Sunday, April 27, 2025

🔴 बा. स. लाड सर: एक तेजस्वी तारा आकाशात विलीन...

          बा. स. लाड सर... केवळ एक नाव नाही, तर एक प्रेरणास्रोत, एक आदर्श व्यक्तिमत्व! ते एक चालते-फिरते ज्ञानभांडार होते, एक असा अनमोल ग्रंथ ज्याची पाने उघडताच ज्ञानाचा आणि माणुसकीचा सुगंध दरवळतो. माझ्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता ऐकून, स्वतःची प्रकृती नाजूक असतानाही, त्यांनी मुंबईहून कणकवलीत येऊन मला भेट दिली, हे त्यांच्यातील असीम प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक होते.

          कणकवलीत डीएडच्या काळात, सलूनमध्ये काम करत असताना माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. आपल्या नाभिक समाजाचा सार्थ अभिमान बाळगणारे ते एक साधे, जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्व होते. तिथेच माझ्या वडिलांशी त्यांची मैत्री झाली, जी 'बाळा कोळंबकर' या प्रेमळ हाकेने अधिक दृढ झाली. मालवणच्या 'न्हिवे-कोळंब' या भूमीतील या तेजस्वी रत्नाला भेटल्यावर प्रत्येकालाच आनंद आणि आपलेपणा वाटत होता. त्यांच्यात अहंकाराचा कणभरही अंश नव्हता.

          कणकवलीच्या काशीविश्वेश्वर मंदिरात सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या कार्यक्रमात त्यांचे ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालन आजही माझ्या स्मृतीत जिवंत आहे. अणावकर गुरुजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांसमोर त्यांची वाणी जणू ज्ञानाचा आणि अनुभवाचा सागर होती, ज्याने मला नेतृत्वगुणांची ओळख करून दिली. त्यांचे ते भाषण माझ्यासाठी एक दिशादर्शक ठरले.

          तळगाव हायस्कूलमधील स्काउटच्या प्रशिक्षणात त्यांचे मार्गदर्शन म्हणजे जणू एका कुशल मार्गदर्शकाने दाखवलेला प्रकाश होता. ते केवळ एक उत्तम शिक्षकच नव्हे, तर एक उत्कृष्ट स्काउट मास्टर होते. काळसे धामापूरच्या त्यांच्या शाळेत त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले, ज्याच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्रदान केले.

          असे हे उत्तुंग व्यक्तिमत्व, आमच्या नाभिक समाजाचे एक अनमोल रत्न होते आणि राहतील. त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा आम्हांला सदैव अभिमान राहील. माझ्या मनात त्यांचे स्थान कायम अढळ राहील.

          त्यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. एक आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असताना, सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका नाभिक संघटनेच्या सामाजिक कार्यांमधील त्यांचा सक्रिय सहभाग आम्हां सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण होते आणि ते आमच्या आठवणींच्या पानांवर कायमस्वरूपी कोरले जातील यात कोणतीही शंका नाही.

          आणि आता... हल्लीच त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कानी आली आणि मन एका क्षणासाठी सुन्न झाले. इतके आरोग्यदायी व्यक्तिमत्व अचानक आमच्यातून निघून जावे, यावर विश्वास बसणे कठीण आहे. हे लिहित असताना, जर त्यांचा पावन आत्मा माझ्या आसपास असेल, तर माझ्या या शब्दांच्या रूपात मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.


©️ प्रवीण अशितोष कुबल, तालुका सरचिटणीस, कणकवली नाभिक संघटना




























Saturday, April 19, 2025

फोन आले आणि पत्र गेले!

 

फोन आले आणि पत्र गेले!

    आजकाल फोनने आपल्या जीवनात अशी काही क्रांती घडवली आहे की, पूर्वीच्या पत्रव्यवहाराच्या आठवणीही धूसर झाल्या आहेत. एकेकाळी ज्या पत्रांसाठी आपण डोळे लावून बसायचो, ज्या पत्रांमधून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या भावनांचा ओलावा अनुभवायचो, ती पत्रं आता इतिहासजमा झाली आहेत. आता जमाना आहे ‘फोन मित्रां’चा! कधीतरी एखाद्या कार्यक्रमात पुसटशी भेट झालेली व्यक्ती असो, किंवा केवळ एका चुकीच्या नंबरमुळे झालेली ओळख असो, आता फोनच्या एका क्लिकवर मैत्री फुलते आणि बोलणं सुरू होतं.

    खरं तर, हे फोन मित्र सोयीचेही आहेत आणि डोकेदुखीचेही. एका क्षणात संपर्क साधता येतो, आवाज ऐकता येतो, पण त्याचबरोबर फेक कॉल्स आणि अनोळखी त्रासदायक फोनमुळे मन वैतागून जातं. त्यामुळे आता फोन उचलण्यापूर्वी आणि बोलतानाही खूप सावधगिरी बाळगावी लागते. कोण बोलतोय, कशासाठी बोलतोय, हे समजून घेऊन फोन कट करण्यातच शहाणपण असतं.

    अखेरीस, फोन करणं, येणं, घेणं, त्यावर किती वेळ बोलायचं किंवा फक्त कामापुरतं बोलायचं, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास, माझे अनेक मित्र आहेत, पण मैत्रिणींचे फोन कामाशिवाय क्वचितच येतात. मित्रही उगाच फोन करून त्रास देत नाहीत. मी स्वतः कोणालाही विनाकारण फोन करून तासनतास बोलणं टाळतो, कारण प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा असतो. शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्याने पालकांचे फोन येतात आणि ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. नातेवाईकांचे फोन कमी असतात, पण त्यातही आता लग्नाळू मुला-मुलींच्या माहितीसाठीचे फोन जरा जास्त असतात.

    आता जर तुम्हाला कोणतेच फोन नको असतील, तर फोन स्विच ऑफ करणं हा उत्तम उपाय आहे. पण महत्त्वाचा फोन येण्याची शक्यता असेल, तर नाइलाजाने फोन चालू ठेवावा लागतो. संध्याकाळी कामावरून आल्यावर अनेकजण निवांतपणे फोनवर बोलताना दिसतात. कदाचित दिवसभराचा थकवा आणि एकाकीपणा दूर करण्याचा तो त्यांचा मार्ग असेल.

    आजकालची तरुण पिढी तर कमालच करते! सतत कानाला ब्लूटूथ डिव्हाइस लावून फिरताना दिसतात. त्यांचे तर महत्त्वाचे फोन कधी थांबायचेच नाहीत! समोरून कोण बोलतंय आणि इकडून कधीतरी 'हं' किंवा 'अच्छा' असे अस्पष्ट प्रतिसाद येत असतात. त्यांची ती कोड लँग्वेज आमच्या जुन्या पिढीला लवकर कळत नाही, त्यासाठी खरंच पीएचडी करावी लागेल! ही मंडळी अक्षरशः फोनला कायमची चिकटूनच असतात. रेंज गेली की यांचा प्रॉब्लेम होतो खरा. प्रवासात तर यांच्या फोनचा पुरेपूर वापर सुरू असतो. मोबाईल बाजूला ठेवण्याचं नावच घेत नाहीत. बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत 'लगे रहो' हे ब्रीदवाक्य ते अगदी इमानदारीने पाळतात.

    त्या दिवशी मी सावंतवाडीहून कणकवलीपर्यंत एसटीने प्रवास करत होतो आणि मला हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. आजकाल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, यात शंका नाही. पण या सोयीमुळे पूर्वीच्या हळुवार आणि भावनापूर्ण पत्रव्यवहाराची जागा घेतली, याची खंत नक्की वाटते. फोनमुळे जग जवळ आलं खरं, पण माणसांमधील संवाद आणि जिव्हाळा काहीसा हरवला की काय, असं कधीकधी वाटून जातं.

© प्रवीण अशितोष कुबल 

Friday, April 18, 2025

🔴 'यक्ष उद्धार' - कलेच्या रंगात रंगलेली शिक्षक मंडळी!

          माझ्या मनात 'यक्ष उद्धार' या दशावतारी नाटकाच्या आठवणी ताज्या आहेत. नुकताच कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा भाग म्हणून हा नाट्यप्रयोग सादर झाला आणि आजही त्यातील रंगत कायम आहे. या नाटकाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाही, तर कलाकारांच्या भूमिकेत असलेल्या माझ्या शिक्षक बंधू-भगिनींच्या कलागुणांची एक अविस्मरणीय छाप सोडली.

          दिग्दर्शक आणि कलाकार संतोष तांबे यांनी साकारलेला यक्ष केवळ प्रभावी नव्हता, तर त्यांनी त्या पात्राला एक वेगळी उंची दिली. सदाशिव राणे यांनी पार्वतीची भूमिका सहजतेने आणि समर्थपणे साकारली. मंगेश राणे यांचा ब्रम्हराक्षस भीती आणि उत्सुकता निर्माण करणारा होता, तर निलेश ठाकूर यांच्या सोमा गुराख्याच्या भूमिकेतील निरागसता आणि सहजता भावली.

          राजेंद्र गोसावी यांनी राजा सूर्यसूताची भूमिका मोठ्या दिमाखात साकारली, त्यांच्यातील आत्मविश्वास आणि तेज प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अजय तांबे यांनी विरभद्राची भूमिका तितक्याच ताकदीने साकारली. राज कदम यांनी सुमतीच्या भूमिकेतून स्त्री पात्राला न्याय दिला.

संगीत नाटकाचा आत्मा असतो आणि या नाटकाला सुनिल गावकर यांच्या हार्मोनियमने, सोहम मेस्त्री यांच्या मृदुंगाने आणि समर्थ सूतार यांच्या झांजेने उत्कृष्ट साथ दिली. या वाद्यांच्या सुमधुर संगीताने नाटकातील दृश्यांना अधिक जिवंत केले. आणि हो, गणपतीच्या भूमिकेतील शिक्षक कलाकार, दिनेश जंगले आणि ऋतुजा जंगले (रिध्दी-सिद्धी), यांनी आपल्या निरागस अभिनयाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली.

          दर तीन वर्षांनी होणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका कणकवलीचे त्रैवार्षिक अधिवेशन हे केवळ शिक्षकांच्या भेटीगाठीचे ठिकाण नसते, तर ते आमच्यातील कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याचे एक सुंदर व्यासपीठ असते. यावर्षी 'यक्ष उद्धार' नाटकाच्या माध्यमातून माझ्या शिक्षक सहकाऱ्यांनी कलेची एक उत्कृष्ट मेजवानी दिली.

          मी स्वतः या नाटकाच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होतो, कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या अविस्मरणीय दृश्यांना कैद करत होतो. शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही मी नाटकाच्या रंगात पुरता रंगून गेलो होतो. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका इतक्या तन्मयतेने साकारली होती की, क्षणभरही असे वाटले नाही की हे व्यावसायिक कलाकार नाहीत. त्यांचे समर्पण, त्यांची मेहनत आणि कलेवरील त्यांचे प्रेम स्पष्ट दिसत होते.

          'यक्ष उद्धार' हे केवळ एक नाटक नव्हते, तर ते आमच्या शिक्षक कुटुंबातील स्नेह, एकजूट आणि कलात्मकतेचा सुंदर नमुना होता. या नाटकाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर आम्हा सर्वांना एक वेगळा आनंद आणि प्रेरणा दिली. या अप्रतिम अनुभवासाठी सर्व कलाकारांचे आणि समितीचे मनःपूर्वक आभार! अशा कलात्मक प्रयत्नांमुळेच शिक्षकी पेशा अधिक समृद्ध आणि आनंदी बनतो, यात शंका नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबल






































Sunday, March 30, 2025

🐀 दारावरचा न्हेल्यानी

  🐀 दारावरचा न्हेल्यानी


          आपण राहण्यासाठी एखाद्या शहरामध्ये भाड्याची खोली घेतो. त्यात आपल्याला राहायचे असते. घरातल्या कुटुंबासोबत काही नको असलेले सदस्य आपल्याबरोबर राहायला आलेले असतात. ते पूर्वीपासूनच राहत असतात , फक्त आता आपली त्यांना सोबत झालेली असते इतकेच. मी उंदीर , झुरळे , मुंग्या , कोळी यांच्याबद्दल बोलतोय हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. अर्थात स्वतःचे घर असले म्हणून हे अनवॉन्टेड सोबती यायचे राहात नाहीत , ते कुठूनतरी येतातच. चांगल्या फ्लॅटमध्येही बेसिनच्या खाली झुरळांची ये- जा सुरू असतेच. स्वयंपाकघरातील त्यांचा वावर आपल्याला शिसारी आणणारा असतो. 

          मुंग्यांनीही बेजार करून सोडलेले असते. जिथे तिथे आपल्या घरात कोळी आपले घर बांधताना दिसतात. हे सगळे कीटक परवडले , पण उंदीर नको. तसे सगळेच कीटक उपद्रवीच असतात. पण उंदीर, चिचुंद्री यांचा उपद्रव अधिक जाणवतो. सीतेला कुटीत एकटी सोडून जाताना लक्ष्मणाने जशी ' लक्ष्मणरेषा ' आखलेली असते , तशी ' लक्ष्मणरेषा ' बाजारातून विकत आणून आपण त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. मग हे अनवॉन्टेड रावण सैरावैरा पळतात आणि त्यांना मारण्यासाठी आपण त्यांच्या मागून सैरावैरा पळतो. त्यांना काठीने मारताना चुकून एखादा घाव आपल्याच माणसांवर किंवा एखाद्या चांगल्या वस्तूंवर करायलाही आपण कमी करत नाही. आपल्यात त्यावेळी कमालीची वीरश्री संचारलेली असते. काही तर उगीचच धावत असतात. शेवटी सगळे हे प्राणी आपल्या आपल्या निवाऱ्यात काही काळ लॉकडाउनप्रमाणे जाऊन राहतात आणि औषधाचा असर संपला की पुन्हा त्यांचे अनलॉक झालेले असते. 

          आमच्या घरी या उंदरांना पळवून लावण्यासाठी ' पिंजरा ' आणून ठेवलेला असे. उंदरांनी खूपच उच्छाद मांडला होता. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. लोखंडी पिंजऱ्यात जाण्यासाठी एक दरवाजा असे. त्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येत नसे. रात्री आईने त्या पिंजऱ्याच्या दरवाजावर ' हिरवी कोथिंबीर ' लावून ठेवली होती. आम्ही सर्व भावंडांनी आपापली अंथरुणे घातली. नेहमीसारखे गाढ झोपी गेलो. बाबा पडल्यापडल्या घोरायला लागले. मीही त्यांच्या पोटात शिरून झोपलो. आई उशिरापर्यंत जागी असे. ती उद्याची तयारी करून ठेवत असे. तीही झोपली. आज तिला शांत झोप लागली असावी. सकाळी लवकर उठण्याची तिची सवय नव्हती. तिला माझे बाबा उठवत असत. बाबांची तयारी झाली की मग आई उठत असे. बाबांना गडबड असली तर कधीकधी ते आईला लवकर उठवून जेवणाची तयारी करायला सांगत. 

          पण का कोण जाणे , आज बाबांच्या अगोदर आई उठली होती. उठल्याउठल्या तिने काहीतरी पाहिले असावे. ते पाहताक्षणी ती मोठ्याने बोलली नव्हे ओरडलीच , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " हे वाक्य ती मोठ्याने बोललीच. पण बाबांच्या कानाकडे जाऊन पुन्हा हळू आवाजात बोलली , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " . बाबा तसेच घाबऱ्याघुबऱ्या उठले आणि बाहेरच्या दरवाजाकडे गेले. त्यांनी बाहेरच्या दरवाजाकडे ठेवलेल्या सर्व आपल्या वस्तू पडताळून पाहिल्या. सर्व वस्तू होत्या तश्याच होत्या. घरवालीने उगीचच काहीतरी सांगितले म्हणून तिला ते ओरडण्यासाठी वळले. आम्हीही आईच्या ओरडण्याने जागे झालो होतो. पण अंथरुणातून उठलो नव्हतो. पुन्हा आई ओरडली , " ओ , हकडे येवा , हेनी सगळा दारावरचा न्हेल्यानी " . तेव्हा बाबा स्वयंपाकघरात गेले तर तिथे पिंजऱ्यात एकही उंदीर नव्हता. पण पिंजऱ्याच्या दारावर ठेवलेली कोथिंबीर त्या उंदरांनी पळवली होती. एकही उंदीर त्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. दारावर ठेवलेली कोथिंबीर पळवल्याबद्दल आई तसे म्हणत होती , " ओ , दारावरचा न्हेल्यानी ". 

          उंदीर एवढे हुशार झाले होते की त्यांना पिंजऱ्यात न सापडता खाऊ घेऊन जाता येत होता. त्यानंतर वेगवेगळे प्रकार करुन उंदरांना पकडण्याचे काम सुरूच राहिले. आजही ' दारावरचा न्हेल्यानी ' या वाक्याला आम्हाला पोट धरून हसू येते. तुम्हालाही हसू आले असेल तर तुम्हीही पोट धरुन हसू शकता. फक्त हसताना तुमचे पोट धरा म्हणजे झाले.


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





Monday, December 30, 2024

🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर

 🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर


          २०१९ पासून मी तळेरे बीटमध्ये आहे. तेव्हापासून माझी आणि त्यांची भेट होत आहे. नावात राम आणि आडनावात विभुती असणारे हे व्यक्तिमत्व. 

          सध्या तळेरे नं. १ शाळेत कार्यरत असणारे माझे मित्र मा. श्रीराम विभूते यांच्याबद्दल मी बोलतोय हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. 

          तळेरे प्रभागातील अनेक उत्तम कार्यक्रम तळेरे नं. १ शाळेत संपन्न होत असताना मी अनेकदा त्या सर्व कार्यक्रमांना उपस्थितही होतो. प्रत्येक वेळी श्रीराम विभूते सरांचं ' सूत्रसंचालन ' अनुभवलं आहे. त्यांच्या हातात ' माईक ' गेला कि त्या ' माईकचं ' कर्णमधुर आवाजात रूपांतर होताना मी कित्येकदा ऐकलं आणि पाहिलं आहे. त्यांचा आवाज लांबूनही मी ओळखू शकेन इतका तो माझ्या ओळखीचा झाला आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी विद्येची देवता ऐकत राहावी अशीच. विद्येचं आराध्य दैवत जणू त्यांच्यावर सदानकदा प्रसन्न झालेलं असतं. त्यांनी बोललेली सुभाषिते, शायरी, चारोळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवत जातात तेव्हा तो प्रेक्षकांसाठी अनमोल क्षण असतो. त्यांनी बोलत राहावं आणि रसिकांनी टाळ्या वाजवत नियमित दाद देत राहावी असं त्यांचं सूत्रसंचालन मला नव्हे सर्वांनाच मोहवून टाकणारं असतं. 

          ते समोर येतात तेव्हा एखाद्या कार्यक्रमाचा सुश्राव्य आरंभ होत असतो. मान्यवरांचे स्वागत करताना त्यांच्याबद्दल ' ऑन द स्पॉट ' स्तुतीसुमने उधळणारे श्रीराम विभूते सर पाहिले कि त्यांच्या अभ्यासू व्यासंगी व्यक्तिमत्वाची छोटीशी झलकच झळकते.

          प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या सूत्रसंचालनाला नेहमीच ते असतात. त्यावेळी बक्षीस वितरणाचे त्यांचे सूत्रसंचालन कुतूहल जागृत करणारं असतं. त्यांच्या स्वतःच्या शाळेने अनेकदा तालुकास्तरापर्यंत किंवा जिल्हास्तरापर्यंत बाजी मारलेली असते तेव्हा तर त्यांच्या सूत्रसंचालनाला अधिक बहर आलेला असतो. 

          NAS सर्वेक्षण होते. माझी नेमणूक कासार्डे तांबळवाडी शाळेत झाली होतो. ते त्या शाळेत काम करुन बदली होऊन तळेरे नं. १ गेले आहेत. तांबळवाडी शाळेत ' CCTV कॅमेरे पाहिले. श्रीराम विभूते सरांनी त्यावेळी तांबळवाडी शाळेला डिजिटल बनविण्यात महत्वाची भूमिका निभावली होती असे ऐकायला मिळाले आणि मला अधिक आनंद झाला. 

          ते एक उत्तम तबलावादक आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात तबला वाजवताना मी स्वतः पाहिले आहे. शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे. त्यांच्यात अनेक उत्तम गुण आहेत. मला त्यांच्यातल्या उत्तम गुणांविषयी अतीव आदर आहे. त्यामुळे ते एखाद्या मोठ्या कार्यक्रमात उठून दिसतात. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार व सिंधदुर्ग जिल्ह्याचा गुरू गौरव पुरस्कार मिळाला आहे.

          त्यांचे स्टेटस भारी असतात. त्यांचे सामान्यज्ञान अफलातून आहे. त्यात नेहमीच वाढ होत असते. १ जानेवारीला त्यांचा वाढदिवस येतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी वाढदिवस असणं ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीराम विभूते सरांनी आपल्या चांगल्या गुणांमध्ये अधिक वृद्धी करावी आणि आपल्या व कुटुंबाच्या आयुष्यात पुढील वाटचालीसाठी समृद्धीचे, सुखाचे, भरभराटीचे दिन सदैव येवोत अशा कोट्यावधी शुभेच्छा. 


©️ प्रवीण कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. १



Saturday, December 21, 2024

जल्लोष बाल खेळाडूंचा

 जल्लोष बाल खेळाडूंचा 


मुलांसाठी खेळ ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. खेळ त्यांच्या जीवनात नियमित आनंद फुलवणारे क्षण निर्माण करत असतो. त्यामुळेच खेळ मुलांसाठी जल्लोष असतो. बालजीवनात चैतन्य आणण्याचे कार्य करणारा हा खेळ सतत येत राहिला तर मुलांचं तन आणि मन दोन्ही तंदुरुस्त होण्यास नक्कीच मदत होईल. 

गेले काही दिवस आम्ही सर्व शिक्षक या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. मुलांसोबत विविध खेळांचा आनंद घेत आहोत. मुलांसाठी आणि मुलांसोबत खेळताना होणारा आनंद काय वर्णावा !! बाल कला , क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सव मुलांच्या जीवनात दरवर्षी प्रसन्नतेचं पीक आणणारा काळ असतो. या दुर्मिळ क्षणांची ही मुले अगदी आतुरतेने वाट पाहताना मी स्वतः अनेकदा पाहिली आहेत. मुलांना खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहण्यासारखं सुख नाही. मुलं मस्त खेळत आहेत , मस्ती करत आहेत , भांडत आहेत , स्वतःच भांडणं सोडवत आहेत असं चित्र सगळीकडेच थोड्याफार फरकाने पाहायला मिळतं. शिक्षकांना हे सतत दिसणारं दृश्य आहे. मुलं तक्रारी सांगतात , त्या सोडवतात. भांडण करतात , भांडणं विसरून जातात. हा त्यांच्यातला निरागसपणा आम्हां मोठ्या माणसांना टिपता यायला हवा. 

केंद्राच्या स्पर्धा संपन्न होत असताना मला उपक्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मी मला दिलेली जबाबदारी अधिक उत्तम रीतीने नेहमीच बजावण्याचा प्रयत्न करतो. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये , आपल्याला त्रास झाला तरी चालेल हे माझं नेहमीच सूत्र असतं. कोणालाही थेट नकार द्यायला मला आवडत नाही. त्यामुळे मला जबाबदारी दिली नसली तरी माझीही जबाबदारी आहे असं समजून मी सर्वतोपरी अधिकाधिक प्रयत्न करत राहतो. ती माझी सवयच आहे. त्यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते आणि मग ती पार पडताना माझी दमछाक झाली तरी मी ती निमूटपणे सहन करत राहतो. 

मुलं छान खेळताना बघून केंद्रात यशस्वी होऊन प्रभागात जाताना एका विशिष्ट चाळणी प्रक्रियेतून जात असतात. प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झालेली मुलेच पुढे पुढे खेळू शकतात. स्पर्धेत यशस्वी व्हायचंच असं ठरवून आलेली मुलं अपयशी ठरली कि अक्षरशः रडू लागतात. यावेळी मी हे क्षण पुन्हा अनुभवले. माझ्या शाळेतील मुलांचा केंद्रात ज्ञानी मी होणार मोठ्या गटात निसटता विजय झाला. अर्थात मुलांनी केलेला अभ्यास मुलांना विजेता ठरवून गेला होता. प्रतिस्पर्धी शाळेतील मुलांनीही खूप अभ्यास केला होता. पण उपविजेता ठरुनसुद्धा त्यांना अश्रू आवरले नाहीत. मुलांना खिलाडूवृत्ती माहिती आहे , तरीही डोळ्यातून पाणी येतंच. मुलांची चाचणी आणि चाचपणी होत असताना जणू शिक्षकांचीच चाचणी होत असते. शिक्षक आणि मुले या दोघांनीही केलेल्या परिश्रमांचं ते दुहेरी यश असतं. यात जेव्हा पालकही जबाबदारी घेतात , तेव्हा मुलांच्या उत्तर देण्याचं प्रमाण अजून वाढत जातं. मुलं पटापट उत्तर देऊ लागली कि टाय फेरीची वेळ येते. 

टाय फेरीपर्यंत पोहोचलेली मुले खऱ्या अर्थाने विजेता ठरलेली असतात. फक्त पुढे एक कोणतातरी संघ न्यावा लागतो म्हणून एक संघ बाद ठरविण्याची ही एक निकषरुपी पद्धत आहे. जी मुलं आणि जे शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुढे आलेली असतात , त्यांच्या त्यावेळी डोळ्यांतून पाणी आल्याखेरीज राहत नाही. मुलांच्या ते प्रत्यक्ष येतं , शिक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं तरी ते लपवून ठेवावं लागतं. कारण त्यावेळी मुलांना सांभाळून घेणं अधिक गरजेचं असतं ना !!! 

मुलं आपलं कोणत्याही खेळातलं सादरीकरण बिनधास्त करतात. आमच्या खोखोच्या संघातील काही मुले आम्हांला इतकी छान खेळतील असं अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिलो होतो. आमचे माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनी येऊन येऊन मुलांना क्रीडांगणावर निपुणतेने खेळण्यासाठी धडे देत होते. या सगळ्या मुलांच्या अंगात खोखो हा खेळ इतका भिनला आहे कि बघताना प्रत्येकात चैतन्य संचारावं. अर्थात मी माझ्या मुलांचा खेळ पाहत होतो. मी स्वतः असा कधीही मैदानावर खोखो खेळ खेळलेलो नाही. कारण आमच्या बालवयात अशा क्रीडा स्पर्धा होत नसत. मी नोकरीला लागल्यापासून या स्पर्धा सुरु झाल्यामुळे आताच्या मुलांना असं खेळण्याची संधी सरकारकडूनच मिळालेली आहे. 

गेली अठ्ठावीस वर्षे मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मुलांच्या अभ्यासाबरोबर खेळसुद्धा घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. छोट्या आणि एकशिक्षकी शाळेत काम करताना मुले छोटी असल्याने मुलांना खेळात सहभागी करूनसुद्धा मुलं खेळात कमी पडताना दिसत होती.त्यामुळे भाग घेऊनसुद्धा कधी जल्लोष वगैरे करता आला नाही. आपले विद्यार्थी खेळात नैपुण्य दाखवतात तेव्हाच मनापासून जल्लोष करता येतो. गोवळ गावठण शाळेत असताना मुले कबड्डी छान खेळत. अनेकदा मुलांनी आणि मुलींनी शाळा समूह योजनेतही ट्रॉफ्या मिळविल्या. तेव्हापासून मुलांमधील खेळातील आवड माझीही आवड बनायला लागली. लोकांनी , पालकांनी यशस्वी झालेल्या मुलांचे ढोल वाजवून केलेले स्वागत मी अजूनही विसरलेलो नाही. खेळात पुढे जाणारी मुले जेव्हा त्या वर्षी ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. 

पुन्हा जेव्हा वैभववाडीत ‘ मांगवली नं. १  ’ शाळेत सात वर्षे असताना नेहमीच खोखो संघाचे नेतृत्व करता आले. आमची मुले स्प्रिंगसारखी खेळताना आमच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा होई. मुलांना दुखले खुपले तरी त्यांना काही वाटत नसे. खेळावर असलेलं त्यांचं प्रेम अंतर्मनात पूर्ण रुजलेले होते. अभ्यासातही चमक दाखवणारी मुले खेळातही अप्रतिम कौशल्ये दाखवताना आम्ही कमालीचे भारावून जात होती. 

आता तर मी ज्या शाळेत आहे , ती शिडवणे नं. १ शाळा तर खोखोसाठी प्रसिद्ध असलेली शाळा आहे. त्यामुळे आमचे अनेक माजी विद्यार्थी खोखो खेळताना पाहिले कि आमचे आजी विद्यार्थीसुद्धा भारावून जाऊन खेळतात. छोटी छोटी मुले खोखो खेळातील हे कौशल्य दाखवताना दिसतात , तेव्हा कधी कधी प्रश्न पडतो कि ही मुले हे कधी शिकली ? मुले बघून बघून आणि आपल्या भावंडांकडूनही परंपरेने खूप काही शिकत असतात. शिक्षकांपेक्षाही आपल्या मोठ्या भावंडांकडून शिकताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. 

यंदा मला प्रभागाचा क्रीडाप्रमुख म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले. त्यामुळे मला कामाचा बराच लोड आला. एकतर माझ्या शाळेमध्ये एक शिक्षिका सहा महिन्यांच्या रजेवर गेल्यामुळे दोन वर्ग सांभाळून मुख्याध्यापक काम करताना होणारी धावपळ , माझा अचानक वाढलेला बीपी , घरातील येणाऱ्या आकस्मिक अडचणी या सर्वांवर मात करताना खूप त्रास होत असला तरी तो त्रास दुसऱ्यांना न दाखवता हसतमुखाने काम करत राहणे एवढेच मला माहिती आहे. क्रीडाप्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी सांभाळतानाही गरम इस्त्री डोक्यावर घेतल्याचा भास होत होता. माझ्या शाळेत कमी शिक्षक असल्याने माझ्या शाळेतील माझ्या वर्गातील मुलांसाठी मला द्यायला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही याची खंत सतावते आहे. 

मुलांचा जल्लोष दिसतो आहे. माझी खंत मनात सलते आहे. क्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत असताना माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी किती खरा उतरलो ते मला माहिती नाही. पण मी मात्र मला जमले तितके प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपसमोर बसून काम करताना मी अजिबात थकत नव्हतो. कारण मला दिलेले कार्य मला निर्विघ्नपणे पार पडायचे होते. 

शिक्षक मला आदर देत होते. विद्यार्थी हसतमुखाने सामोरे जात होते. पंचांना दिलेले काम वेळीच पूर्ण होताना दिसत होते. सर्वांना घेऊन काम करताना मला माझ्या शाळेत संयोजक म्हणून काम केल्याचा अनुभव कामी आला. सर्व विजेते ट्रॉफी घेत होते , तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत चालला होता. मला क्रीडाप्रमुख बनवलं तेव्हा मला वाटलं होतं कि मला बनवलं तर नाही ना ? पण माझी तब्येत बरी नसतानाही मी क्रीडाप्रमुख म्हणून मला दिलेली जबाबदारी पार पडू शकलो याचा माझ्या बाबांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आज ते जिवंत असते तर त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या हसऱ्या सुरकुत्या पाहून मी नक्कीच सुखावलो असतो. मला सहकार्य करणाऱ्या माझ्या प्रभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व शिक्षक , पंच , परीक्षक , पदाधिकारी , पालक , ग्रामस्थ आणि देणगीदार  यांचे ऋण कसे फेडू ? 


© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


Wednesday, December 4, 2024

' परखलेले सर्वे '

         परख नावाच्या परखलेल्या म्हणजेच विशेष पारखून अभ्यासलेल्या सर्वेसाठी माझी नुकतीच क्षेत्रीय अन्वेषक म्हणून निवड झाली होती .  त्यानिमित्ताने शासनाच्या एका सर्वेक्षणामध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी लाभली हे माझे भाग्यच. 

        तशीही ही माझी तिसऱ्यांदा निवड झाल्याने मला यापूर्वी सर्वेक्षण केल्याबद्दलचा अनुभव गाठीशी होताच .  पहिल्या वेळी मला ' कासार्डे तांबळवाडी ' या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गाचा सर्वे करता आला. त्या शाळेत तर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावलेले दिसले. तिथे काम करत असलेल्या आणि काम करुन गेलेल्या शिक्षकांनी गावातील , वाडीतील लोकांच्या सहभागातून शाळेचा चेहरा बदलून टाकल्याचं ते चित्र मला मोहित करणारं होतं. त्या शाळेतील केसरकर मॅडम आणि राठोड सर यांनी केलेला उत्तम पाहुणचार अजिबात विसरता येणार नाहीच.  बिचारे राठोड सर आज हयात नाहीत याची खंत वाटते आहे.  त्यांचा चेहरा मला अजूनही जसाच्या तसा दिसतो आहे.  

        विद्यार्थी सुरक्षा संदर्भात परिपत्रक येण्यापूर्वीच यांनी खूप पूर्वी केलेला विचार खरोखरच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासारखाच आहे. असा भविष्यकालीन विचार करुन कार्य करणाऱ्या शिक्षकांना खरंच सलाम केले तरी कमी पडतील .  

        त्यानंतर दुसऱ्यांदा मला तळेरे येथील ' स्वीटलँड इंग्लिश मेडीयम स्कुल ' मिळाली होती .  इयत्ता सहावीच्या मुलांचा NAS सर्वे करतानाही मला खूप छान अनुभव प्राप्त झाला होता. तिथे मिळालेली वागणूक आदरयुक्त होती .  

        यंदा मिळालेली शाळा पुन्हा एकदा इंग्रजी माध्यमाची होती.  मी मराठी किंवा सेमी माध्यमाला शिकवणारा शिक्षक असलो तरी सर्वे करताना भाषेची कोणतीही अडचण मला आलेली नाही हे महत्त्वाचे आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्हां शिक्षकांना मिळालेलं मुद्देसूद प्रशिक्षण हे त्याला कारणीभूत आहे .  कोणतीही शंका न ठेवता सर्वांच्या सर्व प्रकारच्या शंकांना उत्तरे देणारे मार्गदर्शक खरंच मोलाचे ठरतात ते त्यासाठीच .  त्यांच्याकडे कोणत्याही अवघड शंकेचं मुद्देसूद उत्तर असतं. लहान मुलांना सांगावं तसं ते पुन्हा पुन्हा सुद्धा सांगतात तेव्हा त्यांच्या संयमाची दाद द्यावीशी वाटते. म्हणूनच त्यांनी दिलेले प्रशिक्षण शंभर टक्के शिक्षकांपर्यंत पोहोचते .  

        मला यावेळी मिळालेली शाळा माझ्या शाळेपासून जवळ असली तरी मी कधीही त्या शाळेत गेलेलो नव्हतो .  नडगिवे हे गाव शिडवणे पासून जवळ म्हणायला हरकत नाही .  एका खाजगी शाळेच्या आणि तेसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांची सर्वे परीक्षा घेण्यासाठी माझी निवड झाली होती.  असं काही वेगळं करण्यासाठी शिक्षक म्हणून मी नेहमीच उत्साही असतो .  यावेळीही माझा उत्साह नेहमीसारखाच होता .  

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...