Monday, February 28, 2022

🛑 पत्रकार सुधीर

          आज मी जी मुक्त पत्रकारिता करतो आहे , त्याचे अनेकांना श्रेय जाते. पण त्यात पत्रकार सुधीरजी राणे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. पत्रकारिता शिकताना मला एक वर्षाचे प्रशिक्षण घ्यावे लागले. ते घेत असताना मित्र राजेश मोंडकर , कै. पत्रकार शिरसाटसर , डॉ. रुपेश पाटकर , पत्रकार संदीप तेंडोलकर आणि दिग्गज पत्रकारांचे अनुभव ऐकायला मिळाले.त्यातून पत्रकारितेचे बाळकडू पिता आले. 

          पत्रकारितेमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला. पण क्रमांक येणे आणि प्रत्यक्ष पत्रकारिता या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पत्रकार म्हणून लिहिताना खूप मर्यादा येतात. कसेही लिहून चालत नाही. त्यात शब्दमर्यादा असतेच , पण कमीत कमी शब्दांत जास्त आशय वाचकांपर्यंत पोहोचवायचा असतो. 

          माझे बातमी लेखन परिपूर्ण व्हावे म्हणून मला सुधीरजी यांनी मार्गदर्शन केले. लहानपणी त्यांच्या शेजारी आम्ही राहात होतो. कणकवली टेंबवाडीतील घोलकर वकिलांच्या घरात भाड्याने राहात असताना ते आमचे अगदी जवळचे शेजारी होते. त्यांची बहीण माझ्याच वर्गात होती. आता ती डॉक्टर झाली आहे. त्यांचं संपूर्ण कुटुंब आम्हांला ओळखते. 

          शाळेत एकत्र शिकत असताना  सुधीरजी आमच्या पुढच्या वर्गात होते. माध्यमिक शिक्षण सुरु असताना सुधीरजी कराटे प्रशिक्षण घेत होते. नंतर त्यांनी स्वतःचा कराटे क्लास सुरु केला. मातीच्या विटा , कौले एका झटक्यात फोडतानाचे प्रात्यक्षिक दाखवताना मी त्यांना अनेकदा प्रत्यक्ष पाहिले आहे. ते ब्लॅक बेल्टधारक आहेत. त्यांच्यासोबत हेमलता पारधीये , जोशी अशी मंडळी होती. 

          शिक्षण घेत असतानाच त्यांना पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. त्यांनी लेखन करणे आरंभिले. त्यांचे लेख , बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या. त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला. आता ते एक प्रथितयश पत्रकार आहेत. त्यांचे मुद्देसूद लेख वाचताना त्यांची पत्रकारितेतील उंची लक्षात येते. ते कोणत्याही विषयावर मुक्तलेखन करु शकतात. एवढे करूनही त्यांना अजिबात अहंकार नाही. 

          मला लेख लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारे ते पहिले पत्रकार आहेत. त्यांनी मला लेख कसा असावा यांवर फोनवरुन मार्गदर्शन केले आहे. लेखात काय असू नये , हे मला त्यांनीच सांगितले आहे. त्यांचे वाचन अथांग आहे. पत्रकाराला नेहमी अपडेट राहावे लागते. ते स्वतः दररोज सगळे पेपर वाचतात. ते एक आदर्श पत्रकार आहेत. त्यांनी अनेक सामाजिक , राजकीय आणि शैक्षणिक बाबींवर लेख लिहून जनमानसात जागृतीचा प्रकाश टाकला आहे. 

          नुकतेच त्यांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानित करण्यात आले ही माझ्यासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. त्यांनी मला पत्रकारिता करण्यामध्ये नेहमीच धीर दिला आहे. संयम ठेऊन लेखन करण्याचे मार्गदर्शन केले आहे. ते नावाप्रमाणेच सु ' धीर ' आहेत. पत्रकारिता करताना खूप पैसा मिळत नसेल , पण त्यांना जे समाधान मिळत आहे त्यावर ते खुश आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )



🛑 महिला मेळावा : आनंदाचा सोहळा

          महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या कणकवली शाखेचा मेळावा संपन्न होताना आरंभापासून समारोपापर्यंत थांबण्याचा अविस्मरणीय योग आला. अर्थात तालुका प्रसिद्धी प्रमुख असल्यामुळे थांबावे लागले असे मी अजिबात म्हणणार नाही. त्यामुळे मला दिलेली जबाबदारी पूर्ण करणे हे काम मी उत्साहाने करत असलो तरी संध्याकाळी साडे सहा वाजले तरी अजिबात कंटाळा आला नाही. 

          कार्यक्रमाला उपस्थित राहायला थोडा उशीरच झाला होता. गडबडीत कार्यक्रमस्थळी निघालो. तालुकाध्यक्ष विनायक जाधवसरांचा फोन आला. " प्रवीणभाई , येताय ना ? " गाडीवर असताना फोन उचलणे चुकीचे आहे , पण " हा काय मी निघालो " असं सांगत दोन मिनिटांत पोहोचलो सुद्धा. मराठा मंडळ महिलांच्या आवाजाने गजबजलेले दिसत होते. फेटे घातलेल्या महिला शिक्षिका उत्साहात दिसत होत्या. मी गेल्या गेल्या त्यांचे फोटो घ्यायला सुरुवात केली. मला प्रत्येक घडामोडीचा क्षण टिपायचा होता. प्रत्येक महिला शिक्षिकेच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद कॅमेऱ्यात अचूक टिपणं मला किती जमलं मला माहित नाही ? मी माझ्या परीने प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो. 

          गरमागरम चहा घेण्याचा आग्रह झाला. मस्त वाफाळलेला चहा घेतला. स्वागत कक्षात महिलांची नोंदणी सुरु झाली होती. समोसा खावासा वाटत होता , पण भरपेट नाश्ता उगीच करुन गेलो असे वाटून गेले. सभागृहात गेलो. व्यासपीठ सुंदर सजवले गेले होते. फोटोतल्या सावित्रीबाई फुले , रॉड्रिग्जगुरुजी , शिंपीगुरुजी आणि कुसुमाग्रज यांच्याकडे बघून खूप आनंद झाला. ज्यांच्या चरणी कायम नतमस्तक व्हावे अशी ही व्यक्तिमत्त्वे दिवसभर आमच्यामध्ये होती याचाही आनंद वाटत होता. 

          काही मिनिटांत कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालक ज्योत्स्ना चव्हाणमॅडम मधुर स्वरात मान्यवरांना आसनस्थ होण्यास सांगत होत्या. सुरुवातीलाच हल्लीच देहावसान झालेल्या विभूतींना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. मान्यवरांनी व्यासपीठाचा ताबा घेतला आणि मंगलध्वनीच्या सुरात मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचे उद्घाटन केले. मान्यवरांच्या स्वागतासाठी महिला उत्सुक झाल्या होत्या. सुंदर समुहसुरात गायिलेल्या महिलांच्या स्तवनाने कार्यक्रमाची सुरेल सुरुवात झाली. त्यानंतर मराठी भाषेचे गोडवे गाणारे समुहगीत सादर झाले. सूर , लय , ताल यांचा त्रिवेणी संगम झाल्याचे दिसत होते. 

          मी आपला जसे मिळतील तसे फोटो काढत होतो , व्हिडीओ बनवत होतो. मी कुठेही कसाही फिरत असलो तरी माझी कोणालाच अडचण होत असल्याचे सांगितले जात नव्हते. कदाचित माझ्या मध्येच असण्याचा त्रास अनेकांनी सहन केला असेल तर त्यांची मला दिलगिरी व्यक्त करावीशी वाटते. 

          मुख्य पदाधिकारी महिलांनी सर्व मान्यवरांचे केलेले स्वागत आणि त्यांचा केलेला सत्कार सर्वांच्या दीर्घकाळ टिकणारा असाच होता. सत्कारमूर्तींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होताना दिसत होता. शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ आणि पुस्तकाची भेट असे आगळे वेगळे सत्काराचे स्वरुप होते. 

          कल्पना मलये यांनी लेखिकेला साजेल अशा साहित्यिक भाषेत कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सर्व मान्यवरांनी केलेल्या भाषणात महिलांबद्दलचा आदर ओसंडून वाहताना दिसत होता. शेकडो महिलांची उपस्थिती व्यासपीठाला अधिकाधिक आनंदित करताना दिसत होती. कणकवली शाखेच्या अनेक शैक्षणिक , सामाजिक उपक्रमांबद्दल सर्व वक्त्यांनी तोंड भरुन कौतुक केले. जिल्हा पदाधिकारी यांनी कणकवली शाखेचे विशेष कौतुक केले. राज्याच्या पदाधिकाऱ्यांनी ' पुन्हा पुन्हा येऊ ' असेही सांगितले. सर्व पदाधिकारी भरभरुन बोलत होते. महिला त्यांचे शब्द अगदी कान देऊन टिपून घेताना दिसत होत्या. निकिता ठाकूर आणि त्यांच्या टीमचे काम बघून तर सर्वांनीच तोंडात बोटे घातली असतील. मानसोपचार तज्ज्ञ पियुषा प्रभुतेंडुलकर यांचे मार्गदर्शन सुरु व्हायला थोडा उशीरच झाला होता. भोजनाची वेळ आली असतानाही सर्व महिलांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा आग्रह धरला. ताणतणावाचा सामना कसा करावा आणि आपल्या शालेय जीवनात येणाऱ्या ताणाला कसे दूर ठेवावे हे ऐकताना सर्व महिलांनी सुसंवाद साधला. तीन वाजता जेवतानाही कोणीही कंटाळलेले दिसले नाही हे विशेष. 

          दुपार सत्रामध्ये महिलांचे फनिगेम्स सुरु झाले. यांत सर्वांनी सहभाग घेतला होता. एका गेम मध्ये तरी भाग घेण्याचे प्रत्येक महिलेने येतानाच ठरवलेले होते जणू. एका आगकाडीत एकवीस मेणबत्त्या पेटवणाऱ्या महिलांना मानलेच पाहिजे. पाणी भरलेल्या बादलीतील वाटीत नाणे टाकताना ते नाणे तिन्ही वेळेला वाटीत पडणे सोपी गोष्ट नसते , पण अशी गोष्ट महिलाच शक्य करु शकतात हे पाहाता आले. दूरवर ठेवलेल्या बाटलीत रिंग टाकतानाही महिलांचा उत्साह पाहिला. अचूक नेम धरुन अलगद बाटलीभोवती स्थिरावणारी रिंग सुद्धा आश्चर्यचकित झाली असेल. 

          त्यानंतर बौद्धिक प्रश्नमंजुषा घेण्यात आली. त्यात भाग घेणाऱ्या महिलांनी अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा होता. त्यात सूत्रसंचालन करणारे दिनेश पाटीलसर स्वतःही थक्क झालेले दिसले. शेवटी दोन महिलांमध्ये टाय फेरी होऊनही दोघांचीही महिला रत्न म्हणून निवड करण्याची वेळ आली. 

          लकी ड्रॉ कार्यक्रम हा सर्वांसाठी आकर्षणाचा विषय होता. शेवटपर्यंत थांबलेल्या महिलांनाच त्याचे पारितोषिक प्राप्त होणार होते. चिठ्ठी उचलताना ती आपलीच असणार असे समोरच्या महिलांना वाटत होते. चार पाचदा तर ते खरेही झाले. दहा महिला भगिनींना लकी ड्रॉचे आकर्षक गिफ्ट प्राप्त झाले. ते गिफ्ट घेताना त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसत होता तो पाहून खऱ्या अर्थाने महिला मेळाव्याचा उद्देश सफल झाल्याचे दिसत होते. 

           समारोपाची ऋण व्यक्त करणारी , हृदयाला भिडणारी भाषणे झाली. हा मेळावा संपूच नये असे निघताना प्रत्येकाला वाटले नसेल तरच नवल. माझे मात्र या सर्वांची प्रसिद्धी देण्याचे काम अधिकाधिक वाढलेले दिसत होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )





Sunday, February 27, 2022

🛑 कॅरम कन्या दिक्षा

          आपल्या मुलांमधील सुप्तगुण जोपासणे हे प्रत्येक पालकांचं कर्तव्य आहे. मुलं म्हणजे चैतन्याचा झरा असतात. तो सतत पाझरत ठेवणं हेही पालकांचंच काम. मुलगी म्हणजे बापासाठी धनाची पेटीच असते असे म्हटले जाते. हे स्त्री धन जपायला हवं. त्यांच्या सुप्तगुणांना वाव देत राहायला हवा. 

          भिरवंडे गावातील एक मुलगी कॅरम खेळाने आपले नाव राष्ट्रीय स्तरावर नेऊ शकते ही मुलीची ताकद  तिच्या पालकांना म्हणूनच अभिमानास्पद ठरु शकते. तिचे नाव दिक्षा असे आहे. कणकवली तालुक्यातील कनेडी विभागाचे नाभिक अध्यक्ष नंदकिशोर चव्हाण यांच्या मोठ्या मुलीने आपले आणि आपल्या नाभिक समाजाचे नाव सर्वदूर पोहोचवले आहे. ती आम्हां नाभिकांसाठीची अस्मिता आहे. " मूर्ती छोटी , पण किर्ती मोठी " असे तिचे भव्य दिव्य कार्य बघितले की आमचा प्रत्येकाचा उर अभिमानाने भरुन येतो. तिच्या माता पित्यांची साथ तिच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. ती स्वतः दहावीच्या वर्गात शिकत असतानाही कॅरम खेळ खेळते आहे. हल्लीच तिची वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही आमच्या मानाच्या शिरपेचात अभिमानाचा तुरा खोवण्यासारखी गोष्ट आहे. 

          दिक्षा ही मुलगी अभ्यासातही हुशार आहे. तिने आपल्या खेळातील कौशल्य अधिकाधिक वाढवावे. खेळाबरोबर अभ्यासातही लौकिक मिळवावा. तिच्या प्रत्येक स्ट्राईकला पॉकेटमध्ये जाणारी सोंगटी पाहिली की थक्क व्हायला होते. तिच्या हातात स्ट्रायकर आला की तो तिचा गुलामच बनतो. तिच्या मनात येईल तसा तिचा स्ट्रायकर चालतो. खूप कमी वेळात ती खेळ पूर्ण करते. तिचे हे यश असेच वृद्धिंगत होत राहावे अशी शुभेच्छा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )






Saturday, February 26, 2022

🛑 नाभिकांचे कल्याण

           काही माणसे कल्याण करण्यासाठी जन्माला येतात. नाभिक समाजाचे कल्याण करण्यासाठीही काही व्यक्तींचा जन्म झाला. अशा नाभिक जमातीचे सदैव कल्याण करण्याचा विचार करणारे आपल्या नाभिक समाजाचे राज्यपातळीवर कार्य करणाऱ्या नेत्याचे नावही कल्याण असावे हासुद्धा दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा. शिवाजी महाराजांच्या काळात घोडदळ , पायदळ असे सैन्य असे. दळे आडनाव म्हणजे एक प्रकारचं आमच्या नाभिक समाजाच्या समस्या सोडवणारे दलच आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. एव्हाना मी कोणाबद्दल बोलतोय हे वाचकांच्या लक्षात आले असेलच. हो बरोबर !!! मी आपल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष मा. कल्याणराव दळे यांच्याबद्दल बोलतोय. 

          नुकतीच त्यांची इतर मागास व बहुजन समाज संघटनेच्या कार्याध्यक्ष पदी अभिनंदनीय निवड झाली आहे ही आमच्या नाभिक संघटनेसाठी अत्यंत अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी यापूर्वीही अनेक राजकीय आणि संघटनात्मक उच्चस्तरीय पदे उपभोगली आहेत. 

          दोन वर्षांपूर्वी कणकवली येथे झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वधु वर मेळाव्यासाठी मा. दळेसाहेब अध्यक्षस्थानी विराजमान झाले होते. तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट घडली. त्यांनी केलेले अध्यक्षीय भाषण म्हणजे वक्तृत्वाचा एक उत्कृष्ट नमुना ठरावा. त्यांचे व्यक्तिमत्त्व आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भुरळ पाडेल असेच आहे. त्यांनी मांडलेले मुद्दे व त्यांचे स्पष्टीकरण प्रत्येक वाक्याला टाळ्या घेणारेच होते. नाभिक समाजाचा समूळ विकास व्हावा यासाठी त्यांची तळमळ त्यांच्या भाषणात दिसून येत होती. त्यांनी आपल्या भाषणात नाभिक जमातीच्या अनेक विषयांना स्पर्श केला. 

          आता ते एका मोठ्या संघटनेचे कार्याध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या मनात नाभिक समाजाबद्दल अनेक संकल्पना असतील , योजना असतील , त्या अंमलात येण्यावर त्यांचा नक्कीच भर असेल. ते एखादी गोष्ट करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतात. त्यांचे राज्यस्तरीय पुढारपण आमच्या तळागाळातील समाजासाठी दिलासा देणारे ठरणार यात तिळमात्र शंका बाळगण्याचे कारण नाही. 

          आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाभिक बांधवांसाठी मा. कल्याणराव दळेसाहेबांच्या रुपाने एक धडाडीचा समाजनेता गवसला आहे. त्यांना उदंड आयुआरोग्य लाभो अशी मी सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक संघटनेच्या वतीने प्रार्थना करतो. मा. दळेसाहेब , आप आगे बढो , हम सब आपके साथ हैं ।

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 )






Sunday, February 20, 2022

🛑 प्रज्ज्वलित भाचा

           माझी सगळी भाचरे चांगली आहेत. ते सर्व आम्हां भावंडांचा आदर्श ठेवतात. वाढदिवस दर वर्षांनी येत राहतात. पण दरवर्षीचा वाढदिवस आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो. आपल्या आई बाबांना तो जन्मदिवस जास्त प्रकर्षाने आठवत असेल. कारण त्या दिवशी त्यांच्या झालेल्या तारांबळीची केवळ कल्पना केली तरी आज अंगावर काटा उभा राहतो. किती रोमांचक क्षण असतात ते !!!

          बाळ जन्माला येइपर्यंतची ओढ आईला उल्हासित करत असताना तिला स्वतःला होणाऱ्या वेदनाही ती सुसह्य करुन घेते. आणि बाळाचा जन्म होतो.... एक सुकुमार बालक रडत जन्माला येते आणि सर्वांना हसवते. बाळाच्या आईच्या डोळ्यात हसू आणि आसू दोन्ही दाटून येतात. 

          आमच्या पिंटूच्या जन्माच्या वेळी अगदी तसेच झाले. पिंटू हे त्याचे टोपण नाव. मामांनी नाव ठेवण्याची पद्धत असल्यामुळे ' मराठी शब्दकोश ' वापरुन नवीन नाव शोधून काढले. त्यात ' प्रज्ज्वल ' हे नवीन नाव सापडले. या नावाचा अर्थही ' दीप तेवत ठेवणारा ' असा असल्यामुळे त्या नावावर शिक्कामोर्तब झाले. बाळाच्या तोंडात गोड पेढा भरवून ' प्रज्ज्वल ' असे उज्ज्वल नाव ठेवताना मी मामा म्हणून किती आनंदित झालो होतो म्हणून सांगू !!!

          आज हा प्रज्ज्वल ' जिम बॉय ' झाला आहे. स्वभावाने शांत असलेला पिंटू त्याच्या अभ्यासात खूप हुशार आहे. हल्लीच त्याचं शिक्षण पूर्ण होऊन तो नोकरी करत आहे. नवीन तंत्रज्ञान त्याने आत्मसात केले आहे. नक्कीच त्याच्या अंगी असलेल्या गुणांचा , कौशल्यांचा त्याला पुढील आयुष्यात उपयोग होत जाईल. त्याने आमचा सतत आदर केला आहे. आमच्याकडूनच त्यांना काही विशेष सहकार्य घडत नाही. आमचे भाचे आमच्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवत नाहीत हे विशेष. 

          पिंटूचा आज वाढदिवस आहे. तो आज आणखी एका वर्षाने मोठा झाला आहे. तो वयाने मोठा झालाच आहे पण मनानेही मोठा झाला आहे. त्याने नेहमी मोठे होत राहावे आणि आमच्या मनातील स्वप्ने पूर्ण करावीत. त्याला वाढदिवसाच्या अनेक उदंड शुभेच्छा.

©️ मोठे मामा



Thursday, February 17, 2022

🛑 इब्यालो

          संदीप खरेंचं बालगीत लागलं होतं. ते ऐकताना जुन्या आठवणी जागृत झाल्या. गाण्याचे बोल असे होते , " चमालातु चंगतोसा चमी चकए चष्टगो , मजेत बसा पसरुन पाय , मुळीच नाहीत कष्टगो "… म्हणजे त्यांनी चकारी भाषेचा उपयोग केला होता. सगळ्या शब्दांची सुरुवात ' च ' ने होते म्हणून त्या भाषेला ' चकारी ' भाषा म्हणत असावेत. भाषा बोलताना व ऐकताना खूप गंमत वाटते. त्याहीपेक्षा गंमत म्हणजे समोरच्याला अशी भाषा बोलता येत नसेल तर आपण या सांकेतिक भाषेत बोललो तर त्यांना कळायला अवघड जाणारी ही भाषा आहे. थोडा प्रयत्न केला तर ती शिकायला सोपी भाषा आहे. 

          आम्ही लहानपणी ही चकारी भाषा अनेकदा बोलायचो. प्रत्येक भागात ही भाषा वेगवेगळ्या प्रकारे बोलली जात असेल. माझी मोठी आत्या ही भाषा बोलायची. त्यानंतर कणकवलीत आम्ही जशा खोल्या बदलू लागलो तशा भाषेतही बदल घडत गेला. प्रत्येक ठिकाणची भाषा काही फरकाने बदलत गेली. आम्ही लहान मुले एकत्र आलो कि आम्ही मोठ्यांना समजू नये म्हणून चकारी भाषेचा वापर प्रामुख्याने करु लागलो. सतत या भाषेचा उपयोग करत असल्यामुळे सराव होत गेला आणि बोलण्यातील गतीही वाढली. ही भाषा जेवढी जलद गतीने बोलाल तेवढी ती समजायला कठीण जाते. त्यामुळे आपण काय बोललो ते समोरच्याला बिल्कुल समजत नाही. तीच तर खरी गंमत असते. अशी भाषा बोलणाऱ्यांची मग चांगलीच गट्टी जमते. या आगळ्या वेगळ्या सांकेतिक भाषेत बोलणाऱ्यांची वेगळीच मैत्री होऊ शकते. 

          आम्ही पाचही भावंडे ही भाषा लिलया बोलत असू. आमच्या बाबांनाही ती येत होती. शाळेतल्या मोजक्या मित्रांना ती येत होती. आमच्या शेजारी राहणाऱ्या खेळगड्यांना ती चांगलीच येत होती. एखादा नवीन शेजारी आला कि आम्ही काय बोलतोय ते त्याला समजत नसे , त्यामुळे त्याची चांगलीच गोची व्हायची. गोची म्हणजे अडचण बरं का !!!

          आमच्या दुकानाशेजारीच कामगार कल्याण केंद्र होते. तिथे कामगारांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबवले जात. एसटीतील कामगार , त्यांची मुले येथे सतत येत. सकाळी आणि संध्याकाळी तिथे खूप गर्दी होई. त्यामुळे माझ्या ओळखी वाढल्या. या कामगार कल्याण केंद्रात कॅरम , बुद्धिबळ , गायन , भाषण , वाचन , निबंध , दशावतारी नाटक , शिशुवर्ग , नाट्यस्पर्धा , भक्ती गीत गायन आणि असे अनेक उपक्रम बघायला मिळाले. मी कॅरम खेळायला तिथेच शिकलो. चॅम्पियन कॅरम बोर्डवर खेळण्याची संधी तिथेच मला मिळाली. स्ट्रायकर , रिबॉण्ड , क्वीन , बोरिक पावडर , थम असे अनेक शब्दांची भर पडत गेली. कॅरमची पीस अलगद पॉकेटमध्ये टाकण्याचे अवघड कौशल्य प्राप्त करुन घेतलं. क्वीन , कव्हर घेऊन समोरच्याला हरवतानाचा आनंदच वेगळा असायचा. त्यामुळे दररोज शाळा सुटल्यानंतर कॅरम खेळण्याचा छंदच जडला. इवल्याशा बोटात स्ट्रायकर पकडून त्याचा हलकासा स्ट्रोक मारुन पीस पॉकेटमध्ये गेली की त्याला ' कट :' मारणे म्हणत असू. असे अनेक कट मारायला , रिबॉण्ड मारायला मी शिकलो. 

          तिथे कॉलेजमध्ये शिकणारी मोठी मुलेही येत. त्यांचे पालकही येत. या सर्वांबरोबर हे सर्व खेळ खेळता येत. मोठ्यांबरोबर खेळताना जिंकलो तर आत्मविश्वास वाढत राही. मग आमच्या जोडीला चकारी भाषेचा अवलंब करावा लागे. ती भाषा ओठावर असे आणि कॅरम खेळणे बोटावर सुरु असे. 

          राजेश राजाध्यक्ष नावाचे एक कॉलेज कुमार त्यावेळी माझे मित्र बनले. त्यांना ही भाषा जलदगतीने बोलता येत असे. आम्ही मालवणी असल्यामुळे आमच्या मालवणी भाषेत चकारी भाषा बोलू लागलो. ही मालवणी चकारी भाषा बोलताना खूप मजा येई. 

          एकदा मी आणि राजाध्यक्ष कॅरम खेळत जोडीदार होतो. दुसरी जोडी आमच्यापेक्षा चांगली खेळणारी होती. पण आम्ही आमच्या चकारी भाषेत बोलत बोलत प्रतिस्पर्धी जोडीला नामोहरम करुन सोडले. त्यामुळे प्रतिस्पर्धी जोडीतील दोघेही घाबरुन खेळू लागले. त्यात एक चॅम्पियन खेळाडू होता. तोही घाबरला. मी छोटा होतो , पण खेळात आणि चकारी बोलण्यात चॅम्पियन होतो. राजाध्यक्ष आणि मी चकारीत बोलत होतो. राजाध्यक्ष मला मला म्हणाले , " केत इब्यालो " त्यांना असे म्हणायचे होते , " तो घाबरला ". समोरच्या जोडीला " इब्यालो " ही भाषा अजिबात समजली नव्हती. आम्हाला ती समजत होती म्हणून जास्त आनंद होत होता. आता " इब्यालो " या शब्दाचा आणखी काही वेगळा अर्थ असेल तर मला माहीत नाही. नाहीतर बाबा मी " इब्यालो " आधीच सांगतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Friday, February 11, 2022

फियर ऑफ फिवर

 🔵 फियर ऑफ फिवर लेखांक : ७९

ताप माणसाला तापच आणतो. आता तर साधा ताप आला , तरी त्या तापाची भीती वाटते. कोविड असला तर ? म्हणून ताप येऊ नये यासाठी काळजी घेण्यात येते. पण तरीही ताप आलाच तर काय करणार ? त्याला घाबरून कसे चालेल ? त्याला पळवून लावण्याचे मनोबल आपल्यात निर्माण केले पाहिजे. पूर्वीच्या तापात आणि आताच्या तापात फरक असेलही पण भीतीमध्ये फरक पडलेला आहे. सध्या भीतीनेच माणसे दगावताना दिसत आहेत. काय करावे समजतच नाही. सैरभैर व्हायला झाले आहे. डोकंच चालत नाही असंही म्हटलं जात आहे. रेड झोन नसलेले आपण त्या झोनमध्ये जाताना भीतीच्या थर्मोमीटरचा पाराही तसाच वाढताना दिसत आहे. 

          अनेक ताप येऊन गेले , ते बरेही झाले. पण सध्या ताप न येताही ' कोरोना पॉझिटिव्ह ' चाचण्या अधिक ताप आणत आहेत. तापाचे विविध प्रकार आहेत. त्या तापांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण डॉक्टरांनी सांगितल्यानंतर आपल्याला त्या तापाची अगदी जवळून ओळख होते. तोपर्यंत फक्त त्या तापाच्या नावापुरताच आपला आणि त्याचा संक्षिप्त परिचय असतो. डॉक्टरांनी सांगायला सुरुवात केली की ते ऐकणारेही सुन्न होऊन जातात. एकतर ते सगळ्यांच्या समोर सांगत  नाहीत. तसे सांगणेही चुकीचेच असते. पण कुटुंबप्रमुखाला बोलावून त्याला एकट्यालाच सांगितले जाते. तो बिचारा एकटाच काय तो ताप सहन करीत वाईट तोंड करत हळूहळू सगळ्यांना सांगतो. तो सांगून सांगून त्याच्या डोक्याचा ताप काही प्रमाणात कमी होतो , पण इतरांच्या डोक्यात भीतीचा ताप शिरतो. हे असेच चालू राहणार आहे , त्याला पर्याय नाही. ही भीती कमी करण्याचे नियंत्रण आपल्याकडेच आहे. 

          अकरा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. त्यावेळी माझा छोटा भाऊ आपल्या पत्नी व मुलीसह माझ्याकडेच राहत होता. त्याचा पगारही अंशतः सुरू होता. त्यामुळे एकत्र राहून त्याला आधार देणे गरजेचे होते. त्यांच्यासोबत एकत्र राहणे खूप आनंददायी होते. दोन्ही जावा मस्त राहात होत्या. बाबा, आई , मी , माझी पत्नी, तो , त्याची पत्नी , माझी मुलगी , त्याची मुलगी असे आठजण एकत्र राहताना मज्जा येत होती. कधीकधी भांड्यांचा आवाज येत होता, पण नंतर हास्याचे कारंजेही उडत होते. असे आमचे दोन भावांचं कुटुंब ' सुख म्हणजे नक्की काय असतं , काय पुण्य असलं की जे घरबसल्या मिळतं ' अशा प्रकारे हसतखेळत चाललेलं होतं. 

          अचानक एका संध्याकाळी माझ्या सव्वा वर्षाच्या पुतणीने झोपेत असताना डोळे पांढरे केले. तिला तसे बघून आमचे डोळे पांढरे होण्याची वेळ आली. इकडून तिकडे उड्या मारणाऱ्या माझ्या निरागस बबलीचे अचानक काय झाले म्हणून सगळेच चिंतेत पडले. वहिनीने तिला हलवले , पण तिचे तोंड घट्ट बंद झाले होते, डोळे वर गेले होते. मला घाम फुटला. लहान मुलांना असे काय झाले तर मला खूपच भीती वाटते. माझ्या भावाला तर त्याहूनही भीती वाटली. तो तर रडूच लागला होता. माझ्या बाबांनी आणि मी त्याला शांत केले. बबलीला एकशे चार ताप आला होता. तो डोक्यात गेला होता. तो ताप सहन न झाल्यामुळे तिला आकडी आली होती. ओल्या फडक्याने पुसून काढल्यानंतर ती शुद्धीवर येईल असे वाटले. पण ती शुद्धीवर आलेली नव्हती. 

          मी तिला तसेच फडक्यात गुंडाळले आणि डॉक्टरांकडे निघालो. सोबत वहिनी आणि भाऊ होताच. एका प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांच्याकडे बेड उपलब्ध नसल्यामुळे व बबलीची क्रिटिकल कंडिशन बघून त्यांनी आपल्याकडे दाखल करून घेतले नाही. आम्ही त्यांना हात जोडून , रडून विनंती केली तरी ते आपल्या नकाराशी ठाम राहिले. आम्ही मग दुसऱ्या बालरोग तज्ज्ञांकडे गेलो. त्यांनी दाखल करून घेतले , तोपर्यंत बबली शुद्धीवर आली होती. तिच्यावर पाच दिवस उपचार झाले. ती बरी झाली म्हणून आम्ही खुश झालो होतो. तिचे बोबडे बोल , तिचं दुडूदुडू धावणं पुन्हा नियमितपणे सुरू झालं होतं. पण तिचा ताप गेला , तरी चार पाच दिवसांच्या फरकाने तो पुन्हा पुन्हा येत राही. डॉक्टर जोशीबाई यांच्याकडे तिला घेऊन गेलो. त्यांनी तिला जमिनीवर ठेवण्यास सांगितले. त्या म्हणाल्या , " या मुलीला मेंदूज्वर असण्याची शक्यता आहे , तुम्ही तिला गोवा येथे उपचारासाठी घेऊन जा. तिथे तिच्यावर मोफत उपचार होऊ शकतील. लवकर निदानही होईल. 

          माझा भाऊ आधीच खूप घाबरला होता. डॉक्टरांनी असे सांगितल्यानंतर तो पुन्हा घाबरला. तो मला म्हणाला , " मला भीती वाटते , तू माझ्या मुलीला घेऊन गोव्याला जा. " मी घाबरलोच होतो , पण न घाबरल्यासारखं दाखवत होतो. पुन्हा एकदा धैर्य एकवटून मी आणि माझी वहिनी छोट्या बबलीला घेऊन गोवा मेडिकल कॉलेजमध्ये जायला निघालो. जाताना भावाची अवस्था बिकट झालेली मला दिसली. त्याची मुलगी असली तरी , मी एकदा जबाबदारी घेतली की ती योग्य पार पाडणार यावर त्याचा ठाम विश्वास होता. त्याची पत्नीही घाबरली असली तरी माझ्याबरोबर बहिणीसारखी यायला तयार झाली. ती आपल्या बाळासाठी हिरकणी बनून माझ्यासोबत आली. मला ती दादा म्हणते. मला तिने कधीही भावोजी अशी हाक मारलेली नाही. 

          गोव्याला आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो. तिथल्या आपत्कालीन विभागात संपर्क करून दोन ते तीन तासात बबलीला डॉक्टरांनी दाखल करून घेतले. तिच्यावर उपचार सुरू केले. बालविभागातील खेळणी पाहून बबली खुश झाली. पण पाच मिनिटांत ती रडू लागे. तिला तपासायला अनेक डॉक्टर्स येत. नवशिके डॉक्टर्स आम्हाला तिच्याबद्दल अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडीत. त्यांचे प्रश्न एकतर इंग्रजीत असत , किंवा कोकणी भाषेत असत. आम्ही त्यांच्याशी मराठीत बोलूनच उत्तरे दिली. जन्मापासून घडलेल्या सर्व घटनांचा धांडोळाच त्यांना कथन करावा लागला. एकतर मला त्यांच्या वॉर्डमध्ये प्रवेश नसे. एखाद्यावेळी दोन तीन मिनिटे आत गेलोच , तर मला तिथल्या वॉर्ड वुमन बाहेर जायला सांगत असत. त्यामुळे माझ्या वहिनीला बबलीकडे एकटीने लक्ष देताना खूप त्रास सहन करावा लागला. तिला अजिबात बबलीला सोडून जाता येत नव्हते. मग बबलीला माझ्याकडे देऊन ती कपडे धुणे वगैरे कामे करत असे. 

          एका सकाळी नर्सने बबलीला अजिबात काहीही भरवू नका असे सांगितले होते. पण बबली खूपच रडू लागली , म्हणून वहिनीने तिला दूध पाजले. थोड्या वेळाने मला बोलावण्यात आले. बबलीची ' मेंदूज्वर ' चाचणी करण्यात येणार असल्याने तिला काहीही द्यायला नको होते. पण ती दूध प्यायल्याचे सांगितल्यावर नर्स गोंधळली. तिने लगेच बारीक प्लास्टिक नळी आणली , तिच्या इवल्याश्या नाकात घातली. त्या नळीतून तिने प्यायलेलं सगळं दूध बाहेर काढलं. मी थिजून गेलो , ती नळी नाकात घालतानाच माझ्या अंगावर शहारे आले होते. आम्ही दोघांनीही बबलीला घट्ट पकडून ठेवले होते. थोड्यावेळाने तिच्या पाठीच्या कण्यात एक इंजेक्शन देण्यात आलं. मेंदुज्वरची चाचणी पूर्ण झाली. रिपोर्ट निगेटिव्ह आला. तरीही आणखी पुढील एका अवघड चाचणीसाठी त्यांनी आम्हाला दुसऱ्या खाजगी डॉक्टरांकडे जायला सांगितले. तिच्या अशा अनेक चाचण्या घेत असताना माझा भाऊही एकदा तिला बघून गेला. ती आता बरी आहे , याचा त्याला आनंद होऊन त्याची भीती कमी झालेली दिसली. 

          हॉस्पिटलमध्ये पेशंटसोबत आलेल्या माझ्यासारख्या व्यक्तींना बाहेरच्या जनरल हॉलमध्ये विश्रांती घ्यावी लागे. मला बबलीच्या काळजीने कधीही नीट झोप लागली नव्हती. त्यामुळे झोपताना वरच्या छताकडे नजर गेली की ते सगळं छतच गोलगोल फिरत आहे असे वाटून मला चक्कर येई. भीतीने आणि काळजीने मी व्याकुळता अनुभवत होतो. शेवटी बबलीला विशेष काहीही झालेले नाही हा निष्कर्ष घेऊन आम्ही कणकवलीची वाट धरली. 

          आल्या आल्या सगळ्यांनी बबलीचे गोड गोड पापे घेतले. भावाने मग तिची इतकी काळजी घेतली , की जरा जरी ती आजारी पडली तरी तो तिला लगेच डॉक्टरांकडे घेऊन जात असे. तिला शेळीचे दूध सुरू केले , गावठी अंडी सुरू केली. बबलीने या सर्वांचा फडशा पाडला. मी माझ्या मुलींसाठी कधीही एवढे प्रयत्न केले नसतील , तेवढे प्रयत्न त्याने केले. आता ती अगदी व्यवस्थित आहे. सातवीत गेलीय. आता तिला  " एवढे नको खाऊस , वजन वाढेल !!! " असे सांगावे लागते. पण काहीही म्हणा त्यावेळचा तो ' फियर ऑफ फिवर ' आज आठवला ना , तरी डोक्यात फिवर जातो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )










Monday, February 7, 2022

🛑 ने मजसी ने परत मातृभूमीला

          सकाळी उठून सहज फेसबुक उघडले. गानसम्राज्ञी लतादिदींचा एक व्हिडिओ समोर आला. त्यांच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण भारताला नव्हे तर जगाला दुःख झाले असेल. प्रत्येक घराघरांत दिदी पोहोचल्या असताना घरोघरी दुःख झालेले आहे.  त्यांच्या दिव्य सुरांनी प्रत्येकाचे कान कायमच तृप्त होत राहणार आहेत. 

         ' ने मजसी ने ' हे सावरकरांनी रचलेले देशभक्तीपर गीत मंगेशकर भावंडांकडून ऐकताना मंत्रमुग्ध होत असताना माझ्या डोळ्यांतून हळुवार पाणी ओथंबू लागले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या या गीतामध्ये मातृभूमीकडे परत येण्याची अतितीव्र ओढ लागलेली आहे. ते सागराला आपला प्राण तळमळल्याचे सांगत आहेत. आज आपल्यात लतादिदी नाहीत , पण त्यांच्या सर्व गाण्यांनी त्या अमर ठरल्या आहेत. त्यांचे कोणतेही गाणे लावले , तरी त्या ओळी गुणगुणव्याशा वाटतील अशाच आहेत. गानकोकिळा भारतरत्न लतादी म्हणूनच महान आहेत. पुढील कित्येक पिढ्या त्यांच्या श्रवणीय गीतांचा आस्वाद घेत राहतील. 

          हल्ली अनेक गाणी येतात , हिट होतात. लतादिदींची गाणी एव्हरग्रीन आहेत. ती कोणत्याही काळात ऐका , ती नेहमीच आपलीशी वाटत राहतात. त्यांच्या आवाजाची जादूच तशी आहे. 

          ' ने मजसी ने ' हे गाणे मीही समूहसुरात म्हटले आहे. खूप अवघड शब्द आहेत त्या गाण्यात. अचूक यमक जुळवलेले आहेत. चाल कर्णमधुर आहे. अशी अवीट गाणी ऐकण्याचे व गाण्याचे भाग्य आमच्या पिढीला लाभले हेच आमचे परमभाग्य. लहानपणी अक्षरसिंधुमधील गायक महेश काणेकर यांच्याकडून मी हे गाणे ऐकले होते. त्यांच्या गायनाचा प्रभाव माझ्यावर पडला होता. 

          मी डी. एड. ला असतानाची गोष्ट आहे. त्यावेळी आमचे प्राचार्य शहा सर होते. प्राचार्य कसे असावेत ? याचे मूर्तीमंत उदाहरण होते ते. त्यांच्याबद्दल आम्हां छात्रशिक्षकांना कमालीची आदरयुक्त भीती होती. मी प्रथम वर्षात शिकत असताना द्वितीय वर्षात एक गोड गळ्याची गायिका शिकत होती. आमचे परिपाठ एकत्र होत असत. त्यामुळे आम्हांला त्यांच्या प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्त्वाचे आविष्कार नित्य पाहायला मिळत. तिचे नाव फुलासारखे होते. तिचे आडनाव गावाच्या नावावरुन होते. 

          आज ती आमच्यासमोर एक गाणं सादर करण्यासाठी पुढे आली होती. ती गायला लागली , ती जणू लता मंगेशकरांच्या आवाजात गात होती. मी डोळे बंद करुन गाणे ऐकू लागलो होतो. " ए मेरे वतन के लोगो , जरा आँख में भर लो पानी , जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी " तिने हे गाणे पूर्ण म्हटले होते. गाणे संपले होते , मी डोळे उघडले होते. सर्वांनी जोरात टाळ्या वाजवल्या होत्या. 

          प्राचार्य शहासरांनी आपला चष्मा काढला होता. त्यांचे डोळे भरुन आले होते. त्यांनी आपले डोळे पुसायला सुरुवात केली होती. टाळ्या वाजवणारे आमचे हात अचानक थांबले होते. त्या गीताने खरंच रडायला लावले होते. शहासरांनी त्या मुलीला अशा प्रकारे शाबासकी दिली होती. त्यानंतर तिने हेच गाणे पुन्हा ज्या ज्या वेळी गायिले होते त्या त्या वेळी आम्ही सारखाच अनुभव केला होता. 

          असे अनेक दिग्गज आहेत , ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात ' न भूतो न भविष्यती ' असे कार्य केलेले आहे. रमेश देव असतील , सिंधुताई सकपाळ असतील आणि आता लतादिदी असतील. 

          सगळेच आम्हाला हवेहवेसेच आहेत. स्वर्ग असलाच तर त्यांना स्वर्गात नक्कीच स्थान मिळेल यात शंका नाही. नुकतीच बातमी ऐकली , दशावतारी नटसम्राट सुधीर कलिंगण यांचे दुःखद निधन झाले. रोज अशा धक्कादायक बातम्या वाचून , ऐकून आपण या अभूतपूर्व व्यक्तिमत्वांना पारखे झालोय याचीही खंत वाटतेय. या सर्व मंडळीनी चित्रगुप्ताकडे जाऊन हेच गाणे परत परत म्हणावे असे वाटते , " ने मजसी ने परत मातृभूमीला " 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Tuesday, February 1, 2022

🛑 आमचा राजू का रुसला ?

          राजू नावाची अनेक मुलं असतील जगात. माझ्याही आयुष्यात तसे अनेक राजू आले आहेत. त्या सर्व राजूंचे जीवन जवळून पाहता आले आहे. या राजूंची खरी नावे वेगळीच असतात. राजू हे त्यांचं टोपण किंवा उर्फ नांव असतं. सगळेच राजू हे सारखे नसतात. त्यांचं दिसणं , असणं , वागणंही निरनिराळंच. 

          लहानपणापासून असे अनेक राजू मला लोभ लावून गेले. सोबती झाले. आम्ही भाड्याने राहात होतो , त्यामुळे खोल्या बदलाव्या लागत , तसे आमच्या आयुष्यात येणारे राजूही तसेच बदलत असत. खोली बदलू तिथे एखादा नवीन राजू भेटत असे. ही राजू नावाची माणसे जीवाला जीव देणारी असत हे विशेष. 

          डीएडला असताना माझी परीक्षा मालवणला होती. तिथे मला दहा पंधरा दिवस राहावे लागले. तिथे मी ज्या मावशीकडे राहायला होतो , त्यांच्या दोन नंबर मुलाचे नावही राजू होते. तो आणि त्याचा भाऊ महेश , बहिणी सगळ्यांनी मला कौटुंबिक प्रेम दिले. त्यांच्यामुळे मी डीएडला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होऊ शकलो. हा राजू अजूनही भेटतो , तेव्हा माझ्या विद्यार्थी काळातल्या आठवणी जागृत होतात. 

          काही राजू हे ' राजगो ' नावाने ओळखले जातात. त्यांच्या चांगल्या नावाचे कायमच विडंबन केलेले दिसून येते. आमच्या चुलतकाकांच्या मुलाला राजगो म्हणत. हा राजू किती निरागस होता म्हणून सांगू ? मी सांगेन ते तो ऐकत असे. मी त्याचा मोठा दादा असल्यामुळे तो माझा कमालीचा आदर करत असे. पण तो मोठा होत गेला तसा त्याने आपल्या वाईट सवयींना मोठे केले. त्या वाईट व्यसनांनी त्याचे जीवनच संपून गेले. तो राजू असा रुसून गेला तो परत आलाच नाही. 

          आम्ही ज्या ठिकाणी स्वतःच्या मालकीची खोली घेतली , तिथेही माझी नवीन राजुशी भेट घडली. हा राजू अतिशय प्रेमळ स्वभावाचा होता. जाता येता तो ज्या ज्या वेळी बाल्कनीत दिसे , प्रत्येकवेळी त्याची ' गुर्जी ' अशी आदराची हाक कायमच कानी पडे. उंच, धिप्पाड देहयष्टीचा हा राजू माझ्या सर्व मुलींसाठी राजुदादा बनला होता. माझ्या छोट्या मुलींना तर त्याने इतका लळा लावला होता कि तो त्यांना हाक मारल्याशिवाय कधी पुढे गेलाच नसेल. तो जास्त बोलला नसेल , पण त्याचे डोळे आणि स्मितहास्य खूप काही बोलून जात असत. तो आमचा शेजारी होता आणि त्याने कायमच आपला शेजारधर्म पाळला होता. तो परोपकारी होता. तो घरी आला कि एक चैतन्यच त्यांच्या घरी प्रवेश करत असे. भारदस्त अशी त्याची चाल समोरच्या माणसाला नक्कीच भुलवणारी. कोणाचीही दृष्ट लागेल असाच होता तो. 

          आणि या आमच्या राजुच्या आयुष्यातला तो काळा दिवस आला होता. त्याच्या कौटुंबिक कामानिमित्त तो आपली टू व्हिलर घेऊन दुपारीच निघाला होता. काम तसे महत्त्वाचे असावे म्हणून त्याला जावे लागले होते. तो गाडीवर बसला कि कसला भारी दिसे !!! त्या दिवशी त्याची गाडी त्याला घेऊन सुसाट निघाली असावी. घरातून निघून त्याला काही तास झाले असतील आणि एक वाईट बातमी आमच्या कानावर येऊन धडकली होती. ती बातमी आम्हांला धक्का देऊन गेली होती. राजुचा जबरदस्त अपघात झाला होता. त्याला बघायला मी घाईघाईने निघालो होतो आणि बघतो तर काय ? अपघातस्थळी शेकडो माणसांची गर्दी झालेली दिसत होती. एका महाभयंकर दिसणाऱ्या काळाने त्याचे प्राण हिरावून नेले होते. आमचा राजू आम्हांला कायमचा सोडून निघून गेला होता. 

          जमिनीवर निपचित पडलेला राजु अचानक उठून बोलू लागेल असं मला त्यावेळीही वाटलं होतं. आता त्याची ' गुर्जी ' अशी प्रेमळ हाक पुन्हा कधीच कानावर पडणार नव्हती.  

          आता जेव्हा मी बाल्कनीतून किंवा जिन्यातून येत जात असताना अचानक कधीतरी तो माझ्या समोर येईल आणि मला ' गुर्जी ' अशी हाक मारेल असे वाटण्यापलिकडे मी कोणताही वेगळा आभास निर्माण करु शकत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...