Sunday, July 18, 2021

खूप मज्जा आली सर

           डीएडला असताना मी दुकानात जायचे काही सोडले नव्हते. माझ्या अनेक मित्रांनी ते पाहिलेही असेल. तीन नंबर शाळेतील पंधरा दिवसांचे पाक्षिक सुरू असताना काही नवीन विद्यार्थी ओळखीचे झाले होते. त्यापैकी काही विद्यार्थ्यांनी मी सलूनात केसही कापतो ते बघितलेले होते. त्यातील काही विद्याथी माझ्याकडून आग्रहपूर्वक केस कापूनही गेल्याचे चांगलेच आठवतंय. त्यावेळी मला थोडे अवघडायला होई. पण काही क्षणानंतर भानावर येऊन पुन्हा मी माझ्या कर्तव्यावर ठाम राही.

          एकदा विद्यामंदिर कणकवलीचे राऊळसर आमच्या दुकानात केस कापण्यासाठी आले होते. मी दुकानात काम नसताना अभ्यास करीत असे. मी एस. एम. हायस्कुल कणकवली येथे शिक्षण घेतल्यामुळे त्यांचा आणि माझा शिक्षक - विद्यार्थी असा संबंध आला नव्हता. ते आमचे कस्टमर आहेत आणि भूगोल छान शिकवतात एवढेच मला त्यांच्याबद्दल समजले होते. त्यांनी माझ्या वह्या , पुस्तके घेतल्या आणि अक्षर बघितले. त्यांनी माझ्या पाठीवर प्रेमळ आश्वासक हात ठेवला , मला तो स्पर्श उबदार वाटला. ते त्या स्पर्शातून माझे जणू कौतुकच करत होते हे मला मुकपणेच समजत होते. मस्त पांढरे शुभ्र केस असलेले राऊळसर जणू चांदीचे व्यापारीच होते. पांढरे केस असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांनीच त्यांना ही उपमा दिली होती असे मला माझ्या मोठ्या बहिणींकडून समजले. 

          राऊळसरांनी माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. ते म्हणाले , " अरे प्रवीण , माझ्या भाचीचे दोन मुलगे आहेत. त्यांना घरी जाऊन शिकवशील का ?  तुला दरमहा मानधन दिले जाईल. " मी तयार झालो. संध्याकाळी दुकानातूनच मला त्यांना शिकवायला जायचे होते. पहिल्या दिवशी स्वतः राऊळसर मला त्या दोन्ही मुलांना भेटायला घेऊन गेले. एका मोठ्या घरात त्यांनी मला नेले होते. दोन्ही विद्यार्थी माझी वाटच पहात होते. हॉलमध्ये टेबलभोवती चार खुर्च्या लावलेल्या होत्या. बहुतेक ते डायनिंग टेबल असावे. दोन्ही मुले आपल्या इयत्तांची पुस्तके घेऊन आले. राऊळ सरांनी माझी ओळख करून दिली. ते म्हणाले , " मुलांनो , हे तुमचे नवीन सर आहेत. ते दररोज संध्याकाळी एक तास तुम्हाला शिकवायला येतील. ते स्वतः शिक्षक होण्यासाठी शिकत आहेत हे लक्षात ठेवा. " मुलांनी ते ऐकले व मानेनेच होकार दिला. पण माझ्याकडून शिकण्यासाठी ते आतुर झालेले दिसले. मी कधी एकदा त्यांच्याशी बोलतो असे त्यांना झाले होते. मुलांच्या आईने मला मस्त गरमागरम चहा आणून दिला. ती माऊली माझ्याशी गोड हसली आणि आत गेली. राऊळ सर देखील निघून गेले. माझा तास सुरू झाला. एक तासापेक्षा जास्त वेळ निघून गेला तरी मला आणि मुलांनाही समजले नाही. शेवटी त्या मुलांच्या आईनेच मला " सर , तुम्हाला घरी जायला उशीर होत असेल तर गेलात तरी चालेल असे सांगितले. " तेव्हा मी भानावर आलो. मी मुलांचे वाचन घेत होतो. त्यांची तयारी बघत होतो. मुलांशी अभ्यासविषयक गप्पा मारत होतो. त्यांना शाबासकी देत होतो. त्यांना प्रेमळ शब्दांनी अधिक अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन देत होतो. दोन्ही मुलगे होते. त्यांच्यामध्ये चार वर्षांचा फरक असावा. मी घरी निघण्यासाठी बाहेर पडलो होतो , छोटा शंकू धावतच माझ्या शर्टाला धरायला आला. म्हणाला , " सर , आज खूप मज्जा आली सर .... आम्हाला अभ्यास करतो आहोत असे वाटलेच नाही. उद्यापासून दररोज या सर. आम्हाला तुमच्याकडून शिकताना खूप आनंद झाला सर. " त्या छोट्या मुलाचे बोलणे मला भावले होते. मोठ्या मुलानेही छान स्मितहास्य केले आणि माझ्याबद्दल आदर दर्शविला. तो थोडा मोठा असल्यामुळे त्याने अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली नसावी. 

          शिक्षक होण्यासाठीचे शिक्षण घेत असतानाच मला या दोन मुलांना सर्वात आधी शिकवण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. हे दोन्ही मुलगे आज अत्युच्च शिक्षण घेऊन आपला व्यवसाय करत आहेत. दोघेही सिव्हिल इंजिनियर होऊन एम. बी. ए. झाले आहेत. यातील मोठा मुलगा आज कणकवली नगर पंचायतीचे नगरसेवक आणि मोठे बिल्डर आहेत त्यांचे नाव सुशांत नाईक आणि छोटा मुलगा संकेत नाईक जो आता बांधकाम व्यवसायात अग्रेसर आहे. मी त्यांना दोन वर्षेच शिकवले. त्यानंतर नोकरी मिळाल्याने मला त्यांच्याकडे जाणे जमले नाही. त्यांची आता भेट झाली तरी मला त्यांच्यासोबतचा पहिला दिवस आठवतो आणि छोट्या शंकूने म्हटलेलं ते वाक्य आठवते , " खूप मज्जा आली सर " . आज शिकवल्यानंतर " खूप मज्जा आली सर " असे म्हणणारे विद्यार्थी भेटले तर तो माझ्या जीवनातील अविस्मरणीय क्षण असेल. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



भ्याडसा

           कोडी सोडवणे हा आमचा लहानपणीचा आवडता छंद होता. अर्थात मोठेपणी सुद्धा हा आमचा छंद आहेच. पण तेव्हा सर्व भावंडे मिळून विचार करून कोडी किंवा उखाणी सोडवण्यातली मज्जा काही औरच होती. आम्ही पुढारी किंवा लोकसत्ता पेपर घेत असू. त्यात दरदिवशी कोडी येत असत. आम्हाला शब्दकोडी सोडवण्याचा छंद म्हणण्यापेक्षा नादच लागला म्हणा ना !! शब्दकोडी सोडवून आमच्या शब्दसंपत्तीत भर पडत होती. 

          आमच्या सलूनात येणारे कस्टमर त्यातील शब्दकोडी अर्धवट सोडवून ठेवीत. ती नंतर सोडवून पूर्ण करणे अवघड होत असे. कारण त्यांना न येणारे शब्द शोधून काढावे लागत. माझे बाबा , माझ्या मोठ्या दोन्ही बहिणी शब्दकोडी सोडवण्यात पटाईत होती. त्यांच्यामुळेच मलाही ती चांगली सवय लागली. आमच्यात त्यामुळे चढाओढ लागे. ज्यांना लवकरात लवकर शब्द आठवे त्यांना त्याचे श्रेय मिळे. मी ते श्रेय मिळण्यासाठी खूप प्रयत्न करीत असे. संपूर्ण कोडे परिपूर्ण सोडवणे काही सोपे काम नसते. त्यात ते जम्बो कोडे असले तर खूपच वेळ लागे. काही शब्दकोड्यांमध्ये पुन्हा पुन्हा तेच तेच शब्द येत त्यामुळेही नवनवीन शब्दांची भर आमच्या ज्ञानात पडत राहिली. दुसऱ्या दिवशी शब्दकोड्याचे उत्तर आले की ते पडताळून पाहण्याचे कामही आनंद देऊन जाई. पूर्ण बरोबर शब्दकोड्यासाठी आपणच आपल्याला पाठीवर शाबासकी देत असू. आपण आपली स्वयंमूल्यमापन चाचणी घेत होतो हे त्यावेळी आम्हाला समजलेही नव्हते. 

          एकदा अशीच शब्दकोडी सोडवत बसलो होतो. सुट्टी असल्यामुळे घरात होतो. सगळी भावंडे त्यात आपला सहभाग दर्शवित होती. मी लिहीत होतो. मी लिहीत असलो तरी मोठ्याने वाचून सर्वांना विचारून फक्त लिहिण्याचे काम करत होतो. मी माझ्या मनाने कमीच शब्द लिहिले होते. शब्दसमूह मोठ्याने वाचण्याचे माझे काम सुरू होते. वाचल्यानंतर माझी मोठी ताईच पटकन उत्तर देत होती. माझी आईसुद्धा अधूनमधून त्यात भाग घेण्याचा प्रयत्न करत होती. ती घरात काम करता करता जेवढे ऐकत होती , त्यांची उत्तरे आपल्या परीने मनात ठरवत होती. आम्ही तिला त्यात सहभागी करून घेत होतो याचा तिला आनंदच होता. ती फक्त सातवी शिकलेली होती. आम्ही तिच्यापेक्षा जास्त शिकत होतो , म्हणून आमचा सर्वांचा तिला अभिमानच वाटत होता. ती आम्हाला तिच्यापेक्षा हुशार समजत असे. तिला मोठ्या टाईपच्या अक्षरांची गोष्टीची पुस्तके वाचनाचा छंद होता. पूर्वी कडधान्य कागदात बांधून मिळत असे. किराणा सामान आणल्यानंतर ज्या कागदातून सामान बांधून आणलेले असे , ते सर्व कागद ती वाचून काढीत असे. कधीचे जुने कागद किंवा रद्दी असे ती , पण ती वाचून तिला खूप समाधान मिळे. 

          चार अक्षरी एक शब्द सापडत नव्हता. एका जंगली झुडूप असलेल्या फळाचे नाव होते. ते आठवण्याचा आम्ही खूप प्रयत्न केला. आमचा हा शोध आईपर्यंतही पोचला होता. आईने तिथूनच मोठ्याने उत्तर दिले होते. ती म्हणाली , " भ्या-ड-सा " . तिने हे फळ मालवणी बोलीमध्ये सांगितले होते. भेडसा नावाचे एक करवंदासारखे दिसणारे फळ आहे. तिने आम्हाला त्या फळाविषयी अचूक माहिती सांगण्याचा प्रयत्न केला. आम्हाला चार अक्षरी शब्द सापडला होता , " क र वं द " असे त्याचे खरे आणि बरोबर उत्तर होते. पण आईने भ्याडसा हे नवीन फळाचे नाव उच्चारताना एक वेगळ्याच प्रकारचा उच्चार केला होता. त्यानंतर पुन्हा कधीही शब्दकोडी सोडवताना आम्ही तिला ' भ्याडसा ' असे म्हणून आठवण करून देत असू. ती सुद्धा हा शब्द ऐकून जी हसे ते हसणे निखळ होते. अशाच प्रकारच्या अनेक गमतीजमती आम्ही सगळे एकत्र जेवताना होत असत. 

          कोणत्याही शब्दकोड्यात ' भ्याडसा ' हा शब्द कधी आला असेल किंवा येईल याबद्दल मला माहीत नाही , पण आम्हा सर्व भावंडांच्या आयुष्याचे शब्दकोडे या शब्दाने सुरू होते हे तितकेच खरे आहे. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



पाटकरांचा चहा

      कणकवली ढालकाठीच्या शेजारी आमचे दुकान असतानाची गोष्ट. तसे आम्ही त्याच परिसरात विविध ठिकाणी फिरलो. तिथून खूप लांब दुकान घेणे आमच्याही जीवावर आले असते. कारण आमची ओळखीची माणसे या परिसरातच जास्त होती. कणकवली कॉलेज , विद्यामंदिर , तीन नंबर शाळा , बाजारपेठ , भालचंद्र महाराज आश्रम ही महत्त्वाची ठिकाणे आमच्यापासून जवळ असलेली आम्हाला आवडत होती. या सर्वांशीच आमचे जिव्हाळ्याचे नाते जुळले होते. 

          आमच्या दुकानशेजारी एक चहाचे दुकान होते. हॉटेल असले तरी तिथे चहा सतत मिळे. भजी क्वचितच मिळे. हे चहाचे दुकान पाटकरांचे होते. सुरेश पाटकर नावाचे हे गृहस्थ आमच्या दुकानात सतत बसलेले असत. पेपर वाचणे हा त्यांचा आवडता छंद होता. ते संपूर्ण पेपर वाचून काढत. अग्रलेख वाचून त्यावर चर्चा देखील करत. त्यांचे सामान्यज्ञान वर्तमानपत्रातील दैनंदिन लेख वाचून वाढलेले होते. पेपर वाचता वाचता ' पाटकर , दोन चहा पाठवा. ' असा आवाजही ते ऐकत आणि लगेच चहा गरम करून त्यांना चहा नेऊन देत. पुन्हा आमच्या दुकानात येऊन उर्वरित पेपर वाचून पूर्ण करत. असे त्यांचे रोज चाले. आमच्या दुकानात जास्त गिऱ्हाईके असली तर ते स्वतःच्या हॉटेलमध्ये जाऊन पेपर वाचत. पेपर वाचून संपला की आमचा पेपर आणून देत. पेपरात एखादी बातमी त्यांनी वाचायची राहिली असे होणे शक्यच नसे. कारण आमच्या बाबांनी एखादी बातमी पाटकरांना विचारली तर ते पान नंबरासह बातमी सविस्तर सांगत असत. 

          त्यांचा पोशाख अगदी साधा असे. पांढरा लेंगा आणि पांढरी सँडो बनियन. सँडो म्हणजे बिनबाह्यांची. सतत तोच वेष असल्याने ते दररोज तसेच दिसत जसे काल दिसले होते. दाढी वाढली तर ते स्वतः करत. केस मात्र आमच्या दुकानात कापत. पांढरा शर्ट आणि पांढरा लेंगा घातलेले पाटकरकाका सुंदर दिसत. पण असा वेष घातलेले पाटकरकाका दुर्मिळ होते. 

          त्यांच्या चहाची चव लाजबाब होती. आमच्या घरचा चहा आणि त्यांचा चहा यात खूपच फरक जाणवे. त्यांचा चहा आमच्यासाठी कायमच अमृततुल्य असाच होता. आज जर त्यांचे हॉटेल असते, तर आम्ही तो अमृततुल्य चहा त्यांच्याकडेच जाऊन घेतला असता. ते कोरा चहा करून ठेवत. चहाच्या किटलीत तो भरून ठेवत. मोठ्या पातेल्यात गरम पाणी करून ठेऊन त्यावर ही चहाची किटली ठेऊन देत. कधीही चहा द्यायचा असला की दोन चमचे दूध घालून तो कोरा चहा अमृततुल्य बनवत. चहाच्या ग्लासमध्ये ओतताना ते बरोबर मापात ओतत. आम्ही त्यांच्याकडून तीन ते चार वेळा तरी चहा घेत असू. त्यावेळी 50 पैशांचा चहा मिळे. कधी कधी आमची काही गिऱ्हाईके आम्हाला त्यांच्याकडचा चहा देत. आम्ही बाकी कसले नसलो तरी चहाचे शौकीन जास्त होतो. आणि पाटकरांच्या हातचा चहा मिळणार तर मग सोडतच नसू. आई दुकानात चपाती आणि उसळ पाठवून देत असे. आम्ही कधीतरी चहातून चपाती खात असू. एकच चहा मागवला असला तर तो तिघांमध्येही वाटला जाई. बाबांनी प्यायलेल्या चहाच्या ग्लासमधून आम्ही भावंडे दोन दोन झुरके घेऊ. 

          आज पाटकरकाका नाहीत , त्यांचे हॉटेल नाही , त्यांचा अमृततुल्य चहा नाही. पण त्यांच्यासोबत घालवलेल्या चहाच्या आठवणी नुकत्याच आले घालून उकळलेल्या गरमागरम चहासारख्या अजूनही तशाच आहेत. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )




इतकी कल्पना नव्हती

           इतकी कल्पना नव्हती

        काही व्यक्तींमध्ये अचानक बदल घडतात. काही बदल वयानुसार घडतात. प्रसंग आल्यानंतर जाणीवपूर्वक बदल घडवावे लागतात. या सर्व गोष्टींची कल्पना यायला वेळ लागतो. काही काळ थांबून , वाट बघून घडलेले बदल स्वीकारावे लागतात. कामातील बदल म्हणजे आपण विश्रांती म्हणतो. हे बदल व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकतात. आमूलाग्र बदल घडण्यासाठी तेवढेच परिश्रम घ्यावे लागतात. परिश्रम कमी असताना मोठ्या बदलाची अपेक्षा करणे चुकीचे असते. पण बदल हा जीवन जगण्यासाठी एक आवश्यक गोष्ट असे म्हणायला हरकत नाही. 

          आमच्या डीएडच्या वर्गात एकूण तीन कल्पना असतील याची आम्हाला कल्पनाच नव्हती. समजले तेव्हा कल्पना आली. या तीन कल्पना म्हणजे कल्पना मलये, कल्पना धुत्रे आणि कल्पना मुसळे. तिन्ही कल्पनांचे स्वभाव आगळे आणि वेगळेच होते. एक कल्पना थोडी भित्री होती. दोन कल्पना धीट होत्या. तिन्ही एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. एकाच माध्यमिक शाळेत एकत्र शिकलेल्या आणि हुशार होत्या. पुन्हा एकदा दोन वर्षासाठी एकत्र आल्यानंतर त्या तिघींनाही जो आनंद झाला असेल त्याचे शब्दात वर्णन करणे कठीण आहे. तिन्ही तुफान बोलक्या. एकीचे बोलणं पूर्ण व्हायच्या आत दुसरी बोलत असे , तिसरी दोघांचेही बोलणं खोडून काढण्यात पटाईत. दोन वर्षे एकत्र शिकताना त्यांच्याकडूनही आम्हाला बरेच शिकता आले. तिन्ही कल्पना आज उत्कृष्ट उपक्रमशील शिक्षिका आहेत. 

          अध्यापक महाविद्यालयातील ती दोन वर्षे या तिन्ही कल्पनांनी चांगल्या प्रकारे गाजवली. कार्यानुभव , संगीत , नृत्य , शिवणकाम हे त्यांचे आवडते विषय. आम्हाला कोणतीही मदत लागली तर या त्रयींची मदत मिळणार हे नक्की ठरलेलं असे. भरतकाम , विणकाम यांनीच आम्हाला शिकवले. कधी कधी तयार करूनच दिले. पाठाच्या सादरीकरणात शैक्षणिक साहित्य देण्यात त्यांनी कधीही नकार दिला नाही. अगदी बहिणींप्रमाणे साथ दिली. या कल्पनांनी जशी साथ दिली तशी इतर मैत्रिणींनीही दिली. 

          आज कल्पना मलये एक उत्तम साहित्यिक झाली आहे. ती एक लेखिका आणि कवयित्रीही आहे. तिच्यातले हे गुण आम्ही बघितले नव्हते. ती एक उत्तम वक्ता सुद्धा आहे. या साहित्यिक कल्पनेची आम्हाला कल्पना नव्हती. ती आज आपले मत परखडपणे मांडताना दिसते. पूर्वी पाठ घेताना ती घाबरताना आम्ही प्रत्यक्ष बघितले आहे. आज तिच्या बोलण्याने समोरचाच घाबरून जाऊ शकतो इतका आत्मविश्वास तिच्यात आला आहे हे विशेष सांगावेसे वाटते. तिला दिलेल्या कोणत्याही विषयावर ती मुद्देसूद लिहू शकते. तिच्या जीवनात आलेल्या संकटांशी तिने हसत हसत सामना केला आहे. 

          दुसरी कल्पना म्हणजे कल्पना धुत्रे. हिचा स्वभाव पहिल्यापासूनच प्रेमळ. ती आता आमच्या किर्लोस आंबवणे शाळेत शिक्षिका आहे. पालकांना आपलेसे करण्याची तिची भाषाशैली घेण्यासारखी आहे. पूर्वी ती एवढी मनुष्यवेल्हाळ नव्हती. वाटेने जाता जाता शेतकरी ग्रामस्थांबरोबर संवाद करत जाणारी वेगळी कल्पना आम्ही पूर्वी पाहिली नव्हती. 

          तिसरी कल्पना म्हणजे कल्पना मुसळे. 1 ली ते 7 वी पर्यंत माझ्याच वर्गात असलेली कल्पना , शिक्षिका होईल याची आम्हाला कल्पनाच नव्हती. एकदम साधी, सरळ, नाकासमोर चालणारी मुलगी. आमच्या दुकानापासून तिचे घर अगदीच जवळ. तिचे बाबा , आई , भाऊ यांच्यासोबत आमचे संबंध चांगले होते. आज ही कल्पना आपल्या विद्यार्थ्यांना शिकवताना जी तल्लीन होऊन शिकवते , ती घाबरट कल्पना आज धीट झालेली आम्हाला पहावयास मिळते आहे. 

          अशा या तिन्ही कल्पना इतक्या प्रभावी होतील अशी कल्पना त्या तिन्ही कल्पनांनीही केली नसेल कदाचित. पण आज तिन्ही कल्पना शैक्षणिक क्षेत्रात नाव कमावून आहेत , आपल्या परीने विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडवित आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कार्याला सर्वांचेच सलाम असायला हवेत. ' दिव्यत्वाची जेथ प्रचिती , तेथे कर माझे जुळती '. 

प्रसार माध्यमांचे वास्तव

           प्रसार म्हणजे एखादी गोष्ट सगळीकडे पसरवणे नाही का ? मग प्रसार माध्यमे तर कितीतरी आहेत. दृक स्वरुपातली आहेत, श्राव्य स्वरुपातली आहेत आणि दृक् - श्राव्य या दोन्ही प्रकारचीही आहेत. आता तर आपल्या हातात जग मावलेलं आहे. 

          छोट्या टचस्क्रीनवर नुसतं टच केलं तरी प्रचंड माहितीचा महासागरच आपल्यासमोर खुला होतो. जगाच्या कानाकोपर्‍यात काय घडते ते सर्वांना सदासर्वकाळ एका क्लिकवर समजू लागले आहे. वर्तमानपत्र, दुरदर्शन अशांमधून आपल्याला अधिकृत विश्वासार्ह माहिती मिळण्याची जास्त शक्यता असते. 

          केबल वाहिन्या , विविध ॲप्स, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर यावरही क्षणाक्षणाला अधिकाधिक माहिती येऊन दाखल होते. नुसतं फक्त गुगल करत राहायचं. वेळही पुरणार नाही.मग एकाच विषयावर , घटकावर अनेक प्रकारची वेगवेगळी माहितीसुद्धा मिळते. मग आपण संभ्रमात पडतो. ही माहिती बरोबर कि ती माहिती बरोबर ? बातम्यांचा टी आर पी वाढण्यासाठीही न्यूज चॕनेलवाले बातमीला मीठमसाला लावून भडक करतात. मेकअप स्पष्ट दिसावा म्हणून दशावतारी नाटकातील कलाकार भडक मेकअप करतात ना अगदी तस्संच !! आता आपण चारचौघात उठून दिसण्यासाठी भडक लिपस्टिक लावतोच की !!     

          शोधपत्रकारितेच्या नादात शोधायची गोष्ट सोडून नको तेच शोधलं जातं. आपण सर्वसामान्य दर्शक किंवा वाचक काय करतो, आली नवीन माहिती की कर फाॕरवर्ड. अशाने चुकीचीच माहिती जास्त फाॕरवर्ड होत राहते. चांगली माहिती वाचायची राहूनच जाते, मग ती फाॕरवर्ड तरी कशी होणार ? काही लोकांना तर मॕसेज फाॕरवर्ड करत राहण्याची ॲडिक्शनच झाली आहे. आला मॕसेज.. कर फाॕरवर्ड. वाचतसुद्धा नाहीत आपण नक्की काय फाॕरवर्ड करतोय ते ? काही महाभाग तर आपलं नावसुद्धा बदलण्याची तसदी घेत नाहीत.दुसऱ्यांच्या नावानेच आहे तसाच फाॕरवर्ड करतात. अशाने या प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता कशी राहणार सांगा.

          अधिकृत सुत्रांचा हवाला देऊन बातमी दिलेली असते त्यातही छपाई किंवा संपादनात जर ध चा मा झाला तर अर्थच बदलून जातो. 

सध्या प्रसारमाध्यमांचं जाळंच जाळं पसरलं आहे, कोणी शिंकलं तरी त्याची बातमी होते. बातमीमध्ये आपल्या चॕनलचे वेगळे ट्विस्ट असले पाहिजे असं सगळ्याच प्रसारमाध्यमांना वाटत राहतंय की काय ? 

          विश्वासार्ह बातम्या देणारी सह्याद्री वाहिनी सोडून आपण इतर वाहिन्या सेकंदासेकंदाला बदलत राहतो याचा अर्थ काय समजायचा ? तुम्ही रिमोट हातात घेऊन ते नुसतं दाबत राहण्याचंच काम करत असणार , बरोबर ना ? मग प्रसार माध्यमेसुद्धा तुमच्या चंचल मनाचाच ताबा घेऊ लागल्या आहेत. त्यांची तरी चूक काय ? तुम्हाला जे हवे आहे ते देण्याचं काम माध्यमे करत आहेत. ते जास्त भडक झालं तरी चालेल पण ते तुमच्या गळी उतरवण्यासाठी करत असतील कदाचित नक्की सांगता येत नाही. त्यात आपल्याला असंही लक्षात येऊ लागलं आहे कि काही राजकीय पक्षांचीही वैयक्तिक चॕनल्स वारेमाप आली आहेत. त्याद्वारे त्या वाहिन्या अधिकची माहिती देऊन जनमानसाचं मत आपलंसं करण्याचाही प्रयत्न करतात. 

          पैसे देऊन घेऊन जर बातम्या दिल्या जात असतील तर त्या पेड बातम्यांचं वास्तव काय असणार ? त्यात खरी माहिती कमी आणि फुगवून दिलेली माहिती जास्त असणार यात शंकाच येऊ नये. हल्ली काय ते मतदानाचा कौलसुद्धा कोणाच्या बाजूने ते सांगण्याचा आठवडाभर भारंभार प्रयत्न केला जात असतो.     

          प्रसारमाध्यमांची पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. पण त्यातील वास्तवतेवरही प्रश्नचिन्ह उभे राहतो. कोरोनाचा फैलाव वाढत चाललेला असतानाचे खरेखुरे मृतांचे आकडे समजले असते तर लोकं हाॕलमधून बेडरुममध्येही गेली नसती. सर्व प्रकारच्या आकडेवारीमध्ये अंदाजे आकडे देण्याचे प्रमाण वाढलेले दिसून येते आहे. 

          प्रसारमाध्यमांमध्ये आपापसांत वाढलेली जीवघेणी स्पर्धा या अवास्तवतेला कारणीभूत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. "इंग्रज सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? "असे म्हणणारे नरकेसरी लोकमान्य टिळक आता सापडणार नाहीत. आपल्या जीवाला घाबरुन दुसऱ्यांची स्तुती करत नको ती माहिती प्रसारमाध्यमांकडून फ्लॕश केली जातेय का ? हा सुद्धा एक संशोधनाचा विषय ठरु शकतो. 

          जसं आहे तसं प्रसारण झालं पाहिजे , प्रसारित होणारा शब्दनशब्द स्वच्छ काचेसारखा सुस्पष्ट असला पाहिजे.तर आणि तरच आजची प्रसारमाध्यमे नक्कीच लोकमानसात एक क्रांतीची ज्योत पेटवतील. या प्रसारमाध्यमांमध्येच लोकमत बदलण्याची दिव्य शक्ती आहे. लोकांनीही अशा भंपक आणि अवास्तव माहिती देणाऱ्या माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा आणि चिकटून राहायचे ते ज्याचं त्यानं ठरवायचं आहे .नाही का ?


©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Saturday, July 17, 2021

जाता जाता पावसाने

 🟣 जाता जाता पावसाने

          रात्रीच्या ड्युटीला जायची गडबड सुरू होती. कणकवलीपासून खारेपाटण पर्यंतचा प्रवास तसा पस्तीस ते चाळीस किलोमीटरचा असेल. टू व्हीलरने सतत ये जा करण्याची सवय असल्यामुळे काही वाटत नव्हते. दुपार सत्र , सकाळ सत्र संपून रात्रीचे सत्र सुरू झाले होते. गेल्यावर्षी पासून अनेक सत्रे पार पाडली असल्याने आत्मविश्वास विचलित होण्याचाही प्रश्न नव्हता. ही बहुदा सातवी ड्युटी असावी. कोविड ड्युटी शाळेत विलगीकरण कक्ष , प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खारेपाटण चेकपोस्ट येथे करुन करुन शाळेतल्या कामाचा विसर पडत चालला आहे अशीही जाणीव होऊन कावरेबावरे किंवा कासावीस व्हायला होते होते.

          मला पाऊस नको होता. पण मी बाहेर पडताना तो मुद्दाम येत होता. रेनकोट घालून बाहेर पडायचे माझ्या जीवावर आलेले होते. बायकोने मस्त चवळीची उसळ आणि गरमागरम चपात्या बनवलेल्या होत्या . मी टीव्हीवर सुरु असलेला ' या फुलांना सुगंध मातीचा ' हा कार्यक्रम बघतच कश्यातरी दोन तीन चपात्यांचा फडशा पाडत होतो. आज रात्रीच्या ड्युटीवर जायला जीवावरच आलेले होते. पण नाईलाज होता. मी नाराजीतच रेनकोट चढवत होतो. घरातल्यांच्या चेहऱ्यावरची नाराजीही स्पष्ट दिसत होती. तरीही ते मला कृत्रिम हसत निरोप देत होते. छोटी उर्मी उचलून घ्यायला सांगत होती. तिचा एक गालगुच्चा मला संपूर्ण प्रवासात साथ करणार होता. माझा त्रासदायक प्रवास मला सुखकारक होण्यासाठी मला ते गरजेचे वाटत होते. ती मला येताना ' चुपाचूप ' नावाचा खाऊ आणायला सांगत होती , मी तिला उद्या येताना सकाळी आणता येणार नाही असे म्हणून चूप करुन टाकत होतो.

           ' पेरुचा पापा ' घेऊन निघायचे होते. पेन , रुमाल , चावी , पाणी आणि पाकीट या पाच शब्दांची आद्याक्षरे घेऊन बनवलेले ते संक्षिप्त रुप बनवलेले होते. त्यात आता रेनकोट , हेल्मेट, मोबाईल, चष्मा हे आणखी चार शब्द मिळवायचे बाकी होते. लक्षात राहण्यासाठी आपण बऱ्याचदा असे शॉर्टकट वापरतो. पण तरीही मी काहीतरी विसरलोच होतो. त्या दिवशी मी मोबाईल विसरुन आलो होतो तर मला ड्युटीचे आठ तास म्हणजे कमालीची शिक्षा वाटू लागली होती. पण तेवढा इंटरनेटमुक्त जीवन जगण्याचा आनंदही झाला होता. 

         आज मी रुमाल आणायला विसरलो होतो. सुरुवातीला रिमझिम पडत असलेला पाऊस दोन तीन किलोमीटर नंतर धोधो पडू लागला होता. मी माझा मास्क आधीच काढून ठेवला होता. हेल्मेट चढवल्यानंतर मास्कची गरज नव्हती. हेल्मेटवर काच असल्यामुळे पाणी तोंडावर येण्याची भीती नव्हती. मी चष्मेवाला असल्यामुळे तो घातल्याशिवाय मला स्पष्ट दिसणार नव्हते. मी चष्मा चढवला होता. आता पावसाने आपला वेग वाढवला होता. रपारप पाऊस प्रवासात अडथळे आणत होता. हेल्मेटच्या काचेवरुन पाणी ओघळू लागले होते. समोरचे स्पष्ट दिसत नव्हते. हेल्मेटला वायफर असते तर किती बरे झाले असते असे क्षणभर वाटून माझे मलाच हसू आले होते. 

          मी एकटा जातोय म्हणून हा मुसळधार पाऊस माझी सोबत करु पाहत होता. मला त्याची सोबत आता मात्र नकोशी झाली होती. समोर दिसत नव्हते , म्हणून मी हेल्मेटची काच वर केली होती. सगळा पाऊस माझ्या डोळयांत, नाकात आणि तोंडात शिरु लागला होता. चष्म्यावर पाणी आल्याने समोरचा रस्ता दिसेनासा झाला होता. पुढचा रस्ता दिसायला हवा होता. मी चष्मा काढुन ठेवला होता. आता रस्ता साधारण दिसू लागला होता. काळाभोर रस्ता सोबत करु लागला. रस्त्याच्या मधली पांढरी रेषा पुढे जायला मदत करत होती. मित्र असलेला पाऊस आता शत्रू होऊन डोळ्यांत पाणी आणू लागला होता. पाऊस थांबण्याचे अजिबात चिन्ह दिसत नव्हते. रेनकोटातून पाऊस आत यायला बघत होता. माझे कपडे ओले करुन विजयी झाल्यासारखे आकाशात ढोल वाजवत होता. मधेच वीजबाई चमकून अंगावर येत असलेले शहारे वाढवत होती. रस्ता संपता संपत नव्हता. 

          एकेरी वाहतूक असल्यामुळे समोरुन गाड्या येण्याचा प्रश्नच नव्हता. तरीही एखाद्या ठिकाणी उलट दिशेने गाड्या हाकणारे येत होतेच. त्यांच्यापासून जीव मुठीत घेऊन सुखरूपपणे खारेपाटण चेकपोस्ट गाठायचे दिव्य करायचे होते. पाण्याचे ओहळ रस्त्यावरून वाहताना दिसत होते. अचानक रस्त्यावर जास्त साचलेल्या पाण्याचा आवाज येऊन छातीत धस्स होत होते. कुठेही थांबायचे नव्हते. गाडी बंद केली आणि पुन्हा गाडी स्टार्ट नाही झाली तर ? हा प्रश्न सतावत होताच. त्यामुळे गाडी मध्येच थांबवून पाऊस कमी होण्याची वाट पाहणेही धोक्याचेच वाटत होते. पावसाचा मारा सहन करत गाडी रस्ता आणि पाऊस दोन्ही कापत पुढे पुढे चालली होती. 

          मी या कोविड राक्षसाचा राग राग करत खारेपाटण चेकपोस्टची प्रतिक्षा करत होतो. पंचेचाळीस मिनिटांच्या सलग प्रवासानंतर मी सुखरूप खारेपाटणला चेकपोस्टवर पोचलो याचा आनंद होत होता. दुपारची टीम आमच्या टीमची वाट पाहत असल्याचे दिसत होते. पुढील कामकाज आमच्याकडे सोपवून जाताना त्यांना सुटकेचा निःश्वास टाकताना पाहून आम्हाला रात्र काढायची आहे या भीतीने पोटात आलेला गोळा मोठा मोठा होऊ लागला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Friday, June 4, 2021

🟢 इलास , कधी इलास

 🟢 इलास , कधी इलास


          शिक्षण आणि प्रतिभा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षणाने प्रतिभा येऊ शकते. प्रतिभेमुळे शिक्षण घडू शकते. कमी शिक्षण असलेले प्रतिभावंत असलेले आढळून आलेले आहेत. जास्त शिक्षण घेतलेल्यांच्या अंगी प्रतिभा असेलच याची खात्री देता येत नाही. माणसाच्या अंगी असलेली ही प्रतिभा कधी लवकर लक्षात येते , तर कधी लक्षात यायला वेळ लागतो. ' हाडाचा शिक्षक ' , ' हाडाचा कवी ' अशी उपमा दिली जाते. सगळी माणसे हाडाचीच बनलेली असतात. पण ' हाडाचा ' हा शब्द त्यांच्यातल्या प्रतिभावंतासाठी वापरलेला असतो. 

          बहिणाबाई चौधरी या प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांना स्फुरत असणाऱ्या कविता त्या म्हणत असत. त्यात असणारा अर्थ डोळ्यातून पाणी आणणारा असे. त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईची प्रतिभा जोपासली. त्यांच्या कवितांचे लेखन करून त्या जगाला दिल्या. जगाला जगण्यासाठीचे अमृत बहिणाबाईंच्या गावरान शब्दात सामावलेले होते. बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. 

          कलासानिध्य आणि अक्षरसिंधु या सांस्कृतिक संस्थांमध्ये काम करताना मला अशी प्रतिभावंत माणसं भेटली. प्रत्येकामध्ये वेगवेगळा प्रतिभावंत मी बघत होतो. त्यांचं बोलणं, वागणं मी टिपत चाललो होतो. मी त्यांच्यात सर्वांत कमी असल्याने टिपकागदासारखं सगळं टिपत राहण्याचं काम करत होतो. माझ्यातला प्रतिभावंत जागा होईल का ? याची मी वाट पाहत होतो. मला काही ते जमत नव्हते. 

          आमच्या या टीममध्ये एक कलाकार माझे विशेष लक्ष वेधून घेत होता. मी त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. कुठे पाहिले मी या माणसाला ? जरा स्मरणशक्तीला चालना दिली. हा माणूस मला कणकवलीतच एका दुकानात दिसला होता. मग ते दुकानही आठवले. अरे हो !!! हा माणूस मला दोन दिवसांपूर्वी नारळाच्या दुकानात नारळ विकताना दिसला होता. अरे !!! मग हा माणूस इथे काय करतोय ? म्हणजे हा एवढा प्रतिभावंत नट असूनही नारळाच्या दुकानात नारळ विकतोय तर !!! मला त्या माणसाबद्दल आदर वाढला. त्याची विनोदी शैली मला भावत होती. सगळ्या वाक्यांमध्ये हसण्याच्या जागा या माणसाने शोधून काढल्या होत्या. शाब्दिक कोट्या करत बोलण्याची त्या माणसाची सवय सगळ्यांचीच फिरकी घेत असे. या माणसाशी बोलायचे म्हणजे विचार करूनच बोलायला लागे. 

          या माणसाने कलाकार म्हणून मालवणी सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या ' वस्त्रहरण ' नाटकातही काम केले होते. गोप्याची भूमिका करताना या माणसाने प्रेक्षकांना त्यावेळी लोटपोट करून सोडले असणार . हा माणूस एक प्रतिभावंत कलाकार असला तरी एक प्रसिद्ध व्यापारी आहे. ' नारळवाले खानोलकर ' म्हणून त्यांची सिंधुदुर्गातच नव्हे तर सगळीकडे ओळख आहे. या माणसाचे नाव विलास खानोलकर. मालवणीत या नावाचा उल्लेख ' इलास ' असा केला जातो. विलास खानोलकर म्हणजे एक चालतेबोलते नाट्यगृह आहे. 

          आज विलास खानोलकर हे नाव नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असले असते. पण व्यवसाय करता करता त्यांना ही कला जोपासावी लागली. रात्रीचे प्रयोग करून पुन्हा आपल्या पारंपरिक नारळाच्या दुकानात काम करताना ते नेहमी नजरेस पडतात. त्यांना दुकानात कॅल्क्युलेटरची गरज पडत नाही. ते सगळं हिशेब तोंडीच करताना दिसतात. त्यांचे मालवणी भाषेवर नितांत प्रेम आहे. ते शक्यतो मालवणी भाषेतच बोलतात. मालवणी भाषेतील म्हणी वापरत ते आपला संवाद अधिक रुचकर बनवतात. त्यांना मोठया साहित्यिक कार्यक्रमामध्ये बोलावणे येत असते. ते शीघ्र कवी आहेत. ते चारोळी तयार करतात. या चारोळ्यांमध्ये आपला गावाकडील माणूस लपलेला असतो. त्यांचे अनेक मालवणी लेख ' तरुण भारत ' या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. ते माझ्या काकांच्या वयाचे असतील. मी त्यांना कुठेही वाटेत भेटलो , तर मला ते विनोदाने ' काका ' अशी हाक मारतात. मात्र मी त्यांना फोन केला तर , तिकडून आवाज येतो , " बोल प्रवीण , काय म्हंतस ". 

          या विलास खानोलकरांनी ' इये कोकणचिये नगरी ' अर्थात ' कोकणच्या लोककला ' नावाचा एक अतिशय पारंपरिक , संस्कृतीविषयक आड दशावतार हा कार्यक्रम लिहून त्यात महत्त्वाची भूमिकासुद्धा केली आहे. त्यात त्यांचे मालवणी पात्र अतिशय भाव खाऊन जाते. मी त्यात त्यांच्यासोबत वासुदेव , धनगरीनृत्य , कोळीगीत गायन केले होते. त्यांची आणि अनिल सावंत यांची बतावणी ऐकताना आम्ही नेहमीच पोट धरून हसलो आहोत. अनिल सावंत त्यात कोल्हापुरी माणसाची भूमिका अतिशय छान रंगवायचे. आता ती कोल्हापुरी माणसाची भूमिका कणकवली कॉलेजचे प्राध्यापक हरिभाऊ भिसेसर हेसुद्धा छान वटवतात. 

          प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा छंदी असतो. विलास खानोलकरांना नाटकाचे , लेखनाचे , काव्यरचना करण्याचे वेडच आहे म्हणा ना !! वगनाट्यात बतावणी करताना सद्यस्थितीवर भाष्य करत बोलण्याची त्यांची पद्धत हास्य निर्माण करते. त्यांचा विनोद हा मार्मिक असतो. पोट धरून हसायला लावणारा असतो. प्रत्येक माणसाने या विलास खानोलकरांसारखे विलासी व्हायला हवे. अश्या प्रकारचा विलास प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी यायलाच हवा. माझ्या जीवनात हा विलास आला आणि माझे जीवन चांगल्या अर्थाने ' विलासी ' करून टाकले. म्हणूनच मी गमतीने म्हणतो , " इलास , कधी इलास ? " . 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...