Friday, July 8, 2022

शिडवणे नं. १ शाळेत ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ उपक्रम संपन्न

 शिडवणे नं. १ शाळेत ‘ एक दिवस बळीराजासाठी ‘ उपक्रम संपन्न 

शिडवणे  : गेली काही वर्षांपासून शासनाने ‘ एक दिवस बळीराजासाठी  ‘ हा उपक्रम शाळांमध्ये राबवण्यास सुरुवात केली आहे. या वर्षी शिडवणे नं. १ शाळेने टक्केवाडी येथील शेतात जाऊन ‘ एक दिवस बळीराजासाठी  ‘ हा उपक्रम संपन्न केला. 

          त्यावेळी शिडवणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच अनिल पांचाळ म्हणाले , “ शाळेतील मुले स्वतः श्रमप्रतिष्ठा जोपासत आहेत. त्यांनी तरवा काढला , लावणी केली. गावातील टक्केवाडीमध्ये येऊन शेतीकामाचे धडे घेतले. शाळेचा हा उपक्रम मुलांना शेतकऱ्यांविषयी आदर निर्माण करणारा आहे.”

           इयत्ता चौथी ते सातवीच्या सर्व मुलांनी शेतीकामामध्ये सहभाग घेतला. एक काडी पद्धतीने लावणी कशी करावी याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. तरवा काढण्याचे प्रशिक्षण घेतले. पॉवर टिलरची माहिती घेतली. 

शाळेचे पदवीधर शिक्षक प्रवीण कुबल यांनी उपस्थित शेतकरी निलेश टक्के , सचिन टक्के आणि उपसरपंच अनिल पांचाळ यांची मुलाखत घेत मुलांना अधिक माहिती दिली. मुख्याध्यापक सुनील तांबे यांनी पॉवर टिलर चालवून प्रात्यक्षिक करुन घेतले.  ‘ एक दिवस बळीराजासाठी ’ उपक्रमासाठी सहकार्य केल्याबद्दल शाळेच्या वतीने प्रवीण कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले.




























Wednesday, July 6, 2022

🛑 एक तरी 'ओवी ' अनुभवावी

🛑 एक तरी 'ओवी ' अनुभवावी

          आमच्या घरात मुलींची संख्या जास्त आहे. पहिली बेटी धनाची पेटी असते असे अजूनही म्हटले जाते. सलग मुलीच झाल्या तर त्याही धनाच्या पेट्या म्हणत खूपच धन पदरात पडत जाते. हे धन खऱ्या धन संपत्तीपेक्षा जास्त चिरकाल टिकणारे असते हे कोणाच्या कधी लक्षात येणार ? 

          एखाद्या घरी मुलगी जन्माला येते , तेव्हा बरीच लोकं नाकं मुरडताना मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मग ती मुलगी जसजशी मोठी होत जाते , तसा तिच्यावर जीव जडत जातो. ही मुलगीच आपले आयुष्य आहे याची खात्री पटत जाते. 

          तिचे बोबडे बोल लक्षात येतात. तिच्या बाललीला परत परत पहाव्याशा वाटतात. तिचे गोंडस फोटो फिरुन फिरुन बघण्यात गंमत वाटते. ती आपली ' परी ' होते. 

          आमच्या एका जवळच्या नातेवाईकांच्या घरी अशीच एक गोड ' परी ' जन्माला आली. ती जन्माला आली आणि त्यांचे जीवनच बदलून गेले. ' गोरी गोरी पान , फुलासारखी छान ' असलेली ही परी पाहताक्षणी कोणालाही आकर्षित करेल अशीच. तिचे नाव ' ओवी ' ठेवण्यात आले. जात्यावर बसावे आणि ओठात एखादी ' ओवी ' यावी तशी घरात पाय ठेवावा आणि ही 'ओवी ' हसतमुखाने समोर यावी. दिवसभराचा सर्व शिणभार कुठल्या कुठे पळून जातो. 

          आज या चिमुकलीचा पहिला वहिला वाढदिवस आहे. तिला हे कळण्याइतकी ती समंजस झालेली नाही हे नक्कीच. पण तिच्या पहिल्या वाढदिवसाचे हे क्षण आई वडिलांसाठी जितके महत्त्वाचे असतात , तितकेच ते तिच्या आजीआजोबांसाठी अधिक महत्त्वाचे असतात. त्यांच्या लहानपणी असे वाढदिवस साजरे झाले नव्हते. आपल्या नातीचा वाढदिवस जल्लोषात साजरा करतानाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना खूपच अत्यानंद होतो. असे अनेक अत्यानंद मी प्रत्यक्ष अनुभवले आहेत. 

          अशी ' ओवी' सारखी मुलगी प्रत्येकाच्या भाग्यात आली तर त्याच्यासारखा भाग्यवान तोच. म्हणूनच म्हणतो , " एक तरी ' ओवी ' अनुभवावी " हा ज्ञानेश्वरांचा मंत्रघोष अशाही अर्थाने सार्थ ठरतो.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली.



🛑 एक सच्चा भालचंद्र भक्त हरपला

🛑 एक सच्चा भालचंद्र भक्त हरपला

          नुकतीच एक बातमी कानावर धडकली. भालचंद्र महाराज आश्रमात दररोज पेटी वाजवून आरतीला साथ देणारे ' शिरी ' बुवा यांच्या निधनाची ती दुःखद वार्ता होती. 

          श्रीधर गुरव असे त्यांचे नाव असले तरी सगळे त्यांना ' शिरी बुवा ' या नावानेच जास्त ओळखत असत. नम्र आणि पवित्र व्यक्तिमत्त्व. सतत हसतमुख. त्यांच्यावर दुःखाचे अनेक डोंगर कोसळले असतील पण त्यातून पुन्हा उभे राहण्याचे बळ त्यांना भालचंद्र महाराजांवरील परमभक्तीमुळे मिळाले होते. 

          कधी देवळात गेलो आणि ते मला दिसले नाहीत हे सहसा होत नसे. मोठया उत्सवांना त्यांची दिवसभर हजेरी असे. ते पेटी उत्तम वाजवत. त्यांचा आवाज पहाडी नव्हता. तरीही ते तालासुरात गायन करत. ते पेटी उघडून बसले की मंदिरातील भक्त भजन करायला कोठून कसे येत ते भालचंद्र बाबाच जाणोत. परमहंस भालचंद्र बाबांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही कणकवली भूमी म्हणूनच जगप्रसिद्ध ठरु लागली आहे. 

          मी दररोज मंदिरात जात नाही. जेव्हा माझे जाणे होते तेव्हा मी त्यांच्या भजनात बसत असे. ते कधीकधी मला एखादा अभंग म्हणण्याचा आग्रह करत. मीही मग मला आवडणारा अभंग म्हणत भालचंद्र नामात दंग होऊन जाई. बुवांना माझा आवाज आवडे. ते गोड स्मित हास्य करुन मला दाद देत. मी सुखावून जाई. त्यांच्या आग्रहामुळे मला थोडी भजनसेवा देता आली हे त्यांचंच देणं. 

          ते माणूस म्हणूनही संवेदनशील होते. आमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ते नावाने ओळखत. ते आमचेच कस्टमर होते. त्यांनी कित्येकवर्षं आमच्या दुकानात बाबांकडून किंवा काकांकडून केस कापून घेतले होते. मी एखाद्या वेळी त्यांचे केस किंवा दाढी केली असेल असे वाटते. ते दररोज आमच्या दुकानात येऊन बसत. माझ्या बाबांशी गप्पा मारत आणि आपल्या कामाला निघून जात. 

          ते गोडावूनमध्ये पोती उतरण्याचे काम करत हे समजले तेव्हा ते मला खरेही वाटले नव्हते. प्रत्यक्ष पाहिले तेव्हा या माणसाबद्दलचा आदर कित्येक पटीने वाढला. त्यांनी अनेकदा बाबांकडे माझी विचारपूस केली होती. मी भेटलो कि " बाबा कसे आहेत ? " हे त्यांचे नेहमीचे वाक्य असे. 

          किर्तन वाजवणे हे सर्वांत अवघड काम. त्यांनी आपल्या आयुष्यात हजारो किर्तने वाजवली असतील. एवढी किर्तने ऐकल्यामुळे त्यांचे आचरण अतिशय शुद्ध आणि पवित्र झालेले होते. ते मला गुरु घेण्याबद्दल नेहमी सांगत. " सद्गुरु विना सापडेना सोय " , गुरुविण नाही दुजा आधार " अशी भगवद वचने त्यांच्या मुखात येत. त्यांची वाणी भालचंद्र वाणीच होती असे मला वाटे. माझ्यावर त्यांचेही संस्कार झाले आहेत. 

          एकदा आमच्या कणकवली तालुका नाभिक संघटनेचा मेळावा भालचंद्र मठात संपन्न होत होता. त्यावेळी आमच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ' शिरीबुवांचा ' शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला होता. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील कृतज्ञतेचे निस्सीम भाव स्पष्ट दिसत होते. त्यांच्या डोळ्यातील आनंदाश्रू बोलू लागले होते. आम्ही एका सच्च्या भालचंद्र भक्ताचा सन्मान केल्याचे पुण्य आमच्या पदरी पडले होते. त्यांनी कधीच अहंकार केला नव्हता. आपला सन्मान व्हावा असेही त्यांना कधी वाटले नव्हते. 

          भालचंद्र नगरीने भालचंद्र महाराजांच्या कृपाशीर्वादाने अनेक निस्सीम भक्त घडवले आहेत. त्यापैकी शिरी भाऊंचा नंबर खूप वरचा असेल हे स्वतः भालचंद्र बाबासुद्धा सांगू शकतील. एक निरागस भालचंद्र भक्त अनंतात विलीन झाला आणि भालचंद्र बाबा एका परमप्रिय भक्ताला पारखे झाले आहेत. त्यांच्या पेटीवर फिरणारी बोटे आणि त्या पेटीतून बाहेर पडणारे कर्णमधुर सूर प्रत्येक आरतीच्या आठवले नाहीत तरच नवल.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली



Sunday, July 3, 2022

🛑 कब बाळ : आपला शैक्षणिक भविष्यकाळ

🛑 कब बाळ : आपला शैक्षणिक भविष्यकाळ

          स्काऊटिंगमध्ये 6 ते 10 वर्षे वयोगटातील बालकांना ' कब ' म्हटले जाते. बालक म्हणजे येथे फक्त मुलगे असा अर्थ अपेक्षित आहे. मुलींसाठी ' बुलबुल ' असा शब्द संबोधला जातो. 

          लहान मुलांना प्राण्यांच्या , पक्ष्यांच्या गोष्टी खूप आवडतात. आमच्या लहानपणी ' चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ' ही सर्वांना आवडणारी गोष्ट होती. त्यात वाघ , लांडगा हे प्राणी दाखवलेले होते. त्यातील वाघ आता मोगलीच्या गोष्टीत ' शेरखान ' बनून आला आहे असे वाटते. लांडगा ' अकेला ' बनला आहे. यात म्हातारी कुठेही नाही तर तिची जागा कदाचित ' मोगली ' ने घेतली असावी. 

          आम्ही टीव्ही बघितला तेव्हा त्यावर कार्टून लागतं हे समजल्यावर टीव्हीवर प्रेम जडले. त्या कार्टुनमध्ये ' टप टप टोपी टोपी ' हे गाणं लागलं की आमची आवडती मालिका लागली म्हणून बघण्यासाठी आम्हां मुलांची फौज टीव्ही असणाऱ्या घराचा ताबा घ्यायची. छोटा मोगली करत असलेल्या करामती बघून आमच्यातही तो संचारु लागे. 

          हाच धागा पकडून आपल्याला आपला आजचा ' कब ' घडवायचा आहे. आपला विद्यार्थी संस्कारित करायचा आहे. त्याच्या बाललीला योग्य दिशेने कशा जातील यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे आहेत. त्यांच्या सुप्तगुणांना योग्य दिशा द्यायची आहे. स्काऊटची संकल्पना असणारे हे ' कबिंग ' त्याचाच एक भाग आहे हे आपल्या लक्षात यायला हवे. 

          गाणी , गोष्टी , खेळ आणि संघ पद्धतीच्या माध्यमातून मुलांना योग्य आकार देण्यासाठी आपल्याला ' कबिंग ' चा नक्कीच वापर करता येईल. मुलांना खेळ , गाणी , गोष्टी जात्याच खूप आवडतात. त्यांच्या या आवडीचा वापर करत करत त्यांना सहज शिक्षण दिल्यास ते शिक्षण त्यांना दीर्घकाळ लक्षात राहणारे व चिरकाल टिकणारे असेल असे वाटते. 

          म्हणून प्रत्येक शाळेमध्ये बनी , कब , बुलबुल , स्काऊट , गाईड , रोव्हर , रेंजरची पथकं असणं ही काळाची गरज होऊ पाहते आहे. मुलांना मोबाईल स्क्रिनपासून दूर नेण्यासाठीही याचा अभिनव उपयोग होऊ शकतो. घरात ढिम्म बसून राहणारी मुले याद्वारे काही हालचाली करतील. बेडन पॉवेल यांनी दिलेले ' बीपी सिक्स ' व्यायाम प्रकार करतील. आभासी दुनियेत राहणारी मुले ' मोगली ' प्रमाणे धैर्याने संकटांचा सामना करण्याची क्षमता प्राप्त करु शकतील. 

          ' मोगलीची गोष्ट ' समजून घेताना निसर्गाच्या सानिध्यात राहण्यास शिकतील. वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जर एकत्र राहू शकतात , तर आपण का नाही ? हा दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी ' कबिंग ' ही उत्तम संकल्पना आहे. हिंस्त्र प्राणी देखील माणसासारख्या भावना बाळगतात हे शिकू शकतील. नुकत्याच जन्माला आलेल्या लांडगीच्या पिल्लांसोबत ' माणसाचं ' मूल मोठं होत होतं ही कल्पना मुलांसाठी भूतदया शिकवणारी ठरु शकते.

          मोगलीला भालू आणि भगिरा सारखे सल्लागार भेटतात. त्यांचं मोगलीसाठी प्राणपणानं लढणं , झगडणं हेही मुलांनी लक्षात घेण्यासारखं आहे. "  कब बाळ , वडील माणसांचं ऐकतो , कब बाळ , स्वच्छ आणि नम्र असतो " या दोन नियमांवर आधारित केलेली कबिंगची निर्मिती म्हणूनच संस्कारक्षम वाटते. 

          सध्या हा बाळ ' कब ' बाळ नसल्यामुळे कदाचित वडील माणसांचं ऐकताना दिसत नाही. या ' कबिंग ' मुळे हा आजचा बाळ ' कब ' होऊन जाईल आणि वडीलधाऱ्यांचे ऐकेल , नम्र आणि स्वच्छ बनेल असेही वाटते. 

          या जगात शेरखानसारखी माणसं त्याला ज्या ज्या वेळी भेटतील तेव्हा त्यांच्याशी सामना करण्यासाठी तो एकट्याने लढणार नाही तर ' सांघिक ' शक्तीचा वापर करेल. शक्तीच्या वापरापेक्षा युक्तीचा वापर करेल. 

         तो विश्वसनीय , निष्ठावान , शिस्तप्रिय , विनयशील , प्राणीमित्र , मित्र , निसर्गमित्र, सार्वजनिक मालमत्तेचा रक्षक , धैर्यवान , काटकसरी , पवित्र विचारांचा , पवित्र उच्चारांचा , पवित्र आचारांचा बनण्यासाठी ' कबिंग - स्काऊटिंग ' चे माध्यम नक्कीच उपयोगी पडेल यात शंका नाही. 

          आपल्या शाळेतील प्रत्येक मूल असं घडू शकतं , त्यासाठी प्रत्येक शाळेत ' कबिंग ' ची चळवळ प्रत्यक्ष सुरु राहिली तर आपल्या कब बाळाचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 ) कणकवली.



🛑 जीवनात संतोष आला

🛑 जीवनात संतोष आला

          आपलं जीवन हे खरंतर सदैव संतोषमय असायला हवे. तसे घडताना दिसत नाही. कधी तो येतो , कधी जातो असे घडत राहते. मग जीवन निराशाजनक होऊ लागण्याची शक्यता असते. ऐश्वर्या गेली आणि माझ्या जीवनातील स्फुल्लिंगच निघून गेले होते. हर्षदाच्या रुपाने ती आपला अंश सोडून गेली होती ही एक आणि एकच जमेची गोष्ट होती. 

          छोट्या हर्षदाच्या संगोपनाची जबाबदारी सर्वांनी स्विकारली होती. माझं विमनस्क होणं आईला सहन होत नव्हतं. तिच्या हट्टापायी मला दुसरं लग्न करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता. दहा महिन्यात माझ्या आयुष्यात ' राणी ' चा प्रवेश झाला. ती स्वखुशीने माझ्या आयुष्यात आली असे मला वाटले होते. तिच्या वडिलांनी फोर्स केल्याने ती तयार झाल्याचे मला ' राणी ' नेच खूप उशिरा सांगितले. माझ्या बरोबर राहून लवकरच ती माझ्याशी एकरुप होत गेली आणि हेच तिचे जीवन आहे असे तीही मानत गेली होती. तिच्याबरोबर तिच्या सर्व नातेवाईकांची नाती मला येऊन चिकटली. तिचे आईबाबा , भावंडे यांना आपलंसं करणं माझ्यासाठी कसोटी परीक्षा होती. त्या सर्वांनी मला जीव लावला. मीच त्यांच्याशी सुरुवातीच्या काळात कठोर वागलो असेन. त्यांनी मला कधीही दुखावले नाही. उलट माझेच बरोबर आहे असे ते मान्य करत राहिले होते. 

          ' राणी ' ला सुरुवातीच्या काळात माझे अनेक शब्दडोस ऐकून घ्यावे लागले होते. पुन्हा घरातल्यांचे डोस वेगळे होतेच. तरीही ती छान सुरेख संसार रेखाटत चालली होती. तिने खूप कमी काळात साऱ्यांना आपलेसे केले होते. तिचा आवाज मोठा असला तरी तिच्या मनात काहीही नसते हे आम्हालाही समजायला काही काळ जावा लागला होता. तिच्या आवाजाबरोबर तिचं मनही तितकंच मोठं होतं , याची प्रचिती मला कित्येकदा आली होती. आज ती माझ्यासोबत नसती तर आजची हर्षदा कशी असती याची मी कल्पनाच करु शकत नाही. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी स्वतः आई झालेली नसताना चार वर्षाच्या मुलीला आईची माया देऊन सांभाळणे ही काही साधी गोष्ट नव्हती. तिने ते सहजसाध्य करुन दाखवले ही तिचीच किमया होती. 

          तिचा एकुलता एक सख्खा भाऊ होता. माझा मेहुणा. तो आपल्या मोठया चुलतभावासोबत फिरता व्यापार करत असे. तो माझ्याकडे आला होता. त्याला सलून काम करण्याची आवड निर्माण झाली होती. तो माझ्याकडे राहू लागला होता. माझ्या आत्येभावाच्या सलून दुकानात एक कारागिर हवा होता. तो त्याच्या सलूनमध्ये काम शिकू लागला होता. 

          माझी मुलगी हर्षदा तेव्हा दुसरीत तालुका शाळेत जात होती. तिला शाळेत सोडणे , रस्ता ओलांडून देणे अशीही कामे तो आवडीने करीत असे. तो तिचा मामा असल्यामुळे ती त्याला ' मामा , मामा ' म्हणत असे. त्यामुळे त्याच्या गिऱ्हाईकांचाही तो ' मामाच ' झाला होता. त्याच्यापेक्षा मोठी असणारी सगळी माणसे त्याला अजूनही मामा म्हणतात तेव्हा गंमत वाटते. मी सांगेन ती सगळी कामे तो करणारच हे ठरलेलेच असते. 

          त्यानंतर मी माझे स्वतःचे जेन्ट्स पार्लर सुरु केले. त्यात त्याला काम करायला सांगितले. एक दिड वर्षे मी आणि बाबा दोघेही त्याला मदत करत होतो. पण आता तो पूर्ण तयार झाला होता. त्यामुळे दुकानाची सर्व जबाबदारी मी त्याच्याकडे देऊन मोकळा झालो आहे. 

          त्याच्यामुळे मला एक हक्काचा माणूस मिळाला होता. तो कणकवलीत आल्यामुळे संपूर्ण बदलून गेला होता. त्याचे आयुष्यच बदलले होते. त्याचे राहणीमान कमालीचे सुधारले होते. 

          तो मला ' भावोजी ' म्हणत असल्यामुळे आमचे बरेच कस्टमर मला ' भावोजी ' या नावानेच हाक मारतात तेव्हा किती बरे वाटते म्हणून सांगू ? हा संतोष माझ्या जीवनात आल्यामुळे हे असे घडू शकले. तो इथे आल्यापासून अनेक नवनवीन गोष्टी शिकला आणि त्यात पारंगत होत गेला. आम्हालाही एखादी गोष्ट समजली नाही तर आम्ही त्यालाच विचारतो. तो ती सोडवण्याचा प्रयत्न करतोच. असा तो अष्टपैलू बनला आहे. 

          पूर्वी तो बोलताना अडखळत असे. हळूहळू तीही सवय त्याने प्रयत्नपूर्वक घालवली. त्याच्यासोबतच्या अनेक आठवणी ताज्या आहेत. त्याच्यामुळे माझे आणि माझ्या कुटुंबाचे जीवन बदलून जाण्यास मदत झाली आहे हे मी मान्य करतो. त्याचे जीवन घडविण्यासाठी माझा सिंहाचा वाटा आहे हे तो कधीही मान्य करेल असे असले तरी त्याने दिलेली साथ आम्हीही विसरणार नाही हे तेवढेच खरे आहे. 

          एका भावपूर्ण क्षणी मी त्याला असेही म्हणालो होतो कि तू माझा केवळ मेहुणा नसून ' मानसपुत्रच ' आहेस. तो मला अखंड आजन्म साथ देईल हे आम्हां उभयतांवर अवलंबून आहे. नाती टिकवणं हे मला आणि त्याला दोघांनाही जमतं. पुढे काय होईल हे दोघांच्याही प्राक्तनावर सोडून दिले तरी त्याच्यामुळेही माझ्या जीवनात संतोष आला हे नाकारुन चालणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर. ( 9881471684 ) कणकवली.



Saturday, July 2, 2022

🛑 आई गं !!!!!

🛑 आई गं !!!!!

          सकाळची शाळा असल्यामुळे शाळेत जाण्याची गडबड होती. आईचा दोन जुलैचा दिवस लक्षात होता. तिच्या स्मृतिनिमित्त दरवर्षी सगळ्या फोटोंना हार अर्पण केले जातात. बाबांनी आधीच हार आणून ठेवले होते. आईच्या आणि पत्नीच्या फोटोंना हार घातले गेले. मी फोटोतील आईच्या डोळ्यांत पाहण्याचा प्रयत्न केला होता. तिला हळदीकुंकू लावले. 

          काहीही न घेता तडक शाळेत जायला निघालो होतो. शाळेत गेल्यानंतर मी माझा उरत नाही. शालेय कामकाज करताना आईची आठवण निघून गेली होती. याचा अर्थ ती माझ्यातून निघून गेली नव्हती. ती माझी माऊली आहे. तिने केलेले संस्कार आम्हां भावंडात पुरेपूर उतरले आहेत. तिच्याकडून सोशिकवृत्ती आणि संयम शिकायला मिळाला होता. 

          तिच्या आचरणातून आम्ही घडत गेलो होतो. आम्ही बालपणी तिला जो त्रास दिला होता तो आठवला कि आईचा संयम समोर उभा ठाकतो. तिने आम्हाला प्रेम करायला शिकवले. तिचा पाठीवरुन फिरणारा हात मऊ पिसासारखा मुलायम वाटे. काम करुन करुन तिचे हात कडक झाले होते तरीही. तिने कधी आम्हाला कामांची सक्ती केली नाही. आम्ही न केलेली कामे ती बिचारी निमूटपणे करत असे. आज हे आठवले कि माझा मला राग येतो. 

          बाबा मारत असताना ती माऊली आम्हांला सोडवायला पुढे येई , तेव्हा बाबांचे काही फटके तिलाही बसले असतील. तिने कधी कुरकुर केली नाही. तिला हव्या असलेल्या वस्तू कधीच वेळेत मिळाल्या नाहीत. दागिन्यांची हौस तिला करता आली नाही. संकटकाळी तिच्या असलेल्या दागिन्यांवरही घाला येई. आमच्या शिक्षणासाठी आणि मोठया कुटुंबासाठी तिला अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. तिला जे मिळे त्यात ती समाधानी दिसे. माझ्या बाबांवर तिचे अतिशय प्रेम होते. ती कधीच बाबांच्या शब्दाच्या बाहेर गेली नव्हती. बाबा सांगतील तसेच तिने केले आहे. तिने आपल्या अनेक इच्छांना कायमच मुरड घातली होती. 

          पूर्वी दगडी पाट्यावर चटणी वाटली जात असे. आई चटणी वाटत होती. मी शाळेतून आल्या आल्या अतिशय प्रेमाने आईला मागून मिठी मारली होती. माझे वजन पेलत ती माऊली तशीच चटणी वाटत मला झुलवत राहिली होती. मी कधी रात्रीचा उपाशीपोटी झोपलो असलो , तर मध्यरात्री घायाळ पडत असे. मी घामाघूम होत असे. ती बिचारी मध्यरात्री उठून मला चहा आणि बटर भरवी. असे निर्व्याज प्रेम एक आईच करु शकते. 

          बाबांना कितीही उशीर झाला तरी ती वाट बघत उपाशीच राही. तिला दम्याचा त्रास होता. डॉ.सुधीर मराठे हे तिचे कायमचे डॉक्टर होते. त्यांच्यावर आणि त्यांच्या औषधांवर तिची श्रद्धा होती. 

          ती टेलरिंगचे काम बाबांकडून शिकली होती. गरोदर असतानाही तिने शिवणकामे केली आहेत. तिच्या हाताला चव होती. तिने बनवलेली उसळ सर्वानाच खूप आवडे. तिने बनवलेले धोंडास चविष्ट असे. 

          ती आपल्या मोठ्या भावांना ' आबा , अण्णा , नाना ' अशा आदराने हाक मारी. आमच्या आजोळीचे सुसंस्कार आमच्यावर झाले आहेत. आज आम्ही जे आहोत ते त्यांच्या सुशिल संस्कारामुळेच. आमच्या आईचे माहेरचे नावही ' सुशिला ' होते. ती नावाप्रमाणे तशीच होती. ती बाबांची ' जयश्री ' होती. आई आजारी असताना बाबाच तिची सेवा करीत. ती आमचा हातही लावून घेत नसे. एखाद्याची आई गेली की त्या मुलांची काय अवस्था होत असेल याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. तिचं ते गोड हसणं मला माझ्या स्वप्नांत दिसलं असतं तरीही मी धन्यता मानली असती. आई गं ..... तू ये ना माझ्या स्वप्नात ? मी तुझी वाट पाहतोय. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.





Friday, July 1, 2022

🛑 आठवणींचा महापूर

 🛑 आठवणींचा महापूर

          आम्ही आमच्या किर्लोस गावी गेलो होतो.  आमची किर्लोस आता आंबवणेवाडी या नावानेदेखील ओळखली जाते. आमचा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार पडत होता. आमच्या वरवडे कासरल बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाताना दिसत होते. पाण्याचा वेग वाढत चाललेला दिसत होता. तरीही आमची घरी जायची ओढसुद्धा तितकीच वाढत चालली होती.  कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ही ओढ नागोबासाठी आणि आमच्या घरच्या माणसांसाठी अधिक होती. नदीच्या पलीकडे आमचा गाव असल्यामुळे काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. मग आम्ही ठरवले कि, गाडी अलीकडेच ठेवून लोखंडी साकवावरून जायचे. 

          आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली होती आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो होतो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता  नदी कधी आली ते समजले देखील नव्हते. नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले होते. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला होता.

          लांबलचक लोखंडी साकव एकदाचा पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला होता. शेत छान डुलत होतं. आम्हाला जणू बोलावत होतं. आमचं स्वागत करत होतं. बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची तारांबळ उडत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नव्हते. 

          आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला होता. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या होत्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या  बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लिलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत असत. नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. जो आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण होते.

          घरी आलो होतो. मस्त वाफाळलेला चहा घेतला होता. आमच्या बाबांनी  बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी आणला होता. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होती.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.

          बाबांनी नागोबाचे पूजन सुरु केले होते. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य,  दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता. सुखकर्ता दुःखहर्ता ,  लवथवती विक्राळा अशा आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले होते. नंतर केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले होते. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी, जिलेबी, पापड, वाटाण्या- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र येतोच येतो.

         त्याला कारणही तसेच होते. बाबांच्या बालपणीची खरी गोष्ट घडली होती. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली होती. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली होती. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे झाली होती. 

          आता आजी जेवायला बसली होती. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी चाटू लागली होती. ते माझ्या बाबांनी पाहिले होते व आजीवर ओरडले होते. ते म्हणाले होते , " आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. " सर्व भावंडांनी ते ऐकले होते व बाबांवरच ओरडायला लागली होती ,  " तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची  वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस."  हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला होता. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले होते आणि मोठ्याने रडू लागले होते. त्यावेळी आजी बाबांना म्हणाली होती, " अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला  बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांची उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? " आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले होते कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच. 

          संध्याकाळी नागाचे विसर्जन केले होते आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला होता. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आज इतकेच पाणी वाढले होते. ते कमी होण्याची शक्यताच दिसत नव्हती. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले होते. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले होते आणि जीव भांड्यात पडला होता. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पूरमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाण्याचा पूर आणत होत्या.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर  ( 9881471684 ) कणकवली.

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...