Saturday, May 27, 2023

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण

🛑 एका तेजस्वी सूर्याचा खडतर प्रवास : सुर्यकांत चव्हाण 

           " मुलाचे पाय पाळण्यात दिसतात " असे म्हटले जाते. अर्थात मुलाचे पाळण्यात हलणारे पाय बघूनच अशी कल्पना करण्यात येते. हळूहळू मोठा होताना त्याचे गुण अधिक लक्षात येत राहतात. मुलं नुसती वयाने आणि वजनाने मोठी झालेली कोणालाही आवडणार नाहीत. त्यांनी वर्तमान आणि भविष्य उजळून टाकावं असं भव्य दिव्य करावं अशी सर्वांचीच इच्छा असते. त्यामुळे प्रेरणा देत देत मुलांचं भविष्य घडवणं हे मोठ्यांचं आद्यकर्तव्य ठरतं. 

          ग्रामीण भागातील मुले विशेषतः तावून सुलाखून निघालेली असतात. विविध संकटांचा सामना करुन वज्रासारखी बनून जातात. गरीबी असली तरी त्यात सुखासमाधानाची भाकरी खाण्यातला आनंद विरळाच. 

          सुर्यकांत चव्हाण हे माझे भावोजी. मोठ्या मामांच्या मोठ्या मुलीचे पती. त्यांचा जन्म हिवाळे गावात झाला. वडिलांच्या तुटपुंज्या मिळकतीत पाच मुलांना उच्च शिक्षण देत मोठं करणं सोपी गोष्ट नव्हतीच. पण शिक्षणच आपणांस चांगले दिवस दाखवू शकतं हा ठाम विश्वास वडिलांनी सदैव बाळगला होता. मुलं मोठी मोठी होत गेली आणि शिक्षण घेता घेता कधी समंजस झाली ते वडिलांनाही कळलं नाही. 

          वडिलांनी मग आपली आणि कुटुंबाची जबाबदारी मोठ्या सुर्यकांतवर सोपवली. सुसंस्काराने वाढलेले झाड वाढायचे थांबत नसते. सुर्यकांत आणि त्यांची भावंडे जिद्दी होती. त्यांनी आपल्यावर आलेली जबाबदारी आनंदाने स्वीकारली.

          वडील आजारी पडले आणि मोठ्या सुर्यकांतने कुटुंबाची स्विकारली. सर्वांची लग्न लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मोठा असल्यामुळे  स्वतः सुर्यकांत यांचा नंबर होता. माझी मोठी मामेबहिण सुर्यकांत यांच्याशी विवाहबद्ध झाली. 

          घर अगदी जुनेच होते. सुर्यकांत भावोजी कणकवलीत खाजगी नोकरी करत होते. मोठमोठ्या प्रोजेक्टची इंजिनिअरिंग डिझाईन करण्यात ते पटाईत होते. एकदा मला त्यांच्या त्या ऑफिसमध्ये जाण्याचा योग आला होता. तेव्हा मी त्यांचे काम अगदी जवळून पाहिले आहे. खाजगी नोकरी करत असताना एवढ्या मोठ्या कुटुंबाचा गाडा ओढताना त्यांना त्यांच्या भाऊरायांची साथ लाभली. 

          बांदा हायस्कुलमध्ये  सुर्यकांत रुजू झाले. एक भाऊ , एक वहिनी शिक्षिका आहेत. एक भाऊ इलेक्ट्रॉनिक दुकान चालवता चालवता जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. वित्त व बांधकाम सभापती झाले. एक बहिण आरोग्य विभागात नोकरीला लागली. एक बहीण पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये लेक्चरर झाली. सुर्यकांत यांचा सूर्य उगवू लागला होता. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पत्नीची जबरदस्त साथ त्यांना वेळोवेळी मिळत होतीच. 

          जो प्रामाणिकपणे काम करतो , त्याच्या कार्याचा नक्कीच गौरव होत असतो. सुर्यकांत चव्हाण  बांदा हायस्कुल मध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून  या पदावर काम करत असताना त्यांनी स्वतः अनेक प्रयोग करुन पाहिले आहेत. राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी जिल्हास्तरावर नंबर यावा लागतो. आपल्या ज्ञानाच्या आणि जिद्दीच्या बळावर त्यांनी सहा वेळा राज्यस्तरासाठी निवड झाली एक वेळा राज्यात उत्तेजनार्थ तिसरा क्रमांक व यावर्षी राज्यात तिसरा क्रमांक मिळाला. ही यशाची शिखरे पादाक्रांत केली आहेत. यश मिळवत राहणे हे त्यांच्या रक्तात भिनलेले आहे. कितीही यश मिळवले तरीही त्यांना अहंकार नाही. त्यांचे पाय जमिनीवरच आहेत. 

          यावर्षी होणाऱ्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पतपेढीच्या निवडणुकीत त्यांनी सहभाग नोंदवला आहे. ते उमेदवार जिल्ह्यासाठी इतर मागास प्रवर्गातून(OBC) उभे आहेत. त्यांनी केलेलं शैक्षणिक कार्य उल्लेखनीय आहेच. त्यांच्या अभिनव ज्ञानाचा उपयोग बँकेच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि पर्यायाने सभासदांच्या विकासासाठी नक्कीच होईल असा विश्वास वाटतो. हा विश्वास प्रत्येक मतदारालाही वाटेल यांत तिळमात्र शंका वाटत नाही. 

          शिक्षक बंधु आणि भगिनींनो , आपण आपल्या एका तळागाळातील कार्यकर्त्याला जिल्हा उमेदवार म्हणून निवडून द्याल आणि बँकेच्या तख्तावर बसवाल अशी कळकळीची विनंती करतो. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ )





🛑 दारु आणि मी

🛑 दारु आणि मी

          दारुबद्दल लिहायचे असेल तर दारु पिणाऱ्याबद्दल लिहिले पाहिजे असे बिल्कुल नाही.  दारु बनवणाऱ्यांची घरे , दारु विकणाऱ्यांची दुकाने चालली पाहिजेत म्हणून की काय काही लोक त्यांची दया येऊन दारु पित असावेत. तंबाखूमुक्त चळवळ जशी सुरु असते , तशी दारु विरोधी चळवळी सुरु असतात. 

          क्वचित एखादा चित्रपट असेल की ज्यात दारु दाखवली नसेल. आजच्या काळातील प्रत्येक चित्रपटात तिचा बेसुमार वापर केलेला दिसून येतो. सकाळ ते रात्री कोणत्याही वेळीचा प्रसंग असो , त्यात तिला मोठं स्थान दिल्याचं जाणवतं. पुरुषच काय , पण काही चित्रपटात स्त्रिया सुद्धा पिताना दाखवल्या जातात. 

          Drinking of Alcohol is injurious to health असं वाक्य चित्राच्या खाली बारीक अक्षरात लिहायला अजिबात विसरले जात नाही. आता ती मदिरा पिणे ही फॅशन आणि पॅशन झाली आहे. उलट ही मदिरा न पिणाऱ्यांची हसून खिल्ली उडवली जाते. 

          " अहो , महाशय , तुम्ही किती मागे आहात ? जरा पुढे जा आता !!! " हे वाक्य ऐकून जर तुम्ही घ्यायला किंवा प्यायला गेलात तर तुम्ही नक्कीचे पुढे जाणार हे ठरलेले आहे.   हे पुढे जाणं विनाशाच्या दिशेने असणार आहे हेही लक्षात असू द्या. 

          एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या लग्नाला चाललो होतो. एसटीतून प्रवास सुरु होता. मला गाडीत दारुचा घाणेरडा वास आला. मी मागे वळून पाहिलं. कोणीतरी हळूच पित असल्याचे समजले. मला तो घाण वास सहन होईना. मी कासावीस झालो होतो. प्रवास कधी एकदा संपतो असे मला झाले होते. मी काहीही करु शकत नव्हतो. शेवटी प्रवास संपल्यावर एसटीतून उतरताच मी सुटकेचा दीर्घ श्वास घेतला. 

          हल्ली पिणारी माणसे तिचा घाण वास येऊ नये म्हणून तीव्र वासाचे सेंट लावतात. त्यामुळे आणखी तयार झालेल्या मिश्रित वासाचा सामना करत राहावा लागतो. त्यांना बिचाऱ्यांना सवय झालेली असते , त्यामुळे त्यांना स्वतःला त्याचे काहीच वाटत नसावे. पण त्यांच्या सोबतीने जाण्याचे दुर्भाग्य लाभलं तर काही खरं नाही. 

          आपल्याला तशा अनेक सवयी असतात. त्यापैकी ही पिण्याची सवय असली तर ती घातक असू शकते हे लक्षात घ्यावे. कित्येकांचे संसार या अतिपिण्याने उध्वस्त झाल्याचे मी प्रत्यक्ष बघितले आहेत. दारु पिणाऱ्या माणसाला एकदा दारु पिऊ लागली कि तो माणूस संपलाच असे समजावे. 

          त्यादिवशी एके ठिकाणी एक चांगले इस्त्रीचे कपडे घातलेला चांगल्या घरातील माणूस दारु पिऊन रस्त्यात पडलेला मला दिसला. त्याचा हा अवतार बघून येणारे जाणारे लोक त्याच्याकडे तुच्छतेने बघताना दिसत होते. अगदी मीही. या दारुमुळे माणसाचं एका झटक्यात काय घडते ते पहा. 

          कधीकधी माझी छोटी मुलगी मला म्हणते , "  पप्पा , तुम्ही जर कधी दारु पिऊन घरी आलात ना , तर तुम्हाला मी अजिबात घरात घेणार नाही." तिचंही बरोबर आहे. तिलाही आता अशी माणसं चित्रपटात , यु ट्युबवर दिसत असतात. अशा पिणाऱ्या माणसांचा लहान मूलसुद्धा तिटकारा , तिरस्कार करत असतं हेही लक्षात असू द्या. 

          काही लोक तर सकाळी उठले की त्यानेच तोंड धुतात. उठले की सुटले. जोपर्यंत पित नाहीत , तोपर्यंत त्यांना बरे वाटत नाही. प्यायलेले नसले की ते थरथरत उभे राहतात , पुरेशी प्यायले की नीट उभे राहतात एवढी त्यांना सवय झालेली असते तिची. या सवयीच्या अधीन झालेल्या लोकांचं काय करायचं ते समजण्याच्या पलीकडचे आहे. 

          एकदा एक पोट धरुन हसवणारा नट कणकवलीत येणार होता. आम्ही त्याचे फॅन होतो. अर्धा तास लवकरच आम्ही त्याचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. अजून तो नट आलाच नव्हता. नंतर कुणीतरी हळूच बोलताना ऐकू आले. तो पीत बसला होता. त्याचे पेग संपल्यावर तो आला. पण त्याचा कार्यक्रम बकवास झाला. पुन्हा तो पित असल्याचे समजल्याने त्याच्याबद्दलचा आमचा आदर कमी झाला तो कायमचाच. 

          काही माणसं पितात , पण अजिबात कळू देत नाहीत. या माणसांचा कोणालाही अजिबात त्रास नसतो. अशा माणसांना अति ताण आणि तणाव असतात , म्हणून ते पितात असे म्हटले जाते. पिल्यामुळे त्यांचा ताणतणाव कुठल्या कुठे पळून जातो असे तेच सांगतात. 

          या जगात ताण तणाव सगळ्यांनाच असतात. म्हणून दारु पिण्याचा मार्ग अवलंबून स्वतः बरोबर कुटुंबाची वाताहात करणे अजिबात समर्थनीय नाही. 

          जगात अशी दुःखी माणसे असंख्य असू शकतात , म्हणून ती सगळी दारु पिणारी आहेत का ? नाही ना ? अशा दुःखाचा सकारात्मक सामना करणाऱ्या माणसांकडे बघून तरी या माणसांनी आपल्या दुष्ट मैत्रिणीची साथसंगत सोडली पाहिजे. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 इस्त्री आणि मी

🛑 इस्त्री आणि मी

          लहानपणीपासून कपड्यांना इस्त्री करण्याची सवय लागली आहे. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करुन घालायचे. त्यावेळी इस्त्री कुठे होती ? पितळेचा तांब्या होता. त्यात पेटते निखारे घालायचे. थोडी फुंकर मारुन निखारे फुलवायचे. तांब्याचा तळ चांगलाच तापतो. त्यासोबत धातूच्या उष्णता संक्रमणामुळे तांब्याच्या तोंडापर्यंत उष्णता जाणवे. हात चांगलेच भाजत. ते भाजू नयेत , म्हणून ' भानशिरे ' घेतले जाई. भानशिरे म्हणजे जुना कापडी सुती फडका असे. तो चुलीवरची भांडी उचलून उचलून काळाकुट्ट झालेला असे. 

          इस्त्री करुन सुरकुत्या घालवून शर्ट , पॅन्ट छान दिसत. शाळेचा गणवेश जुना असला तरी नवीन वाटे. शाळेत जाताना पॉश कपडे घातल्याचा अनुभव येई. इतर मुलांचे नवनवे युनिफॉर्म बघून माझे इस्त्री केलेले कपडेही फिके पडत. 

          इस्त्री करुन करुन कपडे कोरम होत. शर्टाची कॉलर विरघळे. पँटीचा रंग बदलून जाई. पण पँट , शर्ट दोन्ही पूर्ण फाटेपर्यंत वापरावे लागत. उसवले तर बाबा शिवून देत. फाटले तर रिपू करावा लागे. हा रिपू कसातरीच दिसे. तरीही फाटक्या कपड्यांपेक्षा रिपू केलेले कपडे वापरणे केव्हाही चांगले. आता हे फाटलेले कपडे किंवा नको तिथे ठिगळ , रिपू ही फॅशन झाली आहे. 

          तांब्यानंतर बाबांनी हप्त्यावर एक साधी इस्त्री घेतली. तिला विजेची आवश्यकता असे. भाड्याने राहत असल्याने मालकांच्या परवानगीने लाईट वापरावी लागे. या नवीन इस्त्रीने इस्त्री करताना मजा येई. पटापट इस्त्री करता येई. कपडे आणखी चांगले दिसत. मामांकडे आजोळी माझे मामेभाऊ कसे इस्त्री करतात ते मी नीट बघून ठेवले होते. त्या निरीक्षणाचा उपयोग झाला. 

          आम्ही सर्व भावंडे इस्त्री करुनच कपडे वापरत असू. आता ऑटोमॅटिक इस्त्री आहे. ती कमी जास्त करता येऊ शकते. ती हलकी व सहज करता येण्यासारखी सुलभ आहे. 

          इस्त्री करताना आपण इतर काहीही करत नसतो. म्हणून मी नेहमी गाणी ऐकत इस्त्री करत असतो. आता मला ती सवयच जडली आहे. इस्त्री , गाणी आणि मी असे समीकरण झाले आहे. एखाद्या वेळी मी इस्त्री करताना गाणी लावली नाही तर माझ्या मुली मला विचारतात , " पप्पा , आज गाण्याशिवाय इस्त्री करताय , कमाल आहे ? " एवढी मला सवय झाली आहे म्हणजे बघा. 

          इस्त्री करताना मी अनेकदा भूतकाळात जात असतो. जुनी आणि मला नेहमी आवडणारी गाणीच मी ऐकत असतो. त्या गाण्यांचीही सवय झाली आहे म्हणा ना !! ही गाणी ऐकता ऐकता मी भराभर इस्त्री करत जातो. माझ्या आठवड्याच्या कपड्यांचा ढिग पडलेला असतो. 

          सलग दोन तासांचा हा इस्त्रीचा कार्यक्रम गाण्यांसह सुरुच असतो. इस्त्री कपड्यांच्या सुरकुत्या घालवत असते आणि गाणी माझ्या मनावरच्या. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर





Thursday, May 25, 2023

🛑 मोटू और पतलु की जोडी

🛑 मोटू और पतलु की जोडी

          बालपणी साधारण हिंदी भाषा समजू लागल्यानंतर ' लोटपोट ' हे हिंदी बाल मासिक हाती आले. कणकवली एस.टी. स्टँडवर असलेल्या पेपर स्टॉलवर हे मासिक मला पाहायला मिळाले. मी ते एकदा घेतले. त्यातील चित्रे आणि हिंदी भाषा जवळची वाटत गेली. 

          मुखपृष्ठावरील मोटू आणि पतलु या दोन कार्टून्सची चित्रे मला आकर्षित करु लागली होती. हळूहळू ही दोन्ही पात्रे माझे मित्र कधी झाली मला समजलेही नाही. मी वाचत गेलो आणि पुनःपुन्हा वाचतच राहिलो. एखाद्या महिन्यात ' लोटपोट ' आले नाही तर मी खट्टू होऊन परत येत असे.  मासिक वाचताना खरंच मी लोटपोट होऊन जात असे. आता हे मासिक जिओ मॅगझीन यावर ऑनलाईन वाचनासाठी उपलब्ध आहे. त्याचे वाचन करत गेलात तर तुमची हिंदी नक्कीच सुधारु शकते. 

          लहान मुलांनी अवांतर वाचन करणे ही आजची गरज आहे. आम्ही आमच्या लहानपणापासून ही वाचनाची आवड जोपासली आहे. मिळतील ती पुस्तके वाचून संपवली आहेत. सर्वच पुस्तके आता लक्षातही राहिली नाहीत. मराठीप्रमाणेच हिंदी वाचन करणेही गरजेचे आहे. कारण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. इंग्रजीकडे जास्त लक्ष देण्याच्या हव्यासापोटी हिंदीकडे होत असलेला दुर्लक्ष नाकारुन चालणार नाही. 

          लोटपोट सारखी बालमासिके वाचून आपण आपलं हिंदी भाषेतील ज्ञान वाढवत जाण्याची हिच वेळ आहे. आता सर्वकाही इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यामुळे इंटरनेटचा असा फायदा करुन घ्यायला हवा. उगीचच निरर्थक सर्फिंग करणे थांबवायला हवे. सर्वच गोष्टी गुगल करण्याची वाईट सवयसुद्धा सोडून द्यायला हवी. 

          एलईडी टिव्ही नावाच्या आयताकृती वस्तूसमोर बसून संपूर्ण दिवसभर कार्टून्स बघणारी मुले बघितली तर पुढील भावी पिढीची चिंता सतावते आहे. काय करायचं या मुलांचं ? कसं होणार या मुलांचं ? हे आणि असे अनेक प्रश्न प्रत्येक पालकाला पडत असावेत. टिव्ही बंद केला तर , मोबाईल आहेतच. मोबाईलच्या छोट्या स्क्रिनवर डोळे मिचिक मिचिक करत का होईना कार्टून्स आणि रिल्स बघणे सुरुच राहते आहे हा खरा घोळ आहे. 

          एका गोष्टीवर निर्बंध घातले तर दुसरी चुकीची गोष्टच करण्याकडेच मुलांचा कल असतो. त्यांना एखादी गोष्ट करु नका म्हटले तर तीच गोष्ट ती पुनःपुन्हा करत राहतात. मग आपणच कंटाळतो. विषयच सोडून देतो. काय करायचं ते करा असे म्हणत वैतागत आणि चरफडत राहतो. 

          आमच्याकडे बऱ्याचदा ही ' मोटू पतलु' मालिका सुरु असते. त्यातली पात्रं कमालीची आकर्षक आहेत. स्वतः मोटू हा धाडसी आहे. आपल्या ताकदीच्या जोरावर तो कितीही मोठ्या संकटांचा सामना करण्यास पुढे सरसावतो. समोसे खाल्ल्याशिवाय त्याला ताकद येत नाही. तो समोसे कधी चावताना दिसत नाही. तो समोसे गिळतो. आपल्याला असं समोसे गिळंकृत करणं या जन्मात तरी शक्य नाही. 

          पतलु हा त्याच्या नावाप्रमाणे बारीक आहे. तो अतिशय हुशार आहे. त्याने सुचविलेल्या युक्त्या भन्नाट असतात. या दोघांची जोडी म्हणूनच बालांच्याच नव्हे मोठ्यांच्याही मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही अगदी कंटाळून घरी आलेले असाल तर ' मोटू पतलु' ही मालिका बघा. तुमचा सगळा शीण कुठल्या कुठे निघून जाईल. 

          त्यांच्यासोबत कायम ' चिंगम ' नावाचा पोलीस अधिकारी असतो. तोही अफलातून कॉमेडी दाखवला आहे. मोटू पतलु या द्वयींच्या मदतीने तो अनेकदा दुष्टांना पकडताना दिसतो. त्याने आपल्या बंदुकीने झाडलेली प्रत्येक गोळी नारळ पाडल्याशिवाय राहत नाही. नारळाचे झाड जवळपास नसले तरी नारळ पडतात त्यामुळे गंमत वाटत राहते. 

          डॉ. झटका यांची संशोधने हटके असतात. प्रयोग करताना होणाऱ्या गमतीजमती पाहताना हसू अजिबात आवरत नाही. ' यार ' हा त्यांच्या तोंडी दिलेला नेहमीचा शब्द तुमच्याही तोंडात कधी येईल ते सांगताही येणार नाही. सोबत घसीटाराम असतो. हे पात्र सुद्धा अवलीच आहे. 

          जॉन आणि त्याच्यासोबत असलेले दोन सहकारी काहीतरी कुरघोडी करण्यात पटाईत असतात. ' जॉन बनेगा डॉन ' असं म्हणत तो मोटू पतलु यांना नामोहरण करण्याचा सदैव प्रयत्न करतात. पण त्यांचे फंडे त्यांच्यावरच उलटतात. त्यामुळे गंमत वाढत राहते. 

          या पात्रांच्या हालचाली मजेशीर असतात. ते आकाशात स्वैरपणे संचार करतात. गाडीखाली सापडले तर त्यांची चपाती होते. पण ते कदापि मरत नाहीत. अशी ही सुखांतिका असलेली बालमालिका अतिशय मनोरंजक आणि हिंदी भाषा बोलण्यास प्रवृत्त करणारी आहे. आपणांस वेळ असेल तर आपणही ही ' मोटू और पतलु की जोडी ' जरुर पाहा आणि हास्याचे फवारे उडवून आपलं रक्त शुद्ध करा. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

🛑 अभिनंदन तुमच्या मुलांचं आणि तुमचंही

          दहावी , बारावीचा रिझल्ट लागला. म्हणजे मराठीत निकाल लागला असे म्हणायचे ना ? 

          अनेक मुलांनी टॉप केलेले आहे. अनेकांनी मेडियम यश प्राप्त केलं आहे. स्वतःची सर्वसामान्य बुद्धिमत्ता आहे असे वाटणाऱ्या मुलांनीही काठापेक्षा जास्त मार्क्स मिळवलेले आहेत. सर्व मुलांचं खरंच मनापासून अभिनंदन. त्यांच्या पालकांचं त्याहीपेक्षा जास्त अभिनंदन. 

          मुलांच्या आणि पालकांच्या दोहोंच्या परीक्षेचा आनंददायी निकाल लागल्यासारखे वाटते आहे. सर्वांनी आपल्या मुलांची गुणपत्रके स्टेटसवर ठेवून अधिक आनंद व्यक्त केलेला आहे यातच सगळे आले. सर्वांचे स्टेटस मुलांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. हे अभिनंदन होत असताना मार्क्स मिळवणाऱ्या मुलांना कित्ती आनंद होत असेल नाही ? आजचे स्टेटस उद्या किंवा परवा असणार नाही. परंतु हे जबरदस्त स्टेटस कायम ठेवण्याची मुलांची आणि पालकांची जबाबदारीही वाढली आहे हे नक्की. त्यामुळे पुढील आयुष्याची शिखरं पादाक्रांत करताना दहावी , बारावीचे गुण महत्त्वाचे ठरणार आहेत. कोणत्या शाखेत ? किती गुण ? ग्रुपमध्ये किती ? आता पुढे काय ? अजून थोडे अधिक गुण मिळाले असते तर ? तू डॉक्टरच हो , नको नको इंजिनिअरिंग कर. त्यापेक्षा स्पर्धा परीक्षा दे. हे आणि अशा अनेक प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागणार आहे. यांची उत्तरे देतानाही नाकीनऊ येणार आहेत असे दिसते आहे. 

          शिक्षकांनी केलेले प्रयत्न , शाळेने केलेले प्रयत्न , संस्थेने केलेले प्रयत्न यांचा सर्वांचा कस लागलेला आहे. यांना यशाची आणि अपयशाची मोजणी करावी लागणार आहे. यापुढे अजून यश मिळवण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. स्पर्धेत ' पळा पळा , कोण पुढे पळे तो ' असं सगळीकडेच बघायला मिळते आहे. 

          अभिनंदन आणि सत्कार यांचीही स्पर्धा सुरुच राहणार आहे. जास्त टक्के मिळवणारे आणि शिक्षणासाठी जास्त पैसे मोजू शकणारे मोठे कोणीतरी होतील यांत शंकाच नाही. परंतु जास्त गुण मिळवूनही केवळ पैशाची कमतरता असल्यामुळे , आर्थिक परिस्थितीमुळे सोपा कोर्स निवडताना दिसणार आहेत. कृपया त्यांनीही आपल्या मार्कांच्या जोरावर  चांगल्या व्यावसायिक प्रशिक्षणाला प्रवेश घ्यायला हवा. जे आपल्याला जमू शकतं , जे आपल्याला आवडतं , ते करण्याचा प्राधान्याने विचार करावा. उगीच दुसरे सांगतात , म्हणून कोणताही कोर्स जॉईन करणे आवश्यकच आहे असे नाही. तो कोर्स तुमच्यासाठी आवश्यक असेल , तर त्याचा थोडाबहुत अभ्यास करुन तो करावा की नाही ते जरुर ठरवावे. उगीच भावनिक होऊन एखादा अभ्यासक्रम सुरु करायचा आणि कंटाळा आला , जमत नाही असे म्हणून सोडून देण्यापेक्षा आधीच सारासार विचार करावा. 

          प्रत्येकवेळी मोठ्या पॅकेजचा विचार करणेही चुकीचे आहे. आपल्याला ज्या पॅकेजमध्ये मानसिक आणि शारीरिक असे दोन्ही समाधान मिळू शकेल असे पॅकेज जरुर निवडावे. 

          काही मुले दहावी किंवा बारावी नंतर जॉबचा पर्याय निवडताना दिसतात. घरातील आर्थिक परिस्थितीनुसार त्यांना ते करावे लागू शकते. पण जॉब करता करता मुक्त विद्यापीठ जॉईन करता येते. आपल्याला हवे असेल ते शिक्षण घेण्याचा पर्याय शिल्लक आहे हे विसरू नये. नोकरी मिळाली तरी शिकतच राहावे. उच्चशिक्षण घेतले तर ते कधीही फुकट जात नसते. उलट तुमच्या पुढील वैभवशाली जीवनाला त्याने सुडौल आकारच मिळणार असतो. 

          सध्या मुली मुलांपेक्षा अधिक बाजी मारताना बघून सावित्रीबाई फुले यांची जास्त प्रकर्षाने आठवण होते आहे. फेसबुक , व्हाट्सएपच्या जगात आपल्याला मिळालेल्या लाईक्सना , कमेंट्सना महत्त्व नसून आपण एक महत्त्वाची परीक्षा पास झालो हे जास्त महत्त्वाचे आहे नाही का ? आता तुम्ही सोळा किंवा अठरा वर्षांचे झाला आहात , तुम्ही या भारताचे एक जागरुक नागरिक बनत चालला आहात हेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी खूपच वाढली आहे. तुम्ही आता लहान नाहीत. तुम्ही आता खऱ्या अर्थाने मोठे झाला आहात. तुम्ही वयाने मोठे झालात , ज्ञानाने मोठे झालात , आता मनानेही मोठे व्हा. समंजस , जिद्दी आणि सकारात्मक विचारसरणी अंगीकारा. तडजोड करायला शिका. आभासी दुनियेतून बाहेर पडा. उघडे असलेले डोळे अधिक व्यवस्थित उघडा आणि जगाकडे जाणीवपूर्वक सजगपणे बघा. तुम्ही मोठे आणि अधिकाधिक मोठे होणार हे फक्त तुमच्यावरच अवलंबून असतं. शुभेच्छा तुम्हाला या सर्वांसाठी. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१



Tuesday, May 16, 2023

🛑 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य

🛑 भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य

          गेल्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीची निवडणुकीची रणधुमाळी , प्रचार आणि प्रत्यक्ष भेटी यांच्या तोफा धुमधडाक्यात सुरु होत्या. 

          कालच निकाल लागला. दोन पॅनेलमध्ये जबरदस्त टक्कर पाहायला मिळाली. सर्व शिक्षक आपलेच आहेत. सर्वच शिक्षक हे प्राथमिक शिक्षक बँकेचे विद्यमान सदस्य आहेत. सर्व शिक्षक आपल्या बँकेवर अतिशय प्रेम करतात. शिक्षक बँक आहे म्हणून आपण आहोत असे म्हटले तरी अनेकांच्या बाबतीत ते अगदीच खरे ठरेल. ती आहे म्हणून आपण तिच्या एकटीच्या जीवावर कर्ज काढून घरे , लग्ने आणि आरोग्य विषयक अडचणींना तोंड देत आहोत. त्वरित कर्ज देणारी व कमी व्याज दर असणारी दुसरी बँक मला तरी माहिती नाही. 

          बँक चालवण्यासाठी त्यावर संचालक निवडून दिले जातात. बहुतेक चार वेळा सत्ता उपभोगणारे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनल पाचव्या खेपेला बहुमतांनी निवडून येणे ही सोपी गोष्ट नव्हतीच. मतदार कधीही तेच तेच चेहरे पाहण्यास उत्सुक नसतात. नवीन तरुण तडपदार उमेदवार त्यांना बँकेवर हवे असतात असाच काहीसा अनुभव येतो आहे. 

          विरोधकांनी निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न नाकारुन अजिबात चालणार नाही. त्यांचा निसटता पराभव आपल्याला विचार करायला लावणारा आहे. हाताच्या बोटावर मोजता येणाऱ्या मताधिक्याने निवडून आलेल्या उमेदवारांना कदाचित या आकड्यांनी धक्काही बसला असेल. निवडून आलो म्हणून आनंदही झाला असला तरी मताधिक्य नसल्याचे दुःख सलणार हे नक्कीचे आहे. याचा अर्थ पुढील काळात डोळ्यांत तेल घालून काम करावे लागणार आहे. 

          आपण मतदार शिक्षकांना जी वचने , आश्वासने दिली आहेत ती परिपूर्ण करण्याची जबाबदारी अधिक वाढली आहे. प्रचाराच्या वेळी जसे जोमाने काम केले होते , त्याच्याहीपेक्षा जास्त काम बँकेच्या खुर्चीत बसून निरपेक्षपणे करावे लागणार आहे. पारदर्शक काम करत असताना सामान्य शिक्षक सभासदाच्या हिताचा विचार प्राधान्याने करावा लागणार आहे. सर्वच सामान्य शिक्षक बँकेत फक्त कामापुरतेच जात असतात. कधीतरी जाणाऱ्या शिक्षकांना बँकेकडून मिळणाऱ्या सेवा सुसह्य आणि लाभदायक वाटत राहायला हव्यात. शिक्षक बँकेतील कर्मचारी वर्ग अतिशय चांगला आहे. फक्त फोन केला तरी हवी असलेली माहिती मिळत असते. कर्मचारी कामात असले तर थोड्या वेळाने पुन्हा फोन करुन माहिती देतात ही सुद्धा लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. कणकवली शाखेतील गेल्या चार वर्षातील माझा अनुभव सकारात्मक आहे. मी सहसा बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला क्वचित उपस्थित असतो. विरोधकांनी चुकत असलेल्या गोष्टींसाठी विरोध जरुर करायला हवा या मताचा मीही आहे. परंतु विरोधासाठी विरोध करणे हेही योग्य नाही. चांगल्या गोष्टींचे त्यांनी कौतुक करायला हवे. बँकेच्या चांगल्या निर्णयांना मंजुर करण्यासाठी विरोधकांनी सुद्धा हातभार लावणे ही आपल्या सर्व शिक्षक बंधु भगिनींच्या हिताचे आहे. 

          प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात. ती अनेकदा एकसारखी होत नाहीत , म्हणूनच संवादाचे विसंवादात रुपांतर होते. शेवटी बहुमतांनी निर्णय घेतला जातोच. काही बांधव नाराज होतात. त्यांना राजी करताना नाकीनऊ येतात. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असताना त्यांनाही त्रास होतोच. मग तेही पुन्हा प्रवाहात आणि प्रवाहाच्या दिशेने वाहण्यासाठी सिद्ध होतात. त्यामुळे पुन्हा सर्व पूर्वीसारखेच सुरु होणार अशा आशा पल्लवित होण्याची चिन्हे दिसू लागतात आणि आनंद द्विगुणित होत जातो. सर्वांनी आनंदाने राहावे हेच आनंदी जगण्याचे रहस्य असते. हे रहस्य समजत जाईल तसे सर्वच सर्वांना आनंदित ठेवण्याचा प्रयत्न करत राहतील.

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनेलचा सूर्य पुन्हा पाच वर्षांसाठी प्रकाशमान झालेला आहे. कोट्यवधी रुपयांचा व्यवहार करताना सदैव चारित्र्यसंपन्न राहता यायला पाहिजे. जिथे शंका येण्याची जराशी शक्यता वाटत असली तर त्यावर अधिक विचारमंथन होऊन योग्य निर्णयाप्रत यायला पाहिजे. जिथे विरोध होऊ शकतो तीच दुखरी नस असते , ती दुखू न देणे हाच तो एकमेव पर्याय आहे. कोणतेही निर्णय हे व्यक्तिनिष्ठ न होता ते बहुमतांनी आणि एकमत होऊन पारित झाले पाहिजेत. अर्थात मला यांत जास्त तपशीलवार कळत नाही , पण माझा स्वतःचा वैयक्तिक फायदा होत नसेल तर ते मला कळणार नाही असेही नाही. 

          बँकेच्या तख्तावर भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलच्या तेरा जणांची वर्णी लागली आहे. भाग्यलक्ष्मीच्या तेराही उमेदवारांसोबत आणखी दोन आपले विरोधक शिक्षक मित्र सहभागी असणार आहेत. त्यांनाही सदैव सोबत घेऊनच कार्य करावयाचे आहे. त्या उभयतांनीही नेहमी आपल्या शिक्षक बँकेच्या हिताचाच विचार केलेला असणार आहे. 

          भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे भाग्य पुनश्च उजळले आहे. ते सदैव आणि अक्षय उजळत राहो अशी भाग्यलक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. सर्व नवनिर्वाचित संचालकांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील पाच वर्षांच्या दैदिप्यमान वाटचालीसाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( कणकवली ) ( 9881471684 )

Friday, May 12, 2023

🛑 सावंतवाडीचे पाईक : नारायण नाईक

🛑 सावंतवाडीचे पाईक : नारायण नाईक

          सर्व सृष्टी संकटाच्या खाईत असताना आठवण येते ती विष्णू नारायणाची. नारदमुनी तर ' नारायण नारायण ' असा नित्य जप करत असतात. भाग्यलक्ष्मी आणि नारायण यांचं नात सर्वानाच ज्ञात आहे. सावंतवाडीचे भाग्यलक्ष्मी सहकार पॅनलचे विद्यमान उमेदवार नारायण नाईकसर हे भाग्यलक्ष्मीचे पाईक आहेत. निष्ठावंत आहेत. शांत आणि संयत व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण आविष्कार आहेत. 

          स्वतः नारायण रिंगणात उतरले कि विजय ठरलेला असतो. हा विजय ' न भूतो , न भविष्यती ' असणार असे भाकित केले तरी ते खोटे थोडेच ठरणार आहे. आपले सर्व शिक्षक बंधु भगिनी मतदार अतिशय सुज्ञ आहेत. ते जुन्या जाणत्या आणि तरुण तडफदार उमेदवारांचा संयोग असणाऱ्या उमेदवारांना निवडून देणार हे स्पष्ट आहे. 

          सावंतवाडी ही सुंदरवाडी आहे. ती अधिक सुंदर बनण्यासाठी शिक्षक बँकेत ' नारायण ' नाईक जिंकुन आले पाहिजेत. सावंतवाडी बँकेसाठी ' नारायण नावाचं अस्त्र नक्कीच उपयुक्त ठरणार आहे. ज्यांच्या नावात नारायण असतो , ते सदैव अजिंक्य ठरल्याची उदाहरणे आहेत. 

          शिक्षक समितीच्या सभा , अधिवेशनात नारायण नाईक यांची आणि माझी पुसटशी भेट घडत राहते आहे. भेट सतत घडली नाही तरीही एका भेटीतही नारायण नाईकांचा प्रभाव पडण्याइतके ते प्रभावी नक्कीच आहेत. 

          ते आता आमच्या संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहेत हेही विसरुन चालणार नाही. एवढ्या मोठ्या संघटनेचे महत्त्वाचे पद सहजासहजी मिळत नसते. त्यासाठी माणसांत नारायण असावा लागतो. नावाप्रमाणे हा ' नारायण ' त्यांच्यात आहे. आमच्या कणकवली शाखेच्या अनेक कार्यक्रमांना असलेली त्यांची हजेरी म्हणूनच सार्थ ठरते. " ते आले , त्यांनी पाहिलं , ते बोलले आणि त्यांनी जिंकून घेतलं " असंच काहीसं त्यांच्याबाबतीत घडताना दिसतं. 

          एखादं नाटक सुरु असावं आणि अचानक मुख्य नटाच्या घरात दुःखद घटना घडावी. दुःख झालं तरी ' शो मस्ट गो ऑन ' असं म्हणत डोळ्यांतील अश्रूंना आवर घालत प्रयोग पूर्ण करणं हे एका आदर्श अभिनेत्याचं कर्तव्य असतं. तसंच घडलं जिल्हाध्यक्ष नारायण नाईकांच्या बाबतीत. त्यांच्या घरात दुःखद घटना घडली होती. त्यांना दुःख अनावर झालं होतं. त्यांनी आपल्या दुःखावर मात करण्याचा प्रयत्न केला. पोटात अतीव दुःख होतं , पण ते ओठात न आणण्याचा प्रयत्न करत होते. कधीकधी असंही करता आलं पाहिजे. मोठी माणसे सर्वांसमक्ष रडत बसत नाहीत , त्यांचं रुदन आतल्या आत असतं. 

          जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळताना घरातील अशा घटनांकडे भावनाविवश न होता जिद्दीने , चिकाटीने सामना करत राहिले. शाळा , सभा , आंदोलने , मोर्चा यांत सामील झाले. संघटनेला जिल्हाध्यक्ष म्हणून कमतरता जाणवू दिली नाही. आपली उपस्थिती फक्त हजेरीपुरती मर्यादित न ठेवता अनमोल असे मार्गदर्शन करत राहिले. 

          असे कणखर ' नारायण व्यक्तिमत्त्व ' आपल्याला लाभले आहे हे आमचे भाग्य म्हणायला हवे. आम्ही सर्व शिक्षक बंधु भगिनी आमच्या या नारायण नाईकांना प्रचंड बहुमतांनी निवडून आणणारच. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म

🔴 ब्रह्मचैतन्य आणि पूर्णब्रह्म           "आपल्यामध्ये धर्म आचरणाचा गुण असायला हवा," असे माझी आजी नेहमी सांगायची. ती केवळ सांगायची...