Sunday, July 30, 2023

🛑 असा रंगारी श्रावण

🛑 असा रंगारी श्रावण

          आषाढ महिना संपला कि श्रावण महिन्याची चाहुल लागते. तो येतो आणि जो आनंद होतो , तो शब्दबद्ध करणं खूपच कठीण असतं. हा स्वानंद अनुभवावा लागतो. तो अनुभवल्याशिवाय कळणार नाही. 

          बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाही श्रावण महिन्याने भुरळ घातली. त्यांनी लिहिलेली कविता सर्वश्रुत आहे. ' श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ' ही कविता म्हणताना साक्षात श्रावण समोर उभा राहतो. इतकी त्यांच्या काव्यात ताकद आहे. 

          श्रावणात सर्व निसर्ग बहरुन जातो. पावसाला उधाण आलेलं असतं. हिरव्यागार झाडावेलींना पाहताना डोळे निवून जातात. आकाशात विविध रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य त्यात भर घालत असतं. पशुपक्षी आनंदात नाचू लागतात. शेतकरी सुखावतात. त्यांची शेती करतानाची कार्ये उत्स्फूर्तपणे सुरु असतात. 

          या महात हिंदू धर्मातील विविध सण येतात. पावसाच्या रिमझिम रेशीमधारा बघतच रहाव्याशा वाटतात. फुलांची बाग अधिक आनंदाने हसताना दिसते. विविध रानभाज्या खुलून दिसतात. 

          गावाकडे घराघरात श्रावण सोमवारी शंकर महादेवाची व्रतवैकल्ये केली जातात. उपवास केले जातात. लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही झोपाळ्यावर झोके घेण्याचा आनंद घेता येत असतो. मंगळागौर , नागपंचमी , रक्षाबंधन , नारळीपौर्णिमा , गोकुळाष्टमी , गोपाळकाला असे सण श्रावण महिन्याचे मुकुटच असतात. मांसाहार न करता पूर्ण शाकाहारी राहण्यासाठी निसर्गदेवता श्रावण महिन्याच्या रुपाने माणसाला साद घालत असते. 

          भक्तीभावाने भारावून गेलेली माणसे श्रावणाची वाट पाहत असतात. एखाद्या ग्रंथाचे वाचन सुरु करण्यासाठी श्रावण महाचे औचित्य लागत असते. 

          असा हा श्रावण सर्वांचाच लाडका ऋतू असतो. 

©️ प्रवीण कुबलसर



🛑 एक घास पप्पांचा

🛑 एक घास पप्पांचा

          बालपणी बालभारतीच्या पुस्तकात ' पेरुची फोड ' असा एक धडा होता. त्यात " पेरुची फोड , लागते गोड "  असे म्हटले होते. त्यापुढे असेही म्हटले होते , " आईची फोड , फारच गोड ". खरंच या दोन्हींमधील पुढची ओळ जास्त लक्षात राहते. कारण ती आईने दिलेली फोड आहे. 

          प्रत्येक मुलांचे आपल्या आई बाबांवर निरतिशय प्रेम असते. आईला भेटण्यासाठी मुले आतुर झालेली असतात. शाळेतून घरी येताच आम्ही पहिल्यांदा आईला कडकडून मिठी मारत असू.  ही मिठी आता मिळत नाही , कारण आईच नाही. 

          आई जशी महत्त्वाची असते , तसे बाबाही महत्त्वाचे असतात. आई प्रेमळ असते. बाबा शिस्तीचे असतात. कधीकधी याउलट असू शकते. काहीवेळा दोन्ही पालक प्रेमळ आणि शिस्तप्रिय असू शकतात. त्यांनी तसेच असायला हवे असते. मुलांसाठी आणि मुलांच्या संगोपनासाठी हे सर्वच आवश्यक असते. 

          आई मुलांना भरवते. मुले कितीही मोठी झाली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. बाबा मुलांना मारतात , तेव्हा आई रडणाऱ्या मुलांना जवळ घेते. हे जवळ घेणे त्यावेळी दिलासा देणारे असते. मला आईने क्वचितच मारले असेल. बाबांचा मार अनेकदा खाल्ला आहे. अजूनही त्यांच्या शब्दांचा मार मिळत असतो. बाबांनी मारल्यानंतर आम्हाला आईचा आधार असे. तिच्या पदरात लपताना जी प्रेमाची ऊब मिळे ती कुठेच मिळणार नाही. 

          माझे आजोबा भरपूर जेवत असत. त्यांच्या जेवणातील एखादा घास मिळण्यासाठी माझे बाबा आसुसलेले असत असं ते सांगतात. माझी आजी तर खूपच प्रेमळ आणि धार्मिक होती. तिने कुठूनही आणलेला खाऊ सर्वांना समान मिळण्यासाठी तिची धडपड असे. लग्न होऊन मुले बाळे झालेल्या मुलांनाही ती लक्षात ठेवून खाऊचा वाटा देत असे. तिच्या निस्सीम मायेची तुलना करणे चुकीचे ठरेल. तिने आम्हाला घास भरवले आहेत. कालवलेला घास तिच्या हाताने खात असताना ती स्वतः सुद्धा आपल्या तोंडाचा ओ करत असे. त्यावेळी तिच्या सुरकुत्या आलेल्या हातांची सैल झालेली कातडी एकत्र करुन तिच्याशी मी खेळत बसलो तरी ती काहीही म्हणत नसे.

          आईने आणि बाबांनीही मला भरवले आहे. मी रात्री , मध्यरात्री अचानक घायाळ पडत असे. मी घामाघूम होई. तेव्हा आईबाबा दोघेही माझ्या जवळ बसून भरवू लागत. त्यावेळी मिळत असलेल्या प्रेमाने मी आणखीच घायाळ होऊन जाई. 

          आता मीही तीन मुलींचा बाबा झालो आहे. मला त्या पप्पा म्हणतात. तिन्ही मुली पप्पांच्या एखाद्या घासासाठी टपलेल्या असतात. मुले कितीही मोठी होत असली तरी आईबाबांसाठी लहानच असतात. त्यादिवशी माझी दोन नंबर मुलगी हट्टच धरुन बसली. मी जेवत होतो. तिला माझ्या जेवणातला एक घास हवा होता. माझे बाबा जवळच होते. मी जेवत असताना त्यांचे माझ्या जेवण्याकडे लक्ष असते. ताटातील भाजी , भाकरी संपत असली तर ते आपल्या सुनेला सांगत असतात. मी मागण्यापूर्वी माझ्या ताटात संपलेला पदार्थ यायला हवा यासाठी त्यांचा हा अट्टाहास असतो. त्यांना मी कितीही सांगितले तरी त्यांनी त्यांची ही सवय अजिबात सोडलेली नाही. 

          मी माझ्या तिन्ही मुलींना एक एक घास भरवू लागलो. मी भुकेलेला असलो तरी त्यांच्या मुखात जसा घास जाई , तशी माझे पोट भरत असल्याचा अनुभव येत जाई. पप्पांनी भरवलेला घास छोटा असला तरी तो त्यांच्यासाठी नेहमीच भारावलेला असतो अगदी आमच्या आईबाबांसारखा. 

©️ प्रवीण कुबलसर



Wednesday, July 12, 2023

🛑 रमला वाचनमेळा

🛑 रमला वाचनमेळा

          वाचन करणे ही आपली संस्कृती बनली पाहिजे. वाचनाची चळवळ जोपासणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. मुले आणि काही मोठी माणसेही मोबाईल वाचतात. हा मोबाईल वाचणे म्हणजे अनेक मानसिक रोगांना आमंत्रण देणे आहे. त्यापेक्षा पुस्तके वाचणे कधीही चांगले. त्यात मध्येच काहीतरी अनाहूत येत नाही. आपल्या वाचनाचा लक्ष दुसरीकडे वळत नाही. 

          मुलांना वाचनासाठी उद्युक्त करणं हे तसं सोपं काम नसलं तरी अवघड मुळीच नाही. पुस्तकं त्यांच्या आजूबाजूला दिसायला हवीत. ही आकर्षक पुस्तकेच त्यांना आकर्षित करु शकतात. फक्त ही पुस्तके त्यांच्या नजरेच्या कक्षेत ठेवायला हवीत. 

          दुपारी शाळेचे माध्यान्ह भोजन संपन्न झाले. मुले जेवल्यानंतर या वर्गातून त्या वर्गात उगीचच फिरताना दिसत होती. कोणी कोणाची पाठ धरत होतं. कोणी काहीबाही करताना दिसत होती. दप्तरातील पुस्तके त्यांची वाट पाहत होती. ती दप्तरात किंवा कपाटात बंद होती. बिचारी हिरमुसली होती. आपल्याला कोणी वाचत नाही म्हणून त्यांचे नाराज होणे साहजिकच होते. 

          मी हळूच कपाट उघडले. त्यातली कदाचित नाराज झालेली पुस्तके मी बाहेर काढली. मुलांना व्हरांड्यात बोलवून घेतले. एकेका मुलाला आकर्षक मुखपृष्ठ असलेले पुस्तक देताना मला खूपच आनंद होत होता. मी काहीतरी वाटतोय हे बघून हळूहळू सगळी मुले माझ्याकडे पुस्तके मागायला आली. मी आपला पुस्तके काढून काढून वाटतच राहिलो. 

          मुलांनी जागा मिळेल तिथे फतकल मारुन बसणे पसंत केले. पुस्तकातील चित्रे बघताना त्यांचे चेहरे मी बघत होतो. पुस्तकं वाचनाचा हा आगळा वेगळा वाचनमेळा पाहून मलाही माझ्या बालपणीची आठवण येऊन गेली. आम्ही त्यावेळी खूप वाचन करीत असू. शालेय पुस्तकांव्यतिरिक्त अवांतर वाचनाची आवड आम्हांला या पुस्तकांनीच लावली होती. हल्लीच्या मुलांना मोबाईलचे आकर्षण असल्यामुळे त्यांना पुस्तकांविषयीचे आकर्षण वाटत नसावे. 

          नुकताच पहिलीत प्रवेश घेतलेला सार्थक माझ्याकडे आला. तो म्हणाला , " सर , मला पुस्तक द्या. " मी त्याला चित्रांचे छान पुस्तक दिले. त्याने त्यातली सर्व चित्रे भराभर बघून घेतली. थोड्याच वेळात तो धावतच माझ्याकडे आला. म्हणाला , " सर , आता दुसरं पुस्तक द्या. " मी त्याला म्हटलं , " अरे सार्थक , हेच पुस्तक पुन्हा पुन्हा वाच. नंतर आणून दे. " तो तयार नव्हता. ते पुस्तक माझ्या हातात कोंबत तो म्हणाला , " सर , मी पहिलीत आहे. मला हे पुस्तक वाचता कुठे येतंय ? " त्याचे अगदी बरोबर होते. मी त्याला दुसरे पुस्तक दिले. तो ते नवे पुस्तक घेऊन धूम पळाला आणि परत आपल्या जागेवर जाऊन त्यातील चित्रे डोळे फाडून कुतूहलाने वाचताना दिसला. 

          इतर मुलेही असेच काहीसे करत होती. माझा वेळ मात्र सार्थकी लागला होता. नाराज झालेली पुस्तकं पुन्हा हसताना दिसत होती. असा हा वाचनमेळा मुलांसाठी पर्वणीच ठरला होता. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून असे अनेक उपक्रम अनेक शाळांमध्ये सुरुच असतात. हा उपक्रम त्यांच्यासाठी किंवा माझ्यासाठी नवा नाही , पण मुलांसाठी मात्र नक्कीच वाचनवेडा आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
















Tuesday, July 4, 2023

🛑 पावसाची रंगतसंगत

🛑 पावसाची रंगतसंगत

          पाऊस आता चांगलाच सुरु झालाय. कालपासून त्याने संततधार सुरु केली आहे. गडगडाट नाही , मुसळधार तर नाहीच नाही. पण नुसता बरसतोय. सकाळी सकाळी त्याचा हा वर्षाव खुप सुखद आनंद देऊन जातोय. तो बाहेर छान कोसळतोय. मी मस्त पावसाची गाणी लावून ऐकत बसलोय. पावसाची जुनी गाणी आणि नवा पाऊस दोन्ही कसे भारावून टाकणारे आहे. 

          पाऊस आला की माझं असं होतं. पावसात जावसं वाटतं आणि घरात थांबावं असंही वाटतं. पण यापैकी एकच करता येऊ शकतं. 

          सकाळी लवकरच छोट्या उर्मीला शाळेत सोडायला जायचे असते. तिला मम्मीसुद्धा लागते. शाळेत जायची गडबड सुरु झालेली असते. ती उठायचे नाव घेत नाही. ती लाडात म्हणते , " पप्पा , जरा वेळ झोपते ना ? " माझी तयारी झालेली असते. उर्मीला मस्त आंघोळ करुन झाल्यावर कोमट पाण्यात हॉटबाथ घ्यायला नेहमीच आवडतं. आजही तिने हॉटशेक घेतलाच. रेनकोट वगैरे घालून तयारी करुन शाळेत निघालो. 

          पाऊस काही थांबण्याचे नाव घेत नव्हता. तो रेनकोटातून आत शिरु पाहत होता. पाच मिनिटांत पाऊस रेनकोटात शिरलाच. गारवा छान वाटतोय. मजा येतेय. मधूनच आलेली पावसाची मोठी सर थेट तोंडात पाणी ओतू पहात होती. चष्म्यातून धूसर दिसू लागले होते. चष्म्याला वायफर नाही म्हणून तो पुन्हा पुन्हा पुसावा लागतोय. रस्ता अस्पष्ट दिसू लागलाय. चष्मा वापरणाऱ्यांचे सर्वांचेच असे होत असले पाहिजे. 

          मुलीला घरी सोडून आलो , तेव्हा कपड्यातून आत घुसलेला पाऊस आता मला पाहून बाहेरुन मिश्किल हसताना मला दिसला. मीही गालातच छान हसलो. मिलिंद इंगळे ऐकत बसलो. सौमित्र ऐकत बसलो. दोघेही आपल्या शब्दांनी , स्वरांनी मला चिंब भिजवून टाकत होते. आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी मी मस्त पाऊस अनुभवत होतो. पत्नीने वाफाळलेला आलेयुक्त चहा दिला. तिच्यासोबत चहा पिताना पूर्वीचा पाऊस आठवत होता. स्मृतींचाही असाच पाऊस असतो नाही का ? तोही प्रत्येकाच्या मनात असाच उदंड वर्षत असतो. 

          मलाही आता शाळेत जायचं आहे. शिकायला आणि शिकवायला. जातानाही पुन्हा पावसाची साथसंगत असणारच आहे. धोय धोय पडणारा हा पाऊस मनातही शब्दांचा धबधबा कोसळवतोय. 

©️ प्रवीण कुबलसर



Saturday, July 1, 2023

🛑 आईविना भिकारीच

🛑 आईविना भिकारीच

          तिन्ही जगाच्या स्वामीला आई नाही , म्हणून म्हटले जाते , " स्वामी तिन्ही जगांचा , आईविना भिकारी. "

          हे अगदी खरे आहे. आई नाही तर आपण सगळी तिची लेकरे भिकारीच आहोत. ती होती तेव्हा जी श्रीमंती होती , ती आज लाभत नाही. प्रत्येकाला आई असते , कारण आईशिवाय आपला जन्मच नसतो. ती तिच्या उदरात नऊ महिने , नऊ दिवस , नऊ घटका , नऊ पळे आपल्याला वाढवत असताना तिला झालेला त्रास तिला सुखकर वाटत असतो. तिला त्रास झाला तरी तिने त्याकडे दुर्लक्ष कायम दुर्लक्ष केलेले असते. 

          बाळाचा जन्म झाल्यावर तिचा चेहरा पाहावा. ती जगातील सर्वात श्रीमंत भासते. तिचा पुनर्जन्म झालेला असतो. बाळाचं हसणं , रडणं दोन्ही तिला स्वर्गसुख देत असतं.

          आईला आपली सर्व लेकरं प्रिय असतात. तिची सर्वांवर सारखीच माया असते. त्यात दुजाभाव नसतो. लेकरांनी कधीही असा गैरसमज करुन घेऊ नये. तिच्या प्रेमावर अविश्वास दाखवण्यासारखे पाप नाही. 

          आमची आई इतरांसाठी सर्वसामान्य असेल , पण आमच्यासाठी ती सदैव असामान्यच राहिली आहे. तिने आमच्यासाठी काय केले नाही ? तिने शेवटी आमच्यासाठीच आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ती तिच्या आजाराला कंटाळली. आम्हांला तिचा त्रास होऊ नये म्हणून तिने स्वतःला संपवले असावे. तिच्या कायमच्या डॉक्टरांनी हात टेकले. दुसऱ्या कोणत्याही डॉक्टरांकडे कधीही न जाणाऱ्या तिने आता धसका घेतला. माझ्या डॉक्टरांनी माघार घेतली म्हणजे माझे आता खरे नाही असे तिला वाटले असावे. ती आजारी पडली आणि बरी होण्याची चिन्हे दिसेनात. बाबांशिवाय तिने कोणाकडूनही सेवा करुन घेतली नाही. लग्न झालेल्या मुली आईला बघायला आल्या तरी पाहून जात. आईने त्यांच्याकडूनही सेवा करुन घेतली नाही. आम्ही दोन्ही मुलगे , दोन सुना सेवा करण्यापूर्वीच तिने राम म्हटला. 

          आपली मोठी सून आपल्या आधी गेली याचे अतीव दुःख तिला नेहमीच सलत राहिले असावे. तिच्यानंतर अवघ्या दोन वर्षांनी ती हे जग सोडून गेली. बाबांची सहचारिणी बाबांना कायमची सोडून गेली होती. लेकरांना दुःख होतेच , पण बाबांना झालेले दुःख बाबांच्या डोळ्यांत दिसत होते. बाबांनी माझ्या आईवर जीवापाड प्रेम केले. रागाने बोलले तरी त्यात प्रेमाचा ओलावा अधिक होता. बाबांनी माझ्या आईची आठवण केली नाही असा एकही दिवस गेला नसेल. 

          आज आईचा चौदावा स्मृतीदिन आहे. बाबांच्या गळ्यातील चेन बाबांना टोचायला लागली. आईच्या मंगळसूत्रापासून ती बनवलेली आहे. ती आज टोचणारच , कारण ती आई आहे. तिने आज आपल्या पतीला स्पर्श केला आहे हे बाबांना समजलेही नाही. 

          आईचे आमच्यावरील प्रेम सदैव राहावे अशी मी तिच्याकडे प्रार्थना करतो. 

▪️ तिचो झिल



Monday, June 5, 2023

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

🛑 दमदार वक्तृत्वाचा आविष्कार : किशोर कदमसर

          शिक्षकी पेशामध्ये पदार्पण केले कि अनेक पैलूंवर काम करावे लागते. कसलेला आणि दमदार शिक्षक तयार होण्यासाठी डी. एड , बी. एड. कॉलेजातील वर्षे अतिशय महत्त्वपूर्ण असतात. नोकरीला लागल्यानंतर होणारी सेवांतर्गत प्रशिक्षणे  शिक्षकातील अंतरंग , बाह्यरंग दोन्ही बदलून टाकत असतात. 

          किशोर कदम हे माझे खूप जवळचे शिक्षक मित्र. त्यांची पत्नी शुभांगी. ती माझी क्लासमेट. तिचे पती किशोर कदम आहेत एवढाच सुरुवातीचा परिचय. त्यानंतर अक्षरसिंधु संस्थेत काम करताना कधीतरी किशोर कदमांची गाठ पडली. धावती भेट झाली. त्यांचं राजबिंडं व्यक्तिमत्त्व त्यावेळी माझ्यावर प्रभाव टाकून गेलं होतं. 

          मग पुन्हा माझी आणि त्यांची भेट थेट पुण्यात झाली. बाहुली नाट्य प्रशिक्षणात. दहा दिवसीय प्रशिक्षणात आम्ही दोघे सिंधुदुर्गवासीय असल्याने एकत्र बसत होतो. मालवणीत बोलत होतो. तिथे मला त्यांच्या अभिनय प्रतिभेचा परिचय घडला. त्यांच्या आवाजाचे टोन , आरोह , अवरोह ऐकून मी अक्षरशः भारावून गेलो. त्यांचं ऐतिहासिक नाट्यात्मक बोलणं माझ्यासाठी नवीन होतं. तेव्हाच माझ्या लक्षात आलं. या कदमांमध्ये चांगलाच दम आहे. त्यांनी ऐतिहासिक वाक्यांची फेक करताना एकदा दम घेतला कि वाक्य संपेपर्यंत ते दम सोडत नाहीत हे विशेष. अशी वाक्ये बोलताना त्यांच्या अंगात जणू ती पात्रेच शिरलेली असतात असे वाटते. 

          त्या दहा दिवसात आम्ही दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आलो होतो. आम्ही जेवायला , नाश्त्याला एकाच हॉटेलमध्ये जात असू. दोघांचा गट असल्याने सादरीकरण करताना मला त्यांची खूपच मदत झाली होती. ते खूप हुशार आहेत. 

          त्यानंतर पुन्हा एकदा ' अतिपरिणामकारक व्यक्तींच्या सात सवयी ' हे तीन दिवसांचं जिल्हास्तरीय प्रशिक्षण नांदगांव शाळेत होतं. तिथे हे किशोर कदम मस्त सुट सफारी घालून आले होते. ते आमचे तज्ज्ञमार्गदर्शक होते. त्यांनी मार्गदर्शन करायला सुरुवात केली आणि पुन्हा मला त्यांचा अधिक अभिमान वाटू लागला. त्यांचं बोलणं तुफान होतं. ते इतक्या जलद गतीने बोलत होते कि ते इतक्या जलद कसे बोलू शकतात हा मला त्यावेळी प्रश्न पडला होता. पुस्तकातील मुद्दे भरपूर होते. तीन दिवसांत ते सर्व समजून सांगायचे तर वेगवान वक्तृत्व गरजेचं होतं. आम्हाला एवढ्या वेगाने ऐकण्याची सवय नव्हती , त्यामुळे त्यातला काही भाग आमच्या डोक्यावरुन गेला ही गोष्ट वेगळी. पण त्यात त्यांचा अजिबात दोष नव्हता. आमची ग्रासपिंग पॉवर तेवढी काम करत नव्हती हेही त्याचे कारण असू शकते. 

          त्यांच्या दोन्ही मुली खूप हुशार आहेत त्यांच्यासारख्याच. ' बाप तश्या बेट्या ' असे म्हटले तरी वावगे ठरु नये. मुलींनी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली वक्तृत्वाचा वसा पुढे चालवला आहे. विविध स्पर्धांमध्ये केवळ भागच घेत नाहीत , तर ठरवून प्रथम क्रमांकाचे बक्षीसही मिळवतात. तीन ते चार मिनिटांच्या भाषणात श्रोत्यांच्या मनाचा ताबाच घेतात म्हणा ना !! शब्द बाबांचे आणि आवाज मुलींचा. बाबांना अपेक्षित यश मिळवत पुढे जाताना त्यांनी कधीही मागे वळून बघितलेले नाही. कालपेक्षा आज जास्त जिद्दीने लढा देत ' वक्ता दशसहश्रेषु ' हे सिद्ध करण्याचा जणू त्यांनी विडाच उचलला आहे असे वाटते. 

          भाषण करत असताना ज्यांच्यावर त्या बोलत असतात त्यांचा पोशाख परिधान करुन त्यांनी कित्येकदा ' भूमिकाभिनय देखील केला आहे. यांच्या भाषणाच्या सुरुवातीच्या वाक्यांपासून प्रेक्षकांच्या टाळ्या सुरु होतात. भाषण संपताना मात्र लोक टाळ्या वाजवायचे विसरुन जातात एवढे ते त्यांच्या भाषणात एकरुप झालेले असतात. 

          किशोर कदम यांना या सर्व गोष्टींचे श्रेय जाते. दोन्ही मुलींना असे वक्तृत्व शिकवत असताना त्यांनाही अधिक उत्तम वाचावे लागते. त्यांनी एकदा लिहायला घेतले की विषयाची मांडणी पूर्ण केल्याशिवाय थांबत नाहीत. त्यांचं व्यक्तिचित्र प्रत्यक्ष बोलण्यासाठी तयार झालेलं असतं. या शब्दांमध्ये आवाजाचे प्राण ओतले कि एक सुंदर प्रभावी वक्त्याचं दर्शन घडायला वेळ लागत नाही. 

          असे वक्तृत्व लेखन करता करता किशोर कदम यांच्या दिव्य लेखणीतून एक पुस्तकच जन्माला आले आहे. त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक सर्व विद्यार्थी , पालक , शिक्षक आणि वाचक यांच्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. शाळेतील जयंत्या , पुण्यतिथी कार्यक्रम साजरे करत असताना मुलांनी या पुस्तकातील भाषणांचा वापर केला तर समोरचे श्रोते खुश होऊन टाळ्या वाजवल्याशिवाय राहणार नाहीत. आवाजात ताकद असली तरी किशोर कदमांनी लिहिलेल्या शब्दांच्या ताकदीमुळे पुस्तक बेस्टसेलर ठरायला हवे यांत शंका असण्याचे कारण नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , पदवीधर शिक्षक , शाळा शिडवणे नं.१ ( 9881471684 )



🛑 गोष्टींचा तास

🛑 गोष्टींचा तास

          माणसांना गोष्टी खूप आवडतात. गप्पा मारता मारता त्यातून कधी कधी गोष्टींची निर्मिती होते. जुन्या गोष्टी ऐकताना त्या ऐकत राहाव्यात असे वाटत राहते. गोष्टींचा कधी कंटाळा येत नाही. 

          गोष्टी सांगणारा म्हणजेच स्टोरीटेलर. त्याला गोष्ट कशी वाढवावी हे माहिती असते. गोष्टींमध्ये रंगत आणणे ही एक कला आहे. गोष्ट सांगणे आणि गोष्ट खुलवून सांगणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. गोष्ट खुलवून सांगता यायला हवी. 

          आपल्या समोर असलेल्या मुलांचा वयोगट लक्षात घेऊन गोष्टींची निवड करावी लागते. त्यातील विविध उदाहरणे देताना ती त्यांच्या परिचयाची हवीत. तर ती मुलांच्या हृदयाचा ठाव घेतात. मुलांचं लक्ष एकाग्र करणं ही आजच्या काळातील अतिशय अवघड गोष्ट होऊन बसली आहे. त्यांना त्यांच्या बालविश्वात फिरवून आणण्याची कला स्टोरीटेलरमध्ये असावी लागते. 

          मुलांना बोलते करत , त्यांच्याशी त्यांच्या वयातील होऊन संवाद साधला तर मुले पटकन एकरुप होतात असा अनुभव आहे. त्यांना प्रेरणा देत गोष्ट पुढे घेऊन जायला लागते. त्यांच्या बालमनावर आघात करणारी गोष्ट सांगणे बरोबर नसते. डोळ्यांतून पाणी आणणारी गोष्ट सांगितली तरी हल्लीच्या मुलांच्या डोळ्यांतून पाणी आणताना स्टोरीटेलरच्या डोळ्यांतून पाणी येऊ शकते. मुलांच्या संवेदना कमी झाल्यात की काय असा प्रश्न पडतो. 

          विष्णु शर्माच्या पंचतंत्रातील नितीपर गोष्टी आम्हाला त्यावेळी खूपच आवडत. आम्ही त्या पुनःपुन्हा वाचत असू. इसापची इसापनीती आम्हाला नीती शिकवून गेली. त्यातील प्राणी , पक्षी आमचे मित्र झाले. 

          श्यामची आई हे सानेगुरुजींचं पुस्तक आमच्या नितांत आवडीचं होतं. ते कितीवेळा वाचलं असेल ते सांगता येत नाही. पुनःपुन्हा वाचण्याइतकी या पुस्तकाची स्टोरी आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी तर तिला ' आईचं महान आणि मंगल स्तोत्र '  म्हटले आहे. 

          मुलांची श्रवण क्षमता म्हणजेच ऐकण्याची क्षमता अधिक विकसित होण्यासाठी , शब्दसंग्रहात भर पडण्यासाठी सकस गोष्टींची खूप गरज असते. मुलांना पूर्वी आजोबा , आजी गोष्टी सांगत असत. आज या गोष्टींची मुलांना उणीव भासू लागली आहे. मग मुलांना युट्युबवर ' आजीच्या / आजोबांच्या गोष्टी ' शोधाव्या लागत आहेत. या संस्कारी गोष्टी शोधता शोधता दुसरेच काहीतरी निकृष्ट दर्जाचे सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संस्कारक्षम वयात मुलांनी काय बघावे आणि काय बघू नये हेही आता पालकांच्या हातात राहिलेले नाही. जे दिसेल ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत किंवा मोबाईलमधील डेटा संपेपर्यंत मुले नुसते पाहात आणि ऐकत आहेत. काय चांगले आणि काय वाईट ते समजून सांगताना पालकांनी माघार घ्यायला सुरुवात केलेली दिसते आहे. 

          जुन्या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये खूप चांगले धडे होते. त्या गोष्टीच होत्या. त्यांचे आपण अजूनही वाचन करताना खूप आनंद होतो. ही पुस्तके बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यांचा वापर मुलांनी , पालकांनी आणि विशेषतः शिक्षकांनी करायला हवा. दिवसभरातील हा गोष्टींचा हा एक तास मुलांचा त्रास कुठल्या कुठे पळवून लावील हे नक्की. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , शिडवणे नं.१

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...