Saturday, January 22, 2022

🛑 कॉईन बॉक्स

          एकमेकांशी संवाद साधणे ही माणसाची अत्यंत महत्त्वाची गरज आहे. समोरासमोर संवाद होत नाही म्हणून फोनचा आधार घ्यावा लागतो.  पूर्वी क्वचितच फोन सुविधा उपलब्ध असे. लॅंडलाईन फोन असणाऱ्यांकडे शेजाऱ्यांचे फोन येत राहात. त्यावेळी त्या फोन मालकांनाही वाटत असेल , फोन आम्ही नक्की कोणासाठी घेतला ? आमच्यासाठी कि शेजाऱ्यांसाठी ? समजा एखाद्याचा महत्त्वाचा फोन असेल तर ठिक आहे. पण दुसऱ्याच्या फोनवर कमी वेळ बोलण्याचे तारतम्य पाळता न येणारी माणसे बरीच बघितली. एकदा फोनचा रिसिव्हर कानाला लावला कि हातवारे करत अर्धा तास बोलणाऱ्या माणसांना काय म्हणावे ?  मिळालाय फुकट म्हणून गैरफायदा घेऊ नये हे त्यांना सांगूनही समजत नाही. 

          त्यानंतर एस टी डी फोन आले ते एक बरे झाले. निदान आपल्या नातेवाईकांना फोन करणे सोयीचे झाले. त्यावेळी अशा बुथवर फोन करण्यासाठी माणसांची तोबा गर्दी असे. मग लोक त्या छोट्या बॉक्समध्ये उभे राहून मनसोक्त अर्धा अर्धा तास बोलत राहू लागले. बाहेरच्या माणसांचे चेहरे मात्र आतल्या माणसाच्या नावाने चरफडत असल्यासारखे दिसत. " हा कधी एकदा बाहेर येतोय आणि मला माझा फोन करता येतोय " असे बाहेरच्याला होऊन जाई. 

          त्यामुळे नंतर कॉईन बॉक्स आला असावा. त्यात एक रुपयाचे नाणे टाकले कि साठ सेकंद बोलता येई. मोजकेच बोलायचे असले तर तेही विसरुन जायला होई. ते आठवेपर्यंत सेकंद संपून जात. पुन्हा पुढचा रुपया टाकावा लागे. 

          मग गल्लोगल्ली असे कॉईन बॉक्स दिसू लागले. काहींनी तर त्याचा धंदाच बनवला. त्यावेळी मोबाईल आलेले असले तरी त्याचे प्रमाण नगण्य होते. पेजर नावाचे एक यंत्र त्यावेळी आले होते. त्यावर फक्त संदेश प्राप्त होत असत. सुटबुटात वावरणाऱ्या काही मोजक्या लोकांकडेच हा पेजर असे. 

          माझे लग्न झाल्यानंतर दोन ते तीन वर्षांनी मी साधा मोबाईल घेतला. ग्रामीण भागात त्यावेळी बी. एस. एन.एल. ची रेंज आली होती. त्यासाठी उंच डोंगरावर जावे लागले. पोस्टपेड कार्ड घेतले होते. उंच ठिकाणी गेल्यावर मोबाईलच्या स्क्रिनवर दोन्ही बाजूला पूर्ण रेंज दिसली कि खूप आनंद होई. मग तिथून सगळ्या नातेवाईकांना फोन लावण्याचा प्रयत्न होई. 

          ज्या घरात राहात होतो , तिथेही माळ्यावर रेंज आहे हे समजल्यावर शिडीवर चढून जाऊन फोन अटेंड करण्यात कोण आनंद व्हायचा म्हणून सांगू !! बोलता बोलता आवाज कट झाला कि रागाने मोबाईल आपटावासा वाटे. पण तसे करणेही जमत नसे. महिना संपला कि पोस्टपेड बिल पोस्टाने येई. ते बघून डोळे पांढरे होत. बिल जास्त आलेले असे. पोस्टपेड असल्यामुळे बोलण्याचे भान नसे. तास तास बोलल्यामुळे बिलाची रक्कम वाढलेली असे. 

          तरीही सर्वांशी घरबसल्या बोलता येई हेही काही कमी नव्हते. फोनवर बोलल्यामुळे आपला संवाद वाढत जात होता. समोरचा आवाज अगदी जवळ ऐकू येत असल्यामुळे ती व्यक्तीच जणू भेटल्याचा भास होऊन जाई. नोकरीच्या गावी असताना आई बाबांशी , भावा बहिणींशी बोलताना घरी आल्यासारखे वाटे. 

          आज आधुनिक तंत्रज्ञान असलेले मोबाईल आले आहेत. त्यावर माणसे प्रत्यक्ष व्हिडिओ स्वरुपात दिसू लागली आहेत. इंटरनेटमुळे जग जवळ आले आहे. दिवस रात्र चॅटिंग होऊ लागले आहे. टाईप करुन चॅटिंग करत असल्याने प्रत्यक्ष आवाजाची मजा निघून गेली आहे. अनेक ग्रुप चॅटिंगमुळे वैयक्तिक स्वरूपाचा संवाद कमी होत चाललेला दिसून येत आहे. आता सर्वच गोष्टी व्हाट्सएप , फेसबुक , इन्स्टाग्राम , टेलिग्राम , यु ट्युबच्या माध्यमातून मिळू लागल्या आहेत. तेच बघत बसण्याच्या नादात आपला एकमेकांशी होणारा हृद्य संवाद कमी कमी होत जात आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. 

          तंत्रज्ञान हे आपल्या भल्यासाठीच आहे , त्याचा आपण किती वापर करायचा हे प्रत्येक वापरकर्त्याला समजायला हवे. त्याचा गैरवापर होतोय हे धोकादायक आहे. आता सगळे  अनलिमिटेड रिचार्ज झाल्यामुळे ते संपेपर्यंत मोबाईलला चिकटून राहण्याची माणसाला सवय होत चालली आहे. 

          कॉईन बॉक्स असताना बरे होते. महत्त्वाचे बोलायचे आणि फोन कट करायचा असे चालायचे. आता मात्र आपण किती बोलतोय याचेही भान राहत नाही. रस्त्याने जाता इयरफोन किंवा ब्लुटूथवर खुळ्यासारखी एकटीच बोलत जात असलेली माणसे पाहिली कि खुळी तरी बरी असे म्हणण्याची वेळ येते. आता त्याहीपुढे आणखी कोणते शोध लागतील ते विज्ञान जाणे. 

          आता ते लाल रंगाचे कॉईन बॉक्स कुठेतरी विरळ आढळतात आणि ते जुने दिवस आठवून ते संवाद हवेहवेसे वाटतात. गॅसवरचे जेवण खाऊन कंटाळलेले लोक चुलीवरच्या जेवणावर आले आहेत , तसे मोबाईलवर बोलून बेजार झालेले लोक पुन्हा कॉईन बॉक्स वापरतील अशी आशा बाळगायला काय हरकत आहे.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, January 19, 2022

🛑 लालपरी

🛑 लालपरी

          हल्ली दोन अडीज महिने झाले , ही परी दिसेनासी झाली आहे.  खरंच ती परी आहे , सर्वांची लालपरी. गावागावात पोहोचलेली. सर्वांना आवडणारी. अगदी अतिदुर्गम भागातही ती पोहोचली होती. तिचे पोहोचणे सर्वांसाठी प्रतिक्षा करत ठेवणारे. ती आली रे आली कि सर्वांचा आनंद द्विगुणित होऊन जातो. तिची प्रतिक्षा आता मात्र सहन होताना दिसत नाही. ती लवकर यायला पाहिजे अशी सर्वांचीच तीव्र इच्छा आहे.

          त्यादिवशी शाळेत जायला निघालो होतो. ती माझ्यासमोरुन अचानक झरकन निघून गेली. किती दिवसांनी ती मला दिसली होती. मला ही खूप आनंद झाला होता. ती अशीच पुढेही दिसत राहावी असे वाटत होते. मी तिच्यामागून गाडी पळवत चाललो होतो. शेवटी तिने मला चकमा दिला. ती वेगात माझ्या पुढे पुढे निघून दिसेनाशी झाली. मी विचार करु लागलो होतो. मला जशी तिची हुरहूर लागली होती , तशीच ती सर्वांनाच लागली असणार. 

          मी ज्या लालपरीबद्दल बोलतोय ती दुसरी तिसरी कोणी नसून आपली सर्वांची लाडकी एसटी आहे. तुम्हाला काय वाटले ? कोणी तिला बस म्हणतात. पण ही बस प्रत्येकाला स्वतःच माझ्यामध्ये बस म्हणून सांगत असते. काहींनी तर या लालराणीला लाल डबा सुद्धा म्हटल्याचे ऐकले आहे. खूप त्रास होतो असे ऐकताना. पण लोकं जिची आतापर्यंत मदत घेत आले आहेत तिलाच असं का बोलत असतील हेही न उलगडणारे कोडे आहे. असो. आता ती नसल्यावर आपली काय अवस्था झाली आहे हे समजले तरी पुरेसे आहे. 

          आम्ही लहानपणापासून या लालपरीनेच प्रवास केला आहे. आता स्वतःची गाडी असल्यामुळे कधीतरी लालपरीने प्रवास घडतो. पण लालपरीचा प्रवास हा सगळ्यात सुरक्षित प्रवास असे. लालपरीचे चालक , वाहक आपल्याला काळजीपूर्वक इच्छित स्थळी नेऊन सोडतात. ते जी सेवा करत आहेत , त्याला तोड नाही. 

          लालपरीचे ड्रायव्हर , कंडक्टर आमच्या दुकानात येत. बाबांशी त्यांची जीवश्च कंठश्च मैत्री होती. त्यातील एक दोन व्यसनाधीन मित्रांना बाबांनी रुळावर आणल्याचे मी प्रत्यक्ष अनुभवले आहे. 

          नोकरीला लागल्यावर मला या लालपरीनेच शाळेपर्यंत सोडले आहे. शनिवारी शाळा सुटल्यानंतर या लालपरीसाठी दहा बारा किलोमीटर अंतर दिड तास चाललो आहे. एकदा लालपरी दिसली की हायसे वाटे. 

          मी जन्माला येणार होतो , त्यादिवशीची गोष्ट बाबा सांगतात. बाबा गावी गणपती बनवत असत , तेव्हा माझी आई कणकवलीत होती. आईच्या पोटात दुखत असल्याची बातमी बाबांपर्यंत कुणीतरी पोहोचवली. बाबा तसेच निघाले होते.  एक लालपरी वेगात निघाली होती. बाबांनी लांबूनच तिला दोन्ही हात जोडले. लालपरीच्या चालकाने स्टॉप नसूनही तिथे गाडी थांबवली. माझा जन्म सुखरुप झाला , तेव्हा माझ्या बाबांनी त्या लालपरीचे मनापासून आभार मानले होते. 

          अशी ही लालपरी. तिने असे अनेकांना वाचवले आहे. कामावर नेले आहे. पर्यटन करायला उपयोगी पडली आहे. ती आता सुरु नाही तर सर्वसामान्यांचा प्रवास महागला आहे.   ती लवकर सगळीकडे धावायला सुरुवात करेल अशी आशा बाळगण्याशिवाय आपल्याकडे  काहीच पर्याय नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



🛑 खांडुक

 🛑 खांडुक

          सायकल ही आमची त्यावेळची सफारी होती. सायकल चालवायला शिकताना खूप गमती जमती घडल्या. बाबांची मोठी सायकल होती. ती चालवणे सोडाच , पण ती आमच्या जीवनीला झेपलीही नसती इतकी जड होती. कधीतरी दोन्ही हातांनी हँडल धरुन गोल गोल फिरवणे व्हायचे. त्याच्यापुढे जाता येत नव्हते. 

          तेली आळीत नेरकरांचे सायकलचे दुकान होते. तिथे तासाच्या भाड्याने छोट्या सायकली चालवण्यासाठी मिळत असत. एक तासाचे एक रुपया भाडे असे. आम्हाला एक रुपया मिळाला कि मी आणि माझा भाऊ दोघे सायकल सवारीसाठी निघत असू. " नीट सायकल चालवा रे बाबांनो " हे बाबांचे व आईचे वाक्य दहा वेळा ऐकून आम्हाला बाहेर पडावे लागे. आम्ही एकमेकांची जबाबदारी घेत असू. छोटी सायकल असल्यामुळे दोन्ही बाजूंना पाय पोहोचत असत. छोटा भाऊ मागून धावत धावत येत असे. मी पडत असताना त्याने अनेकदा मला पकडले आहे. आता मोठेपणीही तो माझ्या कायम पाठीशी असतो. आता जीवनरुपी सायकल चालवतानाही माझा भाऊ मी कुठे कमी पडणार नाही किंवा तोंडघशी पडणार नाही याची काळजी घेतो. खरंच, हा आधार खूप काही देऊन जातो. 

          विद्यामंदिर कणकवलीचे मैदान मोठे होते. त्यावर आम्ही सायकलचे राऊंड मारत असू. एक तास सायकल फिरवतानाचा आनंद इतका असायचा कि आता विमान चालवतानाही तो येणार नाही. पण तास संपत आला की वाईट वाटायचे. सायकल परत नेऊन द्यावी लागे. पुन्हा कधी एक रुपया सायकलीसाठी मिळणार तेव्हाच सायकल चालवायला मिळे. तोपर्यंतची प्रतिक्षा करणे फार अवघड असे. 

          सायकल चालवता येऊ लागल्यानंतर आत्मविश्वास वाढतच गेला. कोणाचीही सायकल दिसली की त्यावर बसून एखादातरी फेरफटका मारावा असे वाटत राही. पण सायकल पोटावर पाडून घेऊ ,  या भीतीने कोणीही आम्हाला सायकल चालवायला देण्याचे धाडस करत नसत. 

          एकदा बाबांची मोठी सायकल  घेऊन मी एकटाच विद्यामंदिरच्या दिशेने निघालो. तरी बाबा नको म्हणत होते. येतो पटकन , असं म्हणत मी निघालो तो क्षणात दिसेनासा झालो. 

          विद्यामंदिरच्या प्रवेशद्वारापाशी महाराजा नावाचे हॉटेल आहे. तिथे मी आलो असेन. माझा अचानक तोल गेला. सायकल माझ्या पोटावर पडली होती. मी सायकलला बाजूला घेण्याचा प्रयत्न करत असताना कोणीतरी मला उचलले होते. सायकल मात्र बाजूला माझी फजिती बघत उभी होती. मला उचलताना कोणीतरी सायकलला व्यवस्थित स्टँडवर लावून ठेवले होते. मला त्यावेळी त्या सायकलचा वैतागथोर राग आला होता. 

          डाव्या पायाचे ढोपर चांगलेच खरचटले होते. त्यातून रक्त ओघळत होते. एक रुपयाच्या नाण्याएवढी त्वचेची साल निघाली होती. मला रडायला येत होतं , पण रडूही शकत नव्हतो. हॉटेलच्या मालकांनी मला ओळखले होते. ते आता बाबांना माझा हा पराक्रम सांगणार त्यामुळे तर मला जास्तच रडू फुटत होते. पण मी ते आवरले आणि सायकल घेऊन तडक निघालो. वाटेत एका ठिकाणी पावसाचे पाणी साचलेले दिसले. त्या पाण्याने खरचटलेला पाय चांगला धुवून घेतला. ते पाणी चांगले नव्हते , पण माझे काहीच झाले नाही असे मला बाबांना दाखवायचे होते. म्हणून मी तशी आयडियाची कल्पना लढवली होती. 

          आता मी दुकानात गेलो आणि गप्प बसलो. पण मी गप्प बसलेला पाहून तर बाबांनी मला लगेच ओळखले. त्यांना झालेला प्रकार अखेर सांगावाच लागला. त्यांनी मला त्यावेळी केलेले फायरिंग मला हुमसून हुमसून रडू आणणारे होते. त्यांनी मला डॉक्टरकडे अजिबात नेणार असे सांगितले. मी रात्रभर झोपलो नव्हतो. दुसऱ्या दिवशी बाबा मला चांगल्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. मी आपला लंगडत लंगडत चालत होतो.

          काही दिवसांनी ती जखम बरी झाली असे वाटले. शाळेत परिपाठाच्या अगोदर मुले धावत असताना एक आडदांड मुलगा मला येऊन मोठ्यांदा आदळला. ती जखम पुन्हा फुटली. त्याचे मोठे खांडुक झाले. ते बरे होता होत नव्हते. मी त्याची खूपच काळजी घेत होतो. त्यामुळे ते बरे व्हायचे विसरुन अधिक चिघळत चालले होते. त्या खांडकाने माझी झोपच उडवून टाकली होती. त्यांच्यावरचे मांस वाढत चाललेले दिसत होते. शेवटी तेवढ्या भागाला भूल देऊन शस्त्रक्रियेने वाढलेली जखम कापून टाकावी लागली. दररोज ड्रेसिंग करायला जावे लागे. पट्टी काढताना जीव जाई. त्यावेळी मला खूप पथ्य पाळावे लागले होते. पिवळं दूध आणि चपाती एवढाच माझा आहार होता. डॉक्टरांना दरवेळी द्यायच्या पैशांचा हिशेब करत माझे काका मला चिडवायचे. तीनशे रुपये आणि दूध असे ते मला चिडवत त्यावेळी मला त्यांचा राग येई. 

          असे हे माझे सुप्रसिद्ध खांडुक लवकरच पूर्ण बरे झाले तरीही आपली खुणा काही त्याने सोडली नाही. अजूनही माझ्या ढोपरावर ते मला वाकुल्या दाखवत आहे असे वाटत राहते. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



Tuesday, January 18, 2022

रिटर्न गिफ्ट

 🛑 रिटर्न गिफ्ट


          अमिताभ बच्चन यांचा मी पूर्वीपासून फॅन आहे. त्यांचे अनेक पिक्चर्स मी पाहिलेत. कितीही वेळा पाहिले तरी ते पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात. माझं लग्न होण्यापूर्वी मी अमिताभ यांचा ' अभिमान ' हा पिक्चर पाहिला होता. त्यावेळी जया भादुरी त्यांची नायिका झाली होती. खरंच किती निरागस अभिनय होता त्या दोघांचाही ! त्या चित्रपटातील गाणी अजूनही ऐकताना पूर्वीच्या क्षणांची आठवण येते. 

          आजही तसेच झाले. जेवता जेवता एखादे सुमधुर गाणे लावले होते. ते एखादे गाणे अभिमान मधलेच असावे आणि त्या गाण्यांच्या ओळींबरोबर थेट मागील सर्व जीवनपट डोळ्यांसमोर येऊन नाचत राहावा हे मला गाणे लावताना अजिबातच वाटले नव्हते. 

          आपलं लग्न व्हावं , पत्नीनं आपल्यावर जिवापाड प्रेम करावं , ते प्रेम वाढत असताना अचानक आपल्या मुलाची चाहूल लागावी अशी दिवास्वप्नं बघता बघता खरीही होतील असं वाटलंही नव्हतं. त्यावेळी मी अनेकदा चिमटा काढून बघितला आहे. अरे हे तर खरंच घडतंय , असे समजल्यानंतर गालातल्या गालात हसलोही आहे. 

          आज अगदी तेच गाणं लागलं होतं. जेवताना घास पटापट चावले जात होते. जिच्यावर जिवापाड प्रेम केलं होतं , तिच्या आठवणींची सनक येऊन डोळ्यातून पाणी यायला बघत होते. पण मी ते आवरले. आता ती जाऊन १५ वर्षं होतील , पण तरीही तिची आठवण येते आणि मी कासावीस होतो. तिने जाताना माझ्याकडे ४ वर्षांची मुलगी सुपूर्द करुन गेली. ती आमची मुलगी आज एकोणीस वर्षांची झाली आहे. अगदी तिच्यासारखीच आहे आमची हर्षदा ;  अभ्यासू , समंजस , जिवाला जीव देणारी. परखडपणे आपली मतं मांडणारी , व्यावहारिक , खरं तेच माझं म्हणणारी. 

          माझ्या गेल्या वाढदिवसाला तिने मला किती छान , अविस्मरणीय गिफ्ट दिली होती ! शब्दरूपाने लिहिलेला एक साहित्यमय लेख तिने माझ्यासाठी लिहिला होता. माझी आवड तिने जाणली. मला नक्की काय आवडतं ते तिला समजलं. तिनं लिहिलेला लेख माझ्यासाठीच होता. तो कोणाला दाखवण्यासाठी नक्कीच नव्हता. तिला फक्त आपल्या पप्पांना खुश करायचे होते. तिला आपला मोठेपणा सांगणे कधीच आवडत नाही. ती तिच्या मम्मीसारखीच आपल्या मताशी कायम ठाम असते. 

          मी मात्र तिचा तो लेख सगळ्यांना पाठवला तेव्हा ती किंचितशी नाखुश झालेली दिसली. तिचा लेख पुढच्याच सोमवारी लोकमतच्या लोकमंच पुरवणीत दिमाखात छापून आला तेव्हाही तिला आनंद झाला नव्हता. अर्थात माझेच चुकले होते. पण माझ्या मुलीच्या निर्मळ भावना सर्वांपर्यंत पोहोचवाव्यात असे मला वाटले. तिच्या भावना काहीशा दुखावल्या गेल्या. पण नंतर ती हसून म्हणालीही , " चला जाऊ द्या पप्पा. तुम्ही माझ्यासाठी एवढं करता , पण आता मला तुमच्यासाठी करायचे आहे. " 

          तिच्या या वाक्याने मी सद्गदित झालो. तिला कोणतीही वस्तू घ्यायची म्हणजे मला प्रश्नच पडतो. पहिल्यांदा ती त्याची किंमत विचारणार. मग ती म्हणणार , " एवढी महाग !!!! कशाला आणली ती !! मला आता एवढी काय गरज नव्हती. " यावर माझ्याकडे कधीही उत्तर नसते. मी फक्त हसतो आणि तिच्या पाठीवर आश्वासक थाप मारतो आणि बाजूला होतो. 

          आज तिचा वाढदिवस आहे आणि आजही मला तोच प्रश्न पडला आहे , " काय घ्यावे तिला , जे तिला बघताक्षणी आवडेल !!  मला सुचेलही खूप , पण ते तिला आवडेल का कोण जाणे ? " 

          मुलीचा वाढदिवस हा प्रत्येक बापासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असायला हवा. कोरोना काळात मला बरे नसताना ती मला स्वतःच्या जबाबदारीवर दवाखान्यात घेऊन गेली होती , तेव्हा मला किती धीर आला होता म्हणून सांगू !!! मला आता तिन्ही मुलीच आहेत , तरीही मला त्याचे अजिबात दुःख होत नाही. उलट मी या जगातील सर्वांत सुखी बाप आहे याचा मला अभिमान वाटतो. 

          हर्षदाच्या मम्मीची ऐश्वर्याची उणीव भरुन काढणारी ईश्वरी माझ्या आयुष्यात आली आणि माझं भरकटलेलं जीवन पुन्हा एकदा किनाऱ्यावर आलं. तिने मला सावरलं. ती पुन्हा माझी ऐश्वर्या बनली. तिचं आपल्या कारभाऱ्यावरील प्रेम अथांग आहे. आज मी आणि माझी मोठी मुलगी फक्त आणि फक्त तिच्यामुळेच आहोत हे मी आताही साश्रु नयनांनी सांगू शकतो. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबल

( 9881471684 )



Wednesday, January 12, 2022

🟢 छंद लेखनाचा

          🟢 छंद लेखनाचा

        समर्थ रामदासांनी म्हटले आहे , " दिसामाजी नित्य काहीतरी ते लिहावे , प्रसंगी अखंडित वाचित जावे ". वाचनाचं वेड प्रत्येकाला असायला हवं , तसंच लेखनाचं वेड असणंही गरजेचं आहे. वाचन आणि लेखन या दोन्ही कौशल्यांचे फायदेच फायदे आहेत. वाचन केल्यामुळे तुम्हाला लिहिण्यासाठी प्रेरणा मिळते. लेखक कसे लिहितात ? त्यांनाच कसं सुचतं ? असे अनेक प्रश्न वाचकाला पडतात. मग तोही काहीतरी लिहावे असे ठरवतो आणि हळूहळू लिहिता लिहिता लेखक बनून जातो. 

          माझेही तसेच झाले. मला वाचता वाचता लिहिण्याची गोडी निर्माण झाली. ही गोडी वाढता वाढता वाढत चालली आहे. हा छंद म्हणावा कि व्यसन म्हणावं ? माणसाला एखादी चांगली गोष्ट करण्यात परमानंद मिळत असेल तर ती गोष्ट त्याने जरुर करावी. हा लेखनाचा स्वानंद मिळत राहणेही आपल्या निकोप आरोग्यासाठी हितकारक असते. तुम्ही चांगले विचार करण्यात गढून जाता. वाईट विचारांना फाटा मिळतो. तुमची सर्जनशीलता विकसित होत जाते. तुमची प्रसिद्धी आपसूकच होत जाते. अर्थात प्रसिद्धीसाठी लेखन करायचे नसते , तुमची लेखन कलाच तुम्हाला प्रसिद्धी मिळवून देते. 

          नाटकात काम करणाऱ्या नटाला प्रत्यक्ष प्रतिसाद मिळतो तेव्हा त्याला होणारा आनंद प्रत्येकवेळी वेगळा असतो. तसाच आनंद लेखकालाही मिळाला की त्याला स्वर्ग दोन बोटे उरत असेल. उत्स्फूर्तपणे लिहावे , ते एकदा दोनदा वाचून पाहावे असे करत असताना आपणच आपल्याला अधिक विकसित करत असल्याचा आनंद विरळाच असतो. 

          मला सुचले कि मी माझा राहात नाही. ते कधी एकदा लिहून काढतो असे होऊन जाते. सुचले कि मग त्याला वेळ, काळ लागत नाही. जिथे असेन तिथे लिहायला सुरुवात करतो. मध्यरात्री सुदधा लिहायला बसावे लागते. एकदा सुचले कि ते लिहिल्याशिवाय स्वस्थता येत नाही. तुमचा ताण कुठल्या कुठे निघून जातो. तुम्ही एक कात टाकलेली असता. तुम्ही कालपेक्षा आज अधिक ताजेतवाने आणि टवटवीत झालेले असता. माणसाला असे ताजेतवाने राहण्यासाठी नित्य लेखनाची नितांत गरज आहे. 

          पूर्वी अनेक लेखक स्वतःला बंद खोलीत कोंडून घेत आणि आपला लेखनप्रपंच करत. स्वातंत्र्यपूर्व काळात कारागृहातून अनेक क्रांतिकारकांनी लेखन करुन अनेक देशभक्तीपर कवने लिहिली. त्यांच्यासाठी कारागृह ही शिक्षा नव्हती. या शिक्षेच्या काळात त्यांच्याकडून विविध साहित्यकृती प्रसवल्या. त्यांचं दैदिप्यमान लेखन वाचताना आजही भारावून जायला होतं. त्यातलं साहित्यमूल्य अजोड होतं. 

          आपल्या जीवनात घडलेल्या घटना लिहिता लिहिता आपणच आपल्याला रिते करीत असतो. आपण मोकळे झालो की बरे वाटते. मला एखाद्याला जे सांगायचं असतं ते लिहिलं की माझ्या भावनांचा योग्य निचरा होतो. भावना आल्या कि त्या प्रकट झाल्याचं पाहिजेत. त्या प्रकट करण्यासाठी लेखनाइतकं दुसरं साधन नाही. 

          लेखन केल्यानंतर ते वाचकांपर्यंत पोहोचवणं ही देखील एक कला आहे. आता प्रसारमाध्यमे वाढल्यामुळे ते सहज शक्य झाले आहे. तुमच्यामुळे काही न वाचणारे लोकही वाचू लागतात हा तुमच्या लेखनात मोठा फायदा असतो. तुम्ही तुमच्या लेखनाने एखादा सकारात्मक विचार देता आणि वाचकाचे जीवन बदलून जाऊ शकते. वाचकाला माहित नसलेली गोष्ट तुम्ही नीट समजावून सांगत असता त्यामुळे वाचकांमध्ये आमूलाग्र बदल घडत असतो हे तुम्हाला लक्षातही येत नाही.

          तुम्हाला भावणारी गोष्ट तुम्ही लिहिता त्यावेळी ती दोनदा जन्माला आलेली असते. एकदा ती प्रत्यक्ष घडलेली असते आणि दुसरी तुम्ही ती शब्दरूपाने घडवून आणत असता. 

          मला एकदा एका सलूनमधून फोन आला. समोरुन आवाज आला , " सर , तुम्ही ' सामंतांचे वडे ' नावाचा लेख लिहिलात तो खुद्द सामंतांच्या पत्नीने वाचला. ती तुम्हाला तुमच्या घरी बटाटे वडे पाठवून देत आहे. " अर्ध्या तासात खरंच गरमागरम बटाटेवडे माझ्यासमोर हजर होते. मला माझ्या लेखनाचा असाही उपयोग होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. 

          हल्लीच माझ्या शाळेत बालिका दिन साजरा झाला. त्याचंही थोडं असंच झालं. एका संस्थेच्या प्रकल्प संचालकांपर्यंत माझे लेख पोहोचले असावेत. त्यांनी त्यांच्या संस्थेचा निबंध स्पर्धेचा कार्यक्रम आमच्या शाळेत घेतला. त्यामुळे आमच्या मुलांना निबंध लेखनाची संधी मिळाली. बक्षिसे मिळाली. बक्षिसे घेत असताना मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस उत्स्फूर्त आनंद बघता आला. 

          त्या दिवशी एका सहावीतल्या मुलाशी फोन संभाषण झाले. तो माझ्या ओळखीचा नव्हता. पण तो मला चांगला ओळखत होता. त्याने माझे लेख वाचले होते. त्याने मला पहिला प्रश्न असा विचारला , " सर , तुम्ही जे लेख लिहिता ते सर्व लेख मी वाचतो. पण तुम्हाला ते लिहायला सुचतात कसे ? " त्या मुलाचा प्रश्न मला आवडला. मी शाळेच्या कामात होतो. पण मला त्या मुलाशी बोलून त्याला उत्तर द्यावेच लागले. मी त्याला सांगितले , " मी असं काही वेगळं लिहीत नाही. मी जात येत असताना मला जे दिसतं ते मी लिहितो. मी प्रत्येक गोष्टीकडे जाणीवपूर्वक बघण्याचा प्रयत्न करतो. त्यातली जी गोष्ट मला अधिक भावते , ती गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात राहते. मग त्या घटनेला मी शब्दरूप देतो. " त्यावेळी मी त्या मुलाशी पाच मिनिटे बोललो असेन. लेखन कसे करता ? असे विचारणारा हा लहान मुलगा पुढे नक्कीच कोणीतरी मोठा आदर्श नागरिक घडेल यात मला मुळीच शंका वाटत नाही. या मुलासारखी अनेक मुले, माणसे या जगात चांगल्याचा शोध घेत असतील तर त्यांना चांगले नक्कीच सापडेल. फक्त हा शोध सुरु ठेवणं हे सातत्याने सुरु राहायला हवं. 

          असा हा लेखनाचा छंद व्रतासारखा जोपासत पुढे जाणं हे माझ्यासाठी सुद्धा एक रोजचं आव्हान असणार आहे. ते पेलता यायला हवं असंच मला वाटत राहतं. 

          माझ्या एका मित्राने हल्लीच माझा एक लेख वाचला आणि त्याला वाचनाची गोडी निर्माण झाली. तो स्वतः हुशारच आहे , सध्या कामाच्या व्यापात वाचनाकडे दुर्लक्ष झाल्याचं त्याने मान्य केलं. पुन्हा एकदा वाचनाकडे आणि लेखनाकडे जाता येण्यासारखा आपल्यातील बदल हा मला वाटतं मोठा बदल असावा , जो आपलं पूर्ण जीवनच बदलून टाकतो.

©️ प्रवीण अशितोष कुबल

( 9881471684 )



Sunday, January 9, 2022

🟣 झुंजार बाबल्या

          🟣 झुंजार बाबल्या

        गेली दोन वर्षे तो मृत्यूशी झुंज देत होता. कॅन्सरची लक्षणे समजल्यानंतर उपचार सुरु करण्यात आले. माणसांना कॅन्सर सारखं दुर्धर  दुखणं कधी होऊच नये. 

          कोणत्याही पेशंटला स्वतःचा आजार समजला कि तो हबकून जातो , पण हा मात्र अजिबात घाबरला नव्हता. त्याने सुरुवातीपासून आज शेवटपर्यंत जगण्याची जिद्द अजिबात सोडली नव्हती. वयाच्या अवघ्या ३५ ते ४० वर्षांमध्ये असे घडावे असे कोणाला स्वप्नातही वाटणार नाही. पण असा आजार जडला कि तोही किती चिवट असतो , जाण्याचे नावही घेत नाही. कायम परोपकारी वृत्तीने सर्वांशी वागणाऱ्या या माणसालाच अशा आजाराने जखडावे याची कमाल वाटते. असा कसा हा देव ? जो तीन मुली आणि एक मुलगा यांना पोरका करुन जातो. कधी कधी या देवाचाही राग करावासा वाटतो. काही माणसे देवालाच शिक्षा देतात. देवाला पाण्यात बुडवून ठेवतात. बिचाऱ्या देवाला बुडून राहावे लागते. ज्याठिकाणी देव बुडून जाऊ शकतो , स्वतःचे रक्षण करु शकत नाही , तर तो आपले रक्षण कसे करणार असाही कधीकधी प्रश्न पडतो. आता यावरही काहीजण म्हणतील कि देव आपली सत्त्वपरीक्षा घेत आहे म्हणून. असो. हे असेच चालायचे , पण अनेक माणसांमध्ये देव भेटतो याची प्रचिती मला अनेकदा आली आहे. 

          मी ज्यांच्याबद्दल बोलतोय तो माझा आत्येभाऊ आणि साडू लागतो. त्याचं नाव प्रसाद. तो आजारी असताना त्याच्या ऑपरेशनसाठी बराच खर्च येणार होता. गरीब बिचारा प्रसाद एवढा खर्च कसा काय पेलू शकणार होता ? त्याला अनेकांनी आर्थिक मदत दिली. प्रत्येकजण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करत होता. तेवढी मदत पुरण्याइतका आजार काही साधासुधा नव्हता. ऑपरेशन झाल्यानंतर प्रसाद बरा झाला असे वाटले , पण तो बाहेरुन बरा दिसत असला तरी आतून पोखरला जात होता. त्याच्या पत्नीला मानले पाहिजे. तिने आपल्या नवऱ्यासाठी शर्थीची झुंज दिली. कोल्हापूर , मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये फिर फिर फिरवले. अजूनही तिला आपला नवरा बरा होऊन दुकानात जाईल अशी आशा होती. प्रत्येकीला आपल्या नवऱ्याबद्दल असेच वाटणार ना ? आपले कुंकू अबाधित राहावे असे प्रत्येक सौभाग्यवतीला वाटणारच. माझ्या मेहुणीचे तिच्या नवऱ्यावर जिवापाड प्रेम. सुपारीच्या खांडाचेही व्यसन नसताना आपल्या नवऱ्याला असा दुर्धर आजार होईल अशी तिने कधी कल्पनाही केली नसेल. 

          या माझ्या भावाला सगळे बाबल्या या नावानेच जास्त ओळखतात. बाबल्या झुंजार होता. पण तो या आजाराने बेजार झाला होता. एकदा तो माझ्याकडे आला होता तेव्हा मी त्याला माझ्या गळ्यातील सोन्याची माळ विकून पैसे दिले होते हे समजल्यावर तर त्याने मला ओक्साबोक्शी रडत घट्ट मिठी मारली होती. तो बरा होण्यासाठी त्याच्या बायकोला गळ्यातले मंगळसूत्रही विकावे लागण्याची शक्यता आहे असे सांगणारा मी स्वतः सोन्याची साखळी विकून बसलो होतो. साखळी विकून आलेले सगळे पैसे मी त्याला हसत हसत देऊन टाकले. त्याची ती त्यावेळची मिठी मला आताही आठवते आहे. 

          आज या बाबल्याला भेटायला गेलो होतो. हल्ली बरेच दिवस मी आणि माझी पत्नी त्याला बघायला गेलोच नव्हतो. अर्थात बघायचे ठरवले असते तर बऱ्याचदा जाऊ शकलो असतो , पण जाण्यासाठी पाय काही बाहेर पडत नव्हते. आज मात्र त्याला बघायला जाण्यासाठी पाय स्वतःहून बाहेर पडले होते. 

          मी , माझी पत्नी आणि माझी पाच वर्षांची छोटी मुलगी उर्मी जात होतो. जाता जाता छोटी उर्मी आम्हाला म्हणाली , " पप्पा , आपल्या बाबल्या काकांना बरे वाटायला हवे. मी देवाकडे प्रार्थना करते. " आम्ही एवढे मोठे असून ती छोटी मुलगी देवाकडे प्रार्थना करत होती. मी गाडी चालवत होतो. पत्नी मागे बसली होती. आपल्या मुलीची ही वाक्ये ऐकताच तिने रडायलाच सुरुवात केली. ती आंब्रडला बाबल्याच्या घरी जाईपर्यंत प्रवासात रडतच होती. 

          गेलो तर बाबल्या बेडवर निश्चेष्ट पडला होता. डोळे सताड उघडे होते. श्वास सुरु होता म्हणून तो आहे असे वाटत होते. त्याला मी चार पाच वेळा जवळ जाऊन हाका मारल्या. त्याने प्रत्येक हाकेला जोरात दिर्घश्वास घेतला होता. हाकेला ओ देणे त्याला अजिबात जमत नव्हते. शेवटी तासभर त्याच्यासोबत राहून आम्ही परत यायला निघालो. 

          अर्ध्या तासात आम्ही कणकवलीत पोहोचलो. खोलीचे कुलूप उघडले आणि आत पाऊल ठेवणार , इतक्यात मोबाईलची रिंग वाजली. आंब्रडवरुन फोन आला होता. बाबल्याची मृत्यूशी झुंज संपली होती. त्याला स्मशानात घेऊन जाताना ' पप्पा , काका , बाबू , बाबल्या ' अश्या आर्त किंकाळ्यानी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. मीही माझा चष्मा काढून हलकेच डोळ्यातले आलेले पाणी पुसत होतो.    

          मला अजूनही प्रश्न पडला आहे , तो आमच्या जाण्याची वाट बघत होता का ? बाबल्या , तू आता आसमंतात जिथे असशील तिथे तुला माझे अनंत कोटी प्रणाम आणि भावपूर्ण श्रद्धांजली.

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली( 9881471684 )



Saturday, January 8, 2022

🔵 करणी फिरता

         🔵 करणी फिरता

         " अशी कशी देवाची करणी , नारळाच्या आत पाणी , नारळ दिसतो दगडावाणी, आत गोड गोड पाणी " असा गजराचा अभंग आम्ही भजनामध्ये आळवत असू. त्यावेळी ' करणी ' या शब्दाचा अर्थ एका चांगल्या अर्थाने मनात बसला होता. आपण सर्वजण या आयुष्यात एक नाटक करत आहोत आणि देव हा त्याचा सूत्रधार आहे. आता देव याचा अर्थ निसर्गाची करणी असाही आपण घेऊ शकतो. 

          त्यानंतर ' करणी ' या शब्दाचा दुसरा अर्थ समजला. " जैसी करनी , वैसी भरनी " नावाचा गोविंदाचा हिंदी चित्रपट पाहिला आणि नवीन अर्थाची मांडणी मनात घर करुन गेली. म्हणजे आपण जसे वागणार आहोत , करणार आहोत , तसंच आपल्या बाबतीत घडणार आहे , आणि ते भोगावेही लागणार आहे.तेव्हापासून अधिक चांगले आचरण करत राहण्याची प्रेरणा मिळत गेली. 

          गावाकडे मात्र या ' करणी ' या शब्दाचा नवा अर्थ समजला जात होता. कोणाचे वाईट झाले कि कोणीतरी आपल्यावर ' करणी ' केली असे बोलले जाई. जप , जाप , साक्षी , पंचाक्षरी असे अनेक शब्द कानात गुंजू लागले होते. एक अनामिक भीती मनात उमटत होती. कोणीतरी आपल्यावर ' करणी ' केली तर आपले काय होईल ? असा संस्कारही बालमनावर त्यावेळी झाला. जसा मोठा होत गेलो , शिकत गेलो तसे त्याचे गांभीर्य माझ्या लेखी कमी कमी होत गेले. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढल्यामुळे असेल , करणीची भिती निघूनच गेली. त्यात एकदा अंधश्रद्धा निर्मूलनच्या नरेंद्र दाभोलकरांचे मार्गदर्शन प्रत्यक्ष लाभल्यामुळेही वैज्ञानिक दृष्टीकोन कमालीचा वृद्धिंगत झालेला दिसला. 

          माध्यमिक शाळेत शिकत असताना असे अनेक साधक बाधक अनुभव येत जात होते. ते मनावर कोरले जात होते. त्यानंतर आपल्या आचरणात सकारात्मक सुधारणा होताना जाणवत होती. एकदा असाच मी शाळेतून दुकानात आलो होतो. दप्तर दुकानाच्या कोपऱ्यात ठेवले होते. ते दप्तर आपोआप हलू लागले होते. दप्तर ज्या भिंतीला टेकले होते , त्या भिंतीच्या मागे एक पोह्याची गिरण होती. गिरण चालू असतानाच दप्तर हलताना दिसे. गिरण बंद झाली कि दफ्तरही हलायचे थांबे. 

          गिरणीचे मालक  नेहमी एक आयडिया करत. त्यांची गिरण सुरु आहे हे लोकांना समजावे म्हणून त्यांनी वाफ बाहेर पडण्याच्या पाईपवर बाटली किंवा प्लास्टिक भांडे लावून ठेवत. त्यामुळे ' फाक फाक फुक फुक ' असा काहीसा मोठा आवाज येई. तो आवाज अतिशय कर्कश असे. आमचे बाबा कधीकधी हळूच जाऊन ती बाटली काढून टाकत असत आणि मग आवाज बंद होई. पण थोड्याच वेळात तो कर्कश आवाज पुन्हा सुरु झालेला असे. 

          त्या दिवशी एक म्हातारे गृहस्थ आमच्या दुकानात आले होते. त्यांनाही तो आवाज ऐकू आला होता.  ते म्हातारे आजोबा अतिशय आस्तिक होते. ते जप, जाप आदि करणारे असावेत. त्यांना तो आवाज वेगळाच वाटू लागला होता. त्यांनी त्या आवाजाला आपल्या मनात असे शब्द ऐकले होते , ' करणी फिरता , करणी फिरता '. आम्ही ज्याला ' फाक फाक फुक फुक ' म्हणत होतो त्याला ते ' करणी फिरता , करणी फिरता ' असे म्हणत स्वतः अतिशय गंभीर आणि अस्वस्थ झालेले दिसत होते. जेव्हा आमच्या बाबांनी ती बाटली काढून टाकली , तेव्हा आवाज बंद झाल्यावर ते म्हातारबाबा पूर्वीसारखे झाले होते. त्यांच्या मनात कोणती ' करणी ' होती ते त्यांनाच माहिती असेल , आम्हाला सांगता येणार नाही. पण या प्रत्यक्ष अनुभवावरून माझ्या असे लक्षात आले कि आपल्या मनात जे सुरु असते , तेच आपल्याला सगळीकडे दिसत असते. त्यानंतर ज्या ज्या वेळी त्या म्हातारबाबांचे दर्शन घडे , तेव्हा मला ' करणी फिरता , करणी फिरता ' ची आठवण येऊन हसू फुटत असे. आता ते म्हातारबुवा राहिलेले नाहीत , पण त्यांची ती ' करणी ' अजूनही कुठेतरी असेल का ? याबद्दल खात्रीपूर्वक सांगताही येत नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबल, कणकवली ( 9881471684 )



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...