Saturday, December 24, 2022

🛑 मयुरेश जन्माला आला

🛑 मयुरेश जन्माला आला

          नऊ महिने पोटात होणाऱ्या हालचाली वाढत चालल्या की आईला बाळाच्या येण्याची आतुरता वाढीस लागलेली असते. माझा बाळ कधी एकदा बघते असे तिला झालेले असते. तिची ही आतुरता साहजिकच असते. ती त्या बाळाची आईच असते. त्या बाळाची वाट बघणारे त्याचे वडील , बहिणी आणि घरातील सर्व आमच्यासारखी मंडळी त्याच्या प्रतिक्षेत असतात. ' तो कधी येतोय ' ची आतुरता कमालीची उत्कंठेला जाऊन पोहोचते. गणपती बाप्पाच्या आगमनाची वाट भक्त पाहत असतात , तशी या छोट्या बाप्पाच्या आगमनाची वाट घरातील सर्वच सदस्य पाहात असतात. 

          मी स्वतः माझ्या होणाऱ्या बाळांची अतिशय आतुरतेने वाट बघितलेली आहे. जणू स्वतःच्या पोटात बाळ असल्यासारखे नऊच्या नऊ महिने मी अक्षरशः मोजत राहिलो होतो. स्वतःचं बाळ जन्माला आल्यानंतर होणारा आनंद शब्दांत व्यक्त होणारा नसतो. तो शब्दातीत असतो. ते माझं बाळ आहे , त्याच्यावर माझा हक्क आहे ही ती निर्मळ प्रेमळ भावना असते. ते बाळ तो किंवा ती आहे याच्याशी मतलब नसतो. त्या बाळाचं हसणं आणि रडणं दोन्ही आपल्याला आसू आणि हसु देणारं असतं. 

          आमच्या घरात आम्ही दोघे भाऊ जन्माला आलो. बाबांना आम्ही दोन मुलगे. इतर चारही काकांना सर्व मुलीच. त्यामुळे माझ्या भावाच्या जन्मानंतर घरात मुलगा जन्माला येण्याचं सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होताना दिसत नव्हतं. रोज स्वप्नं पडत होती , पण ती सत्यात उतरताना दिसत नव्हती. 

          माझं लग्न झाल्यानंतर माझ्याकडून सर्वांच्या अपेक्षा वाढत होत्या. अर्थात माझ्याकडून त्या अपेक्षा पूर्ण होणं हे सर्वस्वी नशिबावर अवलंबून होतं. पहिल्या वेळी मुलगी झाली , तेव्हा ' पहिली बेटी धनाची पेटी ' असे म्हणून सर्वांनी माझ्यासाठी जल्लोष केला होता. दुसऱ्या वेळी मला असे काहीच नको होते. पत्नीला नऊ महिने होणारा त्रास मला सहन होत नव्हता. माझ्यापेक्षा माझी पत्नीच दुसऱ्या बाळंतपणासाठी आतुर झालेली. मुलगा हवा हा तिचा हव्यास तिला आणि पोटात वाढणाऱ्या तिच्या बाळाला दोघांनाही देवाघरी घेऊन गेला. ' तो बाळ ' हे जग बघू शकला नाही. त्यानंतर एका वर्षभरात माझे दुसरे लग्न लावण्यात आले. आता मला पुन्हा दोन मुलीच आहेत. एकूण तीन मुलींचा बाप असलो तरी मला मुलगा नसल्याचे अजिबात दुःख नाही. 

          गावी गेलो की गावातील ज्येष्ठ मंडळी अजूनही मला सांगत असतात , " तुका झिल होतलो " मी त्यांचं हे बोलणं कायमच हसण्यावारी नेत असतो. एका व्यक्तीने तर मला खूपच आपुलकीने म्हटलं , " तू इतका चांगला आहेस , सगळ्यांशी प्रेमाने वागतोस , तुझ्याच आयुष्यात असे का घडावे , तुला मुलगा नाही ही तुझी एकच बाजू लंगडी आहे. आम्हाला तुझी दया येते. " त्यांचं हे बोलणं ऐकलं आणि मला माझ्या अनेक नातेवाईकांच्या मनातही हेच चालले असेल असे वाटून मला हसू आले. लोकं किती अपेक्षा ठेवून असतात , नाही का ? मी अशी कधीच अपेक्षा ठेवली नाही , म्हणून मला त्याचे काहीच वाटत नाही. 

          मी माझ्या कुटुंबाला मुलगा देऊ शकलो नाही. भावाचे लग्न झाले. आता त्याच्याकडून अपेक्षा होत होत्या. त्यालाही पहिली मुलगीच झाली. पुन्हा अपेक्षाभंग..... 

          भाऊ यशस्वी होण्यासाठी घरातल्या सर्वांनी मनोमन गाऱ्हाणी सुरु केली होती. लवकरच गोड बातमी आहे असं समजलं. सर्वांना खूप आनंद झाला होता. आता नऊ महिने , नऊ दिवस वाट पाहणे कठीण जात होते. हे नऊ महिने लवकर संपावेत याचीही प्रतिक्षा सुरु झाली होती. आणि सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी सिझेरियन विभागात दाखल करुन घेतले. डॉक्टरांनी आपले काम सुरु केले होते. आम्ही सगळे दवाखान्यात ऑपरेशन थिएटरच्या बाहेर तहानभूक विसरुन जन्माला येणाऱ्या बाळाची वाट बघत बसलो होतो. नर्स बाहेर येत होत्या , आत जात होत्या. त्यांची होणारी तारांबळ किंवा धावपळ आमच्या मनात अधिकची भिती निर्माण करत होती. आम्ही सर्वजण देवाची आळवणी करत होतो. अखेर देव जागा झाला होता. देवाने आमचे ऐकले असावे. थोड्याच वेळात एक नर्स आमच्या बाळाला घेऊन बाहेर आली आणि म्हणाली , " मुलगा झाला हो " आम्ही सगळेच एवढे आनंदलो की आमच्या तोंडातून एकही शब्द फुटेना. डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या होत्या. आमचा मयुरेश जन्माला आला होता. आमचं घरातल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण झालं होतं.  बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली होती. आमचा बाप्पा म्हणजेच मयुरेश रडत होता आणि आम्ही सगळे त्याच्याकडे बघून हसत होतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )




No comments:

Post a Comment

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...