Tuesday, September 10, 2024

🛑 मत्स्यगंधा

🛑 मत्स्यगंधा

          मत्स्यगंधा माझ्या आयुष्यात आली. माझ्या बालपणात या मत्स्यगंधेची आणि माझी भेट झाली. मत्स्यगंधा म्हणजे कोण ? हा प्रश्न वाचकांना पडणार याचे मला भान आहे. तिचा आणि माझा संबंध होता याबद्दलही अनेकांना कुतूहल वाटल्याशिवाय राहणार नाही. 

          काल कितीतरी वर्षांनी मला ही मत्स्यगंधा पुन्हा एकदा भेटली. मला खूप आनंद झाला. सलग पाऊण तासापेक्षा जास्त काळ मी तिच्यासोबत होतो. हे वाचून तर तुमचा गैरसमज अधिकच वाढणार याबद्दल मला खात्रीच झाली आहे. 

          मला लहानपणापासून भजनांची खूप आवड. ही भजने करताना, भजने ऐकताना ही मत्स्यगंधा मला भेटली. ही अदृश्य मत्स्यगंधा मला पुढे दरवर्षी गणेश चतुर्थीला भेटू लागली. गेले काही वर्षे ती मला भेटली नव्हती. काल ती अनेक वर्षांनी पुन्हा भेटली तेव्हाचा आनंद मी शब्दांत व्यक्त करताना कमी पडेन. 

          आमचा नेहमीचा बुवा. हेमंत बुवा लाड याने आमची आणि तिची अनेक वर्षानंतर पुनःश्च भेट घडवून आणली. या अविस्मरणीय भेटीचे श्रेय पूर्णपणे ' हेमंत लाडबुवा ' यांनाच द्यायला हवे. त्यामुळे माझ्या तिच्यासोबतच्या आठवणी पुन्हा जागृत झाल्या.

         कोकण दर्शन गजराचे निर्माते कै. परशुराम पांचाळ यांनी माझ्या बालपणात सादर केलेल्या ' मत्स्यगंधा ' भारुडाबद्दल मी बोलतोय. परशुराम पांचाळबुवा माझे आवडते भजनीबुवा. त्यांना मी प्रत्यक्ष ऐकले आहे. त्यांचा ' कोकण दर्शन ' हा गजर माझा सर्वात लाडका गजर. डीएडला असताना ' कोकण दर्शन ' हा गजर मी एकदा किंवा दोनदा तरी परिपाठात सादर केल्याचे आठवते. त्यावेळी कॅसेट्स होत्या. टेपरेकॉर्डर होते. त्यांची ही कॅसेट मी कित्येकदा ऐकली असेन. त्यामध्ये मला ' मत्स्यगंधा ' सापडली. पांचाळबुवांनी रचलेले मत्स्यगंधा भारूड लोकं अजूनही शेवटपर्यंत ऐकतात. त्यांच्या आवाजात ताकद होती. त्यांच्या शब्दांना अर्थ होता. त्यांचा लय, सूर आणि ताल उल्लेखनीय होता. त्यातील कथा सांगण्याची त्यांची पद्धत पुढे पुढे ऐकत राहण्यासारखी असे. त्यामुळे त्यांना पुन्हा ऐकावे असे अजूनही वाटते. कंटाळा येत नाही. आळस तर अजिबातच येत नाही. उलट आळस कुठल्या कुठे पळवून लावण्याची किमया पांचाळबुवांच्या गायनात होती. 

कोळ्याची कन्या मत्स्यगंधा आणि पराशर ऋषी यांच्याबद्दल त्यात अधिक माहिती सांगितली आहे. नव्या आणि जुन्या गीतांच्या चालींचा त्यात सुरेख संगम साधला आहे. म्हणून आपण पण पांचाळबुवांनी सादर केलेल्या रचनांच्या प्रेमात पडतो. 

          मला जात्याच गाण्यांची आवड आहे. त्यात असे पांचाळबुवांसारखे शास्त्रीय गायन करणारे बुवा असले तर माझ्यासारख्या भजनवेड्यांसाठी ती पर्वणीच असते. मी आणि माझा भाऊ दोघांनीही त्यावेळी अनेकदा या मत्स्यगंधा भारुडाचे पारायणच केले होते म्हणानात. 

          हेमंत बुवांनी हे ' मत्स्यगंधा ' भारूड म्हणून पुन्हा आमच्या दोघांच्या लहानपणीच्या आठवणी जागृत करुन आम्हांला जो आनंद दिला आहे त्याची गणना करता येणार नाही. अशी ही ' मत्स्यगंधा ' पुनःश्च मला भेटली होती. ती पुन्हा जेव्हा कधी भेटेल तेव्हा कदाचित एखादे वर्ष झालेले असेल. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Sunday, September 8, 2024

🛑 पाहिला गजानन

🛑 पाहिला गजानन

         आपला गणपती पाहिला कि आपलं मन भरुन येतं. गणपती चित्रशाळेत ऑर्डर दिल्यापासून आपलं गणपतीवर लक्ष असतं. आपला गजानन सुस्वरूप दिसावा ही आपल्या घरातील सर्वांचीच तीव्र इच्छा असते. 

          चित्रशाळेत सर्वांचे गणपती असतात. पण आपला गणेश सर्वांचे लक्ष वेधून घेणारा असायला हवा असं प्रत्येकाला वाटतं. आपला गणपती आपल्याला खूप खूप आवडतो. अर्थात सर्वांचेच गणपती सुंदरच असतात, पण आपला गणपती आपल्या मनात भरलेला असतो. 

          माझे बाबा गणपती सुंदर बनवत. असे हे सुंदर गणपती पाहण्यासाठी दररोज आमच्या चित्रशाळेत झालेली गर्दी मी प्रत्यक्ष पाहिली आहे. सुबक गणपती होईपर्यंत बाबा गणपती बाजूला करत नसत. बाबांच्या समोर प्रत्येक गणपती येणारच असे. तो अधिक सुंदर होऊन जाताना बाबांनी त्यात आपला जीव ओतलेला असे. त्यांचे निरीक्षण अफलातून होते. एकही चूक कधीही त्यांच्या नजरेतून सुटत नसे. त्यामुळे गणपती घेऊन जाणारे लोक खुश होऊन जात. पाच पन्नास रुपये जास्त देऊ शकणाऱ्यांपेक्षा खुश होऊन जाणारे लोक बाबांना आणि आम्हांलाही जास्त आवडत. 

          बाबांची गणपतीची शाळा पुढे चालू राहावी ही सर्वांचीच इच्छा आहे. बाबा गेल्यानंतर चित्रशाळेतील त्यांची उणीव कधीही भरुन न येणारी. त्यांची जागा काका, बाला आणि भाऊ यांनी घेतली आहे. हे तिघेही दिलेली जबाबदारी अधिक गंभीरपणे पेलत आहेत ही विशेष नमूद करण्यासाठी गोष्ट आहे. मी त्यांच्यात कोणत्याही प्रकारे इंटरफियर करीत नाही. 

          गणेश चतुर्थीचा दिवस आमच्यासाठी ' गाजावाजा ' असणारा दिवस असतो. गणपती न्यायला येणारे लोक आपल्या सोबत संपूर्ण कुटुंबाला घेऊन येत असतात. गणपती वाहून नेण्यासाठी ते गाड्या घेऊन येतात. काही वेळा वाजंत्री मंडळेही घेऊन येतात. अशी मज्जा असणारा हा दिवस पुन्हा येण्यासाठी एक वर्षभर वाट पाहावी लागते. आम्ही गणपतीच्या शाळेचे मालक आहोत हा आमचा अभिमान असतो. हा अभिमान आमच्या कुटुंबातील महिलांना सुद्धा द्यायला हवा. आमच्या घरातील माझ्या बहिणी गायत्री, तृप्ती यांनी गणपतींना अधिक उत्तम दिसण्यासाठी केलेले सजावट काम बघत राहावे असेच असते. 

          गणपतींच्या यादीत आमच्या गणपतीचे नाव ' घरचा गणपती ' असे लिहिलेले असते. सगळ्यांचे गणपती घरपोच गेले कि आमच्या घरच्या गणपतीचे आगमन होण्याची वेळ येते. घरातील मुले माणसे यासाठी आतुर झालेली असतात. शेवटी गणरायाचे आगमन होते. सुस्वरूप तेजस्वी दृष्टीने आमच्याकडे पाहणारा आमचा गणराय आमच्याकडे पाहू लागतो. त्याने प्रत्येकाकडे पाहत राहावे असे आमच्या सतत मनात असते. आम्ही समोर जिथे उभे राहू, तिथून तो आमच्याकडेच बघतोय असा आमचा गणपती असतो. 

          आरती सुरु झाली. आरती म्हणजे बाबांचा आवडता विषय. दुपारी आणि रात्री जोशात आरती झालेली बाबांना हवी असे. आज बाबा नाहीत म्हणून मला आरती घ्यावी लागली. आरती घेण्याचा बाबांचा पहिला मान. यंदा ही पहिली चतुर्थी असेल ज्या दिवशी बाबा नाहीत. बाबा आरतीत दंग होऊन जात. आरतीचे स्वर बाबांनी ऐकले आणि बाबा पहिल्या आरतीला आले. आले म्हणजे माझ्या वहिणीच्या अंगात आले. माझ्या हातातील आरती गरम झाली होती, चटके बसू लागले होते. तरीही मला तशीच गरम आरती त्यांच्या हातात द्यावी लागली. बाबांनी थरथरत्या हातांनी आपल्या गणपतीला ' आरती ' ओवाळली आणि आपला सुंदर गजानन पाहिला. आम्ही आमचा गजानन पाहिलाच, पण बाबांनीही तो पाहिला याचा आनंद सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आणून गेला. 

 ©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१

Wednesday, September 4, 2024

🛑 बाबांविण नाही दुजा आधार

 🛑 बाबांविण नाही दुजा आधार 

          बाबा मला नेहमीच गुरुच्या जागी आहेत. मी आयुष्यात अनेक गुरूंचे मार्गदर्शन घेतले आहे. त्या सर्वांचे शिक्षक दिनादिवशी ऋण व्यक्त करतो. बाबा माझे पहिले शिक्षक होते. त्यांच्याशिवाय मी अधुरा आहे. ते गेले आणि माझा भक्कम आधारच गेला. शरीरातील स्फूल्लिंगाइतके तरतरी पेरणारे माझे बाबा मला अधिक जवळचे होते. 

          ते गेल्यानंतर मी सगळ्या गोष्टी नियमित करतो आहे. पण त्यांची उणीव भरुन येत नाहीच. ते नाहीत म्हणजे काहीच नाही. ते आहेत म्हणजे सर्वकाही आहे. त्यांच्या सगळ्या गोष्टी मला आज आता अगदी जशाच्या तशा आठवत आहेत. मी त्या विसरता येणे अजिबात शक्यच नाही. 

          दोन दिवसांवर गणपती येत आहे. आज माझे बाबा असते तर गणपतीच्या आगमनाची त्यांनी जय्यत तयारी केली असती. मी सुद्धा करणार पण त्यांची सर मला अजिबातच येणार नाही. त्यांचा गणपतीवर भारीच जीव होता. त्यांच्या हातात गणपतीची माती जिवंत होत असे. त्यांनी माती वळवली ती त्यांना हवी तशी वळत असे. 

          बाबांनी आमच्या देहाच्या मातीला असेच वळवले. त्यांना हवे तसे वळवले आणि सुंदर संस्कारीत बनवले. त्यांनी केलेले संस्कार आजच्या पिढीसाठी आदर्श आहेत. ते शिक्षक नव्हते, पण शिक्षकांपेक्षा वरचढ होते. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त पुस्तके आणि जास्त माणसे वाचली होती. त्यांच्या ज्ञानाची भूक कधीही न संपणारी होती. 

         त्यांनी सांगितलेल्या गोष्टी केल्या तर यश नक्की मिळे. नाही केल्या तर यशापर्यंत पोहोचताना त्यांच्या शब्दांची आठवण येत राही. आता बाबा नसले तरी ते सतत माझ्यासोबतच आहेत असा मला अनुभव येतो आहे. कोणतीही गोष्ट करताना बाबांना विचारून करण्याची माझी सवय होती. आता सुद्धा मी त्यांच्याशी हृदय संवाद साधू शकतो. ते अदृश्य रुपाने आमच्यात वास करतात. ते घरातील प्रत्येक गोष्टीत लपलेले दिसतात. त्यांची नजर कायमच आमच्यावर भिरभिरते आहे. माझ्यावर जरा जास्तच. का कोण जाणे, पण त्यांनी मला झिला म्हणावे असे मला सतत वाटत राही. त्यांची ती गोड हाक आज ऐकू येत नाही आणि मी कमालीचा कावराबावरा होतो. 

          त्यांचे अदृश्य अस्तित्व माझे चैतन्य बनले आहे. त्यांचा हा अदृश्य सहवास मला लाभतो आहे हे माझे भाग्यच. मी त्यांना कदापि विसरूच शकणार नाही. 

          माझी पत्नी गेल्यानंतर सुद्धा मी असाच झालो होतो. तिच्या आठवांनी मी सतत डोळ्यात पाणी आणत असे. ती गेल्याचे दुःख प्रचंड होते. ती गेल्यावर मी दुसऱ्या पत्नीमध्ये तिचे रुप पाहिले. त्यामुळे ती अजूनही माझ्याजवळच आहे असे मी स्वतःला समजावून समजावून आता ती तीच आली आहे या निर्णयापर्यंत आलो आहे. आपले जीवन पुनःश्च होते तसेच जगायचे असेल तर मी बाळगलेला दृष्टिकोन मला बरोबर वाटतो.

          बायकोची रिप्लेसमेंट करता आली हे चांगलेच झाले. पण बाबांची जागा भरुन कशी काढणार ? ते कुडीने माझ्यासोबत नाहीत, ते पवित्र आत्म्याच्या रूपाने सतत माझ्या पाठीशी आहेत हा दृष्टिकोन मला नियमित जागृत ठेवावा लागण्याशिवाय गत्यंतर नाही.

          काल रात्री झोपताना बाबांच्या आठवणी सांगत असताना माझी छोटी मुलगी उर्मी मला म्हणाली, " पप्पा, आता अजून बाबांना आठवू नका, मला रडू येते आहे. " तिच्या त्या शब्दांनी आमच्या सर्वांच्याच डोळ्यातून घळाघळा पाणी ओघळू लागले होते. 

©️ प्रवीण अशितोष कुबल 

मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...