सकाळी उठून सहज फेसबुक उघडले. गानसम्राज्ञी लतादिदींचा एक व्हिडिओ समोर आला. त्यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला दुःख झाले असेल. प्रत्येक घराघरांत दिदी पोहोचल्या असताना घरोघरी दुःख झालेले आहे. त्यांच्या दिव्य सुरांनी प्रत्येकाचे कान कायमच तृप्त होत राहणार आहेत.
' ने मजसी ने ' हे सावरकरांनी रचलेले देशभक्तीपर गीत मंगेशकर भावंडांकडून ऐकताना मंत्रमुग्ध होत असताना माझ्या डोळ्यांतून हळुवार पाणी ओथंबू लागले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गीतामध्ये मातृभूमीकडे परत येण्याची अतितीव्र ओढ लागलेली आहे. ते सागराला आपला प्राण तळमळल्याचे सांगत आहेत. आज आपल्यात लतादिदी नाहीत , पण त्यांच्या सर्व गाण्यांनी त्या अमर ठरल्या आहेत. त्यांचे कोणतेही गाणे लावले , तरी त्या ओळी गुणगुणव्याशा वाटतील अशाच आहेत. गानकोकिळा भारतरत्न लतादी म्हणूनच महान आहेत. पुढील कित्येक पिढ्या त्यांच्या श्रवणीय गीतांचा आस्वाद घेत राहतील.
हल्ली अनेक गाणी येतात , हिट होतात. लतादिदींची गाणी एव्हरग्रीन आहेत. ती कोणत्याही काळात ऐका , ती नेहमीच आपलीशी वाटत राहतात. त्यांच्या आवाजाची जादूच तशी आहे.
' ने मजसी ने ' हे गाणे मीही समूहसुरात म्हटले आहे. खूप अवघड शब्द आहेत त्या गाण्यात. अचूक यमक जुळवलेले आहेत. चाल कर्णमधुर आहे. अशी अवीट गाणी ऐकण्याचे व गाण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले हेच आमचे परमभाग्य. लहानपणी अक्षरसिंधुमधील गायक महेश काणेकर यांच्याकडून मी हे गाणे ऐकले होते. त्यांच्या गायनाचा प्रभाव माझ्यावर पडला होता.
मी डी. एड. ला असतानाची गोष्ट आहे. त्यावेळी आमचे प्राचार्य शहा सर होते. प्राचार्य कसे असावेत ? याचे मूर्तीमंत उदाहरण होते ते. त्यांच्याबद्दल आम्हां छात्रशिक्षकांना कमालीची आदरयुक्त भीती होती. मी प्रथम वर्षात शिकत असताना द्वितीय वर्षात एक गोड गळ्याची गायिका शिकत होती. आमचे परिपाठ एकत्र होत असत. त्यामुळे आम्हांला त्यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे आविष्कार नित्य पाहायला मिळत. तिचे नाव फुलासारखे होते. तिचे आडनाव गावाच्या नावावरुन होते.
आज ती आमच्यासमोर एक गाणं सादर करण्यासाठी पुढे आली होती. ती गायला लागली , ती जणू लता मंगेशकरांच्या आवाजात गात होती. मी डोळे बंद करुन गाणे ऐकू लागलो होतो. " ए मेरे वतन के लोगो , जरा आँख में भर लो पानी , जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी " तिने हे गाणे पूर्ण म्हटले होते. गाणे संपले होते , मी डोळे उघडले होते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या होत्या.
प्राचार्य शहासरांनी आपला चष्मा काढला होता. त्यांचे डोळे भरुन आले होते. त्यांनी आपले डोळे पुसायला सुरुवात केली होती. टाळ्या वाजवणारे आमचे हात अचानक थांबले होते. त्या गीताने खरंच रडायला लावले होते. शहासरांनी त्या मुलीला अशा प्रकारे शाबासकी दिली होती. त्यानंतर तिने हेच गाणे पुन्हा ज्या ज्या वेळी गायिले होते त्या त्या वेळी आम्ही सारखाच अनुभव केला होता.
असे अनेक दिग्गज आहेत , ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ' न भूतो न भविष्यती ' असे कार्य केलेले आहे. रमेश देव असतील , सिंधुताई सकपाळ असतील आणि आता लतादिदी असतील.
सगळेच आम्हाला हवेहवेसेच आहेत. स्वर्ग असलाच तर त्यांना स्वर्गात नक्कीच स्थान मिळेल यात शंका नाही. नुकतीच बातमी ऐकली , दशावतारी नटसम्राट सुधीर कलिंगण यांचे दुःखद निधन झाले. रोज अशा धक्कादायक बातम्या वाचून , ऐकून आपण या अभूतपूर्व व्यक्तिमत्वांना पारखे झालोय याचीही खंत वाटतेय. या सर्व मंडळीनी चित्रगुप्ताकडे जाऊन हेच गाणे परत परत म्हणावे असे वाटते , " ने मजसी ने परत मातृभूमीला "
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )
No comments:
Post a Comment