Sunday, April 27, 2025

🔴 'कुत्र्यांपासून सावधान'!

          आज सकाळी शाळेच्या वाटेवर नेहमीप्रमाणे कुत्र्यांचे दर्शन झाले आणि पुन्हा तोच विचार मनात घोळू लागला - या कुत्र्यांचे करायचे काय? सकाळी कुणी कुत्रा विव्हळताना ऐकला, की एक अनामिक भीती मनात घर करते, 'काही वाईट तर होणार नाही ना?' ही तीच भीती आहे, जी कदाचित हा अनुभव वाचणाऱ्या प्रत्येकाला जाणवली असेल.

          माझा अनुभव तर याहून वाईट आहे. कित्येकदा या कुत्र्यांनी मला दुचाकीवरून पाडले आहे. नशीब बलवत्तर म्हणून केवळ खरचटलो, हाडं-बिडं मोडली नाहीत. पण या कुत्र्यांना काही होत नाही, आपण त्यांना वाचवायला जातो तेव्हा मात्र आपले हात, पाय किंवा एखादे हाड नक्की मोडते. मग ते सांधेपर्यंत त्या कुत्र्याची आठवण येते, कारण आपल्याला बघायला आलेल्या प्रत्येकाला तो किस्सा सांगताना, त्या सुप्रसिद्ध कुत्र्याचा उल्लेख केल्याशिवाय पर्याय नसतो. सांगताना तर असे वाटते, जणू आपणच भुंकत आहोत!

          हे कुत्रेही कमालीचे असतात! आपल्याला हुलकावणी देतात आणि 'कसं फसवलं?' म्हणत भुंकत भुंकत अचानक गायब होतात. आपण मात्र कोण उठवतंय याची वाट बघत राहतो. 

          काही घरांच्या किंवा बागांच्या बाहेर लावलेली 'कुत्र्यांपासून सावधान' ही पाटी वाचली की आधीच धडकी भरते. मी तर जन्मजात कुत्राभित्रा! ( हा शब्द कुठल्याही शब्दकोशात तुम्हाला सापडणार नाही ) त्यामुळे ती पाटी दिसताच शक्यतोवर तो रस्ता टाळतो. मग नाइलाजाने जावे लागलेच, तर त्या कुत्र्याचे मालक त्याला साखळी बांधून पुढे येतात. पण त्यांच्या हातातून साखळी सुटली तर आपले काही खरे नाही, ही भीती घरी स्वस्थ बसू देत नाही.

          एकदा मी सकाळी लवकर शाळेत निघालो होतो. शासनाने शाळेची वेळ लवकर केल्यामुळे लवकर जावे लागते, हे त्या कुत्र्यांना काय माहीत असणार! ते तर रस्त्याला आपले साम्राज्य समजून आरामात पसरलेले असतात. मी माझ्याच विचारात चाललो होतो, पण समोर येऊन मलाच घाबरवणारा तो कुत्रा मात्र पूर्णपणे सावध होता. त्याने माझी तंद्री पुरती घालवली. त्याने माझ्या गाडीमागे धावायला सुरुवात केली आणि मग सुरू झाली जणू एक शर्यत! मी गाडीचा वेग वाढवला, त्यानेही त्याचा वेग वाढवला. 

          कुत्रा आणि माझ्यामध्ये जीवघेणी स्पर्धा लागली होती. माझ्या गाडीचा वेग खूप वाढला होता, कारण एकतर मला कुत्र्यांची भीती वाटते आणि त्यात हा माझ्या मागे लागला होता. शेवटी माझाच विजय झाला! त्या शर्यतीत मी पहिला आलो आणि तो बिचारा खूप मागे राहिल्यामुळे दुसरा आला.

          पण आता मात्र मला भीती वाटू लागली आहे. जर पुन्हा तो कुत्रा पहिल्या नंबरवर आला तर काय करायचे? म्हणून सगळ्यांना सांगतो, कुत्र्यांपासून सावधान राहा!

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🔴 मला सापाने गिळलं!!!

         मला सापाने गिळलं!!! 

मी तसा सरीसृप वर्गातील प्राण्यांना खूप घाबरतो. त्यात साप म्हटलं की माझी बोबडी वळते. शाळेत असताना माझ्या हातून काही साप मारले गेले, तेही केवळ भीतीमुळे. सरपटणाऱ्या प्राण्यांचा कधी धोका निर्माण होईल याचा नेम नसतो. त्यातल्या त्यात सापांबद्दलची भीती अधिकच गडद.

          कालच ऐकलं, आमच्या नाभिक संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याच्या कुशीत एक साप अगदी आरामात झोपला होता. ते महाशय गाढ झोपेत असल्यामुळे त्यांना काहीच समजलं नाही. जेव्हा जाग आली, तेव्हा उशीर झाला होता. तो एक छोटा अजगर होता आणि त्याला फक्त चावणं एवढंच माहीत होतं. त्याने आमच्या मित्राला चावा घेतला आणि मग शांत झाला. सुदैवाने तो साप बिनविषारी होता, नाहीतर अनर्थ झाला असता.

          खरं तर, साप उंदरांच्या शोधात बाहेर पडतात. पण जर त्यांना उंदीर नाही मिळाले, तर ते माणसांना चावायलाही कमी करत नाहीत, असं म्हणतात. मला मात्र साप पकडता येत नाही. मी सर्पमित्र नाही आणि म्हणूनच सापांपासून शक्य तितकं दूर राहतो.

          यावर्षी आमच्या शाळेत जून महिन्यापासून सापांचं येणं सुरू झालं होतं. पण आम्ही त्यांना शाळेमध्ये अजिबातच दाखल करुन घेतलं नाही. शेवटी, आमच्या धाडसी विद्यार्थ्यांनीच त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. खरं सांगायचं तर, मला जेवढी सापांची भीती वाटते, तेवढी माझ्या विद्यार्थ्यांना नाही. म्हणूनच बहुतेक वेळा तेच पुढे होऊन या कामात मदत करतात. त्यामुळे मी थोडा निर्धास्त असतो. पावसाळ्यात तर हे विद्यार्थी आठवड्यातून एकदा तरी एखादा साप पकडून आणतात आणि त्याला त्याच्या घरी, म्हणजे निसर्गात सोडायला जातात. कधीकधी मात्र निसर्गात सोडणं शक्य नसेल, तर नाइलाजाने त्याला मारलं जाऊ शकतं. कारण त्याच्या चाव्यामुळे शाळेतल्या मुलांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. 

          लहानपणी आम्ही घरी सापशिडीचा खेळ खेळायचो. त्या खेळातल्या सापांना बघूनसुद्धा मला सुरुवातीला भीती वाटायची. पण ते खोटे साप आहेत आणि ते काहीही करत नाहीत हे समजल्यावर मात्र तो खेळ माझा आवडता झाला. आजही अनेक घरांमध्ये हा खेळ असेल का नाही साप जाणे. या खेळात सहा टिंबांची सोंगटी खूप महत्त्वाची असते. एकदा का सहा टिंब पडले की पुन्हा एक डाव खेळायला मिळतो. पण हे सहा टिंब पाडण्याचं कसब सगळ्यांनाच जमत नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा त्या खेळातल्या सापाने मला ‘गिळलं’ आहे!

          आज सकाळी शाळेत जाताना माझ्या छोट्या मुलीने माझ्याकडून एक वचन घेतलं होतं. मीही तिला लगेच वचन देऊन टाकलं. ती म्हणाली, “पप्पा, तुम्ही शाळेतून आल्यावर माझ्यासोबत सापशिडी खेळायचे.” शाळेतून आल्यावर ती माझ्या मागेच लागली. मग काय, पुन्हा लहान होऊन तिच्यासोबत सापशिडी खेळायला बसलो. मला आश्चर्य वाटलं, तिला तर या खेळाचे सगळे नियम माझ्याही आधी माहीत होते! आणि ती सहा टिंबांची सोंगटी कशी टाकायची याच्यात तर चांगलीच तरबेज झाली होती. माझा मात्र प्रत्येक वेळी एकच टिंब पडत होता, आणि त्यामुळे ती मला हसून म्हणायची, “पप्पा, तुमचा एकच टिंब  कसा पडतो?” मी तिला म्हणालो, “अगं थांब, मी तुला आता सहा टिंब  पाडून दाखवतो.” पुन्हा सोंगटी टाकली, आणि काय आश्चर्य, पुन्हा एकच टिंब !

          खेळताना ती माझ्या पुढे गेली, पण तिला सापाने खाल्लं आणि ती पुन्हा खाली आली. थोडं पुढे गेल्यावर मला एका मोठ्या सापाने गिळलं!    

          आणि त्यानंतर मी इतका खाली आलो की लवकर वर पोहोचलोच नाही. मी मागेच राहिलो आणि ती मात्र पटापट पुढे सरकत शेवटच्या घरात पोहोचली. मला हरवल्यावर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. खरं सांगायचं तर, मला सापाने ‘गिळलं’ याचं मला मुळीच दुःख नव्हतं. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघण्यासाठी मला पुन्हा पुन्हा सापाने ‘गिळावं’ असं वाटत राहिलं!

          तुम्हाला काय वाटलं, खरंच मला सापाने गिळलं होतं ?

©️ प्रवीण अशितोष कुबलसर



🔴 अहो! मुंग्यांनी मजला पिछाडीले

          उष्णतेचा पारा वाढला की यांचा सुळसुळाट सुरू! जिथे जावं तिथे या टोळक्यांनी धुमाकूळ घातलेला असतो. जरा काही गोडधोड ठेवलं की नाही, हे सैन्य तिथं हजर! आणि चुकून जरी यांच्यावर हल्ला करण्याचा विचार केला, तर यांचा दंश काय असतो, हे तुम्हाला चांगलंच ठाऊक असेल!

          लहानपणी, आमच्या मातीच्या घरात ढेकणांनी असाच कहर केला होता. माझी आजी बिचारी, एक-एक ढेकण चिरडून त्यांची वस्ती साफ करायची. त्यामुळे अख्ख्या भिंतींवर रक्ताचे डाग दिसत होते, जणू कोणीतरी संकल्पचित्र रेखाटलं होतं! रात्री झोपलो की हे ढेकूण अवतरणार. एकदा का तुमच्या अंथरुणात घुसले, की तुमची खैर नाही! तुम्ही गाढ झोपेत असताना, हे रक्तपिपासू हळूच बाहेर पडायचे आणि तुमच्या शरीरात त्यांच्या चाव्यांचं इंजेक्शन टोचायला सुरुवात करायचे. मग काय विचारता? झोप तर पार उडून जायची!

          आता या मुंग्यांचंही तसंच झालंय. पण या ढेकणांसारख्या फक्त रात्रीच्या ड्युटीवर नसतात, यांचा तर चोवीस तास कार्यक्रम सुरू असतो! साखर दिसली की लपून बसायच्या, गुळाच्या डब्यात घुसून घर करायच्या, तुमच्या गोड पदार्थांवर ताव मारायचा, हा तर यांना जन्मसिद्ध हक्कच वाटतो!

          सकाळी कचरापेटी उघडून बघा, यांची अख्खी फौज अगदी इमानदारीने कामाला लागलेली दिसेल. आणि ती कचरापेटी उचलून नेणाऱ्याला यांचा एक-दोन चाव्यांचा 'प्रसाद' मिळाल्याशिवाय राहात नाही. बरं, जर तुम्ही डोक्याला तेल लावत नसाल, तर ठीक आहे. नाहीतर त्या तेलावर ताव मारण्यासाठीसुद्धा यांची हजेरी ठरलेली! एकदा मला याचा अनुभव आला आहे, म्हणून सांगतोय, सांभाळून राहा!

          आणि यांचे प्रकार तरी किती! लाल मुंग्या, बारीक मुंग्या, डोंगळे, वळंजू (हा माणसांचा नाही, मुंग्यांचा प्रकार!), धावऱ्या मुंग्या, काळ्या मुंग्या, विषारी मुंग्या, चावऱ्या मुंग्या... हे तर मी शोधलेले काही प्रकार! तुमचे अनुभव याहून वेगळे असू शकतात, कारण तुम्हाला या मुंग्यांनी किती छळले आहे, यावर ते अवलंबून आहे. असो, हे मुंगीपुराण काही संपणारं नाहीये!

          परवा होळीला बायकोने मस्त पुरणपोळ्या बनवल्या होत्या. दुसऱ्या दिवशी त्या शिळ्या पुरणपोळ्या आणखी चविष्ट लागतात म्हणून डबा उघडला, तर काय आश्चर्य! त्या लाल मुंग्या आधीच तिथे पोहोचून माझी वाट बघत बसल्या होत्या! मी जसा घास घ्यायला गेलो, तशा त्यांनी माझ्या तोंडाचे लचके तोडले! एवढ्या चांगल्या पुरणपोळ्या मला त्यांनी शांतपणे खाऊ दिल्या तर शपथ! तुमचा तरी काय वेगळा अनुभव असेल, असं मला नाही वाटत!

©️ प्रवीण अशितोष कुबल सर



🔴 बा. स. लाड सर: एक तेजस्वी तारा आकाशात विलीन...

          बा. स. लाड सर... केवळ एक नाव नाही, तर एक प्रेरणास्रोत, एक आदर्श व्यक्तिमत्व! ते एक चालते-फिरते ज्ञानभांडार होते, एक असा अनमोल ग्रंथ ज्याची पाने उघडताच ज्ञानाचा आणि माणुसकीचा सुगंध दरवळतो. माझ्या वडिलांच्या निधनाची दुःखद वार्ता ऐकून, स्वतःची प्रकृती नाजूक असतानाही, त्यांनी मुंबईहून कणकवलीत येऊन मला भेट दिली, हे त्यांच्यातील असीम प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक होते.

          कणकवलीत डीएडच्या काळात, सलूनमध्ये काम करत असताना माझी आणि त्यांची पहिली भेट झाली. आपल्या नाभिक समाजाचा सार्थ अभिमान बाळगणारे ते एक साधे, जमिनीवर पाय असलेले व्यक्तिमत्व होते. तिथेच माझ्या वडिलांशी त्यांची मैत्री झाली, जी 'बाळा कोळंबकर' या प्रेमळ हाकेने अधिक दृढ झाली. मालवणच्या 'न्हिवे-कोळंब' या भूमीतील या तेजस्वी रत्नाला भेटल्यावर प्रत्येकालाच आनंद आणि आपलेपणा वाटत होता. त्यांच्यात अहंकाराचा कणभरही अंश नव्हता.

          कणकवलीच्या काशीविश्वेश्वर मंदिरात सिंधुदुर्ग नाभिक संघटनेच्या कार्यक्रमात त्यांचे ओघवते आणि प्रभावी सूत्रसंचालन आजही माझ्या स्मृतीत जिवंत आहे. अणावकर गुरुजींसारख्या ज्येष्ठ नेत्यांसमोर त्यांची वाणी जणू ज्ञानाचा आणि अनुभवाचा सागर होती, ज्याने मला नेतृत्वगुणांची ओळख करून दिली. त्यांचे ते भाषण माझ्यासाठी एक दिशादर्शक ठरले.

          तळगाव हायस्कूलमधील स्काउटच्या प्रशिक्षणात त्यांचे मार्गदर्शन म्हणजे जणू एका कुशल मार्गदर्शकाने दाखवलेला प्रकाश होता. ते केवळ एक उत्तम शिक्षकच नव्हे, तर एक उत्कृष्ट स्काउट मास्टर होते. काळसे धामापूरच्या त्यांच्या शाळेत त्यांनी अनेक अभिनव उपक्रम राबवले, ज्याच्या कार्याची दखल घेत शासनाने त्यांना अनेक मानाचे पुरस्कार प्रदान केले.

          असे हे उत्तुंग व्यक्तिमत्व, आमच्या नाभिक समाजाचे एक अनमोल रत्न होते आणि राहतील. त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाचा आम्हांला सदैव अभिमान राहील. माझ्या मनात त्यांचे स्थान कायम अढळ राहील.

          त्यांना आदर्श शिक्षक म्हणून गौरवण्यात आले. एक आदर्श शिक्षक म्हणून कार्यरत असताना, सिंधुदुर्ग आणि मालवण तालुका नाभिक संघटनेच्या सामाजिक कार्यांमधील त्यांचा सक्रिय सहभाग आम्हां सर्वांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण होते आणि ते आमच्या आठवणींच्या पानांवर कायमस्वरूपी कोरले जातील यात कोणतीही शंका नाही.

          आणि आता... हल्लीच त्यांच्या दुःखद निधनाची बातमी कानी आली आणि मन एका क्षणासाठी सुन्न झाले. इतके आरोग्यदायी व्यक्तिमत्व अचानक आमच्यातून निघून जावे, यावर विश्वास बसणे कठीण आहे. हे लिहित असताना, जर त्यांचा पावन आत्मा माझ्या आसपास असेल, तर माझ्या या शब्दांच्या रूपात मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.


©️ प्रवीण अशितोष कुबल, तालुका सरचिटणीस, कणकवली नाभिक संघटना




























Saturday, April 19, 2025

फोन आले आणि पत्र गेले!

 

फोन आले आणि पत्र गेले!

    आजकाल फोनने आपल्या जीवनात अशी काही क्रांती घडवली आहे की, पूर्वीच्या पत्रव्यवहाराच्या आठवणीही धूसर झाल्या आहेत. एकेकाळी ज्या पत्रांसाठी आपण डोळे लावून बसायचो, ज्या पत्रांमधून आपल्या मित्र-मैत्रिणींच्या भावनांचा ओलावा अनुभवायचो, ती पत्रं आता इतिहासजमा झाली आहेत. आता जमाना आहे ‘फोन मित्रां’चा! कधीतरी एखाद्या कार्यक्रमात पुसटशी भेट झालेली व्यक्ती असो, किंवा केवळ एका चुकीच्या नंबरमुळे झालेली ओळख असो, आता फोनच्या एका क्लिकवर मैत्री फुलते आणि बोलणं सुरू होतं.

    खरं तर, हे फोन मित्र सोयीचेही आहेत आणि डोकेदुखीचेही. एका क्षणात संपर्क साधता येतो, आवाज ऐकता येतो, पण त्याचबरोबर फेक कॉल्स आणि अनोळखी त्रासदायक फोनमुळे मन वैतागून जातं. त्यामुळे आता फोन उचलण्यापूर्वी आणि बोलतानाही खूप सावधगिरी बाळगावी लागते. कोण बोलतोय, कशासाठी बोलतोय, हे समजून घेऊन फोन कट करण्यातच शहाणपण असतं.

    अखेरीस, फोन करणं, येणं, घेणं, त्यावर किती वेळ बोलायचं किंवा फक्त कामापुरतं बोलायचं, हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून असतं. माझ्या बाबतीत बोलायचं झाल्यास, माझे अनेक मित्र आहेत, पण मैत्रिणींचे फोन कामाशिवाय क्वचितच येतात. मित्रही उगाच फोन करून त्रास देत नाहीत. मी स्वतः कोणालाही विनाकारण फोन करून तासनतास बोलणं टाळतो, कारण प्रत्येकाचा वेळ महत्त्वाचा असतो. शिक्षक आणि मुख्याध्यापक असल्याने पालकांचे फोन येतात आणि ते माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. नातेवाईकांचे फोन कमी असतात, पण त्यातही आता लग्नाळू मुला-मुलींच्या माहितीसाठीचे फोन जरा जास्त असतात.

    आता जर तुम्हाला कोणतेच फोन नको असतील, तर फोन स्विच ऑफ करणं हा उत्तम उपाय आहे. पण महत्त्वाचा फोन येण्याची शक्यता असेल, तर नाइलाजाने फोन चालू ठेवावा लागतो. संध्याकाळी कामावरून आल्यावर अनेकजण निवांतपणे फोनवर बोलताना दिसतात. कदाचित दिवसभराचा थकवा आणि एकाकीपणा दूर करण्याचा तो त्यांचा मार्ग असेल.

    आजकालची तरुण पिढी तर कमालच करते! सतत कानाला ब्लूटूथ डिव्हाइस लावून फिरताना दिसतात. त्यांचे तर महत्त्वाचे फोन कधी थांबायचेच नाहीत! समोरून कोण बोलतंय आणि इकडून कधीतरी 'हं' किंवा 'अच्छा' असे अस्पष्ट प्रतिसाद येत असतात. त्यांची ती कोड लँग्वेज आमच्या जुन्या पिढीला लवकर कळत नाही, त्यासाठी खरंच पीएचडी करावी लागेल! ही मंडळी अक्षरशः फोनला कायमची चिकटूनच असतात. रेंज गेली की यांचा प्रॉब्लेम होतो खरा. प्रवासात तर यांच्या फोनचा पुरेपूर वापर सुरू असतो. मोबाईल बाजूला ठेवण्याचं नावच घेत नाहीत. बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत 'लगे रहो' हे ब्रीदवाक्य ते अगदी इमानदारीने पाळतात.

    त्या दिवशी मी सावंतवाडीहून कणकवलीपर्यंत एसटीने प्रवास करत होतो आणि मला हे सगळं प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. आजकाल फोन आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे, यात शंका नाही. पण या सोयीमुळे पूर्वीच्या हळुवार आणि भावनापूर्ण पत्रव्यवहाराची जागा घेतली, याची खंत नक्की वाटते. फोनमुळे जग जवळ आलं खरं, पण माणसांमधील संवाद आणि जिव्हाळा काहीसा हरवला की काय, असं कधीकधी वाटून जातं.

© प्रवीण अशितोष कुबल 

Friday, April 18, 2025

🔴 'यक्ष उद्धार' - कलेच्या रंगात रंगलेली शिक्षक मंडळी!

          माझ्या मनात 'यक्ष उद्धार' या दशावतारी नाटकाच्या आठवणी ताज्या आहेत. नुकताच कणकवली तालुका प्राथमिक शिक्षक समितीच्या त्रैवार्षिक अधिवेशनाचा भाग म्हणून हा नाट्यप्रयोग सादर झाला आणि आजही त्यातील रंगत कायम आहे. या नाटकाने केवळ प्रेक्षकांची मने जिंकली नाही, तर कलाकारांच्या भूमिकेत असलेल्या माझ्या शिक्षक बंधू-भगिनींच्या कलागुणांची एक अविस्मरणीय छाप सोडली.

          दिग्दर्शक आणि कलाकार संतोष तांबे यांनी साकारलेला यक्ष केवळ प्रभावी नव्हता, तर त्यांनी त्या पात्राला एक वेगळी उंची दिली. सदाशिव राणे यांनी पार्वतीची भूमिका सहजतेने आणि समर्थपणे साकारली. मंगेश राणे यांचा ब्रम्हराक्षस भीती आणि उत्सुकता निर्माण करणारा होता, तर निलेश ठाकूर यांच्या सोमा गुराख्याच्या भूमिकेतील निरागसता आणि सहजता भावली.

          राजेंद्र गोसावी यांनी राजा सूर्यसूताची भूमिका मोठ्या दिमाखात साकारली, त्यांच्यातील आत्मविश्वास आणि तेज प्रेक्षकांना खिळवून ठेवले. अजय तांबे यांनी विरभद्राची भूमिका तितक्याच ताकदीने साकारली. राज कदम यांनी सुमतीच्या भूमिकेतून स्त्री पात्राला न्याय दिला.

संगीत नाटकाचा आत्मा असतो आणि या नाटकाला सुनिल गावकर यांच्या हार्मोनियमने, सोहम मेस्त्री यांच्या मृदुंगाने आणि समर्थ सूतार यांच्या झांजेने उत्कृष्ट साथ दिली. या वाद्यांच्या सुमधुर संगीताने नाटकातील दृश्यांना अधिक जिवंत केले. आणि हो, गणपतीच्या भूमिकेतील शिक्षक कलाकार, दिनेश जंगले आणि ऋतुजा जंगले (रिध्दी-सिद्धी), यांनी आपल्या निरागस अभिनयाने कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात केली.

          दर तीन वर्षांनी होणारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका कणकवलीचे त्रैवार्षिक अधिवेशन हे केवळ शिक्षकांच्या भेटीगाठीचे ठिकाण नसते, तर ते आमच्यातील कलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्याचे एक सुंदर व्यासपीठ असते. यावर्षी 'यक्ष उद्धार' नाटकाच्या माध्यमातून माझ्या शिक्षक सहकाऱ्यांनी कलेची एक उत्कृष्ट मेजवानी दिली.

          मी स्वतः या नाटकाच्या प्रत्येक क्षणाचा साक्षीदार होतो, कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या अविस्मरणीय दृश्यांना कैद करत होतो. शूटिंगमध्ये व्यस्त असतानाही मी नाटकाच्या रंगात पुरता रंगून गेलो होतो. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका इतक्या तन्मयतेने साकारली होती की, क्षणभरही असे वाटले नाही की हे व्यावसायिक कलाकार नाहीत. त्यांचे समर्पण, त्यांची मेहनत आणि कलेवरील त्यांचे प्रेम स्पष्ट दिसत होते.

          'यक्ष उद्धार' हे केवळ एक नाटक नव्हते, तर ते आमच्या शिक्षक कुटुंबातील स्नेह, एकजूट आणि कलात्मकतेचा सुंदर नमुना होता. या नाटकाने केवळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले नाही, तर आम्हा सर्वांना एक वेगळा आनंद आणि प्रेरणा दिली. या अप्रतिम अनुभवासाठी सर्व कलाकारांचे आणि समितीचे मनःपूर्वक आभार! अशा कलात्मक प्रयत्नांमुळेच शिक्षकी पेशा अधिक समृद्ध आणि आनंदी बनतो, यात शंका नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबल






































💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...