका सरचिटणीस यांची पुनःपुन्हा नावे घेत  तोंड भरुन स्तुती केली. त्यांनी केलेले मार्गदर्शन अनमोल असेच होते. म्हणूनच कणकवली शाखेचे उपक्रम राज्याला रोल मॉडेल ठरावेत असा त्यांनी पुनरुच्चार केला होता. 

          बासरीवादनाने कार्यारंभ झाल्याने सर्वांचे कान तृप्त झाले होते. दीपप्रज्वलन संपन्न होताना सर्वांच्याच चेहऱ्यावर भक्तिभाव फुलताना दिसला. त्याला जोड मिळाली ती महिला आघाडीने सादर केलेल्या ईश्वस्तवन व स्वागतपद्याची. सूर , लय आणि ताल यांचा त्रिवेणी संगम साधत वाद्यवृंदांनी दिलेली साथही अविस्मरणीय अशीच. 

          संपूर्ण प्रेक्षागृहात तुडुंब गर्दी असताना सर्वांचेच लक्ष कार्यक्रमाकडेच होते , हातातल्या मोबाईलकडे नव्हते. कार्यक्रम चढत्या क्रमाने पुढे पुढे सरकत होता. राजेश कदम यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने सर्वांचे लक्ष व्यासपीठाकडे अक्षरशः खिळून राहिले होते. 

          सर्व मान्यवरांचे शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष विनायक जाधव यांनी मुद्देसूद व भावणारे प्रास्ताविक सादर केले. त्यांच्या बोलण्यात विनम्रता होती. प्रत्येक उपक्रमाविषयी त्यांनी आपले अनमोल विचार मांडलेच , आणि व्यक्तींच्या नावांचाही उपक्रमानुरूप उल्लेख केला. सर्वांचीच नावे त्यांना घ्यायची इच्छा दिसत होती. म्हणूनच गेली तीन वर्षे त्यांनी केलेल्या अहोरात्र कामाची शाबासकी त्यांना राज्यात नक्की मिळेल असे राज्याध्यक्ष साहेबांनी सुचित केले आहे हीसुद्धा शाखेच्या उत्तम कार्याची पोचपावतीच म्हणायला हवी. 

          समितीचे पाईक असे आहेत की त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी ते आपले कार्य करीतच राहतात. सर्वसामान्य समिती शिलेदार म्हणूनच अधिक श्रेष्ठ ठरतो अशी प्रत्येक शिक्षक नेत्यांची निर्मळ भावना असते. समिती शिलेदारांच्या रोमारोमात " त्याग आणि सेवा " वास करत असते. समितीच्या सानिध्यात आल्यानंतर समजते की समिती काय चीज आहे ते ? न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड बाळगत समितीचे शिलेदार नेहमीच संघटनात्मक कार्य करण्यात अग्रस्थानी असतात. 

          विविध शैक्षणिक उपक्रम राबवताना मुलांचा प्राधान्याने विचार केला तो समितीने. मुलांसाठी गाऊ आनंदे , लेट्स लर्न इंग्लिश , राष्ट्रभक्तीपर गीतगायन , खजिना कथांचा , कलांकुर असे अनेक अभिनव नवोपक्रम राबवले. सर्व बंधू भगिनींना सहभागी करुन घेतले. अभ्यासपूरक व ऑनलाईन उपक्रमांमुळे लॉकडाऊन काळातही विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिकण्यास प्रवृत्त झाले. बावीस केंद्रातील गरीब होतकरु मुलांना सर्व प्रकारचे शैक्षणिक साहित्य उपलब्ध करुन देतानाही समितीचे दातृत्व लक्षात येते. कोविडमुळे अकाली निधन झाल्यामुळे अनाथ झालेल्या मुलांना तातडीची रोख मदत देऊन ' आम्ही तुमच्यासोबत आहोत ' हा दिलेला दिलासा मानसिक आधार देणारा होता. मोफत शिष्यवृत्ती सराव  परीक्षा घेऊन स्पर्धा परीक्षेला सामोरे जाण्याचे बळ विद्यार्थ्यांना नेहमीच दिले आहे. क्रीडास्पर्धेत खेळताना जखमी झालेल्या मुलांना तातडीची मदत करण्याचे व्रत समितीने अंगिकारले आहे , त्यामुळे आकस्मिक निधी मिळून मदतीचा हात मुलांना , पालकांना प्रासंगिक सहकार्याचा ठरतो आहे. अशा प्रकारे शैक्षणिक , सामाजिक कार्य करत असताना शिक्षकांचे वैयक्तिक प्रश्नही सोडवले जात आहेत. चेकपोस्टवर ड्युटी असताना समिती सदैव शिक्षकांच्या सोबत राहिली आहे. ऑक्सिजन प्लँट सारख्या मोठया आर्थिक घडामोडीत भरीव मदत करणारी समितीची सिंधुदुर्ग शाखा सामाजिक भान जपणारी संघटना ठरली आहे. 

          विविध तालुक्यांमध्ये समितीने अनेक माध्यमातून विद्यार्थी , पालक यांचे हित जपणारे उपक्रम नेहमीच राबवले आहेत. शिक्षकांच्या सांस्कृतिक , शैक्षणिक गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम , समितीचे दशावतारी कलाकार घेऊन नाटके सादर केली आहेत. समितीने अशी विविध रत्ने असलेले अवतारी शिक्षक निर्माण केले आहेत. समितीतील शिक्षक शिलेदारांची ही शैक्षणिक धडपड बघून कधी कधी वाटते , देवाने यांना शिक्षक रूपाचा अवतार घेऊन पृथ्वीतलावर पाठवले असावे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर (  9881471684 )



आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...