Sunday, August 4, 2024

🛑 दूर देशी गेले बाबा

🛑 दूर देशी गेले बाबा

         सलील कुलकर्णी यांच्या अल्बम मधील ' दूर देशी गेला बाबा ' हे गाणे मला खूप आवडत असे. बाबा सोबत असताना हे गाणं ऐकताना त्यातल्या शब्दांकडे कमी लक्ष जाई. सलीलच्या आवाजातील आर्तता मला नेहमीच आवडते. पण आता बाबा नसताना हे गाणं ऐकणं मला तरी कठीण जाईल. 

         लहानपणापासून ज्या बाबांचे बोट पकडून कायमच सगळीकडे जाणारा मी आता या बोटाला पारखा झालो आहे. बाबांचे बोट पकडण्यात एक वेगळ्या प्रकारची आश्वासकता होती. कितीही मोठा झालो तरी बऱ्याच गोष्टी बाबांना विचारल्याशिवाय मी केल्या नाहीत. त्यांचा आदेश शिरसावंद्य मानूनच पुढे जाणे सावधगिरीचे असे याचा मी अनेकदा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. 

         त्यांची आणि माझी सोबत कधीही न संपणारी असेल असे मला वाटले होते. बाबा गेले आणि माझ्यातून एक अदृश्य चैतन्यशक्ती वेगळी होत असल्याची थरथर जाणवते आहे. बाबा म्हणजे काय अदभूत रसायन असतं ना ? 

         आज आई आणि बाबा दोघेही नाहीत. त्यांच्यासोबतच्या अनेक उत्तम आठवणी माझ्याभोवती नुसत्या रुंजी घालत आहेत. त्यातल्या अनेक माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्या जपून ठेवणे माझे कर्तव्य आहे. माझे बाबा माझ्यासोबत सतत सोबत्यासारखे पाठीशी राहिलेले आहेत. त्यांच्या केवळ असण्याने माझी अवघड कामेसुद्धा चुटकीसरशी मार्गी लागत असत. आता मात्र मला त्यांची तीव्र उणीव भासत राहणार आहे. 

         त्यांच्यासाठी काही दिवसांपूर्वीच नवा बेड घेतला होता. तो बघून त्यांना किती आनंद झाला होता. त्यावर बसून त्यांचे टीव्ही पाहणे, मोबाईल बघणे, पेपर वाचणे अशी दैनंदिन कार्यें पार पडत. आता तो बेड सुना सुना बघवणार नाही. त्यांनी वापरलेल्या सर्व वस्तूंमध्ये मला ते दिसत राहतील. पहिल्यांदा मला त्याचा त्रास होईल, पण मग त्यांच्या आठवणीच्या कोषात मी रमून जाईनही. हे माझे आताचे दिवास्वप्न आहे. 

         काल बाबा गेल्यानंतरचा दहावा दिवस होता. आम्ही नदीशेजारी स्मशानभूमीत धार्मिक विधीसाठी गेलो होतो. एकही कावळा कुठेही दिसत नव्हता. पिंडाला कावळा स्पर्श करायला येईल अशी सर्वांची इच्छा होती. मी पिंड हातात घेऊन इकडे तिकडे फिरत बाबांना हाका मारत होतो. काव काव, बाबा या हो..... पिंडाला स्पर्श करा ना..... मला एका क्षणाला मोठ्याने हंबरडा फोडावा असे वाटले होते. पण मी स्वतःला सावरलं. माझे बाबा माझे नक्कीच ऐकणारे होते. त्यांनी काकरूपाने येऊन माझ्या हातातील पिंडाला स्पर्श करावा असे वाटत असले तरी मला मुळीच वाईट वाटलेले नाही. त्यांचे माझ्यावर अपार प्रेम होते. त्यांचे पुत्रप्रेम असेच अबाधित राहणार आहे याबद्दल शंका बाळगण्याचे कारणच उरत नाही. 

         कारण स्वतः बाबांनी मला सांगितले होते. ते असेच कधीतरी वाढी ठेवत होते. लहानगा मी त्यांच्या सोबतच असे. ते ' आ आ ' करत होते. एकही कावळा वाढीला स्पर्श करायला आला नव्हता. मी न राहवून बाबांना विचारले होते, " बाबा, आज कावळा का आला नाही? " तेव्हा बाबा म्हणाले होते, " अरे झिला, हे कावळे असेच असतात, कधी येतील, कधी येणार नाहीत, पण आपण आपल्या पूर्वजांना अजिबात विसरायचे नाही. " बाबा आमचे प्रॅक्टिकल होते. ते आधी करत,मगच सांगत. त्यामुळे त्यांच्या सर्व गोष्टी मला पटत. 

         कणकवलीतील आमच्या रूमवर बाहेरच्या कटड्यावर बाबांनी बिस्किटे ठेवताक्षणी कुठूनतरी कावळे येत आणि बिस्किटे वरच्यावर उचलत. बाबांना आणि आमच्या घरातील सर्वांनाच मग दैनंदिन सवयच लागली आहे. देवाचे पूजन झाले की आपण काहीही खाण्यापूर्वी कावळ्यांना बिस्किटे, फरसाण असे खाऊ घालण्यात येते. 

         काल नदीशेजारी एकही कावळा फिरकताना दिसला नाही. कदाचित हे सगळे कावळे कणकवलीला आमच्या खोलीच्या बाहेर बाबांची वाट बघत नसतील ना? किती दिवस खोली बंद आहे. आमचा खाऊ घालणारा कुठे गेला असेल ? 

         आता तेराव्या दिवशी कणकवलीला गेलो कि मी पहिल्यांदा बाबांच्या ' काकमित्रांसाठी ' साद घालीन आणि त्यांना बिस्किटे, खाऊ दिल्याशिवाय मला स्वतःला स्वस्थता लाभणार नाही. माझे दूर देशी गेलेले बाबा सुद्धा त्यांच्याबरोबर यावेत अशी मी माझ्या बाबांच्या पवित्र आत्म्याकडे साश्रू नयनांनी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

🛑 शिक्षक स्मृती ठेवुनी जाती

          बदली हवी असली तर ती झाली पाहिजे अशी प्रत्येकाची तीव्र इच्छा असते. कोकणात येणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला परत आपल्या जिल्ह्यात जायची इच्छा झाली तर नवल वाटायला नको. आमचे काही मित्र एकदम बदली न करता सामूहिक राजीनामे देऊन आलो तेव्हा असेच झाले होते. सिंधुदुर्गात नोकरी मिळाली म्हणून आम्हांला खूप आनंद झाला होता. एक नोकरी सोडताना डोळ्यात आसू होते आणि दुसरी लगेचच स्वीकारताना ओठात हसूही होते.

         खोत आणि कासार दोघेही कोकणातील सिंधुदुर्गात मिसळून गेले होते. दोघेही तंत्रस्नेही. उच्चविद्याविभुषित. ज्या शाळेत जातील तिथे वेगळा ठसा उमटवणारे नवोपक्रमशील शिक्षक. 

         रस्सा मंडळातील काही सदस्य आधीच बदलीने निघून गेल्यानंतर आता तर रस्सा संपून गेल्याची जाणीव होऊ लागली आहे. रस्याची चव तेवढी जिभेवर रेंगाळते आहे. असे गेट टुगेदर करताना त्यांनी केलेली नियोजने नेहमीच भाव खाऊन गेलेली. आपुलकीचे शब्द आणि जिव्हाळ्याचा रस्सा थंड होत असताना तो पुनरुज्जीवीत करण्याची जबाबदारी नवनियुक्त शिक्षकांनी पेलावी अशी आम्ही जुने शिक्षक अपेक्षा बाळगून आहोत. नवनियुक्त शिक्षक नव्या दमाचे आहेत. ते जुन्यांपेक्षा अधिक तंत्रस्नेही असतील तर त्यांच्याकडूनही खूप शिकण्याची आमची तयारी आहे. 

         अनिल खोत आणि प्रवीण कासार मला येथेच भेटले. त्यांच्याकडून आम्ही सगळेच शिक्षक खूप काही शिकलो आहोत. अनिल खोत म्हणजे जणू केंद्राचे खोतच. त्यांनी एखादी गोष्ट सुचवली त्यावेळी ती आम्ही सर्वांनी उचलून धरली आहे. त्यांचं बोलणं नेहमीच ऐकत राहावं असं. बोलण्यात विनोदी शैली आणि विषयाचे मुद्देसूद विवेचनसुद्धा. त्यांनी अनेकदा सूत्रसंचालन केलेले मी पाहिले आहे. त्यांचे वक्तृत्व ओघवते असते म्हणून ते सर्वांना आवडते. ते उभे राहतील तिथे त्या जागेचे सोने करतील. सोने म्हणजे ते सोने नव्हे. ते नेहमीच सभा जिंकत. यापुढेही त्यांनी असेच करावे. संघटनेचे पदाधिकारी म्हणून त्यांना अधिक जवळून पाहता आले. त्यांनी केलेली शैक्षणिक साहित्याची पखरण वर्गभर वर्षत राहणारी अशीच. ते पुढे अजून अधिक शिकत आहेत म्हणून मला त्यांचा अधिक अभिमान वाटतो. 

         कासार ह्यांच्या नावातच प्रवीण आहे. त्यांचं हसणं लाजबाब. त्यांचं सहकार्य लाखमोलाचं असतं. त्यांनी कमी कालावधीत सजवलेला वर्ग आमच्याशी शिक्षण परिषदेच्या वेळी बोलला आहे. ज्यांच्या वर्गाच्या भिंती बोलतात, त्यांचा वर्गही तसाच बोलू लागतो. त्यांनी अगदी तसेच केले आहे. पुढे हजर होणाऱ्या शिक्षकांना असे वर्ग अधिक पुढे नेण्यासाठी खूप सोपे जाणार हे नक्कीचे आहे. मला एकदा एका लिंकबद्दल काही अडचणी आल्या होत्या. मला काहीकेल्या जमत नव्हते. मग मला कासारांच्या प्रवीणतेची आठवण आली. मी त्यांना फोन करुन समस्या सांगितली. त्यांनी पाचच मिनिटात माझे काम करुन त्याचा स्क्रिनशॉट सुद्धा पाठविला. क्रीडास्पर्धेच्या वेळी या सर्वांनीच मला उदंड सहकार्य केलेले आहे. शेर्पे केंद्रातील सर्वच शिक्षकांकडून आपल्याला हवा असतो त्यापेक्षा जास्त आदर मिळत असतो हे त्यांचे मोठेपणच आहे. 

         असे हरहुन्नरी शिक्षक बदली होऊन जातात तेव्हा खूप हुरहूर लागते. चणचण भासते. त्यांची उणीव भरुन काढणारे शिक्षक नियुक्त होतीलच. तरीही त्यांच्यासोबत घालविलेल्या आठवणी आम्हां सर्वांसाठी अनमोल ठेवा असणार आहेत. 

         आमच्या शाळेतील सुजाता कुडतरकर मॅडम यांचीही बदली झाली आहे. गेली ५ वर्षे आम्ही शिक्षक जे टीमवर्क करत होतो त्याला तोड नाही. प्रत्येकाचे काम आणि कामाची पद्धत वेगळी असते. त्यांच्या कामाचा उरक चांगला होता. मी नसताना त्यांनी माझ्यापेक्षा शिस्तबद्ध शाळा ठेवली आहे. वृक्षारोपण कार्यक्रमात मी नसताना त्यांनी मारलेली बाजी मी लोकांच्या तोंडून ऐकली आहे. मला त्यावेळी जो आनंद झाला तो शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. 

         बदली होऊन गेलात,  तुम्हांला चांगलं वाटावं म्हणून मी हे लिहित नसून मला मनापासून लिहावेसे वाटले म्हणूनच लिहित आहे. तुमचा सर्वांचा आदर करत शब्दप्रपंच थांबवतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Saturday, August 3, 2024

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

🛑 ढवणसरांची अकाली एक्झिट

        बदली ही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी कधी सुखाची तर कधी दुःखाची गोष्ट बनलेली असू शकते. मला याचा अनेकदा दुःखदायक अनुभव आला आहे. त्यामुळे मी आता बदलीला सकारात्मक पद्धतीने बघू लागलो आहे. 

         काही शिक्षकांच्या बाबतीत खूपच सुखदायक बदल्या होताना मी पाहिल्या आहेत. मी मात्र नेहमीच अडचणींचा सामना करतच बदल्यांना सामोरा जात आलोय. त्यामुळे मला आता त्यांची सवय झाली आहे. पण सर्वांनाच त्यांची सवय होईल याची अजिबात खात्री देता येणे कठीण आहे. प्रत्येकाचा दृष्टिकोन त्याला कारणीभूत असू शकतो. तरीही मनात घडणाऱ्या मानसिक तणावांच्या लहरी थांबवणे हे ज्याला त्याला कसे शक्य होईल हे त्याच्यावर होणाऱ्या प्रसंगानुरूप बदलत राहू शकते. 

         मी कणकवलीत राहणारा असून वैभववाडीतील मांगवली नं.१ शाळेत सात वर्षे अतिशय सुखदायक नोकरी केली आहे. १२० पेक्षा जास्त किलोमीटरचा दैनंदिन प्रवास करुनही शारीरिक, मानसिक तणावावर सात वर्षे राज्य केलं. ऑनलाईन बदली झाली म्हणून आता ६० किलोमीटर अंतरावरची शाळा मला जवळ वाटू लागली आहे. हल्लीच्या मे मधील समुपदेशनात मी बदली झाली नाही म्हणून हसत हसत आलो आहे. हसत यासाठी कारण मला एकही शाळा मिळाली नाही म्हणून मी नकार देऊन पूर्वीचीच शाळा नवीन मिळाल्यासारखा चेहरा करुन दालनाच्या बाहेर पडलो होतो. तुम्ही एकदा नोकरी स्वीकारली की हे असे घडणार याचा कायमच स्वीकार करत राहण्याशिवाय पर्याय नसतो हे मान्यच करायला हवे. असो. 

         लक्ष्मण ढवण सरांची निधनाची बातमी समजली आणि मला त्यांच्याविषयी लिहावेसे वाटले म्हणून मी मध्यरात्री लिहावयास बसलो. मला त्यांच्याविषयी अतिशय आदर आहे. त्यांची आणि माझी वैभववाडी तालुक्यात भेट झाली. माझ्या आणि त्यांच्या मैत्रीला एका तपाचा काळ लोटून गेला आहे. या काळानंतर एक असा काळ त्यांच्यावर येईल असे कधीच वाटले नव्हते. चांगला धटधाकट वाटणारा माणूस अचानक ब्रेन हॅमरेज सारख्या आकस्मिक आजाराने आपल्यातून कायमचा निघून जातो यासारखी वेदनादायक गोष्ट दुसरी असूच शकत नाही. 

         सर्वच माणसांना तणाव असतात. पण कधीतरी अनेक तणावांची बेरीज होऊन वेगळेच विपरीत घडलेले पाहिले की आपणही आता सावधान झाले पाहिजे ही घंटा आपल्या सर्वांच्याच मनात कायम वाजत राहणार आहे. माणूस अतिविचार करु लागला की त्याचे व्यवस्थापन करणे त्याला जेव्हा अजिबात शक्य होत नाही तेव्हा अशा घटनांची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता असते. 

         ढवण सर म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. शिक्षक म्हणून त्यांच्यात अनेक उत्तम गुणांचा संगम झालेला होता. शाळेत त्यांचे काम पहात राहण्यासारखे असे. शिक्षक समितीचा खंदा कार्यकर्ता. वैभववाडी तालुक्याची शिक्षक समिती सचिव पदाची धुरा सांभाळत असताना त्यांची इतिवृत्ते मी बऱ्याचदा ऐकली आहेत. ते अभ्यासू होते. त्यांचे बोलणे ओघवते असे. त्यांची संघटनेवर अपार निष्ठा होती. त्यांच्या जाण्याने एक निष्ठावंत कार्यकर्ता आपल्यातून कायमचा हरपला आहे. 

         ते सांगुळवाडी शाळेत असताना कणकवलीत राहत असत. त्यांनी कोकिसरे गावात सुंदर घर बांधले आहे. त्यांच्या घरी मी एकदा गेलो होतो. त्यांच्या स्वतःच्या घराबद्दल खूप सुंदर संकल्पना होत्या. तरीही मुलाच्या शिक्षणासाठी त्यांना कणकवलीत घर घ्यावसं वाटलं. त्यांनी फ्लॅट घेतला. मुलाचं शिक्षण सुरु होतं. त्यांचं वैभववाडी सांगुळवाडी ते कणकवली रोजचं अपडाऊन मी कित्येकदा पाहिलं आहे. मीही त्यांना महिन्यातून सात आठ वेळा तरी सतत सहा सात वर्षे कणकवली ते वैभववाडी किंवा वैभववाडी ते कणकवली येता जाता कधीना कधी टू व्हीलरने नेले आणले आहे. एकटं जाण्यापेक्षा सोबतीला ढवण सरांसारखे सोबती असताना प्रवास कमी वाटत असे. बोलता बोलता कणकवली कधीच येत असे. प्रवास सुखकर होऊन जाई. गजाली मारत असताना त्यांच्यातील आतला आवाज मला खूप काही देऊन जाई. ते खरंच खूप चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. वैभववाडीत काही सलग वर्षे त्यांनी पगाराचा खोका सांभाळला होता. आकडेवारीमध्ये त्यांचे ज्ञान आम्हांला लाजवणारे होते. 

        २०१९ मध्ये ऑनलाईन बदल्या झाल्या. मी कणकवली तालुक्यात आलो. त्यांनीही कणकवली तालुक्यातील भरणी नं. १ शाळा निवडली. आता ते कणकवलीत कमी आणि कोकिसरे गावी जास्त जाऊ लागले होते. कितीही काहीही झाले तरी प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतोच. त्यांचे पुन्हा कणकवली वैभववाडी अपडाऊन सुरु झाले. त्यांना ते त्रासदायक होऊ लागले म्हणून त्यांनी शेर्पे केंद्रशाळेत कामगिरी मागून घेतली. ती आमची केंद्रशाळा असल्यामुळे पुन्हा शिक्षण परिषदेच्या निमित्ताने त्यांच्या भेटी घडत असत. कामगिरी शेवटी कामगिरीच असते. ती कधीच कायमची नसते. त्यामुळे त्यांना पुन्हा भरणी शाळेत हजर व्हावे लागले. मे मधील समुपदेशनात त्यांना वैभववाडीतील शिराळे शाळा प्राप्त झाली होती. पण बदल्या झाल्याच नाहीत. कदाचित त्यामुळेही त्यांचा तणाव वाढला असेल नक्की सांगता येणे कठीण आहे. पण मी त्यांच्या जागी असतो तर मलाही नक्कीच तणाव आला असता. आता मात्र त्यांनी पदवीधर पदावरून पदावनत होण्याचा निर्णय घेतला होता असे समजले. शेवटी माणसं आपला तणाव कमी होण्यासाठीच असं करत असावीत असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांना आता त्यांच्या घरापासून जवळची शाळा मिळत होती असेही ऐकले. त्या शाळेत ते हजर होण्यासाठी जाण्याआधीच जर त्यांना ब्रेन हॅमरेजचा त्रास होऊन त्यातच त्यांची वणवण कायमची संपणार असेल तर देव खरंच आहे का हा मला प्रश्न पडतो. सर्वांना आवडणारं व्यक्तिमत्व देवालाही आवडतं आणि तो त्यांना आकस्मिक घेऊनही जातो तेव्हा माझ्यासारख्या अनेकांच्या मनाला खूप खोलवर वेदना होतात. 

         ढवणसर आता मला कधीही भेटणार नाहीत याचं अपार दुःख आहेच. कदाचित त्यांनाही माहित नसेल की त्यांना अचानक असे काय झाले ते. मृत्यूदेवतेनं इतकं कठोर वागायला नको होतं. माझ्या बाबांना, आईला आणि पत्नीलाही तिनं असंच अकाली नेलं आहे. नियती, प्राक्तन  आणि जे जे लिहिले भाळी वगैरे ऐकून ऐकून कानांचे पडदे फाटले आहेत. 

         आदरणीय कै. ढवण सरांच्या पवित्र मृतात्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल





Tuesday, July 30, 2024

🛑 बाबा आमचे शिल्पकार

🛑 बाबा आमचे शिल्पकार

        आमच्या बाबांना अनेक गोष्टींचे ज्ञान होते. ते अंतर्ज्ञानी होते. पुढे घडणाऱ्या घटना त्यांना आधीच समजत. त्यांनी आम्हांला एखादी गोष्ट करु नकोस म्हटले आणि आम्ही ती केली तर ती योग्य होणार नाही याचा मलातरी अनेकदा अनुभव आलेला आहे. 

         एखादी गोष्ट करायला सांगितली तर ती केलीच पाहिजे असा त्यांचा दंडक असे. ती परिपूर्ण होऊन सुद्धा जाई. त्यामुळे बऱ्याचदा मी त्यांच्या नकळत अनेक गोष्टी करत गेलो आहे. यशस्वी झाल्यानंतर मी त्यांना सांगत गेलो आहे. त्यावेळी त्यांना आनंद झालेला दिसे, पण मी त्यांना ती गोष्ट पश्चात सांगितली याचे दुःखही होई. 

         ते आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या यशाचे शिल्पकार आहेत. आमचे सुंदर आणि यशस्वी आयुष्य व्हावे यासाठी त्यांनी अनेक खस्ता खाल्ल्या आहेत. ते अष्टपैलू होते. ते अनेक कौशल्ये जाणत असत. 

         ते उत्तम केशकर्तनकार होते. त्यांनी कात्रीने कापलेले केस नुसते पाहत राहावेत असे असत. केस मिळविण्याची त्यांची पद्धत अप्रतिम होती. त्यामुळे कणकवलीतील अनेक श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब सर्व पातळीचे लोक त्यांचे कायमचे कस्टमर होते. त्यांचे कायमचे कस्टमर आमच्याकडे खूप क्वचित बसत. बाबांचा हात लागला नाही तर त्यांना केस कापल्यासारखे वाटत नसे. म्हणून मीदेखील त्यांचे कस्टमर करण्याचे धाडस करत नसे. बाबांनी अनेकांना आपल्या दुकानात सलून काम शिकवले आहे. मी त्यांचाच शिष्य. सुरुवातीला मला गालाला साबण लावण्याचे काम असे. हळूहळू बाबांची कला माझ्या हातात रूळली. शाळा, अभ्यास, दुकान एवढीच आमची दैनंदिनी असे. अनेक विनंत्या केल्यानंतर आम्हांला कधीतरी खेळायला किंवा सायकल चालवायला पाठवले तर. नाहीतर आम्ही नेहमी बाबांच्या आदेशांचे बांधलेले. 

         टेलरिंग हा त्यांच्या आवडीचा छंद होता. तोही त्यांनी व्यवसाय बनवला. आमच्या दुकानात एक शिलाई मशीन असे. ती खूप जुनी झाली होती. तरीही बाबांनी तिला दुरुस्त करुन करुन वापरले. तिच्यावर त्यांनी जिवंत व्यक्तीवर प्रेम करावे तसे प्रेम केले. बाबा ब्लाऊज, झबली, हाफ पॅन्ट, सदरे, लेंगे, फ्रॉक छान मापात शिवत असत. नाडीची चड्डी स्पेशालिस्ट म्हणून ते प्रसिद्ध होते. अजूनही बाबांचे नाडी चड्डीचे कस्टमर घरी येत. बाबा घरच्या घरी चड्डया शिवून देत किंवा त्यांच्या घरपोच करत. त्यांचे आवडीचे काम असल्याने मी त्यांना बोलत नसे. 

         बाबा कधीही स्वतःसाठी खर्च करत नसत. ते नेहमी कुटुंबासाठी खर्च करत राहीले. खिश्यातील पैसा संपल्यावर त्यांना आनंद होई. मी किंवा भावाने दिलेले पैसे ते परोपकारासाठी खर्च करत. पैसे संपेपर्यंत ते खर्च करीत राहत. 

         बाबा उत्तम मूर्तिकार होते. त्या काळात त्यांनी कणकवली, आंब्रड, गोठणे आणि किर्लोस अशा चार मूर्तिशाळा चालवल्या. त्यांचे हातीकाम बघतच राहावे. आता अनेक मूर्तिकार साच्यांचा आधार घेतात. आमची गणपतीची शाळा म्हणजे त्यांचा अभिमान होता. गणपतींचे डोळे उघडणे म्हणजे अतिशय अवघड काम असे. रात्र रात्र जागरणे करुन बाबा ते काम करीत. दोन्ही भुवया सारख्याच कशा येतात हा मला प्रश्न पडे. त्यांचे हात आणि ब्रश भराभर चालत. 

         ते कविमनाचे होते. चांगले वाचक होते. त्यांनी अनेक पुस्तके त्या काळात वाचून फडशा पाडला होता. त्यामुळे त्यांच्या मुखातून नेहमीच सरस्वती नांदत असे. फक्त जुनी सातवी शिकलेले माझे बाबा जेव्हा बोलत तेव्हा त्यांच्या गोष्टी आम्ही भान हरपून ऐकत असू. 

         आई आजारी असताना तिची सेवा करत असताना बाबांनी आपले आत्मचरित्र लिहायला घेतले. आई गेल्यानंतर बाबांची लेखणी थांबली. सलून मधील त्यांच्या गजाली ऐकायला कणकवली कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. संभाजीराव शिंदे व कणकवली नं. ३ चे उच्चश्रेणी मुख्याध्यापक मारुती पालवगुरुजी मुद्दाम येऊन दोन दोन तास सलग बसत असत. 

         असे आमचे बाबा ज्यांच्याबद्दल मी कधीही लिहायला घेतले की त्यांच्या अनुभवांच्या शाळेतील शिल्पे माझ्यासमोर अशीच नाचत राहतात. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Sunday, July 28, 2024

🛑 झिला, माका सोड

🛑 झिला, माका सोड 

         बाबांची तब्येत अचानक बिघडली. बिपी वाढण्याचे निमित्त झाले. वाढत असलेला बिपी आणि त्यांचे पूर्वीचे आजार थांबायचे नाव घेईनात. 

         अगदी काल परवा पर्यंत चांगले चालते फिरते बाबा विविध आजारांनी त्रस्त झाले होते. १० ते १२ दिवसांच्या कालावधीत ते कोमात गेले. 

         हात खांद्यात दुखणे, संडासातून रक्त पडणे, हर्निया हे त्यांचे खूप जुने आजार वयोमानानुसार पुन्हा पुन्हा उद्भवत होते. या आजारांची त्यांनी स्वतः कधीच पर्वा केली नव्हती. त्यांचा त्यांनी नेहमीच हसतमुखाने प्रतिकार केला होता. अचानक बिपी कसा वाढला हे अजूनही आमच्यासाठी असलेलं गूढच आहे. 

         आम्ही बाबांना नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. ते आमच्यावर लहान मुलासारखे प्रेम करीत. बारीकसारीक गोष्टी आम्ही लहान मुले असल्यासारखी समजावून सांगत. आम्ही त्यांच्यासाठी नेहमीच लहान होतो आणि असणार. त्यांच्याइतकं मोठं होणं कधीच शक्य नाही. त्यांनी हे जग सोडून जाणं आमच्यासाठी अपार दुःखाच्या नावेत सतत हेलकावे खात राहण्यासारखं आहे. 

         त्यांनी आम्हाला अनेकदा दुःखाचा वारा लागू दिलेला नाही. संकटात समर्थपणे पाठीशी ठाम उभे राहिले. स्वतः कधीही रडले नाहीत आणि अनेकदा आमचं रडणंही थांबवलं आहे. 

         गेले १० ते १२ दिवस मी सतत त्यांच्यासोबत होतो. त्यांची जितकी सेवा करता येईल तेवढी करण्याचा प्रयत्न करत होतो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना त्यांनी जणू असहकार पुकारला होता. त्यांना आपल्या शरीराला अनेकविध चाचण्या करुन घेतानाही अतिशय वेदना होत होत्या. जे त्यांनी आपल्या शरीराबरोबर कधीही करुन घेतले नव्हते तेच त्यांना करावे लागत होते. आम्हांलाही त्यांना होणाऱ्या यातना सहन होत नव्हत्या. एकदा डॉक्टरांच्या उपचारांच्या कचाट्यात सापडलो की ते सांगतील तसे करत बसण्याशिवाय पर्याय उरत नाही. आमच्या बाबांच्या बाबतीत तसेच घडले. 

         वेगवेगळ्या तीन डॉक्टरांच्या सहा दिवसांच्या उपचार मालिकेनंतर आता प्रेमाच्या सेवेचा उपचार करण्याचे सर्वानुमते ठरले. कोमासदृश्य परिस्थितीत असलेले माझे बाबा अजिबात हालचाल करु शकत नसताना आम्ही घरी आणण्याचा योग्य निर्णय घेतला होता. 

         घरी आणताना रुग्णवाहिकेत बाबांनी डोळे उघडले. अर्थात त्यांना घरीच जायचे होते म्हणून त्यांनी डोळे उघडले असावेत. घरी जाईपर्यंत मी त्यांच्याशी बोलतच होतो. वाटेतील सर्व देवदेवता त्यांना आठवून देण्याचा माझा प्रयत्न मलाच केविलवाणा वाटत होता. माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले होते. 

         अखेर आम्ही बाबांना घेऊन घरी ( घर मठी ) आलो होतो. त्यांच्या स्वतःच्या रूममध्ये त्यांना झोपवले. सर्वांनी त्यांना हाका मारायला सुरुवात केली. पाण्याचे दोन चमचे जिभेवर पडताच बाबांनी पुन्हा डोळे मिटले. श्वास सुरु, हातापायांची गती मंद झालेली, डायपर बदलताना तो स्वच्छ अशी परिस्थिती होती. नाकात घातलेल्या नळीवाटे पेज, पाणी आणि शहाळ्याचे पाणी असेच भरवणे सुरु होते. 

         नेहमीप्रमाणे सकाळ झाली होती. बाबा निश्चलच होते. नातेवाईक, मित्र, गावकरी येऊन येऊन विचारपूस करुन जात होते. नळीत पेज भरवायला घेतली. पेज पोटात जात असताना ती पुन्हा मागे येत असलेली पाहून नाकातील नळी सुद्धा काढून टाकावी लागली. 

         आता बाबा नाकातून श्वास घेतील असे मला वाटले. पण नळी काढली तरी नाकातून श्वास घेणे सुरु नव्हते. बाबा तोंडाने जलद गतीने श्वास घेत होते. अचानक त्याचीही गती मंदावली. त्यांच्या मुखातून कधी काळा तर कधी तपकीरी रंगाचा फेस यायला लागला होता. मी त्यांच्या उशाशीच बसून होतो. रात्री १० वाजल्यानंतर त्यांनी आपली जीभ वळवली. मान दोन्ही दिशांना हलवली. माझ्या काकांनी मला बाबांचे डोके मांडीवर घ्यायला सांगितले. मी डोके मांडीवर घेऊन बाबांना दोन चमचे पाणी भरवताच बाबांनी माझ्या मांडीवरच आपला देह कायमचा ठेवला. 

         डॉक्टरांकडे असताना त्यांना ३५ पेक्षा जास्त सलाईन लावावी लागली. त्यांना ती सहन होईनात म्हणून ते हलू लागले, मोठ्याने हलवू लागले. त्यामुळे त्यांचे हात पाय बांधून ठेवण्याचा पर्याय डॉक्टरांनी निवडला. आम्ही उघड्या डोळ्यांनी बाबांचे होणारे हाल निमूटपणे पाहत होतो. 

         बाबा मला नुसते विनंती करत होते. " झिला, माका सोड, झिला,  माका सोड " मी त्यांना सोडू शकलो नाही. मला त्यांना बरे झालेले बघायचे होते. त्यांना सोडत नव्हतो म्हणून त्यावेळी त्यांना माझा खूप राग आलेला होता. बाबा डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्यामुळे मी त्यांना सोडले नाही. पण घरी आणल्यानंतर ते चारच दिवसात आम्हाला कायमचे सोडून गेले. त्यांचे आम्हा सगळ्यांवर निरतिशय प्रेम होते. त्यांची जगण्याची तीव्र इच्छा होती. सगळी मुले, माणसे प्रत्यक्ष येऊन गेल्यानंतरच त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला आम्हाला पोरके करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Monday, July 1, 2024

🛑 तुझी आभाळाइतकी माया

 🛑 तुझी आभाळाइतकी माया

     ममतेची छाया असणाऱ्या माझ्या आईचा आज स्मृतिदिन. ती गेली आणि आम्ही विनाआईचे झालो. आईची माया आईच देऊ शकते. माझी आई अगदी तशीच होती. मायेची निस्सीम मूर्ती आमची आई. जणू श्यामची आईच. मी श्याम नसेन , पण माझी आई श्यामची आईच होती. तिच्यात आणि श्यामच्या आईमध्ये मी बरंच साम्य बघितलं आहे. 

    माझ्या शाळेतील मुलांसाठी मी जो ब्लॉग लिहितो , त्याचं नाव मी ‘ या लाडक्या मुलांनो , तुम्ही मला आधार ’असंच ठेवलं आहे.आमची आई तशीच होती. ती आमचे खूप लाड करी. कारण आम्ही तिचे आधार होतो असे तिला सतत वाटत राही. ‘ या लाडक्या मुलांनो ’ या गाण्यात कवी सानेगुरुजी म्हणतात , “ आईस देव माना , वंदा गुरुजनांना ” हे अगदी खरेच आहे. आई म्हणजे देवच आहे. ती आता नाही म्हणून तिच्या फोटोचे पूजन करण्यात येते. त्याहीपेक्षा जास्त ती आपल्या कायमच हृदयात आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. 

    ज्यांना आई आहे ते भाग्यवान आहेत. ज्यांना आई नाही त्यांना ज्यावेळी आईचं निष्पाप प्रेम मिळत नाही तेव्हा ‘ आई ’ किती थोर असते हे समजते. आई आपल्या बाळांना सर्वानाच नेहमीच हवीहवीशी वाटत असते. तिच्या पदरात जी ऊब असते , ती हल्लीच्या ओढणीमध्ये आहे असे वाटत नाही. तिच्या पदराला धरुन राहण्यात मुलांना खूप मोठा आधार वाटत असतो. आईचं प्रेम तिच्या पदरात लपलेलं असतं. म्हणूनच जेव्हा बाबा आपल्याला मारु लागतात , आपण रडत रडत आईच्या दिशेने धावतो , तेव्हा आई आपल्याला पदरात घेते. पदरातील प्रेमात बाबांच्या रागाचा डोंगर कोसळवून टाकण्याचे सामर्थ्य असते. बाबाही मारायचे थांबतात. 

    लहान तान्ह्या बाळांना ‘ आईच्याच जुन्या साड्यां ’ मध्ये गुंडाळून ठेवलेलं मी अनेकदा बघितलं आहे. आम्हीसुद्धा असेच कधीतरी आमच्या आईच्या मायेने मंतरलेल्या साडीच्या फडक्यात गुंडाळलेले असताना छान गाढ झोपी गेलेले असू. त्यासाठी आईचीच साडी का लागते ? कारण त्यात आईची माया ओतप्रोत भरलेली असते. आई ही आईच असते , तुमची आमची सर्वांची सेम असते. 

    माझी आई जेवण चवदार बनवी. तिने बनवलेल्या चपात्या व उसळ दुसऱ्या दिवशी सकाळी तर अधिकच गोड लागत असत. तिच्या जेवणाची चव अजूनही विसरायला होत नाही. ती सर्व प्रकारचे पदार्थ बनवी. ते सर्व पदार्थ का गोड आणि चवदार असत ? कारण त्यात प्रेम ओतलेले असे. आता माझी पत्नी ईश्वरी सुद्धा आपल्या मुलींसाठी अतिशय चवदार पदार्थ बनवत असते. त्यात ती असेच प्रेम ओतत असते. तिच्या हाताची चव माझ्या आईच्या हातासारखीच आहे. कारण ती माझ्या मुलींची आई आहे. 

    आमच्या आईने कधी टिकली लावली नाही. ती गंधक लावत असे. सकाळी लावलेले गंधक दिवसभर अगदी ठसठशीत दिसे. केस नीट विंचरलेले असत. तिची तयारी आमच्या आधीच होत असे. देवाला दिवा लावताना तिला पाहायला हवे. ती ईश्वराकडे निस्वार्थी अंतःकरणाने काहीतरी मागत असे. तिच्या मागण्या देवाने ऐकल्या असतील का ? आज मला ते सांगता येणार नाही. तिची त्यावेळची प्रसन्न मुद्रा मला सतत तशीच असावी असे वाटत राही. एकत्र कुटुंबासाठी तिचे आपलं समर्पण दिले आहे. स्वतःसाठी काहीही न करता कायमच झिजत राहिली ती सर्वांसाठी. तिच्या मनातील भावना तिने कधी मोकळ्या केल्या असतील तर आम्ही तेव्हा तिथे नव्हतोच. ती बाबांना सर्व सांगे. बाबांवर तिचे जीवापाड प्रेम होते. बाबा आणि आई दोन्ही उभयतां एकमेकांसाठीच बनले असावेत. एकमेकांशिवाय कधीही राहू शकत नसत ही दोघं. त्यात आम्ही पाच भावंडं होतो. आमचे सर्व करता करता तिचं आयुष्यच संपून गेलं. तिला आम्ही सगळे कर्तृत्ववान झालेले पाहायचे होते. ती आज आमच्या कर्तृत्वाला पाहायला जिवंत असती तर किती खुश असती ? 

    आमचे बाबा मात्र आम्हांला आईला आठवू देत नाहीत. ती गेली तेव्हापासून बाबांनी आम्हांला कधीही आईची उणीव भासू दिलेली नाही. बाबा मात्र आपण आपल्या पत्नीसाठी खूप काही करायचे राहून गेले असे सांगत आपली खंत व्यक्त करत असतात. बाबांची आई म्हणजे आमची आजी सुद्धा खूप प्रेमळ होती. तिच्या संस्कारात वाढलेले बाबा आमचं एकत्र कुटुंब मनानेही सदैव एकत्र राहावं यासाठी झटत असतात. 

    आज आईचा आत्मा कुठे असेल तेथे माझ्या या शाब्दिक भावना पोहोचतील अशी आशा करतो. ती आमच्यावर कधीच नाराज नसणार. तिचा वरदहस्त नेहमीच आपल्या पिल्लांवर राहो , तिच्या प्रेमपंखांची ऊब आम्हांला सदैव जाणवत राहो अशी तिच्या अदृश्य अस्तित्वाकडे मागणी करतो. प्रिय आई , तुला भावपूर्ण आदरांजली. 

©️ तुझा मुलगा : प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. 1 )


🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा

 🎈स संदीपचा , क कदमांच्या , क कवितेचा 


संदीप कदम हे एक गुणी आणि आदर्श शिक्षक आहेत. त्यांचा आणि माझा परिचय देवगड तालुक्यातला. अनेकदा आम्ही प्रशिक्षणे , स्पर्धा आणि एकाच तालुक्यात असल्यामुळे एकत्र आलो आहोत. कणकवली तालुक्यात माझ्या कणकवलीतील घरापासून तीन ते चार किलोमीटरवर त्यांचे जानवली येथे घर आहे. मला त्यांच्या घरी जाण्याचा एकदाही योग आलेला नाही. तरीही संदीप कदम सरांच्याकडे बघून मीही त्यांचे काही गुण घेतले असावेत. 

‘ एक घास चिऊचा ’ हा त्यांचा सुप्रसिद्ध शालेय उपक्रम मलाच काय कोणालाही भुरळ पाडू शकतो. शाळेत जाऊन प्रामाणिकपणे फक्त शिकवावे असे म्हणणाऱ्या शिक्षकांच्या व्याख्येला त्यांच्यासारखेच शिक्षक बदलवू शकतात. त्यांनी शाळेच्या भिंतींच्या बाहेर जाऊन शिकवले आहे. शिक्षण हे कधी चार भिंतींच्या आत घडत नसते हे त्यांनी प्रात्यक्षिकाने सिद्ध केलेले आहे. त्यांच्या सहवासात राहणारा माणूस सुजनवाक्य बोलणारा नाही झाला तरच नवल. ते आपला अभ्यासक्रम जगत असतात. 

सानेगुरुजींच्या ‘ भूतदया ’ या गोष्टीची आठवण येते. झाडावरुन खाली पडून मरत असलेल्या पक्ष्याला छोट्या श्यामने जीवदान दिले होते खरे , पण तोच पक्षी जेव्हा हे जग सोडून गेला तेव्हा झालेले दुःख सानेगुरुजींनी अत्यंत करुण शब्दांत व्यक्त केलेले दिसते. या मृत पक्ष्याला मातीत पुरुन त्यावर आठवणीसाठी झाड लावणारे छोटे सानेगुरुजी मला म्हणूनच आठवतात. मुलांनी पक्ष्यांवर प्रेम करावे , प्राणिमात्रांवर दया करावी यालाच भुतदया असे म्हणतात. हीच भुतदया मुलांमध्ये निर्माण होण्यासाठी संदीप कदम सरांनी राबविलेला छोटासा उपक्रम खूप मोठे आणि चिरकाल टिकणारे संस्कार करुन जातो. या उपक्रमाची संकल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली असावी याचा विचार केला तरी कदमांच्या विचारांतील दम लक्षात येतो. 

त्यांचे अक्षर मोत्यासारखे म्हटले तरी वावगे ठरूच नये. अक्षरांचे मोड त्यांच्याकडून शिकलेली मुले भाग्यवान म्हटली पाहिजेत. शिक्षकाचे अक्षर सुंदर असलेच पाहिजे. त्याने लिहिलेला फळा कधीच पुसू नये असे वाटत राहावे असे कदमसरांचे अप्रतिम लेखन असते. त्यांनी कलेची कोणतीही डिग्री घेतली असेल तर मला माहिती नाही. तरीही हस्ताक्षरात त्यांचा हात धरणारे विरळेच असावेत. सध्या ते नडगिवे नं. 1 शाळेत पदवीधर शिक्षक म्हणून अतिशय उपक्रमशील रीतीने कार्यरत आहेत. त्यांच्यासारखे शिक्षक मिळणे हे त्या शाळेचे आणि केंद्राचेही भाग्यच म्हणायला हवे. आदर्शवत राहणीमान बघून ते शिक्षक आहेत हे कोणीही सांगेल. ते अतिशय नम्र आहेत. 

मिठबांव , शिरगांव अशा ठिकाणी आमची दहा दहा दिवसांची प्रशिक्षणे झाली आहेत. प्रत्येकवेळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केलेली ऐतिहासिक पात्रे अजूनही डोळ्यासमोर उभी राहतात. त्यांचा इतिहासाचा गाढा अभ्यास आहे. त्यांनी आपल्या शिक्षकमित्र चमूंसोबत अनेकविध कार्यक्रम केलेले असू शकतात. आत्मविश्वास त्यांच्यात ठासून भरलेला आहे. ते मार्गदर्शक म्हणून बोलू लागले कि श्रोत्यांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहायचा नाही. 

शिक्षक संघटना आणि सामाजिक संघटनेमध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर असूनही त्यांनी कधीही अहंकार केलेला असेल असे वाटत नाही. ते अतिशय संवेदनशील आणि सहनशीलही आहेत. आपल्यापेक्षा कमी सेवा झालेल्या आम्हांलाही ते अतीव आदर देतात. त्यांच्यासोबत काही तासांचा कालावधी जाणे हेही माझ्यासारख्याला अतिशय आनंददायी असू शकतं. त्यांना हल्लीचं हे बेगडी जग आवडत नाही. त्यांना प्रसिद्धीही नको असते. प्रसिद्धीपासून ते जरा दूरच राहणं पसंत करतात. 

ते कविमनाचे आहेत हे माहिती होते. पण नुकत्याच आमच्या मुख्याध्यापक सहविचार सभेत त्याची प्रचिती आली. त्यांनी आणि त्यांच्या कवीमित्रांनी लिहिलेल्या एका काव्यसंग्रहाचे नुकतेच समारंभपूर्वक प्रकाशन झाले होते. कदम सरांनी आम्हांला ही माहिती दिली आणि आम्हीही आनंदलो. आमच्या एका शिक्षक मित्राच्या काही सुंदर निवडक कविता काव्यसंग्रहात छापून येतात हेच आमच्यासाठी अभिमानाची बाब असते. मग काय त्यांना केंद्रप्रमुख पवार साहेबांनी कविता वाचन करण्याची अनमोल संधी दिली. आमच्यासाठी ऐकण्याची ती सुवर्णसंधी होती. पुढील पाच दहा मिनिटे कदम सरांच्या सुंदर शब्दांचा जागर आमच्यासमोर धबधब्यासारखा कोसळत राहिला होता. ‘ स संदीप सरांच्या ’ ‘ क कदमांच्या ’ ‘ क कवितांचा ’ तास कधी संपूच नये असे मला अजूनही वाटते आहे.   


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक , शिडवणे नं. 1 )  








आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...