Thursday, November 17, 2022

🛑 प्रसिद्धी गणेशु

🛑 प्रसिद्धी गणेशु

          प्रसिद्धी करणं ही खूप कठीण गोष्ट नसली तरी सोपी मात्र अजिबात नाही. त्यासाठी अभ्यास लागतो. अभ्यास केल्यावर ती साध्य होणारी गोष्ट आहे. काहींना दुसऱ्यांची चांगली प्रसिद्धी करणं आवडतं. आपली स्वतःची प्रसिद्धी अशांना अजिबात नको असते. 

          असंच एक हसतमुख व्यक्तिमत्त्व म्हणजे गणेश चव्हाण. ते फक्त पत्रकारिता करत नाहीत , तर ती जोपासतात. ते एक उत्तम पत्रकार आहेत आणि खूप काही आहेत. पत्रकार हा त्यांचा एक पैलू आहे. त्यांच्या सहवासात जावं , तसे त्यांचे इतर पैलू दिसू लागतात. त्याचं बोलणं , त्यांचं वागणं , त्यांचं आदर देणं या सर्व गोष्टी मनाला अंतर्गत स्पर्श करीत जातात. 

          श्रावण गावातील हा एक हिरा आहे. हा माणूस स्वतः हिरा असला तरी दुसऱ्याचं आयुष्य चमकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतो. कोणत्याही अपेक्षेने त्यांनी कार्य केलेलं नसतं. परोपकारी वृत्तीच त्यांना तसं करण्यासाठी भाग पाडते. कधी ते ऑटोरिक्षा चालवताना दिसतील तर कधी व्हॅन. कधी ते समाजसेवा करताना दिसतील. कधी ते छान लेख लिहून पाठवतील. लोकांना प्रेरणा देण्याचं महत्त्वाचं कार्य ते नेहमीच करताना दिसतात. त्यांचं ते अतिशय आवडीचं काम असतं. ते करताना त्यांना जो आनंद होत असतो तो आम्ही त्यांच्या चेहऱ्यावर अनेकदा पाहिला आहे. अर्थात कोणत्याही मानधनाची अपेक्षा त्यांनी कधीही केलेली नसते हे विशेष आहे. 

          ' जाता जाता भलं करावं ' या सुविचाराने ते नेहमीच प्रभावित झालेले मी स्वतः पाहिले आहेत. शिक्षणाने माणूस हुशार होतो , असे असले तरी त्यांनी आपल्या शिक्षणाच्या पदव्या कधीही पुढे पुढे केल्या नाहीत. उच्चशिक्षित असूनही एका साध्या , सरळ माणसाचं जीवन ते जगताना दिसतात. आपल्या शिक्षणाचा त्यांनी कधी टेंभा मिरवला नाही. 

          सिंधुदुर्ग जिल्हा नाभिक समाजाशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध राहिला आहे. गोवा राज्यातील अखिल गोमंतक नाभिक समाजाशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत. हल्लीच कुडाळ येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय सभेत त्यांची जिल्हा प्रसिद्धी प्रमुख या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली हे आमच्यासाठीही अभिमानास्पद आहे. प्रसिद्धी करणाऱ्या व्यक्तीलाच प्रसिद्धी प्रमुख हे पद मिळून त्या पदालाही योग्य असा न्याय मिळाला आहे असे आम्ही मानतो. त्यांचं प्रसिद्धीचं कार्य अविरत सुरुच आहे. त्यात खंड पडणार नाही यात तिळमात्र शंका नाही.

          आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांच्याबद्दल लिहिणं हे मी माझं कर्तव्य समजतो. हे शब्द जसे सुचतील तसे लिहित गेलो आहे. त्यांच्यासोबतच्या निवडक आठवणी असल्या तरी त्यांची प्रत्येक भेट माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरलेली आहे हे सांगायला मला अतिशय आनंद होतो आहे. अशा या ' प्रसिद्धी गणेशु ' यांना त्यांच्या पुढील भव्य दिव्य आयुष्यासाठी कोटी कोटी शुभेच्छा.

©️ प्रवीण कुबल ( कणकवली ) 9881471684



Friday, November 11, 2022

🛑 कुठे हरवली मळणी

🛑 कुठे हरवली मळणी

          पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नुकताच रत्नागिरी जिल्हा परिषद शाळेत जामगे सीमावाडी येथे हजर झालो होतो. त्या आठवणी अजूनही ताज्या वाटत आहेत. त्या सर्व आठवणी स्मरणकुपीत जतन करुन ठेवण्यासारख्याच आहेत , म्हणून जपून ठेवल्या आहेत. 

          मी तेव्हा एकवीस बावीस वर्षांचा असेन. मिशीसुद्धा दिसत नव्हती. दाढी तर आलीच नव्हती. शाळेत शिक्षक असल्याने मोठ्या वयस्कर माणसांचा आदर स्विकारताना भारावून जायला होत होते. दोन वाड्यांच्या मध्यभागी द्विशिक्षकी शाळा होती. शाळा रस्त्यालगत होती. त्यावेळी तो मार्ग एसटी साठी सुरु झाला नव्हता. शाळेपासून जवळपास शेतीच शेती होती. त्यामुळे भात कापणी झाल्यानंतर शाळेसमोरुन भाताच्या पेंड्या नेताना पालक , गावकरी यांच्या भेटीगाठी होत असत. त्यांच्या मनात शिक्षकांबद्दल कमालीचा आदर असे. डोळ्यात बघून ते कधीही बोलत नसत. ' गुर्जी , गुर्जी ..... अशी प्रेमळ हाक तिथे कायम ऐकू येई. त्यात असलेला आदर ओसंडून वाहत असल्यासारखा असे. त्यात कृत्रिमता अजिबात नसे. 

          मी तेव्हा एका रिकाम्या घरात राहत होतो. मोरे , शेलार आणि सुर्वे नावांच्या घरमालकांनी दिलेले प्रेम विसरलेलो नाही. सुर्वे आणि शेलार यांच्या घरात त्यांचं कुटुंब होतं. मोरे यांचं बंद घर मला शाळेपासून जवळ होतं. म्हणून मी तिथे राहायला लागलो. 

          शाळा सुटल्यानंतर मी त्या रिकाम्या घरात एकटाच कंटाळून जाई. मग हळूहळू मी सायंकाळची अभ्यासिका घेऊ लागलो. दहा पंधरा मुले दररोज अभ्यासासाठी येऊ लागली. त्यांना येणाऱ्या शंका मी सोडवू लागलो. त्यांना न्यायला पालक येत असत. त्यामुळे सगळ्या पालकांशी माझी चांगली ओळख झाली. 

          ओळखी सुरु झाल्या होत्याच आणि भात कापणीचे दिवसही सुरु झाले होते. कापलेले भात एकावर एक रचून ठेऊन नंतर समूहाने एकदम झोडण्याची त्या लोकांची सवय माझ्यासाठी नवीनच होती. 

          आमच्या गावी गाईबैलांचा किंवा रेड्यांचा वापर करुन मोठ्या जाड खांबाभोवती भात पसरवून मळणी करत असत. गुरांच्या पायाखाली पेंड्या तुडवल्या जात. त्याखाली भाताच्या पेंडीला उरलेसुरले शिल्लक भाताचे  गोटे तुटून पडत. दोन तीनदा असे करुन मग भाताच्या पेंड्यांचे गवतात रूपांतर होई. ते गवत गुरांना चारा म्हणून वापरले जाई. लहानपणी आम्ही कधी गावी गेलो असताना रात्री रात्री गॅसबत्तीच्या उजेडात मळण्या बघितल्या आहेत. 

          मोठया पाटावर भात झोडल्यावर काही दिवसानंतर ही मळणी पार पडे. मळणी झाली की घरात मस्त गरमागरम पिठी आणि उकडाभात भरपेट खायला मिळे. लाकडी डोण्यात ठेवलेल्या उकड्या पेजेवर दुधासारखी जाड सुरसुरीत साय जमा झालेली दिसे. तशी उकडी पेज आता पाहायला मिळत असेल असे वाटत नाही. मातीच्या गोलीमध्ये पेज केली जात असे. गोली म्हणजे मातीची कळशी. ती चुलीवर ठेऊन ठेऊन काळीकुट्ट झालेली असे. त्यात बनलेली पेज मात्र पांढरीशुभ्र दिसे. करवंटीच्या डवलीतून पेज वाढणारी माझी आजी सर्वांना प्रेमाने पुन्हा पुन्हा वाढत राही. तिला नाही उरली तरी खरवडून वाढणारी आजी आज जिवंत हवी होती. 

          रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ग्रामीण भागातील मळणी म्हणजे सामुहिक भात झोडणीच असे. एका दिवसांत त्यांची मळणी आणि झोडणी पूर्ण होताना मी बघितली आहे. 

          त्या दिवशी माझ्याकडे माझा एक शिक्षक मित्र आला होता. आम्ही मालवणी भाषेत मस्त बोलत होतो. कितीतरी दिवसांनी मालवणीत बोलण्याची संधी मिळाली होती. गावाकडे आल्यासारखा अनुभव येत होता. मस्तपैकी गाव गाता गजाली सुरु होत्या. तेवढ्यात एक विद्यार्थी निरोप घेऊन आला. म्हणाला , " गुर्जी , गुर्जी , तुम्हाला आमच्या मळणीकडे बोलावले आहे."   आम्हांला गंमतच वाटली. आम्ही दोघेही धावतच मळणीच्या ठिकाणी गेलो. मळणीचा धबधब आवाज येत होता. मोठ्या काळ्या पत्थरावर भाताच्या ओंब्या रपारप आपटल्या जात होत्या. पिवळेजर्द भाताचे दाणे चहूकडे उडत होते. आम्हीही सहज मळणीत भाग घ्यायला जाण्याच्या प्रयत्नात होतो. पण आम्ही आल्याचे समजताच मळणी करणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आम्हांला आदरपूर्वक नमस्कार केला आणि बसण्याची विनंती केली. 

          आम्ही आतल्या खोलीत जाऊन बसलो. पाच दहा मिनिटांत आमच्यासमोर कोंबडीचे जेवण आले. आमच्याकडे ज्याला ' वडे सागोती ' म्हणतात , तसा त्यांचा जेवणाचा बेत पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो. सगळ्यांच्या जेवणापूर्वी आम्हाला आदरपूर्वक वाढण्यात आले होते. पुन्हा पुन्हा आग्रहाने वाढले गेले. नारळाच्या वापराशिवाय केलेल्या जेवणाची एव्हाना सवय झाली होती. 

          आमचे जेवण झाले तरी मळणी सुरु होतीच. मळणी संपल्यावर सर्व मंडळी जेवली असतील. त्यांनी आम्हां शिक्षकांना प्रथम जेवण्याचा मान दिला होता. त्यातले काही लोक कधीही शाळेत गेले नव्हते , तरीही शिकलेल्या माणसांपेक्षा जास्त आदर देण्यास शिकलेले पाहून माझं शिक्षण मला त्यांच्यासमोर खुजं वाटायला लागलं. 

          त्यानंतर प्रत्येकवेळी आम्हाला मळणीच्या जेवणाला बोलावणे व्हायचे. नेहमी तसाच आदर पाहायला मिळायचा.  ही मळणी आणि आदर दोन्ही आता हरवलीत की काय ? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. नवीन युगातील तंत्रज्ञान वापरून केली जाणारी मळणी आणि आदर या दोहोंचा आज अंगीकार करण्याशिवाय पर्याय नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर

( 9881471684 )




Sunday, October 23, 2022

🏮🏮HAPPY DIWALI 🏮2022

 🏮🏮HAPPY DIWALI 🏮2022


सुसंधी , आशा आणि आकांक्षा यांनी उजळून जावो तुमचं जीवन.....

साजरा करा उत्सवी आनंद....

तुमच्या जीवनात येऊ दे पुन्हा एक नवी पहाट..

पुन्हा एक नवी आशा..

तुमच्या कर्तृत्वाला..

पुन्हा मिळू दे एक नवी दिशा....

दीपोत्सवाने आपले जीवन आनंदाने व सुखाने उजळू दे...

आपणां सर्वांना दिवाळीच्या ' पवित्र ' शुभेच्छा ....

आरोग्य आणि संततीसौख्य लाभो...

सार्वजनिक क्षेत्रात यश मिळो...

आध्यात्मिक ओढ लागो...

भाग्य उजळो...

मोठ्या पराक्रमाचे वर्ष जावो...

गृहसौख्य लाभो...

आणि नोकरी व्यवसायात भरभराट होवो...

इच्छित फलप्राप्ती होवो.

🏮शुभेच्छुक ....

▪️ प्रवीण कुबल आणि समस्त कुबल परिवार कणकवली



 

Saturday, October 22, 2022

🛑 आमच्या घरी अन् तुमच्या घरी

 🛑 आमच्या घरी अन् तुमच्या घरी

          दिवाळी येण्यापूर्वीच सर्वांनाच दिवाळीचे वेध लागलेले असतात. कितीतरी आतुरता असते दिवाळीच्या पहाटेची. चाळीस वर्षांपासून दिवाळीच्या विविध घडामोडी बघितल्या आहेत. तेव्हा मी सात आठ वर्षांचा असेन. दिवाळी समजू लागली होती. 

          बाबा पहाटे चार वाजता उठून आंघोळ करुन कारीट फोडत होते. ' गोविंदा गोपाळा  यश्वदेच्या तान्ह्या बाळा ' असं म्हणत असताना त्यांच्या पायाखालच्या नरकासुराचा त्यांनी कृष्ण बनून वध केला होता. शेजारी फटाक्यांचे आवाज कानी पडत होते. एक आकाश कंदिल दरवाजाच्या बाहेर दिमाखात लटकत होता. आईसुद्धा उठून कामाला लागली होती. बाबांनी आधीच ' सुगंधी उठणे ' तयार करुन ठेवलं होतं. ताई , आक्का , मी , भाऊ सगळे एकामागोमाग एक उठण्याची सुरुवात झाली होती. पपी अगदीच छोटी होती. एक दिड वर्षाची असेल. तिलाही तिच्या आयुष्यात पहिली दिवाळी पाहायला मिळाली होती. मोठ्या बहिणी लहान असल्या तरी आमच्यापेक्षा खूपच समंजस होत्या. आईच्या आणि बाबांच्या कामात लक्ष देणाऱ्या होत्या. आम्ही दोघे भाऊ मात्र त्यांनी काढलेल्या रांगोळ्या पुसण्याचे काम करीत होतो. 

          आईने थंड पाण्यात तयार केलेले उठणं माझ्या अंगावर चोळलं होतं. तेव्हा अंगावर सर्रकन काटा उभा राहत होता. मी त्या पहाटेच्या प्रसंगी रडत आंघोळ केली होती. तरीही आईने मला घासघासून आंघोळ घातलीच होती. छोटं टॉवेल गुंडाळून तसंच मला कारेट फोडायला तुळशीसमोर नेण्यात आलं. मी छोटं कारेट फोडू शकलो नव्हतो. मग ते बाबांनीच चिरडलं होतं. 

          बाबांची देवळात जायची घाई सुरु झाली होती. मीही त्यांच्यासोबत जाण्याचा हट्ट धरला. शेवटी बाबांच्या करंगळीला पकडून मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. 

          काशीविश्वेश्वराच्या मंदिरात छान काकड आरती सुरु झाली होती. बाबांच्या हातातील टाळ मला हवा होता. त्यांनी तो मला दिला नाही , म्हणून मी खट्टू झालो होतो. लवकर उठल्यामुळे मला झोप येत होती. पण आरतीच्या आर्त सुरांमुळे मी झोपूही शकलो नव्हतो. एक तासानंतर आरती संपली होती. देवळात माणसांची गर्दी होऊ लागली होती. माझ्यावर आरतीचे संस्कार घडत जात होते. 

          दरवर्षी काकड आरतीला जाणे सुरुच राहिले होते. सतत आरती म्हणत राहिल्यामुळे आरती पाठ होत चालली होती. आरती संपल्यावर घरी आल्यावर आईने केलेले गोड पोहे आणि पिवळे कांदापोहे खाण्याचा आनंदच वेगळा होता. आमच्याकडे त्या दिवसांतच पोहे खायला मिळत असत. बाकी इतर दिवसात कधी पोहे खायला मिळत नसत. आईबाबांनी केलेले रव्याचे लाडू अप्रतिम गोड असत. यापेक्षा काहीच बनवले जात नसे. तरीही आमची दिवाळी खूप मजेत असे. बाबा आमच्या सलून दुकानात टेलरिंग देखील करत. त्यामुळे दिवाळीला गिऱ्हाईकांचे कपडे शिवायला येत. ते शिवण्याची बाबांची आणि आईची घाईच घाई दिसे. ते कपडे शिवल्यानंतरच आमची दिवाळी खऱ्या अर्थाने साजरी होई. त्या शिवलेल्या शिलाईतून बाबा आमची भावंडांची भाऊबीज धुमधडाक्यात साजरी करीत. आम्हाला जे हवे असे ते देण्याचा बाबांचा प्रयत्न असे. गोवा फटाक्यांच्या दोन माळा आम्हांला पुरत. कारण आम्ही त्या माळेतील शिवलेले सगळे फटाके सिंगल करुन वाजवण्याचा आनंद घेत असू. फुलबाजा , भुईनळे यांचाही आनंद घेऊ. कधीतरी पाऊस मिळे. पाऊस म्हणजे आगीचे तुषार सोडणारी एक आवाज न येणारी फटाकीच. 

          थोडे मोठे झाल्यावर आम्ही भाऊ चिव्याच्या काठ्यांपासून चांदणी किंवा आकाशकंदील बनवत असू. तो बनवायला आम्हाला दोन ते तीन दिवस लागत. पताकाचे कागद आणून ते गव्हाच्या चिकीने चिकटवत स्वतः बनवलेला कंदिल डौलाने डुलताना बघून खूप अभिमान वाटे. 

          आम्ही रतनज्योत नावाची गुलाबी रंगाची मशेरी लावत असू. पण दिवाळीच्या दिवसांत भाऊबीजेच्या दिवशी आम्हांला बहिणींकडून टूथब्रश , टुथपेस्ट अशी भेट मिळे. त्यामुळे भाऊबीजेचा दुसरा दिवस उजाडण्याची आम्हाला घाई झालेली असे. तोपर्यंत मी कितीतरी वेळा टुथपेस्टचे बुच उघडून वास घेतलेला असे. 

          आता बहिणींकडून मोठमोठ्या भेटवस्तू मिळतात. संपत्तीचं प्रदर्शन घडत राहतं. पण त्यावेळचे दिवस आठवले की तेच दिवस चांगले होते असंही वाटत राहतं. 

          आमच्या आईबाबांनी आम्हाला त्यावेळी दिलेली दिवाळीची भेट ही आमच्यासाठी सर्वोत्तम भेट असे , जी आम्ही आजही लक्षात ठेवलेली आहे. नव्हे कधीही विसरणार नाही.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



Monday, October 17, 2022

🛑 आदिती , तू कुठे आहेस ?

 🛑 आदिती , तू कुठे आहेस ?

          शिक्षकांना अशी किती मुलं भेटत असतील नाही का ? पेशा स्वीकारल्यापासून कित्येक मुलांचा सहवास लाभला आहे. छोट्या शाळेत काम करताना त्या दहा वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाललीला पाहताना भान हरपून जाते. ती मग त्या विशिष्ट पालकांची मुलं राहत नाहीत , ती आपलीच मुलं होऊन जातात. 

           शिरवल रतांबेवाडी शाळेत असतानाचे दिवस आठवतात. तिथला निसर्गरम्य परिसर आठवतो. तिथल्या सगळ्या आठवणी कधीही शिळ्या न होणाऱ्या आहेत. खरंतर माणसाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडत असतात , त्या लक्षात ठेवण्याची गरजही नसते. पण काही अशा आठवणी चिरकाल स्मरणात राहतात. 

           दोन शिक्षकी शाळा. सात ते आठ मुलांचा पट. प्रत्येक मुलाशी आपुलकीचं नातं जडलेलं.  प्रत्येक मुलाने शिक्षकांशी तसंच जिव्हाळ्याचं नातं जपलेलं. नातं जडणं तसं सोपं , पण ते अखंड जपणं कठीणच. मुलांनी ते नातं कायमचं जपत राहण्यासाठी माझ्यासारखे शिक्षक नक्कीच देवाकडे प्रार्थना करतील.

          शाळेत जाण्यासाठी अडचणीची वाट होती. उतरत्या रस्त्याने जाताना जीव मुठीत ठेवून जावे लागे. तरीही पाच वर्षे त्या रस्त्याची सवय झाली. गाडी रस्त्याच्या कडेला लावायची आणि दहा मिनिटे चालत जायचे. रतांब्यांची झाडे दिसू लागली की त्यापुढे शाळा दिसे. मी धावतच शाळेत जाई. शेतीच्या मळ्यांच्या मेरेवरुन जाताना भीती वाटे. कधी भेकरे वाटेत आडवी येत. दाट झाडीतून शाळेपर्यंत पोहोचताना वाघाचीही भीती चटका लावून जाई. पण एवढ्या वर्षात वाघ काही भेटला नाही. डुकरांची झुंडच्या झुंड एकदा पाहिली. तशी झुंड नंतर पाहायला मिळाली नाही. 

          या रस्त्याने जाताना बऱ्याचदा माझे विद्यार्थी माझ्यासोबत असत. त्यांच्या साथीमुळे माझी भिती कुठल्या कुठे पळून जाई. कुडतरकरांची आदिती नुकतीच पहिलीत आली होती. तिला शिकवायला मडवबाई होत्या. आदिती मला घाबरत असे. ती माझ्याकडे अजिबात पाहत नसे. तिसरी चौथीच्या मुलांना ओरडताना तिने मला पाहिले होते. त्यामुळे तिच्या मनात माझ्याबद्दल भीती निर्माण झाली असावी. 

          पण एक दोन महिन्यांत ती माझ्याशी बोलू लागली. गाडीवर बसून निघताना मी दिसेनासा होईपर्यंत टाटा करणारी आदिती आजही मला जशीच्या तशी दिसते आहे. हळूहळू तिची आणि माझी छान गट्टी जमली. ती माझ्याशी न घाबरता बोलू लागली. ती माझ्या एकदम जवळ येऊन काहीतरी सांगू लागली. तिचं ते निरागस हसणं मलाही खूप आवडू लागलं. ती एखाद्या दिवशी शाळेत आली नाही तर सगळ्या मुलांना शाळा खायला येऊ लागली. तिचे बोल बोबडे होते. त्या बोलांमध्ये अनोखी जादू होती. 

          आणि तिच्या साठी तो सुट्टीचा काळा दिवस उगवला. मकर संक्रांत होती. दुपारची भोजनाची वेळ असेल. घराबाहेरच्या अंगणातील तुळशीसमोर निरांजन तेवत होते. वाऱ्याने तिची ज्योत आज जरा जास्तच वेगाने फडफडत होती. सुंदर ड्रेस परिधान केलेली खेळकर आदिती तिथेच खेळत , बागडत होती. तिचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. ती दुडूदुडू धावत होती नुसती. तिचे कुठेच लक्ष नव्हते. तिचा फ्रॉक पायापर्यंत होता. तोही तिच्या गिरकीबरोबर गोल गिरक्या घेत होता. अचानक ती गिरक्या घेत घेत कधी त्या निरंजनापाशी आली ते तिचे तिलाच समजले नाही. 

          जोराने पेटणाऱ्या त्या निरांजनाच्या ज्योतीने आदितीच्या फ्रॉकला अलगद स्पर्श केला होता. तिच्या फ्रॉकने घेतलेला पेट तिला समजला. तिचे शरीर भाजू लागले. ती जिवाच्या आकांताने किंचाळू लागली. तिच्या भयानक ओरड्याने घरातले सगळे बाहेर धावले. सर्वांनी तिला वाचवण्यासाठी जीवावर उदार होऊन प्रयत्न केले. ती साठ टक्केपेक्षा जास्त भाजली होती. नॉयलॉनच्या फ्रॉकने आग भडकवली होती. तिला डॉक्टरांकडे तातडीने हलवले होते. 

          मला ही बातमी समजली तसा मीही लगेच निघालो. तिच्या चेहऱ्याला काहीही झाले नव्हते. तिचे मानेखालील शरीर भाजले होते. तिच्या संपूर्ण शरीराला बँडेज लावलेले दिसत होते. मी तिच्या निरागस चेहऱ्याकडे अतिशय प्रेमाने पाहिले. तिनेही माझ्याकडे नेहमीप्रमाणे पाहिले होते. तिला असह्य वेदना होत होत्या. तिचे पालक हतबल झाले होते. ती बरी होईल असे त्यांना वाटत होते. डॉक्टरांनी तिला मुंबईला हलवायला सांगितले होते. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तिला मुंबईला नेण्याची तयारीही करण्यात आली होती. 

          अरेरे !!! संध्याकाळी तिला मुंबईला नेण्याअगोदरच तिच्याविषयीची दुःखद बातमी कानावर येऊन धडकली. आदितीचे ते बोबडे बोल आता कधीच ऐकू येणार नव्हते. 

          त्यानंतर दोन तीन महिन्यांत माझं शाळेत जाणं येणं यंत्रवत झालं होतं. मला हसतमुखाने टाटा करणारी माझी विद्यार्थिनी आदिती आता कधीच दिसणार नव्हती. आता ती शाळा बंद झाली आहे. मुलांच्या आठवणी काहीकेल्या बंद होऊ शकत नाहीत. आदिती बाळा , तू आता कुठे असशील ? ये ना परत , स्वप्नात तरी !!!

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )



Saturday, October 15, 2022

🛑 आईबाबा : वाचन पाठ १

 🛑 आईबाबा : वाचन पाठ १

          मुलांनो , तुम्ही तुमच्या आईबाबांवर खूप प्रेम करा. तुमच्या आईबाबांइतकी माया तुमच्यावर कोण करेल ? तुम्हांला शिकवण्यासाठी ते किती परिश्रम करतात. अन्न , वस्त्र आणि झोपण्यासाठी उबेचं पांघरूण हे सगळं तुमच्यासाठी कोण देतात ? तुमची तब्येत बरी नसताना , तुम्हाला दुखत खुपत असताना तुम्हाला मायेने जवळ कोण घेतात ? आणि अधिक ममतेने तुमची सेवा कोण करतात ? आणि तुम्हाला औषधपाणी कोण करतात ? आणि देवाने तुम्हाला आरोग्य , धन आणि संपदा देण्यासाठी देवाची प्रार्थना कोण करतात ? 

          तुमच्या आईवडिलांची स्वतःची तब्येत बरी नसली तर तुम्ही त्यांची सेवा नको का करायला ? त्यांच्या कष्टात त्यांना अधिकचे सहकार्य करा. त्यांनी तुमच्यासाठी किती केले आहे , आणि किती सोसले आहे याची आठवण ठेवा. 

          तुम्हाला तुमच्या मोठ्या भावाबहिणींची भीती वाटली पाहिजे. त्यांना छळू नका. त्यांना त्रास देऊ नका. वाईट नावे ठेऊ नका. त्यांना मारण्यासाठी तुमचे चिमुकले हात उगारु नका. तुमची एखादी वस्तू त्यांनी घेतली तर त्यांना रागे भरु नका. त्यांनीच ती तुम्हाला दिली होती हे लक्षात ठेवा. त्यांनी ती काही काळासाठी घेतली म्हणून हिसकावून घेऊ नका. तुमची आवडती वस्तू दुसऱ्यांनाही काही काळ वापरायला देण्याची सवय अंगी बाळगा. जमेल ते तुम्हाला. प्रयत्न तर करुन पाहा. 

          तुम्ही भांडत असताना तुमचे आई बाबा तुम्हाला पाहतात , तेव्हा त्यांना किती दुःख होत असेल याची कल्पना करा. त्यांची एवढीच इच्छा असते की आपल्या मुलांनी सर्वांशी प्रेमाने , मायेने , गोडीगुलाबीने आणि आपुलकीने वागावे. मग असे वागणार ना ? 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )

Friday, October 14, 2022

🛑 देवाचा प्रसाद

 🛑 देवाचा प्रसाद

          आपल्याला देव कधी भेटेल ते अजिबात सांगता येणार नाही. आपण अपेक्षा ठेवली नाही तरी तो माणसाच्या रुपात भेटून जाऊ शकतो. आपल्या ते ध्यानातही येणार नाही. कारण आपण तशी दृष्टी ठेवत नाही म्हणून तसे घडत असावे. 

          मनात सकारात्मकता असली की सगळ्या गोष्टी साध्य होतील असे वाटू लागते. आज शिक्षण परिषद होती. पूर्वीचं गटसंमेलन , आता त्याचं नाव ' शिक्षण परिषद ' असं झालं आहे. या शिक्षण परिषदेत शिक्षकांनी शिक्षकांना मार्गदर्शन करावयाचे असते. शैक्षणिक आणि प्रशासकीय मार्गदर्शनाचा एक उत्तम प्लॅटफॉर्म असतो तो. त्यानिमित्ताने केंद्रातील शिक्षक एकत्र येतात. विचारांची देवाणघेवाण करतात. नवीन शाळांचे दर्शन घडते. नवीन वाटा चोखळताना नवीन काहीतरी दृष्टीस पडत राहतं. हे नवीन नवोपक्रमात परावर्तित होतं. नवीन दृष्टिकोन सापडतो. पठारावस्था निघून जाते. 

          आजच्या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने शिक्षकांशी हृद्य संवाद साधण्यासाठी डॉ. प्रसाद देवधर स्वतःहून आले होते. ते बोलायला उभे राहिल्यापासून त्यांनी केलेला संवाद शेवटपर्यंत मेंदूला जाऊन भिडत होता. शिक्षकांबद्दलचा त्यांच्या मनातील आदर ओथंबून बाहेर पडत होता. शिक्षकांनी काय केले पाहिजे म्हणजे शिक्षकांबद्दल समाजात आदराची भावना वाढेल यासाठी त्यांनी केलेले प्रबोधनपर वक्तृत्व उंचावत जाणारे होते. शिक्षकांनी फक्त शब्द आणि अक्षरे शिकवायची नसून त्यातील अर्थ समजून उमजून सांगितला पाहिजे या गोष्टीचा त्यांनी पुनरुच्चार केला. शिक्षकांनी भरपूर वाचन करायला हवे हे त्यांनी कमालीचे स्पष्ट करुन सांगितले. समाजातील लोकमनावर अधिराज्य करणारा कल्पनातीत शिक्षक पुनश्च निर्माण होण्यासाठी शिक्षकांनी वैयक्तिक प्रयत्न करायला हवेत असे त्यांनी ठासून सांगितले. 

          नवीन पिढी शिक्षकांच्या एक पाऊल पुढे जात आहे. त्यामुळे या पिढीला मार्गदर्शन करणारा शिक्षकही तसाच त्यांच्यापुढे कित्येक पावलं गेलेला असला पाहिजे. 

          पुस्तकातील शिकवायच्या प्रत्येक गोष्टीचा शिक्षकाने दररोज धांडोळा घेतला पाहिजे. परिस्थितीनुरुप दररोज बदलणारे प्रवाह स्वीकारुन त्याचे आपल्या जीवनावर होणारे परिणाम सांगताना शिक्षकाला एका समुपदेशकाची भूमिका बजावायची आहे. प्रत्येक मूल वेगळं आहे , तर प्रत्येकाला तसं वेगळं शिकवण्याची उर्मी बाळगायला हवी. तशी ही अवघड गोष्ट असली तरी प्रयत्नसाध्य आहे हेही तितकेच खरे आहे. 

          शिक्षकाने स्वतः भरपूर फिरायला हवे. आपल्या जिल्ह्यातील माहिती त्याला असायलाच हवी. पण त्याने जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या आणि देशाच्याही बाहेर जाऊन नवीन बघून ते खरे प्रसंग मुलांना सांगायला हवेत.

          शिक्षकांची स्वतःची लायब्ररी असायला हवी. नुसती लायब्ररी नको , तर ती पुस्तकं त्याने वाचायला हवीत. पुस्तकांचं धन असणारे शिक्षक आजच्या काळाची गरज आहे. हे जेव्हा घडेल तो सुवर्णदिन असू शकतो. 

          शिक्षक म्हणून नोकरी मिळाली की आपलं कर्तव्य अधिक मोठया प्रमाणात वाढलेलं आहे हे प्रत्येक शिक्षकाच्या लक्षात आलेली गोष्ट असेल. सध्याच्या इंटरनेटच्या युगात सगळं जगच त्यावर चालू लागलं असतानाही शिक्षकांचं महत्त्व जसंच्या तसं राहिलेलं आहे. संदर्भ बदलले आहेत. अपेक्षा वाढल्या आहेत. इंग्रजी शिक्षणाची गरज लोकमनाला शहराकडे नेऊ पहात असताना त्यांचे हे प्रचंड लोंढे पुन्हा जिल्हा परिषदेकडे वळतील हे आपलं सर्व शिक्षकांचं स्वप्न खरं होण्यासाठी अधिक विचार करावा लागेल. शैक्षणिक उन्नतीसाठी खूप काम करावं लागेल. काय करता येईल याचं विचारमंथन सतत होत राहायला हवे. विचार आला की तो तसाच विरु न देता त्याचं आचरण प्रत्यक्ष घडण्यासाठी जाणीवपूर्वक कृती करायलाच हवी. 

          वेळ न पुरणं हे सगळ्यांचंच दुखणं आहे. त्यावर मात करता येते का ? हेही आजमावून पाहिलं पाहिजे. मुलांसाठी झोकून देऊन काम करताना मिळणारा आनंद आणि समाधान हे कित्येक मोठ्या पुरस्कारांपेक्षाही वरचढ असणार हेही तितकेच खरे आहे. कोणीतरी प्रोत्साहन देईल म्हणून आपल्याला कोणतीही गोष्ट करावयाची नसून ती आपली जबाबदारी आहे असे समजून करायला हवी. 

          डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेल्या पंचवीस मिनिटांच्या संबोधनात अशा अनेक उत्तम गोष्टींवर परखड मते मांडली आणि अप्रत्यक्षपणे आम्हां शिक्षकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचेही नकळत कार्य केले आहे. त्यांच्या मनोगतातून ते छान व्यक्त झाले आहेत. त्यांची प्रत्येक भावना सकारात्मकपणे घेतली पाहिजे. कधी कधी शिक्षकांनाही अशा मार्गदर्शनाची गरज असते. असं मार्गदर्शन माझ्यासारख्या शिक्षकांना अधिक प्रेरणा देणारं ठरतं आणि त्यांच्या वाक्यांना आपसूक टाळ्या पडतात. 

          ते आले , ते बोलले आणि त्यांनी सर्वांची मनं जिंकून घेतली. ते ' भगीरथ ' साठी भगीरथ प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आडनावात देव आहे , तसा तो त्यांच्यातही असावा असं माझं प्रांजळ मत आहे. त्यांचं नाव प्रसाद आहे. त्यांनी आज आम्हाला आपल्या मौलिक विचारांचा प्रसाद वाटला आहे. म्हणूनच हा विचारांचा प्रसाद ' देवाचा प्रसाद ' मानून आम्ही सर्वांनी मिळून प्राशन केला आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )




आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...