Monday, June 5, 2023

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

          शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केले कि अनेक पैलूंवर काम करावे लागते. कसलेला आणि दमदार शिक्षक तयार होण्यासाठी डी. एड , बी. एड. कॉलेजातील वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. नोकरीला लागल्यानंतर होणारी सेवांतर्गत प्रशिक्षणे  शिक्षकातील अंतरंग , बाह्यरंग दोन्ही बदलून टाकत असतात. 

          किशोर कदम हे माझे खूप जवळचे शिक्षक मित्र. त्यांची पत्नी शुभांगी. ती माझी क्लासमेट. तिचे पती किशोर कदम आहेत एवढाच सुरुवातीचा परिचय. त्यानंतर अक्षरसिंधु संस्थेत काम करताना कधीतरी किशोर कदमांची गाठ पडली. धावती भेट झाली. त्यांचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व त्यावेळी माझ्यावर प्रभाव टाकून गेलं होतं. 

          मग पुन्हा माझी आणि त्यांची भेट थेट पुण्यात झाली. बाहुली नाट्य प्रशिक्षणात. दहा दिवसीय प्रशिक्षणात आम्ही दोघे सिंधुदुर्गवासीय असल्याने एकत्र बसत होतो. मालवणीत बोलत होतो. तिथे मला त्यांच्या अभिनय प्रतिभेचा परिचय घडला. त्यांच्या आवाजाचे टोन , आरोह , अवरोह ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो. त्यांचं ऐतिहासिक नाट्यात्मक बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं. या कदमांमध्ये चांगलाच दम आहे. त्यांनी ऐतिहासिक वाक्यांची फेक करताना एकदा दम घेतला कि वाक्य संपेपर्यंत ते दम सोडत नाहीत हे विशेष. अशी वाक्ये बोलताना त्यांच्या अंगात जणू ती पात्रेच शिरलेली असतात असे वाटते. 

          त्या दहा दिवसात आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो होतो. आम्ही जेवायला , नाश्त्याला एकाच हॉटेलमध्ये जात असू. दोघांचा गट असल्याने सादरीकरण करताना मला त्यांची खूपच मदत झाली होती. ते खूप हुशार आहेत. 

          त्यानंतर पुन्हा एकदा ' अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयी ' हे तीन दिवसांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण नांदगांव शाळेत होतं. तिथे हे किशोर कदम मस्त सुट सफारी घालून आले होते. ते आमचे तज्ज्ञमार्गदर्शक होते. त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पुन्हा मला त्यांचा अधिक अभिमान वाटू लागला. त्यांचं बोलणं तुफान होतं. ते इतक्या जलद गतीने बोलत होते कि ते इतक्या जलद कसे बोलू शकतात हा मला त्यावेळी प्रश्न पडला होता. पुस्तकातील मुद्दे भरपूर होते. तीन दिवसांत ते सर्व समजून सांगायचे तर वेगवान वक्तृत्व गरजेचं होतं. आम्हाला एवढ्या वेगाने ऐकण्याची सवय नव्हती , त्यामुळे त्यातला काही भाग आमच्या डोक्यावरुन गेला ही गोष्ट वेगळी. पण त्यात त्यांचा अजिबात दोष नव्हता. आमची ग्रासपिंग पॉवर तेवढी काम करत नव्हती हेही त्याचे कारण असू शकते. 

          त्यांच्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत त्यांच्यासारख्याच. ' बाप तश्या बेट्या ' असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मुलींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्वाचा वसा पुढे चालवला आहे. विविध स्पर्धांमध्ये केवळ भागच घेत नाहीत , तर ठरवून प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवतात. तीन ते चार मिनिटांच्या भाषणात श्रोत्यांच्या मनाचा ताबाच घेतात म्हणा ना !! शब्द बाबांचे आणि आवाज मुलींचा. बाबांना अपेक्षित यश मिळवत पुढे जाताना त्यांनी कधीही मागे वळून बघितलेले नाही. कालपेक्षा आज जास्त जिद्दीने लढा देत ' वक्ता दशसहश्रेषु ' हे सिद्ध करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे असे वाटते. 

          भाषण करत असताना ज्यांच्यावर त्या बोलत असतात त्यांचा पोशाख परिधान करुन त्यांनी कित्येकदा ' भूमिकाभिनय देखील केला आहे. यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यांपासून प्रेक्षकांच्या टाळ्या सुरु होतात. भाषण संपताना मात्र लोक टाळ्या वाजवायचे विसरुन जातात एवढे ते त्यांच्या भाषणात एकरुप झालेले असतात. 

          किशोर कदम यांना या सर्व गोष्टींचे श्रेय जाते. दोन्ही मुलींना असे वक्तृत्व शिकवत असताना त्यांनाही अधिक उत्तम वाचावे लागते. त्यांनी एकदा लिहायला घेतले की विषयाची मांडणी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांचं व्यक्तिचित्र प्रत्यक्ष बोलण्यासाठी तयार झालेलं असतं. या शब्दांमध्ये आवाजाचे प्राण ओतले कि एक सुंदर प्रभावी वक्त्याचं दर्शन घडायला वेळ लागत नाही. 

          असे वक्तृत्व लेखन करता करता किशोर कदम यांच्या दिव्य लेखणीतून एक पुस्तकच जन्माला आले आहे. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि वाचक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शाळेतील जयंत्या , पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करत असताना मुलांनी या पुस्तकातील भाषणांचा वापर केला तर समोरचे श्रोते खुश होऊन टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. आवाजात ताकद असली तरी किशोर कदमांनी लिहिलेल्या शब्दांच्या ताकदीमुळे पुस्तक बेस्टसेलर ठरायला हवे यांत शंका असण्याचे कारण नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं.१ ( 9881471684 )



🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

Sunday, June 4, 2023

🌀 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

 🌀 कल्पनेपलिकडचो ' कारटो '

शिक्षक समितीच्या एका सत्कार समारंभात मला एक पुस्तक भेट म्हणून मिळाले होते. घरी आल्या आल्या ते पुस्तक बघितले. ते ' कारटो ' नावाचे पुस्तक होते. अशी अनेक पुस्तके आपल्या घरी येऊन पडतात. ती वाचायची राहूनच जातात. माझ्या लेखिका मैत्रिणीने हे पुस्तक लिहिले होते याचा मला अभिमान असला तरी पुस्तक वाचलेच नव्हते. तिने लिहिलेले पुस्तक म्हणून मी माझ्या वर्गातील सर्व मुलांसाठी पुस्तके घेऊन ती मुलांना मोफत दिली होती. पुस्तकाची किंमत फक्त पंधरा रुपये असल्याने मला ती परवडली असेल. त्यावेळी मी त्यातले पहिले दोन तीन लेख वाचून दाखवले होते. तेव्हा माझ्या शाळेतील मुले खळखळून हसलीही होती. पण त्यापुढे पुस्तक वाचायचे राहूनच गेले होते.
वर्तमानपत्रात , फेसबुकवर ' कारटो ' पुस्तकाची प्रसिद्धी वरचेवर येत होती. तरीही पुस्तक हातात घेतले जात नव्हते. मोठ्या मोठ्या लेखकांची पुस्तके वाचताना आपण आपल्या सोबतच्या लेखिकेला कमी लेखत होतो ही माझी चूकच होती हे माझ्या आज लक्षात आले. एकत्र दोन वर्षे शिकल्यामुळे ' ही ' काय लिहिणार असेही वाटून गेले असेल. आपण स्वतः लिहितोय तेच बरोबर आणि दुसऱ्यांचे ते चूकच असा दृष्टिकोन तर निर्माण होत नाही ना आपल्यात असे वाटून माझेच मला हसू आले. तेव्हा माझी मैत्रिण कल्पना मलये मला खूप मोठी लेखिका असल्याचे जाणवले. एक एक करत मी सगळं पुस्तकच बसल्या बैठकीत वाचून फडशाच पाडला.
' कारटो ' पुस्तक हाती घेतलं की त्याचं मुखपृष्ठ आकर्षित करणारं आहे हे ध्यानात येतं. झाडावर उलटा लटकलेला ' कॅश ' लहानांचे आणि मोठ्यांचेही लक्ष वेधून घेणारा आहे. मालवणी भाषेत कथा लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. मालवणीत सावंतवाडी , मालवण , कणकवली , वेंगुर्ले , कुडाळ अशा सर्व तालुक्यातील भाषेत थोडा थोडा फरक आहे. तो लक्षात घेऊन लिहायचे असते हे लेखिकेने अभ्यासलेले आहे. डॉ. विजया वाड यांनी केलेले प्रास्ताविक शॉर्ट बट स्वीट आहे. लेखिकेची मालवणीवर श्रद्धा आणि पकड आहे. त्या सर्रास मालवणीच बोलतात. भाषण देताना त्यांचा एकही शब्द मालवणी येत नाही हे विशेष.
ही एका खोडकर आणि समंजस मुलाची कहाणी आहे. त्यात तो खराखुरा दाखवला आहे. सभ्यपणाचे सर्व बुरखे त्याने फाडले आहेत. वाचणाऱ्या प्रत्येकाला आम्ही लहान असताना तसेच होतो इतके हुबेहूब पटावे असे लेखन करणाऱ्या कल्पना मलये यांना म्हणूनच नव्या पिढीतील जाणकार मालवणी लेखिकेचा सन्मान द्यायला हवा. लेखिका स्वतःच्या जीवनात परखड आहेत , तशीच स्पष्ट भाषा त्यांच्या कादंबरीत उतरली आहे. त्यांना खोटे अजिबात आवडत नाही.
मालवणी भाषेचे अलंकार म्हणजे मालवणी म्हणी. या शिवराळ वाटणाऱ्या म्हणींचा त्यांनी केलेला चपखल वापर त्यांच्या मालवणी भाषेचं प्रदर्शन घडवतात. त्यांनी दिलेली शीर्षके प्रत्येक कथेला अगदी बरोबर वाटतात.
एक कारटा तुम्हाला तुमच्यासमोर येऊन काहीतरी गमतीजमती सांगत असल्याचा भास वाचकाला शेवटपर्यंत होण्यासाठी लेखिकेने विशेष प्रयत्न केलेले दिसतात. ही कादंबरी कुठेही कंटाळवाणी , रटाळ वाटत नाही.
यातील सर्व पात्रे आपल्या सर्वांच्याच घरात वावरत असल्यासारखे वाटत राहते. मालवणी भाषेची हिच लज्जत वाढवत नेऊन कल्पना मलये यांनी मालवणी भाषेचा सन्मान अधिकाधिक वाढवला आहे.
आज जर मच्छिन्द्र कांबळी असते तर त्यांनी कल्पना मलयेंच्या या पुस्तकाचे कोडकौतुक केले असते. मालवणी शब्दकोश बनवायचा झाला तर त्यांनी या पुस्तकाचा संदर्भग्रंथ म्हणून उपयोग करायला काहीच हरकत नाही.
हे पुस्तक वाचताना ' बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत , कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात ' असे शीर्षकगीत असलेल्या ' गोट्या ' मालिकेची आठवण येत राहते. त्यातील गोट्या मराठी भाषा बोलणारा होता , हा कारटा मालवणी आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या ' बोक्या सातबंडे ' या बालचित्रपटाचीही प्रकर्षाने आठवण येत राहते.
ही कादंबरी म्हणजे फक्त गंमत गोष्ट नसून लहानांप्रमाणे मोठ्या माणसांच्या डोळ्यांत अंजन घालणारी ठरु शकते. विनोदाची झालर असली तरी प्रत्येक गोष्टीच्या शेवटी तुम्हाला धडा मिळतो ही जमेची बाब आहे.
श्रद्धा , अंधश्रध्दा , शिवाशिव पाळणे , किशोरवयीन मुलींचे शिक्षण , शैक्षणिक वातावरण , सहल अशा अनेक गोष्टींवर यांत हसत हसत प्रकाश पाडल्याचे दिसून येते. यातल्या बाई , गुरुजी आपलेच शिक्षक वाटतात.
ज्यांनी हे पुस्तक वाचले नसेल त्यांनी ते नक्कीच खरेदी करुन वाचावे , वाचले असेल त्यांनी पुन्हा एकदा जरुर वाचून बघा. शाळेत एकपात्री प्रयोग करण्यासाठी तर हे पुस्तक म्हणजे एक अतिशय उत्तम लेखसंग्रह आहे असे म्हटले तरी तुम्हीही त्याला दुजोरा द्याल. अशा या पुस्तकाच्या लेखिकेला लेखनाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )

🌏 शिक्षक झालो म्हणून

  🌏 शिक्षक झालो म्हणून

लहानपणापासून प्रत्येकाला कोणीतरी होण्यासाठी प्रयत्न केले जातात. प्रत्येकजण काहीतरी करणारच असतो. काय होणार ? कोण होणार ? हे कोणाला माहिती नसते. " तुझे बाबा डॉक्टर आहेत , म्हणून तुला डॉक्टर व्हायला लागेल. नाहीतर हा एवढा मोठा डोलारा कोण सांभाळणार ? " अशी वाक्यं ऐकायला मिळतात. मग त्या मुलाला डॉक्टर होण्याशिवाय पर्याय उरत नाही. शेवटी उपजीविकेचे साधन म्हणून डॉक्टरी पेशा त्याला स्विकारणे भाग पडते. असेच इतर सर्व बाबतीत घडत असावे.
शिक्षक शिक्षिका असलेल्या आईबाबांना आपली मुलं शिक्षण क्षेत्रात किंबहुना शिक्षकी पेशात पाठवायला कितपत आवडतील हा सुद्धा एक प्रश्नच आहे. त्यांचा पाल्य आपल्या आईबाबांची वाटचाल बघत असतो. त्यामुळे की काय त्याला तो व्यवसाय स्वतःहून स्वीकारावासा वाटत नाही. ते म्हणतात , " शिक्षकी व्यवसाय सोडून मी दुसरे काहीही करेन. " आईबाबा सुद्धा त्याला दुजोरा देत असतील. कारण त्यांनी भोगलेले त्यांच्या मुलांनीही भोगावे असे त्यांनाही वाटत नाही. त्यांचा हाच उद्देश असेल , इतर कोणता उद्देश असेल असे वाटत नाही.
शिक्षकी पेशा हा पेशा आहे. तो धंदा नाही. ते एक समाजव्रत आहे. ते स्वीकारणे सोपे असू शकते , पण जोपासणे कठीण असू शकते. आपण या शिक्षकी पेशाला योग्य न्याय देऊ शकलो नाही तर त्याचा आपल्यालाच त्रास होऊ शकतो.
' थ्री ईडीएट्स ' चित्रपटात एका मुलाला फोटोग्राफीची आवड असूनही वडिलोपार्जित व्यवसाय करण्यासाठी आग्रह धरला गेला. त्याला वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता. ज्यावेळी त्याचे वडीलच त्याला फोटोग्राफी करण्याची परवानगी देतात तेव्हा तो आपल्या करारी वडिलांना घट्ट मिठी मारुन आपला आनंद व्यक्त करतो.
मला लहानपणी जेव्हा प्रश्न विचारला जाई , " तू मोठेपणी कोण होणार ? " तेव्हा माझे उत्तर ठरलेले असे. " मी इंजिनिअर होणार ... " इंजिनिअर म्हणजे कोण ? हे मला त्यावेळी माहितीही नव्हते. कोणीतरी सांगितले होते म्हणून मला तसे बनायचे होते. माझे स्वतःचे त्यावेळी नक्की कोणते मत होते ते सांगणे कठीण आहे.
मी शिक्षक झालो आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न हवेत विरुन गेले. मी इंजिनिअर झालो नाही ते एका अर्थाने बरेच झाले. कारण शिक्षक झाल्यामुळे माझ्या हाताखालून अनेक इंजिनिअर बनू शकले आहेत.
मी शिक्षक झालो म्हणून मला आज आदर मिळतो आहे. शिक्षक नसतो तर हा आदर नक्कीच मिळाला नसता. हल्ली या आदराचे प्रमाण खूप कमी झाले आहे. शिक्षकाला अध्यापनाव्यतिरिक्त कामे करावी लागत असल्याने त्याचे हे असे झाले असावे. कोणीही शिक्षकांबद्दल काहीबाही बोलू लागले आहेत. त्यात चांगलं कमी आणि बोचेल असे जास्तीचे आहे. त्यामुळे आपली अशी समाजात होणारी अवहेलना पाहून तो ' दीन ' होत चालला आहे.
कितीही चांगले काम केले तरी शाबासकीची थाप मिळणे दुर्मिळ झाले आहे. अर्थात अपवादात्मक असू शकेल , पण हे प्रमाण कमी झाले आहे असे राहून राहून वाटते.
आजही शिक्षक दिनानिमित्त अनेकांचे शुभेच्छा संदेश येतात. फोन येतात. हे लिहीत असतानाच मला एक फोन आला. त्यांनी मला शिक्षक दिनाच्या मनस्वी शुभेच्छा दिल्या. मी भरुन पावलो. मी त्यांना शिकवलेच नव्हते , तरीही त्यांनी मला फोन केला होता. त्यांनी मला वैयक्तिक फोन केला असला तरी मी तो सर्व शिक्षकी पेशालाच फोन आला होता असे समजतो. अजूनही कुठेतरी शिक्षकांबद्दल आदर जिवंत असल्याचे ते एक उदाहरण आहे. प्रत्येकाने असाच शिक्षकांबद्दलचा आदर दाखवण्याची गरज आहे. शिक्षकांच्या पाठीशी राहण्याची गरज आहे.
आपल्या शिक्षकांनी जर आपल्या लेकरांना शिकवायचे असेल तर जनमानसातून शिक्षकांना पाठिंबा मिळायला हवा. शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या अशैक्षणिक कामांच्या विरोधात शिक्षकांनीच उभे राहण्यापेक्षा शिक्षकेतर सर्वांनीच ठाम उभे राहिल्यास शिक्षक पूर्णवेळ वर्गात शिकवू शकेल. पुन्हा एकदा अशी क्रांती घडेल याची वाट बघण्याशिवाय माझ्यासारख्या शिक्षकाला दुसरे काहीही करता येत नाही.
©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 )

Saturday, May 27, 2023

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण 

           " मुलाचे पाय पाळण्यात दिसतात " असे म्हटले जाते. अर्थात मुलाचे पाळण्यात हलणारे पाय बघूनच अशी कल्पना करण्यात येते. हळूहळू मोठा होताना त्याचे गुण अधिक लक्षात येत राहतात. मुलं नुसती वयाने आणि वजनाने मोठी झालेली कोणालाही आवडणार नाहीत. त्यांनी वर्तमान आणि भविष्य उजळून टाकावं असं भव्य दिव्य करावं अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे प्रेरणा देत देत मुलांचं भविष्य घडवणं हे मोठ्यांचं आद्यकर्तव्य ठरतं. 

          ग्रामीण भागातील मुले विशेषतः तावून सुलाखून निघालेली असतात. विविध संकटांचा सामना करुन वज्रासारखी बनून जातात. गरीबी असली तरी त्यात सुखासमाधानाची भाकरी खाण्यातला आनंद विरळाच. 

          सुर्यकांत चव्हाण हे माझे भावोजी. मोठ्या मामांच्या मोठ्या मुलीचे पती. त्यांचा जन्म हिवाळे गावात झाला. वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीत पाच मुलांना उच्च शिक्षण देत मोठं करणं सोपी गोष्ट नव्हतीच. पण शिक्षणच आपणांस चांगले दिवस दाखवू शकतं हा ठाम विश्वास वडिलांनी सदैव बाळगला होता. मुलं मोठी मोठी होत गेली आणि शिक्षण घेता घेता कधी समंजस झाली ते वडिलांनाही कळलं नाही. 

          वडिलांनी मग आपली आणि कुटुंबाची जबाबदारी मोठ्या सुर्यकांतवर सोपवली. सुसंस्काराने वाढलेले झाड वाढायचे थांबत नसते. सुर्यकांत आणि त्यांची भावंडे जिद्दी होती. त्यांनी आपल्यावर आलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

          वडील आजारी पडले आणि मोठ्या सुर्यकांतने कुटुंबाची स्विकारली. सर्वांची लग्न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा असल्यामुळे  स्वतः सुर्यकांत यांचा नंबर होता. माझी मोठी मामेबहिण सुर्यकांत यांच्याशी विवाहबद्ध झाली. 

          घर अगदी जुनेच होते. सुर्यकांत भावोजी कणकवलीत खाजगी नोकरी करत होते. मोठमोठ्या प्रोजेक्टची इंजिनिअरिंग डिझाईन करण्यात ते पटाईत होते. एकदा मला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला होता. तेव्हा मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. खाजगी नोकरी करत असताना एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढताना त्यांना त्यांच्या भाऊरायांची साथ लाभली. 

          बांदा हायस्कुलमध्ये  सुर्यकांत रुजू झाले. एक भाऊ , एक वहिनी शिक्षिका आहेत. एक भाऊ इलेक्ट्रॉनिक दुकान चालवता चालवता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. वित्त व बांधकाम सभापती झाले. एक बहिण आरोग्य विभागात नोकरीला लागली. एक बहीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चरर झाली. सुर्यकांत यांचा सूर्य उगवू लागला होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पत्नीची जबरदस्त साथ त्यांना वेळोवेळी मिळत होतीच. 

          जो प्रामाणिकपणे काम करतो , त्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होत असतो. सुर्यकांत चव्हाण  बांदा हायस्कुल मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून  या पदावर काम करत असताना त्यांनी स्वतः अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी जिल्हास्तरावर नंबर यावा लागतो. आपल्या ज्ञानाच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी सहा वेळा राज्यस्तरासाठी निवड झाली एक वेळा राज्यात उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक व यावर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला. ही यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. यश मिळवत राहणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. कितीही यश मिळवले तरीही त्यांना अहंकार नाही. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. 

          यावर्षी होणाऱ्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ते उमेदवार जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातून(OBC) उभे आहेत. त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहेच. त्यांच्या अभिनव ज्ञानाचा उपयोग बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पर्यायाने सभासदांच्या विकासासाठी नक्कीच होईल असा विश्वास वाटतो. हा विश्वास प्रत्येक मतदारालाही वाटेल यांत तिळमात्र शंका वाटत नाही. 

          शिक्षक बंधु आणि भगिनींनो , आपण आपल्या एका तळागाळातील कार्यकर्त्याला जिल्हा उमेदवार म्हणून निवडून द्याल आणि बँकेच्या तख्तावर बसवाल अशी कळकळीची विनंती करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ )





🛑 दारु आणि मी

🛑 दारु आणि मी

          दारुबद्दल लिहायचे असेल तर दारु पिणाऱ्याबद्दल लिहिले पाहिजे असे बिल्कुल नाही.  दारु बनवणाऱ्यांची घरे , दारु विकणाऱ्यांची दुकाने चालली पाहिजेत म्हणून की काय काही लोक त्यांची दया येऊन दारु पित असावेत. तंबाखूमुक्त चळवळ जशी सुरु असते , तशी दारु विरोधी चळवळी सुरु असतात. 

          क्वचित एखादा चित्रपट असेल की ज्यात दारु दाखवली नसेल. आजच्या काळातील प्रत्येक चित्रपटात तिचा बेसुमार वापर केलेला दिसून येतो. सकाळ ते रात्री कोणत्याही वेळीचा प्रसंग असो , त्यात तिला मोठं स्थान दिल्याचं जाणवतं. पुरुषच काय , पण काही चित्रपटात स्त्रिया सुद्धा पिताना दाखवल्या जातात. 

          Drinking of Alcohol is injurious to health असं वाक्य चित्राच्या खाली बारीक अक्षरात लिहायला अजिबात विसरले जात नाही. आता ती मदिरा पिणे ही फॅशन आणि पॅशन झाली आहे. उलट ही मदिरा न पिणाऱ्यांची हसून खिल्ली उडवली जाते. 

          " अहो , महाशय , तुम्ही किती मागे आहात ? जरा पुढे जा आता !!! " हे वाक्य ऐकून जर तुम्ही घ्यायला किंवा प्यायला गेलात तर तुम्ही नक्कीचे पुढे जाणार हे ठरलेले आहे.   हे पुढे जाणं विनाशाच्या दिशेने असणार आहे हेही लक्षात असू द्या. 

          एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला चाललो होतो. एसटीतून प्रवास सुरु होता. मला गाडीत दारुचा घाणेरडा वास आला. मी मागे वळून पाहिलं. कोणीतरी हळूच पित असल्याचे समजले. मला तो घाण वास सहन होईना. मी कासावीस झालो होतो. प्रवास कधी एकदा संपतो असे मला झाले होते. मी काहीही करु शकत नव्हतो. शेवटी प्रवास संपल्यावर एसटीतून उतरताच मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. 

          हल्ली पिणारी माणसे तिचा घाण वास येऊ नये म्हणून तीव्र वासाचे सेंट लावतात. त्यामुळे आणखी तयार झालेल्या मिश्रित वासाचा सामना करत राहावा लागतो. त्यांना बिचाऱ्यांना सवय झालेली असते , त्यामुळे त्यांना स्वतःला त्याचे काहीच वाटत नसावे. पण त्यांच्या सोबतीने जाण्याचे दुर्भाग्य लाभलं तर काही खरं नाही. 

          आपल्याला तशा अनेक सवयी असतात. त्यापैकी ही पिण्याची सवय असली तर ती घातक असू शकते हे लक्षात घ्यावे. कित्येकांचे संसार या अतिपिण्याने उध्वस्त झाल्याचे मी प्रत्यक्ष बघितले आहेत. दारु पिणाऱ्या माणसाला एकदा दारु पिऊ लागली कि तो माणूस संपलाच असे समजावे. 

          त्यादिवशी एके ठिकाणी एक चांगले इस्त्रीचे कपडे घातलेला चांगल्या घरातील माणूस दारु पिऊन रस्त्यात पडलेला मला दिसला. त्याचा हा अवतार बघून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे तुच्छतेने बघताना दिसत होते. अगदी मीही. या दारुमुळे माणसाचं एका झटक्यात काय घडते ते पहा. 

          कधीकधी माझी छोटी मुलगी मला म्हणते , "  पप्पा , तुम्ही जर कधी दारु पिऊन घरी आलात ना , तर तुम्हाला मी अजिबात घरात घेणार नाही." तिचंही बरोबर आहे. तिलाही आता अशी माणसं चित्रपटात , यु ट्युबवर दिसत असतात. अशा पिणाऱ्या माणसांचा लहान मूलसुद्धा तिटकारा , तिरस्कार करत असतं हेही लक्षात असू द्या. 

          काही लोक तर सकाळी उठले की त्यानेच तोंड धुतात. उठले की सुटले. जोपर्यंत पित नाहीत , तोपर्यंत त्यांना बरे वाटत नाही. प्यायलेले नसले की ते थरथरत उभे राहतात , पुरेशी प्यायले की नीट उभे राहतात एवढी त्यांना सवय झालेली असते तिची. या सवयीच्या अधीन झालेल्या लोकांचं काय करायचं ते समजण्याच्या पलीकडचे आहे. 

          एकदा एक पोट धरुन हसवणारा नट कणकवलीत येणार होता. आम्ही त्याचे फॅन होतो. अर्धा तास लवकरच आम्ही त्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. अजून तो नट आलाच नव्हता. नंतर कुणीतरी हळूच बोलताना ऐकू आले. तो पीत बसला होता. त्याचे पेग संपल्यावर तो आला. पण त्याचा कार्यक्रम बकवास झाला. पुन्हा तो पित असल्याचे समजल्याने त्याच्याबद्दलचा आमचा आदर कमी झाला तो कायमचाच. 

          काही माणसं पितात , पण अजिबात कळू देत नाहीत. या माणसांचा कोणालाही अजिबात त्रास नसतो. अशा माणसांना अति ताण आणि तणाव असतात , म्हणून ते पितात असे म्हटले जाते. पिल्यामुळे त्यांचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातो असे तेच सांगतात. 

          या जगात ताण तणाव सगळ्यांनाच असतात. म्हणून दारु पिण्याचा मार्ग अवलंबून स्वतः बरोबर कुटुंबाची वाताहात करणे अजिबात समर्थनीय नाही. 

          जगात अशी दुःखी माणसे असंख्य असू शकतात , म्हणून ती सगळी दारु पिणारी आहेत का ? नाही ना ? अशा दुःखाचा सकारात्मक सामना करणाऱ्या माणसांकडे बघून तरी या माणसांनी आपल्या दुष्ट मैत्रिणीची साथसंगत सोडली पाहिजे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 इस्त्री आणि मी

🛑 इस्त्री आणि मी

          लहानपणीपासून कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली आहे. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन घालायचे. त्यावेळी इस्त्री कुठे होती ? पितळेचा तांब्या होता. त्यात पेटते निखारे घालायचे. थोडी फुंकर मारुन निखारे फुलवायचे. तांब्याचा तळ चांगलाच तापतो. त्यासोबत धातूच्या उष्णता संक्रमणामुळे तांब्याच्या तोंडापर्यंत उष्णता जाणवे. हात चांगलेच भाजत. ते भाजू नयेत , म्हणून ' भानशिरे ' घेतले जाई. भानशिरे म्हणजे जुना कापडी सुती फडका असे. तो चुलीवरची भांडी उचलून उचलून काळाकुट्ट झालेला असे. 

          इस्त्री करुन सुरकुत्या घालवून शर्ट , पॅन्ट छान दिसत. शाळेचा गणवेश जुना असला तरी नवीन वाटे. शाळेत जाताना पॉश कपडे घातल्याचा अनुभव येई. इतर मुलांचे नवनवे युनिफॉर्म बघून माझे इस्त्री केलेले कपडेही फिके पडत. 

          इस्त्री करुन करुन कपडे कोरम होत. शर्टाची कॉलर विरघळे. पँटीचा रंग बदलून जाई. पण पँट , शर्ट दोन्ही पूर्ण फाटेपर्यंत वापरावे लागत. उसवले तर बाबा शिवून देत. फाटले तर रिपू करावा लागे. हा रिपू कसातरीच दिसे. तरीही फाटक्या कपड्यांपेक्षा रिपू केलेले कपडे वापरणे केव्हाही चांगले. आता हे फाटलेले कपडे किंवा नको तिथे ठिगळ , रिपू ही फॅशन झाली आहे. 

          तांब्यानंतर बाबांनी हप्त्यावर एक साधी इस्त्री घेतली. तिला विजेची आवश्यकता असे. भाड्याने राहत असल्याने मालकांच्या परवानगीने लाईट वापरावी लागे. या नवीन इस्त्रीने इस्त्री करताना मजा येई. पटापट इस्त्री करता येई. कपडे आणखी चांगले दिसत. मामांकडे आजोळी माझे मामेभाऊ कसे इस्त्री करतात ते मी नीट बघून ठेवले होते. त्या निरीक्षणाचा उपयोग झाला. 

          आम्ही सर्व भावंडे इस्त्री करुनच कपडे वापरत असू. आता ऑटोमॅटिक इस्त्री आहे. ती कमी जास्त करता येऊ शकते. ती हलकी व सहज करता येण्यासारखी सुलभ आहे. 

          इस्त्री करताना आपण इतर काहीही करत नसतो. म्हणून मी नेहमी गाणी ऐकत इस्त्री करत असतो. आता मला ती सवयच जडली आहे. इस्त्री , गाणी आणि मी असे समीकरण झाले आहे. एखाद्या वेळी मी इस्त्री करताना गाणी लावली नाही तर माझ्या मुली मला विचारतात , " पप्पा , आज गाण्याशिवाय इस्त्री करताय , कमाल आहे ? " एवढी मला सवय झाली आहे म्हणजे बघा. 

          इस्त्री करताना मी अनेकदा भूतकाळात जात असतो. जुनी आणि मला नेहमी आवडणारी गाणीच मी ऐकत असतो. त्या गाण्यांचीही सवय झाली आहे म्हणा ना !! ही गाणी ऐकता ऐकता मी भराभर इस्त्री करत जातो. माझ्या आठवड्याच्या कपड्यांचा ढिग पडलेला असतो. 

          सलग दोन तासांचा हा इस्त्रीचा कार्यक्रम गाण्यांसह सुरुच असतो. इस्त्री कपड्यांच्या सुरकुत्या घालवत असते आणि गाणी माझ्या मनावरच्या. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर





आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...