Friday, April 7, 2023

ओढ गावाची

         प्रत्येकाला आपला गाव आवडत असतो. ज्या गावात आपला जन्म झाला , तोही आपलाच गाव असं आपल्याला वाटत असतं. अर्थात जन्मस्थळ आणि गाव यांत साम्य असलं तर त्या गावाविषयी आपल्याला कमालीची ओढ असते. नव्हे ती असायलाच हवी. आपल्या गावाशी आपली नाळ जोडलेली असते. त्या गावातील आठवणी आपल्याला सतत गावाची ओढ तीव्र करत राहतात. 

        ' गड्या आपला गावच बरा ' असं म्हणणारी अनेक माणसं मी बघितली आहेत. त्यांना हे सतत कळत असतं . गावात आले कि त्यांना शहराचा विसर पडतो. रजा संपत आली कि पोटात भला मोठा गोळा येतो. शहराकडे जाताना पावले जड होत जातात. शेवटी आपल्या मातृभूमीला सोडताना जणू आईलाच पारखे होत असल्याचा अनुभव येत असतो. गावातील ते अविस्मरणीय क्षण आठवले कि पाय पुढे पडणारच कसे ? 

        माझा जन्म कणकवलीत झाला. त्यावेळी वाहतुकीची आतासारखी साधनं नव्हती. संपर्क साधनं तर नव्हतीच म्हणाना. गोरगरिबांसाठी कुठला आलाय फोन ?  तो फक्त बघण्यापुरता मर्यादित होता. कणकवलीपासून दहा मैलावर असणारं माझं किर्लोस गाव. आता त्याचं नाव आंबवणेवाडी असं झालं आहे. पण आम्ही किर्लोस या नावाचाच उच्चार करतो. किर्लोस हेच नाव आमच्या तनामनात कोरले गेले आहे. सर्व धार्मिक कार्यक्रम आमच्या गावीच केले जातात. मराठी दिनदर्शिकेप्रमाणे येणाऱ्या अधिकाधिक सणांना बालपणी आम्ही किर्लोस गावी जात असू. बालपणीचा तो काळ खूप सुखाचा म्हणायला हवा. त्याचं वर्णन करताना प्रत्येकवेळी वेगवेगळ्या उपमा सुचू शकतात. बालपणी गावात घालवलेले क्षण आनंदाचे परमोच्च बिंदूच म्हणायला हवेत. 

        शेतावर गुरे घेऊन जाणे , गुरे पाण्यावर घेऊन जाणे , गुरे पाण्यावर नेत असताना वाटेत सापडणारी सगळी झाडे आपल्याला फळे द्यायला आधीच उत्सुक असत. झाडाखाली पडलेली जांभळे , चिंचा , बोरे खाताना येणारी मजा काही औरच. करवंदे खाऊन ओठ चिकटत. करवंदांचा लालभडक कोंबडा खातानाचे दिवस पार काळवंडून गेले आहेत. नदीवर नेलेल्या गुरांना पाण्यात डुंबताना पाहून आपणांस डुंबता येत नाही ही खंत अजूनही सलते आहे.  काकांनी पोटाखाली हात धरून पोहायला शिकवतानाचे धडे लक्षात आहेत. पण आता मात्र त्याच पाण्याची ज्याम भीती वाटते. आमच्या नदीने त्यावेळी मुंबईकरांचे घेतलेले जलबळी आमच्या मनात थरकाप आणत. त्यामुळे पाण्याची भीती वाटत गेली. पोहोणे राहूनच गेले. कपडे धुणाऱ्या फडतरीच्या पुढे पोहत जाण्याचे आमचे धाडस काहीकेल्या झालेच नाही. 

        पावसाळ्यात शेतावरील गुट्यावर बसून चिखलात पडताना झालेला आनंद अजूनही अंगावर रोमांच आणतो आहे. रात्रीच्या वेळी काकांनी पकडून आणलेले ' न्हयचे  माश्ये ' मनःचक्षूंसमोर फडफडताना दिसत आहेत. त्याचं तिखट सार आणि हाताचा दोन दिवस न जाणारा वास गायबच झाला आहे. हे सगळे क्षण अविस्मरणीय आहेत म्हणूनच मला माझ्या गावाची ओढ वाटत राहते. सुट्टी कधी एकदा पडते आणि गावाला जायला मिळते असे आम्हाला होऊन जाई. शनिवारी आणि रविवारी मिळालेली संधीही आम्ही सोडत नसू. आंबे , काजू तर होतेच. फणसाचे गरे खाताना स्पर्धा लागे. माझे बाबा एकावेळी पन्नास साठ पेक्षा जास्त बरके गरे खात. त्यांचा कायम पहिला नंबर ठरलेला असे. आम्ही वीस पंचवीसच्या पुढे कधी गेलोच नाही. खाऊन पचवणे त्यावेळी चांगले जमे. आता जास्त खाल्ले तर त्रास होईल म्हणून स्पर्धाच लावली जात नाही. 

        मी रत्नागिरी जिल्ह्यात नोकरीला लागलो. आता जन्मभूमी आणि कर्मभूमी बदलली होती. नोकरीत खुश होतो. पण गावाकडे जाण्याची ओढ काही कमी होत नव्हती. एक नोकरी सोडून दुसरी नोकरी पकडली. तीही रत्नागिरीतच. माध्यमिक शाळेतील नोकरी सोडून मराठी जिल्हा परिषदेची नोकरी स्विकारताना मनस्वी त्रास होत होताच. सरांचा गुरुजी झालो. तिथेही अठरा ते एकोणीस महिने छान नोकरी केली. गावाकडून येणारी पत्रे डोळ्यात पाणी आणत होती. मीही पाणी भरल्या डोळ्यांनी उत्तरे देत राहिलो. 

        शेवटी माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओढ तीव्र झाली. नवीन भरतीच्या वेळी माझी सिंधुदुर्गात निवड झाली. एका दिवसांत निर्णय घेतला. रत्नागिरीतील नोकरी सोडून सिंधुदुर्गात आलो. देवगडात नऊ वर्षे नोकरी केली. पुन्हा कणकवलीत पाच वर्षे , वैभववाडीत सात वर्षे आणि आता पुन्हा कणकवलीत म्हणजे माझ्या जन्मभूमीत आलो आहे. माझी माणसे माझ्यासोबत आहेत. ती मला रोज भेटत आहेत. त्यांच्यासोबत आयुष्य जगताना आयुष्याचं सोनं होत आहे. 

© प्रवीण अशितोष कुबल ( पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं. १ ) 





        

Sunday, March 19, 2023

संप आणि कंप

        १४ मार्चपासून सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झालाय. आज सहावा दिवस संपत आलाय. तरीही संप मिटण्याचं चिन्ह दिसत नाहीय. मीही या संपात सहभागी आहे. वाटलं होतं , संप सुरु केला कि एक दोन दिवसांत तो मिटेल. आज आणि पुढेही सगळेच सरकारी कर्मचारी आपल्या ' एकच मिशन , जुनी पेन्शन ' या मागणीवर ठाम आहेत. 
        सरकारने २००५ नंतर नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ' कुटुंब निवृत्ती योजना ' पुनरुज्जीवित केली आहे. तशीच ' जुनी पेन्शन ' सुरु करावी ही सर्व कर्मचाऱ्यांसाठी असलेली हक्काची मागणी अजून प्रलंबित ठेवली जात आहे. 
        मी एक पदवीधर शिक्षक आहे. कोरोना काळात शाळा बंद असतानाही मी चेकपोस्टवर जास्तीत जास्त वेळा ड्युटी केलेली होती. शिकवणेही सुरु होतेच. कामाचे सहा तास असताना चोवीस तास काम करावे लागत होते. मुलं अंतर ठेवून शिकत होती , तरीही शिक्षण सुरु होते. आज मात्र मी शाळेत नाही. संपात सहभागी आहे. त्यामुळे मुलांच्या पासून दूर झालो आहे. मुलांवर त्याचा कितपत परिणाम झाला आहे हे सांगू शकत नाही. पालकांवर किती परिणाम झाला आहे हेही मला सांगता येणे कठीण आहे. घरात बसून संपाच्या संदर्भातील बातम्या बघण्याचे काम नित्याचे झाले आहे. त्याचाही कंटाळा आलाय. काय करावे ते समजत नाहीय. अजून किती दिवस संप सुरु राहील याचाही अंदाज बांधता येत नाहीय. 
        मी २००५ पूर्वी नोकरीला लागलेला शिक्षक आहे. मला पेन्शन मिळणार याबद्दल खात्री आहे. पण २००५ नंतर आणि पुढेही नोकरीला लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरी संपल्यानंतर न मिळणाऱ्या आर्थिक सुरक्षिततेविषयीबद्दल असलेला हा लढा आहे. कधीकधी लढा दिल्याशिवाय मागण्या मान्य होत नाहीत. म्हणून नाईलाजास्तव संपाचे हत्यार उपसावे लागते. लोकांचे , मुलांचे , रुग्णांचे होणारे हाल बघून व्यथित व्हायला होत आहे. बातम्या बघता बघता डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. संपकऱ्यांच्या अंगात कंप येऊ लागलाय. 
        घरात कधीही निवांतपणे न बसणारे माझ्यासारखे अनेक सरकारी कर्मचारी हवालदिल झाले असतील अशी मी कल्पना करतो आहे. पेपर वाचूनही संपला आहे. पुस्तके वाचायलाही मन लागत नाहीय. शाळेतील मुले बंड करुन डोळ्यासमोर उभी राहिली की काय करावे तेच समजत नाही. बायको , मुले आणि कुटुंबातील सर्वांनाच आपण पूर्वीसारखेच हसतखेळत आहोत असा खोटा अभिनय करावा लागतोय. सामाजिक उपक्रमात भाग घेतानाही कधीतरी एका क्षणी मन सुन्न एकाकी बनू पाहत आहे. घरातले काय बोलत आहेत , त्याकडे नीटसा लक्षही नाही. त्यांचं बोलणं कानावर आदळलं की तो डीजेचा आवाज वाटत आहे. शिक्षक म्हणून नेहमी आपल्याला बोलण्याची सवय. आताशा मला सर्वांचं ऐकावं लागत राहण्याची जणू शिक्षाच मिळाली आहे असंही वाटतंय. संप संपेपर्यंत माझ्यासारखा विचार करणाऱ्या शिक्षकांचे काय होईल माहिती नाही. संयम सुटत चाललेला नसला तरीही सहनशक्ती कमी होत चालली आहे. त्याचं रुपांतर गप्प गप्प राहण्याकडे जाईल अशीही भीती वाटतेय. 
        कोणीही सोबत नसलं तर आपला मोबाईल आपली साथ करतो. सध्या तोही गपगार झालाय. त्याला स्वीच ऑफ ठेवून ' डिजिटल उपास ' करावा असाही एक विचार येऊन जातोय. मुख्यमंत्र्यांच्या खचाखच भरलेल्या सभा टीव्हीवर पाहताना ते आमच्या संपाचा विचार करत असावेत का ? असाही प्रश्न पडलाय. संपाबद्दलची अनेकांची नकारात्मक विचारसरणी ऐकून ऐकून कान बहिरे होऊ पाहत आहेत. काय ऐकावं तेच कळेनासे झालेय. रडू येतंय , पण डोळ्यांतून एक टिपूस पाणी येईल तर शपथ !! झोपही धड लागत नाहीय. झोप लागलीच तर स्वप्नातही संपाची धडधड सुरु आहे. अचानक जाग आलीच तर पुन्हा संप सर्व शरीर कंपित करत आहे. 
        ५४ दिवसांचा संप करणाऱ्या आमच्या पहिल्या पिढीतील कर्मचाऱ्यांचा इतिहास पाहिला तर तो आम्हांला थक्क करुन सॊडणारा आहे. त्यांच्यात एवढा संयम कोठून आला असावा ? हा संयम आमच्यात का नाही ? आम्ही आजची पिढी का इतक्या लवकर ढेपाळतोय ? त्या शिक्षकांनी आमच्यात स्वाभिमान पेरला होता. त्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. तरीही त्यांच्याइतके आम्हांला संयमाने नक्कीच जगता येणं कठीण आहे. सगळे लोक पगाराच्या नावाने बोलत सुटले आहेत. किती दिवस , किती सुट्ट्या यांचा हिशेब घालून दाखवू लागले आहेत. सरकारी नोकरी करणं ही अवघड गोष्ट नसली तरी सोपी नाही हे यांना कोण सांगणार ? आलेल्या आदेशांचे पालन करत राहणं हेच आयुष्यभर करत राहणारे आम्ही , स्वतःचं घर , कुटुंबही विसरत चालतो आहोत. सरकारसाठी प्रामाणिकपणाने नोकरी करायची आणि सर्वांचं बोलूनही घ्यायचं असं सध्या सुरु आहे. हे कधीही न संपणारं आहे. नकारात्मक आणि आम्हाला लागेल असे बोलणाऱ्यांना बोलताना काहीच वाटत नाही. कदाचित त्यांच्या घरी एकही शासकीय कर्मचारी नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना असं बोलणं सुचू शकतं. 
        काहीही झाले तरी आमच्या अठरा लाखांची संख्या असणाऱ्या सर्व संपकरी शासकीय कर्मचाऱ्यांना धन्यवाद देण्यापेक्षा त्यांच्या कायम ऋणात राहायला हवे. ' काम नाही तर दाम नाही ' असे शासनाच्या म्हणण्यानुसार दररोजच्या आर्थिक उत्पन्नावर पाणी सोडणाऱ्या सर्वांना माझा मानाचा मुजरा. 
© प्रवीण अशितोष कुबल ( कणकवली ) 



        

Saturday, February 4, 2023

🛑 खेळ नियतीचा

🛑 खेळ नियतीचा

          आपल्या जीवनात आलेली प्रिय व्यक्ती अकस्मात कायमची निघून जाण्यासारखी वाईट गोष्ट या जगात दुसरी कुठलीही नसेल. कल्पना नसताना एखादी घटना घडते आणि संपूर्ण संसाराची राखरांगोळी झाल्याचा अनुभव येतो. 

          प्रिय व्यक्तीचे अकाली निधन झाले असेल तर काय होत असेल याची मला स्वतःला अनुभूती आलेली आहे. त्यामुळे माझ्यासारखंच संकट एखाद्यावर आलं तर मी पुन्हा माझ्या त्या काळात जातो. 

          हल्ली सर्रास प्रेमविवाह होत असतात. प्रेम करुन मग लग्न केले जाते. पूर्वी तसे नव्हते. आधी लग्न केले जायचे , मग प्रेम करावे लागायचे किंवा प्रेम निर्माण व्हायचे. त्यावेळी जुळणाऱ्या रेशीमगाठी मजबूत होत्या हे तितकंच खरं आहे. आताही प्रेम करुन लग्न केलेली जोडपी सुखात नांदताना आपण पाहतो. अपवादात्मक घटस्फोट होतानाही पाहतो. एक कवी आपल्या कवितेत म्हणतो ते अगदी खरं आहे , " प्रेम म्हणजे , प्रेम म्हणजे , प्रेम असतं , तुमचं आमचं सेम असतं. " 

          तीन वर्षांपूर्वी आमच्या नातेवाईकांच्या जवळच्या नातेवाईकांकडे असाच विवाह झाला. नवरा नवरी आनंदात संसार करु लागली होती. लग्न झाल्यानंतर दोनच वर्षात त्यांच्या घरी नवीन बाळ येणार अशी चाहुल लागली होती. दांपत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. 

          आनंदाला उधाण आलेले असताना अचानक आयुष्यात वाईट घटनाही घडू शकते याची आपल्याला जाणीवही नसते. नियतीने आपला क्रूर खेळ खेळायला सुरुवात केली होती. एवढा क्रूर खेळ की तिने एका बरोबर दुसऱ्याचं आणि अनेकांचं आयुष्यच उध्वस्त करुन टाकलं होतं. या उद्ध्वस्त आयुष्याचे काय करायचे हा प्रश्न पडला की आपलं जीवनच संपवून टाकावं असे वाईट विचार आले तर त्यात नवल ते काय ?

          ' छान चाललंय आमचं ' असं म्हणत असतानाच सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली होती. नवऱ्याचा अपघाती मृत्यू झाला होता. पत्नी गरोदर असल्यामुळे तिला ही गोष्ट सांगायची कशी ? सांगितली तर तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचे काय होईल ही भीती होतीच.  शेवटी सांगावेच लागले होते. आपला प्रिय नवरा आता या जगात जिवंत नाही ही गोष्ट ऐकताच कोणतीही प्रेम करणारी बायको मूर्च्छित झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी तसेच झाले होते. पोटातल्या बाळासह मलाही हे जग सोडून माझ्या प्रिय नवऱ्याकडेच जायचे आहे असे त्यावेळी तिला वाटायला लागले होते.

          ती स्वतःला दोष देत राहिली होती. तिने एका सुंदर गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळाकडे बघूनही ती आपले दुःख विसरु शकली नव्हती. तिला तिचा नवराच हवा होता. तिच्या नवऱ्याने त्या बाळाच्या रुपाने एक आपली आठवण भेट तिला कायमची प्रदान केली होती. नियतीने नवरा हिरावून घेऊन गोरागोमटा मुलगा दिला होता. इथे नियती चांगली वागली असली तरी त्या आईला हे अजिबात मान्य नव्हतं. 

          मांडीवर आपल्या रक्ताचं तान्हं बाळ असतानाही तिच्या मनात अनेक वाईट विचार येतच राहिले होते. स्वतःला त्रास करुन घेण्याचं प्रमाण नवऱ्याच्या तीव्र आठवणीगणिक वाढतच चाललं होतं. 

          पतीच्या आयुष्यातून पत्नी कायमची निघून गेल्यानंतर काय अवस्था होते ही माझी गोष्ट मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण ती आपल्या दुःखाला कवटाळूनच बसलेली दिसत होती. तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्यात आले होते. तिने डॉक्टरांना सर्व हकीकत सांगितली होती. सांगताना तिचे रडणे सुरुच होते. डॉक्टरांनी तिच्याशी छान सुसंवाद साधला होता. तिने स्वतःला संपवण्याचे केलेले प्रयत्न असफल ठरत होते ही मात्र चांगली गोष्ट घडत होती. तिच्या तान्ह्या मुलासाठी जगणं हेच तिचं आता जीवनाचं ध्येय बनायला हवं असं आम्हा सर्वांना वाटतं आहे. 

          तिचा नवरा आठवणींच्या रुपात तिच्यासोबत आहे अशा भावना सदैव मनात ठेवून आपल्या बाळासाठी ती नक्कीच जगेल अशी आशा करण्यापलीकडे आम्ही काहीही करु शकत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल 

पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१



Sunday, December 25, 2022

🛑 रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है

🛑 रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है

          काल एक नवीन चित्रपट बघायला गेलो होतो. चित्रपट कॉमेडी होता. त्यात संस्कारांबद्दल सांगण्यात आलेले आहे. 

          खरंच संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. मूल जन्माला आल्यापासून त्याच्यावर विविध गोष्टींचे संस्कार सुरु होतात. त्याच्यावर चांगल्या गोष्टींचे संस्कार करताना वाईट गोष्टींचेही संस्कार घडत असतात. हे वाईट आहे , असं करु नये अशा बाबी त्याला पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात. 

          अर्थात हे सांगणारे आपण स्वतः पालक , आई , वडील , घरातील मंडळी आणि त्याचे शिक्षक असतात. या सर्वांच्या सानिध्यात राहूनच मुलांवर चांगल्या गोष्टींची सवय होत राहते. या चांगल्या सवयीचं रुपांतर सुसंस्कारात होतं. 

          संस्कार देणारे पालक संस्कारांची शाळाच असतात. सगळे संस्कार शाळेत शिकवले जात असतील , पण शाळेतील वेळेपेक्षा मूल घरात जास्त वेळ असतं. त्यामुळे शाळेतील संस्कार वृद्धिंगत करणं हे सर्वस्वी पालकांचं काम असतं. फक्त शाळेत घातलं की आपलं काम झालं असं कधीच होता कामा नये. चांगल्या आणि सगळ्या सुविधा असलेल्या शाळेत घालून पालक मोकळे होतात. शाळेची भरमसाठ फी भरली की त्यात सगळे संस्कार मिळतील अशी त्यांची सहज भावना असते. संस्कार असे विकत घेण्याची गोष्ट नसते. ते जाणीवपूर्वक करण्याची प्रक्रिया आहे. 

          निर्जीव दगडाची गोष्ट आहे. एका दगडाचे दोन भाग केले गेले. त्याचा एक भाग देवीची पाषाणमूर्ती बनवण्यासाठी वापरला गेला. सुबक मूर्ती तयार झाली. देवालयात त्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. भक्तगण त्या देवीच्या पाषाणमूर्तीवर मनोभावे फुले , पुष्पहार अर्पण करु लागले. निर्जीव दगडाचा उद्धार झाला. दररोज त्या दगडाची पूजा अर्चा होऊ लागली. दगडाच्या जीवनाचे सार्थक झाले. सर्व भक्त आपल्याला नमस्कार करण्यासाठी येत आहेत हे दगडाच्या लक्षात आले. दगड मनोमन आपल्या असण्यावर खुश होत राहिला. त्याचं देवी असणं त्याला निरंतर समाधान देत होतं. 

          इकडे त्या दगडाचा दुसरा भाग बाजूला करण्यात आला होता. दगड अगदी दिसायला तसाच होता. पण त्याची मूर्ती बनवली गेली नव्हती. बरेच दिवस तो दगड तसाच पडून होता. तेवढ्या मूर्तीची ऑर्डर मिळाली नव्हती. एक धनाढ्य व्यापारी आला. त्याने तो दगड पाहिला. त्याला तो आवडला. त्याने तो विकत घेतला. त्याच्या नवीन बंगल्याचे काम सुरु होते. या दगडाचा वापर आपल्या बंगल्यासाठी होईल म्हणून त्याने तो मुद्दाम आणला होता. बंगल्याच्या स्वच्छतागृहाचे काम सुरु होते. त्याला एक दगड कमी पडत होता. हा नवीन आणलेला दगड स्वच्छतागृहामध्ये बसवण्यात आला. या दगडाचा उपयोग असा वेगळ्या प्रकारे होणार होता. दगडाचा दर्जा चांगला होता , तरीही त्याचा हा असा होणारा वापर पाहून स्वतः दगड नाराज झाला होता. स्वच्छतागृहात जाणारे लोक त्याच्यावर पाय ठेवून पुढे जात होते. दगड त्या घाणेरड्या , अस्वच्छ पायांच्या वासाने गुदमरुन गेला होता. यापुढे त्याचे जगणे असेच असणार होते.  दुसऱ्या दगडाचा वापर स्वच्छतागृहासाठी झाल्याने दगड मनोमन खट्टू होऊन बसला होता. 

          या गोष्टीतील एका दगडाच्या दोन तुकड्यांचे जीवन वेगवेगळे झालेले दिसते आहे. एकाच दर्जाचे असलेले हे दगड ज्या संस्कारात गेले , अगदी त्या संस्काराचे घडून गेले आहेत. त्या संस्कारातून आता त्यांची सुटका होणे कठीण आहे. पहिला दगड मजेत नमस्कार स्वीकारतोय , तर दुसरा दगड लाथा....... 

          याचा अर्थ असा की आपली सजीव असणारी मुले ज्या संस्कारात वाढतील , तशी ती घडत जातील. म्हणून तशा म्हणी निर्माण झाल्या आहेत , " खाण तशी माती , बाप तसा बेटा , कुंभार तसा लोटा ". यांत सुसंस्कार आणि कुसंस्कार दोन्ही दाखवले आहेत. म्हणूनच त्या चित्रपटातील ते हिंदी भाषेतील वाक्य मला अधिक संयुक्तिक वाटतं , " रिश्ता खून से नही , परवरिश से बनता है !!! " 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Saturday, December 24, 2022

🛑 मयुरेश जन्माला आला

🛑 मयुरेश जन्माला आला

          नऊ महिने पोटात होणाऱ्या हालचाली वाढत चालल्या की आईला बाळाच्या येण्याची आतुरता वाढीस लागलेली असते. माझा बाळ कधी एकदा बघते असे तिला झालेले असते. तिची ही आतुरता साहजिकच असते. ती त्या बाळाची आईच असते. त्या बाळाची वाट बघणारे त्याचे वडील , बहिणी आणि घरातील सर्व आमच्यासारखी मंडळी त्याच्या प्रतिक्षेत असतात. ' तो कधी येतोय ' ची आतुरता कमालीची उत्कंठेला जाऊन पोहोचते. गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट भक्त पाहत असतात , तशी या छोट्या बाप्पाच्या आगमनाची वाट घरातील सर्वच सदस्य पाहात असतात. 

          मी स्वतः माझ्या होणाऱ्या बाळांची अतिशय आतुरतेने वाट बघितलेली आहे. जणू स्वतःच्या पोटात बाळ असल्यासारखे नऊच्या नऊ महिने मी अक्षरशः मोजत राहिलो होतो. स्वतःचं बाळ जन्माला आल्यानंतर होणारा आनंद शब्दांत व्यक्त होणारा नसतो. तो शब्दातीत असतो. ते माझं बाळ आहे , त्याच्यावर माझा हक्क आहे ही ती निर्मळ प्रेमळ भावना असते. ते बाळ तो किंवा ती आहे याच्याशी मतलब नसतो. त्या बाळाचं हसणं आणि रडणं दोन्ही आपल्याला आसू आणि हसु देणारं असतं. 

          आमच्या घरात आम्ही दोघे भाऊ जन्माला आलो. बाबांना आम्ही दोन मुलगे. इतर चारही काकांना सर्व मुलीच. त्यामुळे माझ्या भावाच्या जन्मानंतर घरात मुलगा जन्माला येण्याचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हतं. रोज स्वप्नं पडत होती , पण ती सत्यात उतरताना दिसत नव्हती. 

          माझं लग्न झाल्यानंतर माझ्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढत होत्या. अर्थात माझ्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होणं हे सर्वस्वी नशिबावर अवलंबून होतं. पहिल्या वेळी मुलगी झाली , तेव्हा ' पहिली बेटी धनाची पेटी ' असे म्हणून सर्वांनी माझ्यासाठी जल्लोष केला होता. दुसऱ्या वेळी मला असे काहीच नको होते. पत्नीला नऊ महिने होणारा त्रास मला सहन होत नव्हता. माझ्यापेक्षा माझी पत्नीच दुसऱ्या बाळंतपणासाठी आतुर झालेली. मुलगा हवा हा तिचा हव्यास तिला आणि पोटात वाढणाऱ्या तिच्या बाळाला दोघांनाही देवाघरी घेऊन गेला. ' तो बाळ ' हे जग बघू शकला नाही. त्यानंतर एका वर्षभरात माझे दुसरे लग्न लावण्यात आले. आता मला पुन्हा दोन मुलीच आहेत. एकूण तीन मुलींचा बाप असलो तरी मला मुलगा नसल्याचे अजिबात दुःख नाही. 

          गावी गेलो की गावातील ज्येष्ठ मंडळी अजूनही मला सांगत असतात , " तुका झिल होतलो " मी त्यांचं हे बोलणं कायमच हसण्यावारी नेत असतो. एका व्यक्तीने तर मला खूपच आपुलकीने म्हटलं , " तू इतका चांगला आहेस , सगळ्यांशी प्रेमाने वागतोस , तुझ्याच आयुष्यात असे का घडावे , तुला मुलगा नाही ही तुझी एकच बाजू लंगडी आहे. आम्हाला तुझी दया येते. " त्यांचं हे बोलणं ऐकलं आणि मला माझ्या अनेक नातेवाईकांच्या मनातही हेच चालले असेल असे वाटून मला हसू आले. लोकं किती अपेक्षा ठेवून असतात , नाही का ? मी अशी कधीच अपेक्षा ठेवली नाही , म्हणून मला त्याचे काहीच वाटत नाही. 

          मी माझ्या कुटुंबाला मुलगा देऊ शकलो नाही. भावाचे लग्न झाले. आता त्याच्याकडून अपेक्षा होत होत्या. त्यालाही पहिली मुलगीच झाली. पुन्हा अपेक्षाभंग..... 

          भाऊ यशस्वी होण्यासाठी घरातल्या सर्वांनी मनोमन गाऱ्हाणी सुरु केली होती. लवकरच गोड बातमी आहे असं समजलं. सर्वांना खूप आनंद झाला होता. आता नऊ महिने , नऊ दिवस वाट पाहणे कठीण जात होते. हे नऊ महिने लवकर संपावेत याचीही प्रतिक्षा सुरु झाली होती. आणि सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सिझेरियन विभागात दाखल करुन घेतले. डॉक्टरांनी आपले काम सुरु केले होते. आम्ही सगळे दवाखान्यात ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तहानभूक विसरुन जन्माला येणाऱ्या बाळाची वाट बघत बसलो होतो. नर्स बाहेर येत होत्या , आत जात होत्या. त्यांची होणारी तारांबळ किंवा धावपळ आमच्या मनात अधिकची भिती निर्माण करत होती. आम्ही सर्वजण देवाची आळवणी करत होतो. अखेर देव जागा झाला होता. देवाने आमचे ऐकले असावे. थोड्याच वेळात एक नर्स आमच्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली , " मुलगा झाला हो " आम्ही सगळेच एवढे आनंदलो की आमच्या तोंडातून एकही शब्द फुटेना. डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आमचा मयुरेश जन्माला आला होता. आमचं घरातल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं होतं.  बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली होती. आमचा बाप्पा म्हणजेच मयुरेश रडत होता आणि आम्ही सगळे त्याच्याकडे बघून हसत होतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )




Monday, December 19, 2022

🛑 लक्ष्मीने प्राण वाचवले

🛑 लक्ष्मीने प्राण वाचवले

          संकट काही सांगून येत नसतं , तुम्ही गाफिल राहिलात तर ते हमखास येऊ शकतं. संकट येताना काळ आणि वेळ दोन्ही सोबतीने येत असतात. त्या संकटाचा सामना करताना आपण वाचलो , तर म्हणतो ..... काळ आला होता पण वेळ आली नव्हती. काळ आपले प्राण घेऊन जायला येतो , तेव्हा तो त्या व्यक्तीला नक्कीच दिसतो. त्यातून वाचता आले तर त्या काळाचा अदृश्य चेहरा सतत डोळ्यासमोर येत राहतो त्या भयंकर आठवणींच्या रुपाने. 

          तो लक्ष्मीपूजनाचा दिवस होता. दिवाळीत लक्ष्मीपूजन आमच्यासाठी कायमच उत्साहाचे राहिले आहे. दरवर्षी आमच्या दुकानात लक्ष्मीपूजन साजरे केले जाते. जुन्या दुकानातील गरीबी लक्ष्मीने दुर केली. नवीन दुकानात पुन्हा लक्ष्मीचा वास सुरु झाला. लक्ष्मी येत राहिली , कधी जात राहिली , कधी स्थिर राहिली. हे असे प्रत्येकाच्या बाबतीत घडत असते. आता आम्ही आमच्या राहत्या घरी सुद्धा लक्ष्मीपूजन थाटात साजरे करु लागलो आहोत. त्या दिवशी आम्ही आमच्या घरातील लक्ष्मीचे पूजन करुन दुकानातील लक्ष्मीचे पूजन करण्यास गेलो होतो. घरातील सर्व सदस्य दुकानात लक्ष्मीपूजन साजरं करताना आनंदून गेलो होतो. दुकानाच्या बाहेर सुंदर रांगोळी काढण्यात आली. लक्ष्मीची पावले आपल्या दुकानात सदैव यावीत यासाठी मनोभावे प्रार्थना केली. 

          भुईनळे , फटाके , आपटबार , पावसाचे फटाके अशी आतिषबाजी सुरुच होती. शेजारी पाजारी , गिऱ्हाईके , मित्र , ज्ञातीबांधव लक्ष्मीला नमस्कार करुन प्रसाद घेऊन जात होते. आमच्या दुकानाच्या बिल्डिंगप्रमाणेच सर्व शहरातील दुकाने प्रकाशमय झालेली पाहून उत्साह द्विगुणित होत होता. आपल्या लक्ष्मीला नमस्कार करत असताना आपल्याला दुसऱ्यांच्या लक्ष्मीपूजनाची आमंत्रणे येत असतात. त्यांच्याकडे जाणे हेही आपले कर्तव्य असते. हे कर्तव्य मी दरवर्षी पार पाडत असतो. याहीवर्षी मी माझ्या स्नेह्यांच्या दुकानातील लक्ष्मीदेवींना वंदन करण्यासाठी निघालो. 

          वेळ संध्याकाळी 8 नंतरची असेल. रस्त्यावर प्रकाशाची लक्ष्मी जागोजागी दिसत होती. रात्रीच्या काळोखात लक्ष्मी हसतमुखाने सर्वांना दर्शन देत असावी. ती साक्षात दिसत नसली तरी जाणवत होती. तिचे असणे लक्षात येत होते. 

          मी माझ्या स्कुटरने निघालो. पुढे माझी छोटी मुलगी उर्मी बसली होती. ती बसली नव्हती , तर स्कुटरच्या पुढच्या छोट्या जागेत उभी राहिली होती. पत्नी मागे बसली होती. जाता जाता ओळखीच्या दुकानात जाऊन नमस्कार करत पुढे पुढे जाणे सुरुच होते. 

          एका दुकानात जाण्यासाठी मी गाडी स्टँडवर लावली. गाडी सुरुच होती. गाडीची चावी मी फिरवली नव्हती. गाडी थांबवल्याबरोबर छोटी उर्मी गाडीवरून उतरली. पण गाडीजवळच थांबून दुकानांची रोषणाई पाहात उभी राहिली होती. पत्नीही गाडीवरून उतरुन दुकानाच्या दिशेने निघाली. मुलीला गाडीवरून खाली उतरण्यासाठी मीही माझे दोन्ही हात कधीच हँडलवरुन सोडले होते. मी फक्त गाडीवर बसलो होतो. गाडी सुरुच होती. मीही दुकानाकडे पाहत दंग झालो होतो. सभोवताली दिसणारी अदृश्य लक्ष्मी मला आकर्षित करीत होती. मी काही काळ भान विसरुन गेलो होतो. माझे माझ्याकडे आणि गाडीकडे काही क्षणांसाठी दुर्लक्ष झाले असेल बहुदा. अचानक गाडीने वेग घेतला. मला काहीच समजायला मार्ग नव्हता. मी आपोआप गाडीबरोबर पुढे जाऊ लागलो आहे हे माझ्या लक्षात आले. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करु लागलो. मोठ्याने ओरडत गाडीचे हँडल पकडण्याचा प्रयत्न केला. गाडीच्या एक्सीलेटरवर माझा हात पडला. माझ्या हाताने एक्सीलेटर आणखी पिळला गेला. गाडी अजून पुढे पुढे गेली. पुढून एक नवी कोरी करकरीत पांढरीशुभ्र कार येत होती. त्यांची कार नवीनच होती. ती यायला आणि माझी गाडी पुढे जायला काही सेकंदांचा कालावधी पुरेसा होता. मी माझ्या गाडीसह धाडकन त्या नव्या कोऱ्या गाडीवर जाऊन आदळलो. माझ्या गाडीचे बरेच नुकसान झाले. त्यांच्या गाडीला थोडेसे खरचटले. त्यांनाही खुप वाईट वाटले , कारण त्यांची नवी कोरी कार होती. मी गाडी बरोबर रस्त्यावर वायूवेगाने चित्रपटात घडावे तसा जाऊन आदळलो. माझे कपडे पूर्ण फाटून गेले. माझी मुलगी माझ्याबरोबर उडाली की काय असे मला काही क्षणांसाठी वाटले. मी भेदरुन गेलो. पण मी उठलो तेव्हा माझी छोटी मुलगी उर्मी रस्त्याच्या कडेला अधिक घाबरलेल्या अवस्थेत बघायला मिळाली. मी तिला जवळ घेतले. तिने मला घट्ट मिठी मारली. तिला काही झाले नाही हे पाहून माझा जीव भांड्यात पडला. संपूर्ण मोडून उध्वस्त झालेल्या गाडीकडे माझे मुळीच लक्ष नव्हते. मला लागलेला मुका मार अजिबात जाणवत नव्हता. मला फक्त माझी मुलगी वाचली याचा आनंद वाटत होता. मी स्वतः गाडीखाली जाणार होतो. सेकंदांच्या काही भागांचे अंतर असेल , काळ माझ्याकडे येत असताना मी साक्षात पाहत होतो. पण माझी वेळ आलेली नव्हती. मला माझ्या लक्ष्मीने थोडे मागे ओढून घेतले असावे. मी आणि माझी मुलगी दोघेही सुखरुप आहोत हे पाहून सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. 

          हा अपघात कशामुळे घडला हे सांगावंच लागेल. माझ्या मुलीने गाडीवरून उतरल्यानंतर सहज एक्सीलेटर दाबला होता , तिच्याकडून ते सहज घडून गेले होते. तिच्यामुळे हा अपघात घडला असे म्हणणेही चुकीचेच. कारण मीही गाडी बंद करायला विसरलो होतो. घरी आल्यानंतर माझ्या मुलीने स्वतःचे दोन्ही कान पकडले होते आणि म्हणत होती , " पप्पा , मी असं पुन्हा कधीच करणार नाही. " तिच्या त्या निष्पाप वागण्याने माझ्या डोळ्यात आलेले पाणी मी कधीही विसरु शकत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल  ( 9881471684 )



Thursday, December 8, 2022

🔴 कुप्पम ज्ञानम खुप्पम : भाग १

🔴 कुप्पम ज्ञानम खुप्पम : भाग १

          कुप्पम येथील अगस्त्या इंटरनॅशनल फाऊंडेशन अंतर्गत प्रशिक्षणाचा पहिला दिवस अतिशय प्रेरणादायी ठरला. हे बघू की ते बघू असे प्रत्येकाला झाले होते. आदल्या दिवशीचा प्रवासाचा शीण कधीच निघून गेला होता. सगळीकडे वैज्ञानिक रचना दिसू लागल्या होत्या. 

          172 एकर जमिनीच्या मोठया प्रदेशात आमचं प्रशिक्षण सुरु झालं होतं. अगस्त्या फाऊंडेशनच्या रेखाचित्राने आकर्षित व्हायला झाले. त्यात मोबाईल लॅब , सायन्स सेंटर , सायन्स फेअर , लर्निंग मेथड्स , टिचर ट्रेनिंग , कॅम्पस इत्यादींचा उल्लेख करण्यात आला होता. म्हणजे हे सर्व आम्हाला चार दिवसांत बघायला मिळणार होते. 

          मानवता , आत्मविश्वास , कुतूहल या तीन गोष्टी नजरेसमोर ठेवून शिक्षण , संस्कार आणि संसार निर्माण करणं अगस्त्याला अतिशय गरजेचं वाटलं. 

          " आ , आहा आणि हाहा " या तीन शब्दांनी आश्चर्य , मनोरंजन आणि आता मला खरे काय ते समजल्याची भावना प्रगट होते. 

          ज्ञानरचना संकल्पना सांगणारा ज्ञानरचनावाद सगळीकडे ओसंडून वाहताना दिसत होता. " जाऊ तिथे शैक्षणिक वैज्ञानिक पाहू" असंच काही तिथलं शैक्षणिक वातावरण दिसत होतं. फुलपाखरांनी बागेत उडावं आणि पकडणाऱ्यांना हे पकडू की ते पकडू असं वाटावं असा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा ' आहा आणि हाहा ' खूप काही सांगून जात होता. प्रत्येक गोष्टीत ज्ञानाची रचना कशी करावी याचे धडे प्रत्येकाच्या डोक्यात धडाधड आपटत होते. 

          दररोज सकाळी 7 वाजता राहत्या खोलीच्या तळमजल्यावर गरमागरम ग्रीन टी येत होता. चालत्या जमिनीवर पानांचे ठसे कोरलेले दिसत होते. प्रत्येक इमारतींची नियोजनपूर्वक बांधणी केलेली दिसून येत होती. या इमारतींना दिलेली नावेही आमचं लक्ष वेधून घेत होती. मल्लिका , नथीनी , रजनीगंधा अशी ती नावे होती. आम्ही नथीनीमध्ये राहत होतो. मल्लिकामध्ये जेवत होतो. प्रत्येक ठिकाणी दगडांचे आकार बनवून त्यातून वैशिष्टयपूर्ण आकार बनवलेले होते. फुलझाडे , शोभेची झाडे , औषधी झाडे सगळीकडे विखुरलेली होती. आम्हांला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी विशेष वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. 

          ट्रेनिंग सेंटरवर प्रवेशद्वारापाशी सुंदर दगडी  पार्श्वभूमी असलेला सेल्फी पॉईंट कमालीचा लक्षवेधी होता. तिथेच एक निरुपयोगी रबरी टायरपासून बनवलेला हत्ती शांतपणे आम्हांला पाहात आहे असे वाटत होते. गुरु शिष्य परंपरा सांगणारी उठावाची भित्तिचित्रे सेल्फी घेण्यास आकर्षित करणारी होती. ' जाऊ तिथे एक सेल्फी घेऊ ' असं प्रत्येकाला वाटत असतानाच त्यांच्याकडून सेल्फी घेण्याचा मोह आवरता येत नव्हता. पिण्यासाठी गरमागरम पाण्याचीही सोय अगस्त्याने केली होती. कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये याची त्यांनी घेतलेली काळजी उल्लेखनीय अशीच होती. दररोज दिले जाणारे बदलते जेवणाचे , नाश्त्याचे मेनू चविष्ट असेच. वर्गात कंटाळा न येणारी मार्गदर्शने म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच. 

          प्रशिक्षण कक्षात पहिले पाऊल टाकताच एका मॉडेलवर प्रत्येकाची नजर फुलपाखरांसारखी भिरभिरली. त्यावर लिहिलं होतं , " Butterfly makes the world beautiful , Acharya Initiative makes Teaching beautiful. " याचा अर्थ असा आहे , " फुलपाखरं जसं आपलं जग सुंदर बनवतात , तसंच हे प्रशिक्षण शिक्षकांचं शिकवणं सुंदर बनवते. "

          सर्व शिक्षक प्रशिक्षण घेण्यासाठी आतुर झाले होते. स्वागत समारंभ संपन्न झाला. अगस्त्या टीमने फाऊंडेशनची संक्षिप्त ओळख करुन दिली. व्हिडीओ क्लीपचे सादरीकरण करण्यात आले. तज्ज्ञांनी आपली ओळख करुन दिली. त्यानंतर चार दिवसांत करावयाचे " डूज अँड डोंट्स " समजावून सांगण्यात आले. एका वर्गाचे तीन वर्गात विभाजन करण्यात आले. प्रत्येक वर्गाला वेगळी खोली देण्यात आली. आईस ब्रेकिंग उपक्रम घेऊन यलो , ग्रीन , रेड , ब्लू , व्हायलेट असे पाच ग्रुप बनवण्यात आले. प्रत्येक सदस्याने आपल्याला मिळालेल्या फुग्याला फुगवून त्या रंगाची वैशिष्ट्ये सांगितली. त्यासोबत आपला परिचय दिला. इथूनच ज्ञान रचनावाद सुरु झाला. 

          सुधाकर सर आणि विजयाशांतीमॅडम यांनी आमच्या वर्गाचा ताबा घेतला. इंग्रजीचा जास्तीत जास्त वापर आणि हिंदीचा आवश्यक वापर करत मार्गदर्शन सुरु झाले. पूर्वचाचणी घेण्यात आली. वर्ग कशाप्रकारे घेण्यात येणार ते स्पष्ट करण्यात आले. उद्दिष्टे सांगण्यात आली. त्यानंतर चहासाठी विश्रांती घेण्यात आली. 

          कागदी कपात ओतप्रोत पाणी भरुन त्यांवर येणाऱ्या ताणाचे निरीक्षण करण्यात आले. ड्रॉपरने हळूहळू पाण्याचे थेंब अलगद टाकताना पाण्याचा दंडगोलाकार पृष्ठभाग पाहता आला. त्यानंतर त्यात बॉल बेरिंग टाकण्यात आले. नव्यान्नव बॉल टाकेपर्यंत पाणी सांडले नाही हे विशेष होते. त्यामुळे दिसणे आणि प्रत्यक्ष असणे यांत फरक असतोच याची जाणीव झाली. शाळेतील मुलांकडून असे छोटे छोटे प्रयोग करुन घेतल्यास त्यांच्या मेंदूतील ज्ञानाची रचना अधिक दृढ होण्यास नक्कीच मदत होऊ शकते हे विश्वासही या प्रयोगाने सर्वांना दिला. 

          त्यानंतर भोजनासाठी ' मल्लिका ' येथे नेण्यात आले. सर्वांनी चवदार व गरमागरम भोजनाचा यथेच्छ आस्वाद घेतला. अगस्त्याने प्रत्येक शिक्षकाला एक पर्यावरणप्रेमी हँडबॅग भेट दिली. ती घेऊन फिरताना आपण विज्ञान गणित शिक्षक असल्याची अधिक जाणीव झाली. सात भौमितिक आकारांपासून एक एक वेगळी भौमितिक आकृती बनवण्यास शिकलो. आपणही विद्यार्थी बनलो आहोत आणि विद्यार्थी राहूनच आपल्याला आजन्म अध्ययन , अध्यापन करत राहायला हवे हा दृष्टीकोन निर्माण झाला. 

          सायंकाळी कला दालनात नेण्यात आले. मुलांनी बनवलेली अनेक हस्त कला प्रदर्शन रुपात मांडण्यात आल्या होत्या. त्या सर्वांना नीट बघण्यास वेळ पुरत नव्हता. हे सर्व कला कौशल्य डोळ्यात आणि मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्याचे कार्य सातत्याने सुरुच होते. सुरु झालेला दिवस संपूच नये असे प्रत्येकालाच वाटत होते. 

          रात्रीच्या भोजनानंतर खोलीत गेल्यावर अंथरुणावर पडल्या पडल्या कधी झोप आली ते समजलेही नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )





🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...