Friday, June 4, 2021

🟢 इलास , कधी इलास

 🟢 इलास , कधी इलास


          शिक्षण आणि प्रतिभा या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिक्षणाने प्रतिभा येऊ शकते. प्रतिभेमुळे शिक्षण घडू शकते. कमी शिक्षण असलेले प्रतिभावंत असलेले आढळून आलेले आहेत. जास्त शिक्षण घेतलेल्यांच्या अंगी प्रतिभा असेलच याची खात्री देता येत नाही. माणसाच्या अंगी असलेली ही प्रतिभा कधी लवकर लक्षात येते , तर कधी लक्षात यायला वेळ लागतो. ' हाडाचा शिक्षक ' , ' हाडाचा कवी ' अशी उपमा दिली जाते. सगळी माणसे हाडाचीच बनलेली असतात. पण ' हाडाचा ' हा शब्द त्यांच्यातल्या प्रतिभावंतासाठी वापरलेला असतो. 

          बहिणाबाई चौधरी या प्रतिभावंत कवयित्री होत्या. त्यांना स्फुरत असणाऱ्या कविता त्या म्हणत असत. त्यात असणारा अर्थ डोळ्यातून पाणी आणणारा असे. त्यांचा मुलगा सोपानदेव चौधरी यांनी आपल्या आईची प्रतिभा जोपासली. त्यांच्या कवितांचे लेखन करून त्या जगाला दिल्या. जगाला जगण्यासाठीचे अमृत बहिणाबाईंच्या गावरान शब्दात सामावलेले होते. बहिणाबाईंचा प्रत्येक शब्द वाचकांच्या हृदयाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. 

          कलासानिध्य आणि अक्षरसिंधु या सांस्कृतिक संस्थांमध्ये काम करताना मला अशी प्रतिभावंत माणसं भेटली. प्रत्येकामध्ये वेगवेगळा प्रतिभावंत मी बघत होतो. त्यांचं बोलणं, वागणं मी टिपत चाललो होतो. मी त्यांच्यात सर्वांत कमी असल्याने टिपकागदासारखं सगळं टिपत राहण्याचं काम करत होतो. माझ्यातला प्रतिभावंत जागा होईल का ? याची मी वाट पाहत होतो. मला काही ते जमत नव्हते. 

          आमच्या या टीममध्ये एक कलाकार माझे विशेष लक्ष वेधून घेत होता. मी त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते. कुठे पाहिले मी या माणसाला ? जरा स्मरणशक्तीला चालना दिली. हा माणूस मला कणकवलीतच एका दुकानात दिसला होता. मग ते दुकानही आठवले. अरे हो !!! हा माणूस मला दोन दिवसांपूर्वी नारळाच्या दुकानात नारळ विकताना दिसला होता. अरे !!! मग हा माणूस इथे काय करतोय ? म्हणजे हा एवढा प्रतिभावंत नट असूनही नारळाच्या दुकानात नारळ विकतोय तर !!! मला त्या माणसाबद्दल आदर वाढला. त्याची विनोदी शैली मला भावत होती. सगळ्या वाक्यांमध्ये हसण्याच्या जागा या माणसाने शोधून काढल्या होत्या. शाब्दिक कोट्या करत बोलण्याची त्या माणसाची सवय सगळ्यांचीच फिरकी घेत असे. या माणसाशी बोलायचे म्हणजे विचार करूनच बोलायला लागे. 

          या माणसाने कलाकार म्हणून मालवणी सम्राट मच्छिन्द्र कांबळी यांच्या ' वस्त्रहरण ' नाटकातही काम केले होते. गोप्याची भूमिका करताना या माणसाने प्रेक्षकांना त्यावेळी लोटपोट करून सोडले असणार . हा माणूस एक प्रतिभावंत कलाकार असला तरी एक प्रसिद्ध व्यापारी आहे. ' नारळवाले खानोलकर ' म्हणून त्यांची सिंधुदुर्गातच नव्हे तर सगळीकडे ओळख आहे. या माणसाचे नाव विलास खानोलकर. मालवणीत या नावाचा उल्लेख ' इलास ' असा केला जातो. विलास खानोलकर म्हणजे एक चालतेबोलते नाट्यगृह आहे. 

          आज विलास खानोलकर हे नाव नाट्यक्षेत्रात प्रसिद्ध असले असते. पण व्यवसाय करता करता त्यांना ही कला जोपासावी लागली. रात्रीचे प्रयोग करून पुन्हा आपल्या पारंपरिक नारळाच्या दुकानात काम करताना ते नेहमी नजरेस पडतात. त्यांना दुकानात कॅल्क्युलेटरची गरज पडत नाही. ते सगळं हिशेब तोंडीच करताना दिसतात. त्यांचे मालवणी भाषेवर नितांत प्रेम आहे. ते शक्यतो मालवणी भाषेतच बोलतात. मालवणी भाषेतील म्हणी वापरत ते आपला संवाद अधिक रुचकर बनवतात. त्यांना मोठया साहित्यिक कार्यक्रमामध्ये बोलावणे येत असते. ते शीघ्र कवी आहेत. ते चारोळी तयार करतात. या चारोळ्यांमध्ये आपला गावाकडील माणूस लपलेला असतो. त्यांचे अनेक मालवणी लेख ' तरुण भारत ' या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. ते माझ्या काकांच्या वयाचे असतील. मी त्यांना कुठेही वाटेत भेटलो , तर मला ते विनोदाने ' काका ' अशी हाक मारतात. मात्र मी त्यांना फोन केला तर , तिकडून आवाज येतो , " बोल प्रवीण , काय म्हंतस ". 

          या विलास खानोलकरांनी ' इये कोकणचिये नगरी ' अर्थात ' कोकणच्या लोककला ' नावाचा एक अतिशय पारंपरिक , संस्कृतीविषयक आड दशावतार हा कार्यक्रम लिहून त्यात महत्त्वाची भूमिकासुद्धा केली आहे. त्यात त्यांचे मालवणी पात्र अतिशय भाव खाऊन जाते. मी त्यात त्यांच्यासोबत वासुदेव , धनगरीनृत्य , कोळीगीत गायन केले होते. त्यांची आणि अनिल सावंत यांची बतावणी ऐकताना आम्ही नेहमीच पोट धरून हसलो आहोत. अनिल सावंत त्यात कोल्हापुरी माणसाची भूमिका अतिशय छान रंगवायचे. आता ती कोल्हापुरी माणसाची भूमिका कणकवली कॉलेजचे प्राध्यापक हरिभाऊ भिसेसर हेसुद्धा छान वटवतात. 

          प्रत्येक माणूस हा कोणत्या ना कोणत्या गोष्टींचा छंदी असतो. विलास खानोलकरांना नाटकाचे , लेखनाचे , काव्यरचना करण्याचे वेडच आहे म्हणा ना !! वगनाट्यात बतावणी करताना सद्यस्थितीवर भाष्य करत बोलण्याची त्यांची पद्धत हास्य निर्माण करते. त्यांचा विनोद हा मार्मिक असतो. पोट धरून हसायला लावणारा असतो. प्रत्येक माणसाने या विलास खानोलकरांसारखे विलासी व्हायला हवे. अश्या प्रकारचा विलास प्रत्येकाच्या जीवनात एकदा तरी यायलाच हवा. माझ्या जीवनात हा विलास आला आणि माझे जीवन चांगल्या अर्थाने ' विलासी ' करून टाकले. म्हणूनच मी गमतीने म्हणतो , " इलास , कधी इलास ? " . 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

Sunday, May 30, 2021

🔴 काबुलीवाले गांधी

🔴 काबुलीवाले गांधी

        काबुली म्हणजे भाजलेले चणे. कागदाच्या गुंडाळीमध्ये गरमागरम काबुली खातानाचा आनंद मी बऱ्याचदा अनुभवला आहे. लहानपणी शाळेच्या जवळ एखादा काबुलीवाला हमखास येत असे. माझ्या एका मित्राचे वडीलही काबुलीवाले होते. ते वयस्कर झाल्यानंतर माझा तो मित्रही काबुलीवाला झाला. माझा हा काबुलीवाला मित्र मला भेटतो. माझ्या संपूर्ण कुटुंबाची विचारपूस करतो. हल्ली बरेच दिवस तो भेटला नाही. त्याचा भाऊ भेटतो , तोही चौकशी करतो. माझ्या या काबुलीवाल्या मित्रामुळे मला त्याच्या वडिलांचा खूप आदर वाटू लागला. स्वतःचे पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असताना हा माझा मित्र काबुली विकत असे. शिक्षण घेत असताना ' काबुलीवाला ' हा फिरून करावयाचा धंदा असला तरी हा धंदा त्याच्यासाठी कधीच व्यत्यय ठरला नाही. उलट त्या व्यवसायाने त्याचे शिक्षण पूर्ण केले. 
          त्यांची फिरती गाडी असल्यामुळे नाट्यगृह , जत्रा , शाळा इत्यादी ठिकाणी त्यांना फिरून धंदा करावा लागे. शाळा सुटली की माझा मित्र संध्याकाळी उशिरापर्यंत काबुलीच्या गाडीवर चणे , शेंगदाणे विकताना मी अनेकदा पाहिले आहे. आमच्या वर्गातील सर्व मुले , मुली मधल्या सुट्टीत आमच्या ह्या मित्राच्या गाडीवर जाऊन ' काबुली ' घेत असत. माझ्या या मित्राला आपल्या या धंद्याबद्दल कधीही कमीपणा वाटल्याचे दिसले नाही. त्यांच्याकडचे गरमागरम चणे , शेंगदाणे, पिवळे वाटाणे, रंगीबेरंगी वाटाणे, चुरमुरे, खारे शेंगदाणे, भाजकी चणा डाळ, तिखट डाळ, तिखट शेंगदाणे खाऊन झाले की पुन्हा पुन्हा खावेसे वाटत. कागद सहज गुंडाळून त्याची शंकूच्या आकाराची काबुली पुडी बनवून त्यात मापाने काबुली ओतून त्यात आणखी थोडी काबुली घालत हसतमुखाने काबुली देणारे माझ्या मित्राचे ते बाबा माझ्या नयनचक्षूंसमोरून आता तरळून जात आहेत. 
          त्यानंतर अजून एक काबुलीवाले माझ्या आयुष्यात आले. आमचे सलून कणकवली ढालकाठी परिसरात असताना त्यांचा आमचा परिचय झाला. मी एकदा असाच दुकानात अभ्यास करत असताना बाबा किंवा काका मला म्हणाले , " तुला गांधीजी बघायचे आहेत का ? " मी गमतीनेच हो म्हटले. आम्ही शाळेत ज्यांची जयंती , पुण्यतिथी साजरी करतो , ते गांधीजी मी पुस्तकात बघितले होते. पण आता प्रत्यक्ष बघायला मिळणार म्हणून माझी उत्सुकता वाढली. माझी नजर रस्त्यावर वळली. खरंच सांगतो , गांधीजी आमच्या दिशेनेच येताना मला दिसले. मला वाटले स्वप्न असेल. मी मला चिमटा काढून बघितला. मी जागेपणीच गांधीजी बघत होतो. अगदी तसेच दिसणारे कणकवलीतले गांधीजी मी साक्षात बघत होतो. ते आमच्या दुकानात आले. त्यांनी माझ्या हातावर प्रेमाने ' काबुली ' ठेवली. मी अवाक होऊन त्यांच्या कडे बघतच राहिलो होतो. गांधीजींचे हुबेहूब रूप घेऊन आलेले हे काबुलीवाले माझे मित्रच झाले. कधी कधी आम्ही त्यांच्याकडून ' काबुली ' विकत घेत असू. पण बऱ्याचदा ही काबुली त्यांनी आम्हाला आमच्या चिमुकल्या हातात भरभरून दिलेली असे. अगदी पैसे न घेताही. त्यांना सगळे ' बाबुराव ' म्हणत. पण आम्ही त्यांना ' काबुलीवाले गांधीजी ' म्हणत असू. 
          विविध सांस्कृतिक मंडळांनी त्यांच्या या गांधीजींसारखे दिसण्यामुळे ' गांधी जयंती ' , ' स्वातंत्र्य दिन ' अशा विशेष दिनांना ' काबुलीवाल्या गांधीजींना ' वेशभूषेने  गांधीजी ' बनवून उपक्रम सादर करून वाहवा मिळवली. ते गांधीजी म्हणून प्रसिद्ध झाले. ते सर्वांशी प्रेमाने बोलत असत. काबुली विकता विकता ते लोकांना प्रेमाचे शब्दही देत चालले होते. नंतर त्यांनी ' काबुली विकण्यासाठी गाडा ' घेतला. सर्व जत्रा, गर्दी होणारे कार्यक्रम ते करू लागले. ते बहुदा एकटेच असत. सहज कणकवलीत फिरता फिरता ते चणे , शेंगदाणे विकत असत. आधी हातावर फुकटचे चणे देत. सतत फुकट घेणे बरोबर नाही , म्हणून आम्ही त्यांच्याकडे दर भेटीवेळी चणे , शेंगदाणे घेत राहिलो. त्यांचा आमच्याविषयीचा आदर वाढला. आम्हाला तर त्यांच्याविषयी आदर होताच , तो त्यांच्या नियमित येण्याने वाढतच चालला होता. 
          माझी मोठी बहीण ताई त्यावेळी रेशन दुकानात सेल्समन होती. घराला तेवढाच हातभार लागावा म्हणून ती नोकरी करून आमच्या दुकानात शिवणकामही करत होती. तिथेही हे ' काबुलीवाले गांधीजी ' जात असत. माझ्या ताईचा स्वभाव त्यांना खूप आवडे. कदाचित माझ्या ताईमध्ये ते आपल्या मुलीला पाहत असावेत. काबुलीच्या पिशवीत हात घालून जितके येतील तितके चणे , शेंगदाणे ते तिच्या हातात ठेवीत. पैसे न घेताच ते निघून जात. असे त्यांनी अनेकदा केले असेल. संध्याकाळी रेशन दुकान सुटल्यानंतर ताईकडून आम्हाला ' काबुली ' मिळे. रेशन दुकानात कामाला असतानाच माझ्या ताईचे लग्न झाले. लग्नानंतर ती ' डोंबिवलीला ' गेली. पण हे काबुलीवाले गांधीजी आले की पहिल्यांदा तिची चौकशी करत. त्यामुळे ताई कधी गावाकडे आली की रेशन दुकानात भेटायला जाई , तशी या ' काबुलीवाल्या गांधीजींनाही भेटे. त्यांना सहज शंभर , पाचशेची नोट पुढे करी. ताईला वाईट वाटू नये म्हणून ते पैसे ते घेत. पण ताईच्या हातावर पुन्हा एकदा ' काबुलीची प्रेमळ भेट ' मिळे. अशी कोणतेही नाते नसणारी माणसे आयुष्यात येतात आणि जातात. रक्ताचे नाते नसले तरी अशी माणसे एवढा जीव का लावतात समजत नाही.कधीकाळी त्यांची आठवण आली की , घालमेल होते. 
          असे हे काबुलीवाले ' गांधीजी ' . त्यांच्या आयुष्यात ते किती सुखी होते हे आम्हाला माहीत नाही , आम्ही ते शोधण्याचा प्रयत्नही केला नाही. पण त्यांच्या येण्याने आम्हाला प्रेमाचा सुवास मिळे. कालच त्यांच्या निधनाची वार्ता वाचली नि क्षणभर ' ते ' काबुलीवाले गांधीजी ' हातावर काबुली देत असल्याचा भास झाला. लोकांसाठी ते बाबुराव असतील , पण आमच्यासाठी ते कायमच ' काबुलीवाले गांधीजीच ' असणार आहेत. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


Friday, May 28, 2021

मी वासुदेव झालो

 🟣 मी वासुदेव झालो


          पूर्वी सकाळी सकाळी दारोदारी एक पिंगळा येत असे. गळ्यात कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी , बाराबंदी घातलेला , कपाळी टिळा , छोटी झांज वाजवत व हरिनामाचा गजर करत येणारा वासुदेव म्हणजेच पिंगळा आम्ही अनेकदा बघितला आहे. आता हल्ली हा वासुदेव दिसेनासा झाला आहे. या वासुदेवाची कोणतीही अपेक्षा असत नसे. तुम्ही जे द्याल ते घेऊन तो पुढच्या घरी जात असे. हसतमुखाने आशीर्वाद देऊन जाणाऱ्या वासुदेवाकडे पाहिले की दिवस कसा मस्त जात असे. त्यानंतर भविष्य सांगणारे येत. तेही घरातल्या सर्वांचे भविष्य सांगत. हे भविष्यवेत्ते भरपूर तांदूळ , गहू , रोख रक्कम यांची मागणी करत. आमच्याकडे एक तुणतुणेवाला येत असे. तो तुणतुण करत एखादा सुंदर अभंग गात असे. त्याचा स्वर चांगला लागे. ते ऐकण्यासाठी मी त्याच्या जवळ जात असे. पण त्याच्याकडे एक उग्र वास येत असे. मी बाबांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितले कि त्याने काल थोडी घेतली असणार त्याचा उग्र वास अजून त्याच्या अंगाला येतो आहे. मला त्यामुळे नंतर त्या तुणतुणेवाल्याचा राग येई. तो आला कि त्याचे गाणे न ऐकताच मी त्याला घरातून काहीतरी आणून देऊन हाकलवून लावी. 

          अक्षरसिंधु संस्थेत काम करत असताना मला अनेकदा ' वासुदेव ' सादर करण्याची संधी प्राप्त झाली होती. मीही त्या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला. माझा आवाज चांगला होता , त्यामुळेही ते मला शक्य झाले असावे. लहानपणी रविंद्र महाजनीचा ' देवता ' हा चित्रपट बघितला होता. त्यात त्याने वटवलेला वासुदेव किती छान होता !! वासुदेव आला हो , वासुदेव आला ..... सकाळच्या पारी हरिनाम बोला .... असे म्हणत आपल्या मैत्रिणीला तुरुंगातून सोडवायला आलेला दरोडेखोर लाखनसिंग त्यावेळी खूप प्रसिद्ध झाला होता. मी तो चित्रपट चार ते पाच वेळा तरी पाहिला असेन. 

          वासुदेव करायचा म्हणजे धोतर नेसावे लागे. सुधाकर प्रभूमिराशी किंवा सुप्रिया प्रभूमिराशी मला छान धोतर नेसवीत. त्यावर बाराबंदी घालावी लागे. कवड्याच्या माळा , मोरपिसाची टोपी . एका हातात चिपळी, दुसऱ्या हातात खंजिरी . नाम लावून हरिनामाचा नामजप करत मी रंगमंचावर नाचत येई. माझ्या येण्यापूर्वी रंगमंचावर ओव्या सुरू होत. बायका दळण दळत असत. दळताना त्यांच्या ओठातून सुस्वर गाणे बाहेर पडे.


           ' कोंबडा घाली साद , 

          जग समदं गं झालं जागं ' 


          याच्या पाच सहा ओळी झाल्या की मी गाणे म्हणत व नाचत नाचत रंगमंचावर दाखल होई. काही भगिनी रांगोळी काढत , काही मुसळाच्या साहाय्याने मसाला कुटण्याचा हावभाव करत. एक घरण म्हणजे घरातली सुहासिनी महिला तुळशीला पाणी घालायला येई. सकाळचा मंगल ध्वनी सुरू असतानाच माझा प्रवेश होई आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होई. 


          तुळस वंदावी , तुळस वंदावी 

          अहो , माऊली दिनांची साऊली , तुळस वंदावी ।।

          दारापुढती लावलं रोप , त्याला निर्माल्याचा खप 

          नित्य प्रभाती उठून , करा जलाचे सिंचन 

          येई आरोग्य त्यातून , जावे त्याच्यात डुंबून , तुळस वंदावी ।।


          हे गाणं संपलं की ती घरंदाज संस्कारित भगिनी मला म्हणजे वासुदेवाला  ' दानधर्म ' करीत असे. धर्म म्हणजे तिच्याकडे असलेले तांदूळ किंवा इतर धान्य मला मनोभावे दान देत असे. मी हे दान घेतले की पुढचे गाणे म्हणू लागे. 


          दान पावलं हो , धर्म पावला 

          गळ्यात घातल्या कवड्याच्या माळा

          बाराबंदीच्या गाठी बांधल्या 

          नाजूक लाविले गंध कपाळा

          शिरी शोभते मुकुट जैसी 

          मोरपंखांची मोहक टोपी 

          हरिनामाचा गजर ओठी , दान पावलं हो धर्म पावला .......


          आकाशामध्ये सूर्यदेवाला

          भूमीमधल्या नागदेवाला

          पंढरीच्या पांडुरंगाला , दान पावलं हो धर्म पावला .......


          असे म्हणत मी आनंदाने पुढच्या घरी जात असे. पुढच्या घरी जाताना पुढील गाणे म्हणत असे. 


          वासुदेव आला हो , वासुदेव आला 

          सकाळच्या पारी हरिनाम बोला 


          आज बऱ्याच वर्षांनंतर मला मी वासुदेव झालो होतो ती आठवण झाली. एकदा आपण एखाद्या भूमिकेत शिरलो की आपले राहत नाही हेच खरे. मी अगदी वासुदेवच होऊन जात असे. गोवा येथे साखळी येथे प्रयोग होता. त्यावेळी मी सुरुवातीला ' ज्ञानेश्वर ' झालो होतो. पसायदान म्हणणारे कुणी दुसरेच गायक होते. माझ्या समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती. समईच्या अंधुक प्रकाशात मी ज्ञानेश्वर ' पसायदान ' म्हणायला लागलो. अर्थात मी फक्त ओठ हलवत होतो. पण माझे पसायदान पूर्ण पाठ असल्यामुळे ते मीच म्हणत आहे असे प्रेक्षकांना वाटून गेले होते. त्यानंतर माझे वासुदेवाचे सादरीकरण झाले. तेही इतके सुंदर झाले की कार्यक्रम झाल्यानंतर पडद्यामागे  चार पाच अनोळखी लोकांनी येऊन सांगितले होते , " तुमचा ज्ञानेश्वर आणि वासुदेव दोन्ही आम्हाला खूप आवडले . " मला त्यावेळी जो आनंद झाला तो आगळा नि वेगळा असाच होता. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

©️ चित्र रेखांकन : तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर  ( 9405218189 )



ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये

 🔴 ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये


          उन्हाळा सुरू झाला की थंड पाण्याने आंघोळ करावीशी वाटते. थंडीच्या दिवसांत मात्र थंड पाण्याची आंघोळ करणे जीवावर येते. आपलं शरीर गरम झालं कि ते थंड करण्यासाठी शरीराने नैसर्गिकपणे ' घाम ' आणण्याची केलेली प्रक्रिया अत्यावश्यकच आहे. हा घाम आला की फॅनच्या खाली बसलात की कोण आनंद होतो ? पण  हा उकाडा कोणालाही सहन होत नाही. ती थंडी परवडली , पण उन्हाळ्याच्या झळा सोसत नाहीत. 

          पूर्वीचं सगळ्यांचं आवडतं हिंदी गाणं आंघोळ करताना अजूनही सर्वजण म्हणत असतील. '  ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' . हे गाणे नुसते म्हणून उपयोगाचे नाही. सोबत थंड पाण्याच्या धारा डोक्यावर पडत असतील तर तो अनुभव काय वर्णावा !! हल्ली शॉवरखाली आंघोळ केली जाते. बंद खोलीत शॉवरखाली आंघोळ , आणि ओठावर ते हिंदी गाणं , थोडावेळ डोळे बंद करून पावसात भिजण्याचा मस्त फील घ्यायचा. लहानपणी पावसात भिजताना घेतलेला आनंद , शेतात गुट्यावर बसून चिखलात बैलांच्या मागे पळण्याचा आनंद , टू व्हीलर गाडीवरून जात असताना अचानक पडलेल्या पावसाने भिजण्याचा आनंद , छत्री डोक्यावर धरलेली असताना वादळाने छत्री उडून गेल्यानंतर भिजायला झाल्याचा आनंद , रेनकोट घातल्यानंतरही त्यात पाणी येऊन अर्धे निम्मे भिजताना होणारा आनंद , बाहेर तुफान पाऊस पडत आहे आणि गारा पडू लागल्या आहेत , त्या गारा वेचत असताना भिजायला होत असल्याचा आनंद हे सगळे आनंद थंड पाण्यामुळे मिळणारे आहेत. 

          ज्यांना सतत गरम पाण्याची आंघोळ करण्याची सवय असेल , त्यांनीसुद्धा कधीकाळी हा सर्व प्रकारचा आनंद घेतलाच असेल. पण आता तो घेता येत नसला तरी आपण हा आनंद पूर्वी घेतलेला आहे , हा सुद्धा आनंदच नाही का ? मी कधी गावी गेलो की नदीत डुंबण्यात मिळणारा आनंद , प्लास्टिकच्या भरलेल्या बादलीत येत नाही. शेतात काम करताना इरले , प्लास्टिक पिशवीची खोळ , कांबळे ( आडनाव असणाऱ्यांनी राग मानू नये ) घालून पावसात भिजताना होणारा आनंद कुडकुडतानाही जाणवतो. विहिरीतील पाणी स्वतः ओढून काढून कळशी कळशीने आंघोळ करताना ती आंघोळ संपूच नये असे वाटत राहते. एक कळशी डोक्यावर रिकामी केली की दुसरी , तिसरी करत दहा पंधरा कळश्या डोक्यावर पालथ्या केल्या तरी समाधान होत नाही. खरंच अशा आंघोळीसारखा आनंद नाही. 

          आमच्या शेजारी एक कुटुंब राहत असे. त्यांचे घर रस्त्याच्या पलीकडे होते. आमच्या मालकांच्या विहिरीचे पाणी संपले की आम्हाला त्यांच्या विहिरीचे पाणी आणावे लागे. त्यांच्या कुटुंबात सगळी तरुण पुरुष मंडळी होती. या सर्व मुलांना विहिरीवर आंघोळ करण्याची रोजची सवय. आम्ही आमच्या खोलीबाहेर आलो , तरी सकाळ , दुपार , संध्याकाळ त्यांच्यापैकी कुणीतरी आंघोळ करताना नजरेस पडे. कळशी भरून पाणी काढायचे आणि धबाधब डोक्यावर ओतायचे. ते बघूनच माझ्या अंगावर शहारे यायचे. थंडीच्या दिवसातही ते थंड पाण्याची आंघोळ करत याची कमाल वाटे. मग गरगरीत साबण लावून तो जाईपर्यंत सात ते आठ कळश्यांचा त्यांच्या अंगावर महाअभिषेक होई. मी त्यानंतर थंड पाण्याची आंघोळ करण्याचा संकल्प करी , पण सकाळी गरम पाण्याची आंघोळ केल्यानंतर पुन्हा तोच संकल्प करत असे. 

          आता आंघोळीसाठी टब बाथ वगैरे पद्धती अस्तित्वात आल्या आहेत. माझी पाच वर्षांची लहान मुलगी मोठ्या प्लास्टिकच्या टबात आंघोळ करत असताना मला या '  ठंडे ठंडे पानी से नहाना चाहीये ' च्या आंघोळीविषयी सुचले. कारण तीसुद्धा आंघोळ करताना हेच गाणे मोठ्याने म्हणत या आंघोळीचा मनमुराद आनंद घेत होती. 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )


तुलसी आर्ट : तुळशीदास अशितोष कुबलसर ( 9405218189 )

Thursday, May 27, 2021

दारावरचा न्हेल्यानी

 🐀 दारावरचा न्हेल्यानी


          आपण राहण्यासाठी एखाद्या शहरामध्ये भाड्याची खोली घेतो. त्यात आपल्याला राहायचे असते. घरातल्या कुटुंबासोबत काही नको असलेले सदस्य आपल्याबरोबर राहायला आलेले असतात. ते पूर्वीपासूनच राहत असतात , फक्त आता आपली त्यांना सोबत झालेली असते इतकेच. मी उंदीर , झुरळे , मुंग्या , कोळी यांच्याबद्दल बोलतोय हे तुमच्या एव्हाना लक्षात आले असेलच. अर्थात स्वतःचे घर असले म्हणून हे अनवॉन्टेड सोबती यायचे राहात नाहीत , ते कुठूनतरी येतातच. चांगल्या फ्लॅटमध्येही बेसिनच्या खाली झुरळांची ये- जा सुरू असतेच. स्वयंपाकघरातील त्यांचा वावर आपल्याला शिसारी आणणारा असतो. 

          मुंग्यांनीही बेजार करून सोडलेले असते. जिथे तिथे आपल्या घरात कोळी आपले घर बांधताना दिसतात. हे सगळे कीटक परवडले , पण उंदीर नको. तसे सगळेच कीटक उपद्रवीच असतात. पण उंदीर, चिचुंद्री यांचा उपद्रव अधिक जाणवतो. सीतेला कुटीत एकटी सोडून जाताना लक्ष्मणाने जशी ' लक्ष्मणरेषा ' आखलेली असते , तशी ' लक्ष्मणरेषा ' बाजारातून विकत आणून आपण त्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न करतो. मग हे अनवॉन्टेड रावण सैरावैरा पळतात आणि त्यांना मारण्यासाठी आपण त्यांच्या मागून सैरावैरा पळतो. त्यांना काठीने मारताना चुकून एखादा घाव आपल्याच माणसांवर किंवा एखाद्या चांगल्या वस्तूंवर करायलाही आपण कमी करत नाही. आपल्यात त्यावेळी कमालीची वीरश्री संचारलेली असते. काही तर उगीचच धावत असतात. शेवटी सगळे हे प्राणी आपल्या आपल्या निवाऱ्यात काही काळ लॉकडाउनप्रमाणे जाऊन राहतात आणि औषधाचा असर संपला की पुन्हा त्यांचे अनलॉक झालेले असते. 

          आमच्या घरी या उंदरांना पळवून लावण्यासाठी ' पिंजरा ' आणून ठेवलेला असे. उंदरांनी खूपच उच्छाद मांडला होता. त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते. लोखंडी पिंजऱ्यात जाण्यासाठी एक दरवाजा असे. त्यात प्रवेश केल्यानंतर पुन्हा बाहेर पडता येत नसे. रात्री आईने त्या पिंजऱ्याच्या दरवाजावर ' हिरवी कोथिंबीर ' लावून ठेवली होती. आम्ही सर्व भावंडांनी आपापली अंथरुणे घातली. नेहमीसारखे गाढ झोपी गेलो. बाबा पडल्यापडल्या घोरायला लागले. मीही त्यांच्या पोटात शिरून झोपलो. आई उशिरापर्यंत जागी असे. ती उद्याची तयारी करून ठेवत असे. तीही झोपली. आज तिला शांत झोप लागली असावी. सकाळी लवकर उठण्याची तिची सवय नव्हती. तिला माझे बाबा उठवत असत. बाबांची तयारी झाली की मग आई उठत असे. बाबांना गडबड असली तर कधीकधी ते आईला लवकर उठवून जेवणाची तयारी करायला सांगत. 

          पण का कोण जाणे , आज बाबांच्या अगोदर आई उठली होती. उठल्याउठल्या तिने काहीतरी पाहिले असावे. ते पाहताक्षणी ती मोठ्याने बोलली नव्हे ओरडलीच , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " हे वाक्य ती मोठ्याने बोललीच. पण बाबांच्या कानाकडे जाऊन पुन्हा हळू आवाजात बोलली , " ओ , दारावरचा न्हेल्यानी " . बाबा तसेच घाबऱ्याघुबऱ्या उठले आणि बाहेरच्या दरवाजाकडे गेले. त्यांनी बाहेरच्या दरवाजाकडे ठेवलेल्या सर्व आपल्या वस्तू पडताळून पाहिल्या. सर्व वस्तू होत्या तश्याच होत्या. घरवालीने उगीचच काहीतरी सांगितले म्हणून तिला ते ओरडण्यासाठी वळले. आम्हीही आईच्या ओरडण्याने जागे झालो होतो. पण अंथरुणातून उठलो नव्हतो. पुन्हा आई ओरडली , " ओ , हकडे येवा , हेनी सगळा दारावरचा न्हेल्यानी " . तेव्हा बाबा स्वयंपाकघरात गेले तर तिथे पिंजऱ्यात एकही उंदीर नव्हता. पण पिंजऱ्याच्या दारावर ठेवलेली कोथिंबीर त्या उंदरांनी पळवली होती. एकही उंदीर त्या पिंजऱ्यात अडकला नव्हता. दारावर ठेवलेली कोथिंबीर पळवल्याबद्दल आई तसे म्हणत होती , " ओ , दारावरचा न्हेल्यानी ". 

          उंदीर एवढे हुशार झाले होते की त्यांना पिंजऱ्यात न सापडता खाऊ घेऊन जाता येत होता. त्यानंतर वेगवेगळे प्रकार करुन उंदरांना पकडण्याचे काम सुरूच राहिले. आजही ' दारावरचा न्हेल्यानी ' या वाक्याला आम्हाला पोट धरून हसू येते. तुम्हालाही हसू आले असेल तर तुम्हीही पोट धरुन हसू शकता. फक्त हसताना तुमचे पोट धरा म्हणजे झाले.


©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



सामंतांचे वडे

 🔵 सामंतांचे वडे


          वडे कोणाला नको होतील का ? अर्थात मी बटाटेवडयांबद्दल बोलतोय हे तुम्हाला समजले असेलच. त्याबरोबर पावाची आठवण येऊ शकते. सोबत खोबऱ्याची हिरवी चटणी किंवा लाल मसाला चटणी असेल तर काय ? जिभेला पाणीच सुटेल. नुसत्या वासानेसुद्धा आपण वडापाव , भजी खाण्यासाठी थांबत असणार . पार्सल आणून घरी एकत्र बसून मस्त गरमागरम वड्यांवर ताव मारत असणार , नाही का ? एक वडापाव खाल्ल्यानंतर अजून एक खावासा वाटणे , आणखी एक करत चार ते पाच वडापाव खाणारेही महाभाग मी बघितले आहेत. आता लॉकडाऊन काळातही बाजार घ्यायला बाहेर पडलो तर , वडापावची टपरी उघडी असली तर एखादा तरी वडापाव खाण्याचा मोह कोणालाही आवरत नसेल ना ? खरं आहे ते. 

          एखादी गृहिणी यु ट्युब वर बघून चवदार बटाटेवडे बनवतही असेल , पण पार्सल आणून तो वडापाव खाण्यात जी मजा आहे ती येत नाही. मग दर संध्याकाळी वडापाव खाण्याची सवय होऊन जाते. घरी बाजार आणल्यानंतर त्यात ' वडापाव ' चे पार्सल शोधले जाते. वडे बनवणारी गृहिणीसुध्दा यातून सुटत नाही. तीसुद्धा बाजारात जाताना आपल्या धन्याला हळूच सांगते , " अहो , येताना गरमागरम वडापाव घेऊन या ना !! " हे हळूचचं सांगणं ऐकणार नाही तो धनी कसला ?

          आमच्या दुकानापासून जवळ एक वडेवाले राहत असत. कणकवली बाजारपेठेत त्यांचे वडे प्रसिद्ध होते. आम्हाला त्यांच्या वड्याची चव लागली होती. ' वडे , वडे ' असे त्यांचे शब्द कानावर पडले की आमच्या जिभेला पाणी सुटे. मग बाबांना सांगून एखादा तरी वडा खायला मिळतच असे. त्या वडेवाल्यांचे पूर्ण नाव मला माहित नाही , त्यांचे आडनाव ' सामंत ' होते. त्यामुळे ते वडे ' सामंतांचे वडे ' या नावानेच अजूनही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या वड्यांची चव विशिष्ट अशी होती. कित्येक ठिकाणचे वडे खाल्ले तरी ' सामंतांच्या वड्यांची तुलना होऊ शकत नाही. हल्ली आम्ही दरवेळी वडेवाले बदलत राहतो. पण प्रत्येकवेळी त्यांच्या वड्यांची चव बदलत असल्याचे लक्षात येते. पण सामंतांच्या वड्यांची चव कधीही बदलली नाही. ते आमच्या दुकानापासून लांब गेले की ते पुन्हा येईपर्यंत आम्हाला थारा नसे. कधी एकदा ' सामंतांचा वडा ' खातो असे होऊन जाई. ते पाच दहा मिनिटांनी येत आणि म्हणत , " काय ओ कुबलांनु , मघाशी एवढो मोठ्यान ओरडत गेलय ,तेवा लक्ष खय होतो तुमचो " त्यावर बाबा म्हणत , " अहो सामंत , मी माझ्या कामात होतय , ह्या पोरांनी सांगल्यानी म्हणून तुमका हाक मारुची लागली . तेंका तुमच्या वड्याशिवाय चैनच पडत नाय ". असे म्हणत असतानाच सामंत रद्दी पेपरात दोन तीन वडे बांधून देत. बाबा मग त्यांचे प्रत्येकी दोन ते तीन भाग करत. त्यातला छोटा भाग आम्हाला खायला मिळे. पण तेवढा छोटा वडासुद्धा अमृतासमान लागत असे. तशी अमृताची चव आम्ही कधीच चाखलेली नाही. पण तसे म्हणण्याची एक पद्धत आहे. आम्ही अमृत प्यायलो नाही , म्हणून त्या वड्याला ' अमृताची चव ' देऊन टाकली इतका तो सामंतांचा वडा चविष्ट होता. 

          एकदा हे सामंत दुकानाकडून वडे घेऊन चालले होते. त्यांचे वड्यांचे दुकान कधीच नव्हते. ते फिरून फिरून तासाभरात शंभर इतके वडे विकून येत असत. सगळे कणकवलीकर ' सामंतांच्या वड्यांचे ' शौकीन होते. मी सामंतांना हाक मारली , " ओ सामंतकाका , कसे आहात ? " ते फक्त हसले आणि पुढे निघून गेले. दररोज आम्ही वडे मागू शकत नव्हतो. बाबांनी बरेचदा आम्ही न सांगताही आम्हाला वडे घेऊन दिले होते. पण दुकानात काम नसताना उगीच खाऊसाठी खर्च करणे आम्हालाही पटत नव्हते. एखादी गोष्ट हवी वाटली तर ती लगेचच मिळायला हवी असे नाही. ती मिळण्यासाठी थोडा अवकाश जायला हवा. आम्हाला तो अवकाश मिळत असे. आज वडा मिळाला तर तीन चार दिवसांनी वडा खायला मिळणार हे नक्की. पण तसा संयम ठेवायला हवा. आम्ही तसा संयम ठेवत असू. बाबांना आमची आवड माहिती असली तरी त्यांनीही आम्हाला वाईट सवय लावली नाही. तसंही , वाट पाहण्यात किंवा एखादी गोष्ट मिळणार आहे याची प्रतिक्षा करण्यातही वेगळीच मौज असते. ती मौज आम्ही पाचही भावंडांनी अनुभवलेली आहे. आज वडा मिळणार नाही हे आम्हाला ठाऊक होते. त्यामुळे मी आपला माझ्या अभ्यासाचे पुस्तक वाचण्यात मग्न होतो. 

          तेवढ्यात माझ्या डोक्यावर कोणीतरी टपली मारली. मी पुस्तकातून डोके वर काढले. समोर वडेवाले सामंत उभे होते. त्यांनी माझी हाक ऐकली होती. तरीही ते पुढे गेले होते. एक वडा माझ्यासाठी शिल्लक ठेऊन त्यांनी बाकी सर्व वडे विकले होते. तो माझ्यासाठी शिल्लक ठेवलेला वडा त्यांनी माझ्या चिमुकल्या हातात दिला. बाबांनी माझ्याकडे बघितले. मला बाबांची भीती वाटली. पण बाबांनी माझ्याकडे रागाने बघितले नव्हते. त्यांनी पैशाच्या ड्रॉव्हरला हात घातला. बाबा त्यांना वड्याचे पैसे देऊ लागले. पण सामंतांनी ते पैसे घेतले नाहीत. ते म्हणाले , " कुबल , मी वड्यांचा धंदा करतो , पण मला या वड्याचे पैसे नकोत , जाताना तुमच्या मुलाने मला जी प्रेमाने हाक मारली , त्यामुळे मी मुद्दामच आज त्याला हा वडा मोफत देत आहे. " दुकानातली इतर गिऱ्हाईके त्यांच्यातल्या या वेगळ्या माणसाकडे पाहून गप्पच झाली. नेहमीप्रमाणे सामंतांचा तो ' प्रेमळ वडा ' आम्ही सगळ्यांनी वाटून खाल्ला हे वेगळे सांगायलाच नको. 

          आम्ही त्यानंतर अनेक दुकाने बदलली तरी खायचा वडा कधीही बदलला नाही. सामंतांनी अनेकदा आम्हा भावंडांना असे फुकट वडे दिले आहेत. त्यांचा एखादा वडा खाल्ल्यानंतर पोट भरून जात असे. माझी सर्व भावंडे अगदी माझ्यासह लहानपणी असं म्हणत असत , " मी सामंतांकडचे खोलीभर वडे खाईन ". या वड्याबरोबर पाव नसे , चटणी नसे , कांदा नसे , ओली चटणी नसे , पण त्या वड्यात त्यांचे प्रेम मात्र ओतप्रोत भरून राहिलेले असे . 


 ©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Wednesday, May 12, 2021

वस्तऱ्याने मोठे केले

 🪒 वस्तऱ्याने मोठे केले


          गाव गाता गजाली ही मराठी मालिका प्रसिद्ध झाली होती. त्यात एक नाभिक व्यावसायिकाचे पात्र रंगविण्यात आले होते. त्यात असणारा नाभिक नेहमी एक वाक्य म्हणत असतो. ते वाक्य " वस्तरो मारीन " असे होते. त्या बिचाऱ्याने ते वाक्य फक्त म्हणण्याचे काम केले. कधी वस्तरा मारला मात्र नाही. त्या नाभिकाचा हुबेहूब अभिनय करणारा कलाकार म्हणजे आमचे ग्राहकमित्र अभय नेवगीसर. आमच्या केशकर्तनालयात येऊन बऱ्याचदा दाढी आणि केस कापून गेले आहेत. आम्हाला या गोष्टीचा अभिमानही आहे की " त्या " सिरियलमध्ये काम करणारा कलाकार आमच्या दुकानात येऊन आमची सेवा घेत आहे. 

          एकदा तर मला त्यांना फोन करण्याचा मोह झाला. मी फोन केला तर माझ्या मुलींनाही त्यांच्यासोबत बोलायचे होते. त्यांच्या प्रत्यक्ष संवादाने माझ्या मुली आनंदल्या. छोटी उर्मी तर अजूनही त्यांच्याशी बोलायला आतुर आहे. त्यांच्याशी बोलताना मी त्यांना सहजच विचारले , " नेवगीसाहेब , तुम्ही उत्तम प्रकारे नाभिक दुकानदाराची भूमिका वटवली आहे. अभिनंदन आणि शुभेच्छा. पण तुम्ही ते ' वस्तरो मारीन ' हे वाक्य का म्हणता ? " त्यावर त्यांनी छान उत्तर दिले , " अहो , ते माझं सहजवाक्य आहे. ते माझ्या तोंडात पटकथाकाराने दिलं आहे. ह्या वाक्याने मी तुमचा ' वस्तरा ' साता समुद्रापार नेला आहे. मला तुमच्या या वस्तऱ्यामुळे अमाप प्रसिद्धी मिळते आहे. मी वस्तऱ्याला मोठे केले तर वस्तऱ्याने मला मोठे केले. " फोन ठेवल्यानंतर मी विचार करत बसलो. तर माझ्या लक्षात आले की या ' वस्तऱ्याने ' आमच्या सर्व नाभिक व्यावसायिकांना मोठे केले आहे.   

          आठवीत गेल्यापासून हा वस्तरा माझ्यासोबत आहे. त्यापूर्वीही होताच पण लक्षात येत नव्हता. कोणीही ' वस्तरा पाजळण्याचा ' अभिनय करून चिडवले तर वैतागथोर राग येई. त्यावेळी मनात येई , " वस्तरो मारीन " . पण मनात आलेले कधी बोललोही नाही. केलेही नाही. राग गिळून टाकीत सहन करीत राहिलो. आज काहीजण सहजच म्हणतात , " काय हजामती करायच्या आहेत काय ? " जे असे म्हणत असतील त्यांना हजामतीच्या कामाची माहिती नसावी . कारण त्यांनी ते काम करून बघितले असते तर तसे म्हटलेच नसते. कारण ' हजामती ' करणे तेवढी सोपी गोष्ट नाही. असे म्हणणाऱ्यांनी तसे करूनच पाहावे. त्यांनी आमच्यासारखी गुळगुळीत हजामत करून दाखवावी. आता कितीही सांगून जर म्हणणारे म्हणतच असतील तर आम्ही काय त्यांच्या तोंडाला धरू शकत नाही. पण दाढी आणि केस कापताना सर्व ग्राहक आपले पूर्ण डोके आमच्याच हातात देतात ना ? त्यावेळी तरी आम्हाला त्यांच्या तोंडाला धरावेच लागणार. 

          आमच्या दुकानाची जागा गेली होती. आम्ही नवीन जागेत एका घराच्या पडवीत तेली आळीत दुकान थाटले. सर्व ग्राहकांना समजेपर्यंत थोडे दिवस ग्राहकांची वाट पाहत बसावे लागले. मी , माझा भाऊ त्यावेळी मराठी शाळेत जात होतो. शाळेतून आलो की दुकानात यायचे आणि घरी जाताना बाबा देतील तो बाजार घेऊन जायचा असे आमचे नेहमी चाले. दुकानाची जागा बदलल्यामुळे गेले दोन तीन दिवस दुकानाकडे कधीतरी एखादा ग्राहक फिरकत असे. आम्ही वाट पाहून दमत असू. बाबांना तर आमची काळजी लागून राहिली होती. तेवढ्यात एक ग्राहक दुकानात शिरले. त्यांची दाढी आणि केस दोन्ही करायचे होते. बाबांनी लगेच उठून खुर्चीवर टॉवेल झटकून कामाला सुरुवात केली. माझा छोटा भाऊ दरपत्रक वाचत बसला होता. तो मला म्हणाला , " अरे , आता आम्हाला 5 रुपये मिळणार " खरंच केस आणि दाढी केल्यानंतर त्यावेळी पाच रुपयेच मिळणार होते. ते पाच रुपये मिळाल्यानंतर बाबा आम्हाला घरातील बाजार आणून देणार होते आणि आम्ही तो घरी नेऊन दिल्यानंतर आई जेवण बनवणार होती. 

          ते काही दिवस खूपच हलाखीचे गेले. पण या वस्तऱ्याने आम्हाला जगवले. 14 व्या वर्षी मी दुकानात कामाला सुरुवात केली. वस्तरा हातात घेऊन पैसे मिळवू लागलो. हा वस्तरा आम्हाला पैसे मिळवून देत होता. अजूनही आम्ही या वस्तऱ्याला मनोमन पूजतो आहोत आणि पूजत राहणार. कारण या वस्तऱ्यानेच आम्हाला मोठे केले. 




©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...