Monday, December 30, 2024

🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर

 🛑 जय श्रीराम विभूते : मी पाहिलेले सूत्रसंचालक सर


          २०१९ पासून मी तळेरे बीटमध्ये आहे. तेव्हापासून माझी आणि त्यांची भेट होत आहे. नावात राम आणि आडनावात विभुती असणारे हे व्यक्तिमत्व. 

          सध्या तळेरे नं. १ शाळेत कार्यरत असणारे माझे मित्र मा. श्रीराम विभूते यांच्याबद्दल मी बोलतोय हे एव्हाना आपल्या लक्षात आले असेलच. 

          तळेरे प्रभागातील अनेक उत्तम कार्यक्रम तळेरे नं. १ शाळेत संपन्न होत असताना मी अनेकदा त्या सर्व कार्यक्रमांना उपस्थितही होतो. प्रत्येक वेळी श्रीराम विभूते सरांचं ' सूत्रसंचालन ' अनुभवलं आहे. त्यांच्या हातात ' माईक ' गेला कि त्या ' माईकचं ' कर्णमधुर आवाजात रूपांतर होताना मी कित्येकदा ऐकलं आणि पाहिलं आहे. त्यांचा आवाज लांबूनही मी ओळखू शकेन इतका तो माझ्या ओळखीचा झाला आहे. त्यांच्या मुखातून बाहेर पडणारी विद्येची देवता ऐकत राहावी अशीच. विद्येचं आराध्य दैवत जणू त्यांच्यावर सदानकदा प्रसन्न झालेलं असतं. त्यांनी बोललेली सुभाषिते, शायरी, चारोळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवत जातात तेव्हा तो प्रेक्षकांसाठी अनमोल क्षण असतो. त्यांनी बोलत राहावं आणि रसिकांनी टाळ्या वाजवत नियमित दाद देत राहावी असं त्यांचं सूत्रसंचालन मला नव्हे सर्वांनाच मोहवून टाकणारं असतं. 

          ते समोर येतात तेव्हा एखाद्या कार्यक्रमाचा सुश्राव्य आरंभ होत असतो. मान्यवरांचे स्वागत करताना त्यांच्याबद्दल ' ऑन द स्पॉट ' स्तुतीसुमने उधळणारे श्रीराम विभूते सर पाहिले कि त्यांच्या अभ्यासू व्यासंगी व्यक्तिमत्वाची छोटीशी झलकच झळकते.

          प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या सूत्रसंचालनाला नेहमीच ते असतात. त्यावेळी बक्षीस वितरणाचे त्यांचे सूत्रसंचालन कुतूहल जागृत करणारं असतं. त्यांच्या स्वतःच्या शाळेने अनेकदा तालुकास्तरापर्यंत किंवा जिल्हास्तरापर्यंत बाजी मारलेली असते तेव्हा तर त्यांच्या सूत्रसंचालनाला अधिक बहर आलेला असतो. 

          NAS सर्वेक्षण होते. माझी नेमणूक कासार्डे तांबळवाडी शाळेत झाली होतो. ते त्या शाळेत काम करुन बदली होऊन तळेरे नं. १ गेले आहेत. तांबळवाडी शाळेत ' CCTV कॅमेरे पाहिले. श्रीराम विभूते सरांनी त्यावेळी तांबळवाडी शाळेला डिजिटल बनविण्यात महत्वाची भूमिका निभावली होती असे ऐकायला मिळाले आणि मला अधिक आनंद झाला. 

          ते एक उत्तम तबलावादक आहेत. त्यांनी एका कार्यक्रमात तबला वाजवताना मी स्वतः पाहिले आहे. शिक्षकाने अष्टपैलू असायला हवे. त्यांच्यात अनेक उत्तम गुण आहेत. मला त्यांच्यातल्या उत्तम गुणांविषयी अतीव आदर आहे. त्यामुळे ते एखाद्या मोठ्या कार्यक्रमात उठून दिसतात. त्यांना तीन राष्ट्रीय पुरस्कार व सिंधदुर्ग जिल्ह्याचा गुरू गौरव पुरस्कार मिळाला आहे.

          त्यांचे स्टेटस भारी असतात. त्यांचे सामान्यज्ञान अफलातून आहे. त्यात नेहमीच वाढ होत असते. १ जानेवारीला त्यांचा वाढदिवस येतो. वर्षाच्या पहिल्या दिवशी वाढदिवस असणं ही भाग्याची गोष्ट आहे. श्रीराम विभूते सरांनी आपल्या चांगल्या गुणांमध्ये अधिक वृद्धी करावी आणि आपल्या व कुटुंबाच्या आयुष्यात पुढील वाटचालीसाठी समृद्धीचे, सुखाचे, भरभराटीचे दिन सदैव येवोत अशा कोट्यावधी शुभेच्छा. 


©️ प्रवीण कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. १



Saturday, December 21, 2024

जल्लोष बाल खेळाडूंचा

 जल्लोष बाल खेळाडूंचा 


मुलांसाठी खेळ ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे. खेळ त्यांच्या जीवनात नियमित आनंद फुलवणारे क्षण निर्माण करत असतो. त्यामुळेच खेळ मुलांसाठी जल्लोष असतो. बालजीवनात चैतन्य आणण्याचे कार्य करणारा हा खेळ सतत येत राहिला तर मुलांचं तन आणि मन दोन्ही तंदुरुस्त होण्यास नक्कीच मदत होईल. 

गेले काही दिवस आम्ही सर्व शिक्षक या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत. मुलांसोबत विविध खेळांचा आनंद घेत आहोत. मुलांसाठी आणि मुलांसोबत खेळताना होणारा आनंद काय वर्णावा !! बाल कला , क्रीडा आणि ज्ञानी मी होणार महोत्सव मुलांच्या जीवनात दरवर्षी प्रसन्नतेचं पीक आणणारा काळ असतो. या दुर्मिळ क्षणांची ही मुले अगदी आतुरतेने वाट पाहताना मी स्वतः अनेकदा पाहिली आहेत. मुलांना खेळताना त्यांच्या चेहऱ्यावरचा निरागस आनंद पाहण्यासारखं सुख नाही. मुलं मस्त खेळत आहेत , मस्ती करत आहेत , भांडत आहेत , स्वतःच भांडणं सोडवत आहेत असं चित्र सगळीकडेच थोड्याफार फरकाने पाहायला मिळतं. शिक्षकांना हे सतत दिसणारं दृश्य आहे. मुलं तक्रारी सांगतात , त्या सोडवतात. भांडण करतात , भांडणं विसरून जातात. हा त्यांच्यातला निरागसपणा आम्हां मोठ्या माणसांना टिपता यायला हवा. 

केंद्राच्या स्पर्धा संपन्न होत असताना मला उपक्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. मी मला दिलेली जबाबदारी अधिक उत्तम रीतीने नेहमीच बजावण्याचा प्रयत्न करतो. आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये , आपल्याला त्रास झाला तरी चालेल हे माझं नेहमीच सूत्र असतं. कोणालाही थेट नकार द्यायला मला आवडत नाही. त्यामुळे मला जबाबदारी दिली नसली तरी माझीही जबाबदारी आहे असं समजून मी सर्वतोपरी अधिकाधिक प्रयत्न करत राहतो. ती माझी सवयच आहे. त्यामुळे माझ्यावर अधिक जबाबदारी येऊन पडते आणि मग ती पार पडताना माझी दमछाक झाली तरी मी ती निमूटपणे सहन करत राहतो. 

मुलं छान खेळताना बघून केंद्रात यशस्वी होऊन प्रभागात जाताना एका विशिष्ट चाळणी प्रक्रियेतून जात असतात. प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झालेली मुलेच पुढे पुढे खेळू शकतात. स्पर्धेत यशस्वी व्हायचंच असं ठरवून आलेली मुलं अपयशी ठरली कि अक्षरशः रडू लागतात. यावेळी मी हे क्षण पुन्हा अनुभवले. माझ्या शाळेतील मुलांचा केंद्रात ज्ञानी मी होणार मोठ्या गटात निसटता विजय झाला. अर्थात मुलांनी केलेला अभ्यास मुलांना विजेता ठरवून गेला होता. प्रतिस्पर्धी शाळेतील मुलांनीही खूप अभ्यास केला होता. पण उपविजेता ठरुनसुद्धा त्यांना अश्रू आवरले नाहीत. मुलांना खिलाडूवृत्ती माहिती आहे , तरीही डोळ्यातून पाणी येतंच. मुलांची चाचणी आणि चाचपणी होत असताना जणू शिक्षकांचीच चाचणी होत असते. शिक्षक आणि मुले या दोघांनीही केलेल्या परिश्रमांचं ते दुहेरी यश असतं. यात जेव्हा पालकही जबाबदारी घेतात , तेव्हा मुलांच्या उत्तर देण्याचं प्रमाण अजून वाढत जातं. मुलं पटापट उत्तर देऊ लागली कि टाय फेरीची वेळ येते. 

टाय फेरीपर्यंत पोहोचलेली मुले खऱ्या अर्थाने विजेता ठरलेली असतात. फक्त पुढे एक कोणतातरी संघ न्यावा लागतो म्हणून एक संघ बाद ठरविण्याची ही एक निकषरुपी पद्धत आहे. जी मुलं आणि जे शिक्षक प्रयत्नांची पराकाष्ठा करुन पुढे आलेली असतात , त्यांच्या त्यावेळी डोळ्यांतून पाणी आल्याखेरीज राहत नाही. मुलांच्या ते प्रत्यक्ष येतं , शिक्षकांच्या डोळ्यांत पाणी आलं तरी ते लपवून ठेवावं लागतं. कारण त्यावेळी मुलांना सांभाळून घेणं अधिक गरजेचं असतं ना !!! 

मुलं आपलं कोणत्याही खेळातलं सादरीकरण बिनधास्त करतात. आमच्या खोखोच्या संघातील काही मुले आम्हांला इतकी छान खेळतील असं अजिबात वाटलं नव्हतं. आम्ही त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत राहिलो होतो. आमचे माजी विद्यार्थी आणि माजी विद्यार्थिनी येऊन येऊन मुलांना क्रीडांगणावर निपुणतेने खेळण्यासाठी धडे देत होते. या सगळ्या मुलांच्या अंगात खोखो हा खेळ इतका भिनला आहे कि बघताना प्रत्येकात चैतन्य संचारावं. अर्थात मी माझ्या मुलांचा खेळ पाहत होतो. मी स्वतः असा कधीही मैदानावर खोखो खेळ खेळलेलो नाही. कारण आमच्या बालवयात अशा क्रीडा स्पर्धा होत नसत. मी नोकरीला लागल्यापासून या स्पर्धा सुरु झाल्यामुळे आताच्या मुलांना असं खेळण्याची संधी सरकारकडूनच मिळालेली आहे. 

गेली अठ्ठावीस वर्षे मी शिक्षण क्षेत्रात काम करत असताना मुलांच्या अभ्यासाबरोबर खेळसुद्धा घेण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. छोट्या आणि एकशिक्षकी शाळेत काम करताना मुले छोटी असल्याने मुलांना खेळात सहभागी करूनसुद्धा मुलं खेळात कमी पडताना दिसत होती.त्यामुळे भाग घेऊनसुद्धा कधी जल्लोष वगैरे करता आला नाही. आपले विद्यार्थी खेळात नैपुण्य दाखवतात तेव्हाच मनापासून जल्लोष करता येतो. गोवळ गावठण शाळेत असताना मुले कबड्डी छान खेळत. अनेकदा मुलांनी आणि मुलींनी शाळा समूह योजनेतही ट्रॉफ्या मिळविल्या. तेव्हापासून मुलांमधील खेळातील आवड माझीही आवड बनायला लागली. लोकांनी , पालकांनी यशस्वी झालेल्या मुलांचे ढोल वाजवून केलेले स्वागत मी अजूनही विसरलेलो नाही. खेळात पुढे जाणारी मुले जेव्हा त्या वर्षी ज्ञानी मी होणार स्पर्धेत जिल्ह्यापर्यंत जाऊन पोहोचली होती. 

पुन्हा जेव्हा वैभववाडीत ‘ मांगवली नं. १  ’ शाळेत सात वर्षे असताना नेहमीच खोखो संघाचे नेतृत्व करता आले. आमची मुले स्प्रिंगसारखी खेळताना आमच्या पालकांचा आनंद गगनात मावेनासा होई. मुलांना दुखले खुपले तरी त्यांना काही वाटत नसे. खेळावर असलेलं त्यांचं प्रेम अंतर्मनात पूर्ण रुजलेले होते. अभ्यासातही चमक दाखवणारी मुले खेळातही अप्रतिम कौशल्ये दाखवताना आम्ही कमालीचे भारावून जात होती. 

आता तर मी ज्या शाळेत आहे , ती शिडवणे नं. १ शाळा तर खोखोसाठी प्रसिद्ध असलेली शाळा आहे. त्यामुळे आमचे अनेक माजी विद्यार्थी खोखो खेळताना पाहिले कि आमचे आजी विद्यार्थीसुद्धा भारावून जाऊन खेळतात. छोटी छोटी मुले खोखो खेळातील हे कौशल्य दाखवताना दिसतात , तेव्हा कधी कधी प्रश्न पडतो कि ही मुले हे कधी शिकली ? मुले बघून बघून आणि आपल्या भावंडांकडूनही परंपरेने खूप काही शिकत असतात. शिक्षकांपेक्षाही आपल्या मोठ्या भावंडांकडून शिकताना त्यांना कोणतीही भीती वाटत नाही. 

यंदा मला प्रभागाचा क्रीडाप्रमुख म्हणून सर्वानुमते निवडण्यात आले. त्यामुळे मला कामाचा बराच लोड आला. एकतर माझ्या शाळेमध्ये एक शिक्षिका सहा महिन्यांच्या रजेवर गेल्यामुळे दोन वर्ग सांभाळून मुख्याध्यापक काम करताना होणारी धावपळ , माझा अचानक वाढलेला बीपी , घरातील येणाऱ्या आकस्मिक अडचणी या सर्वांवर मात करताना खूप त्रास होत असला तरी तो त्रास दुसऱ्यांना न दाखवता हसतमुखाने काम करत राहणे एवढेच मला माहिती आहे. क्रीडाप्रमुख म्हणून दिलेली जबाबदारी सांभाळतानाही गरम इस्त्री डोक्यावर घेतल्याचा भास होत होता. माझ्या शाळेत कमी शिक्षक असल्याने माझ्या शाळेतील माझ्या वर्गातील मुलांसाठी मला द्यायला पाहिजे तेवढा वेळ देता येत नाही याची खंत सतावते आहे. 

मुलांचा जल्लोष दिसतो आहे. माझी खंत मनात सलते आहे. क्रीडाप्रमुख म्हणून जबाबदारी पार पडत असताना माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासास मी किती खरा उतरलो ते मला माहिती नाही. पण मी मात्र मला जमले तितके प्रयत्न केले. रात्री उशिरापर्यंत लॅपटॉपसमोर बसून काम करताना मी अजिबात थकत नव्हतो. कारण मला दिलेले कार्य मला निर्विघ्नपणे पार पडायचे होते. 

शिक्षक मला आदर देत होते. विद्यार्थी हसतमुखाने सामोरे जात होते. पंचांना दिलेले काम वेळीच पूर्ण होताना दिसत होते. सर्वांना घेऊन काम करताना मला माझ्या शाळेत संयोजक म्हणून काम केल्याचा अनुभव कामी आला. सर्व विजेते ट्रॉफी घेत होते , तेव्हा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित होत चालला होता. मला क्रीडाप्रमुख बनवलं तेव्हा मला वाटलं होतं कि मला बनवलं तर नाही ना ? पण माझी तब्येत बरी नसतानाही मी क्रीडाप्रमुख म्हणून मला दिलेली जबाबदारी पार पडू शकलो याचा माझ्या बाबांना अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही. आज ते जिवंत असते तर त्यांच्या चेहऱ्यावर पडलेल्या हसऱ्या सुरकुत्या पाहून मी नक्कीच सुखावलो असतो. मला सहकार्य करणाऱ्या माझ्या प्रभागातील अधिकाऱ्यांपासून सर्व शिक्षक , पंच , परीक्षक , पदाधिकारी , पालक , ग्रामस्थ आणि देणगीदार  यांचे ऋण कसे फेडू ? 


© प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १


Wednesday, December 4, 2024

' परखलेले सर्वे '

         परख नावाच्या परखलेल्या म्हणजेच विशेष पारखून अभ्यासलेल्या सर्वेसाठी माझी नुकतीच क्षेत्रीय अन्वेषक म्हणून निवड झाली होती .  त्यानिमित्ताने शासनाच्या एका सर्वेक्षणामध्ये भाग घेण्याची सुवर्णसंधी लाभली हे माझे भाग्यच. 

        तशीही ही माझी तिसऱ्यांदा निवड झाल्याने मला यापूर्वी सर्वेक्षण केल्याबद्दलचा अनुभव गाठीशी होताच .  पहिल्या वेळी मला ' कासार्डे तांबळवाडी ' या जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गाचा सर्वे करता आला. त्या शाळेत तर सी. सी. टी. व्ही. कॅमेरे लावलेले दिसले. तिथे काम करत असलेल्या आणि काम करुन गेलेल्या शिक्षकांनी गावातील , वाडीतील लोकांच्या सहभागातून शाळेचा चेहरा बदलून टाकल्याचं ते चित्र मला मोहित करणारं होतं. त्या शाळेतील केसरकर मॅडम आणि राठोड सर यांनी केलेला उत्तम पाहुणचार अजिबात विसरता येणार नाहीच.  बिचारे राठोड सर आज हयात नाहीत याची खंत वाटते आहे.  त्यांचा चेहरा मला अजूनही जसाच्या तसा दिसतो आहे.  

        विद्यार्थी सुरक्षा संदर्भात परिपत्रक येण्यापूर्वीच यांनी खूप पूर्वी केलेला विचार खरोखरच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्यासारखाच आहे. असा भविष्यकालीन विचार करुन कार्य करणाऱ्या शिक्षकांना खरंच सलाम केले तरी कमी पडतील .  

        त्यानंतर दुसऱ्यांदा मला तळेरे येथील ' स्वीटलँड इंग्लिश मेडीयम स्कुल ' मिळाली होती .  इयत्ता सहावीच्या मुलांचा NAS सर्वे करतानाही मला खूप छान अनुभव प्राप्त झाला होता. तिथे मिळालेली वागणूक आदरयुक्त होती .  

        यंदा मिळालेली शाळा पुन्हा एकदा इंग्रजी माध्यमाची होती.  मी मराठी किंवा सेमी माध्यमाला शिकवणारा शिक्षक असलो तरी सर्वे करताना भाषेची कोणतीही अडचण मला आलेली नाही हे महत्त्वाचे आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आम्हां शिक्षकांना मिळालेलं मुद्देसूद प्रशिक्षण हे त्याला कारणीभूत आहे .  कोणतीही शंका न ठेवता सर्वांच्या सर्व प्रकारच्या शंकांना उत्तरे देणारे मार्गदर्शक खरंच मोलाचे ठरतात ते त्यासाठीच .  त्यांच्याकडे कोणत्याही अवघड शंकेचं मुद्देसूद उत्तर असतं. लहान मुलांना सांगावं तसं ते पुन्हा पुन्हा सुद्धा सांगतात तेव्हा त्यांच्या संयमाची दाद द्यावीशी वाटते. म्हणूनच त्यांनी दिलेले प्रशिक्षण शंभर टक्के शिक्षकांपर्यंत पोहोचते .  

        मला यावेळी मिळालेली शाळा माझ्या शाळेपासून जवळ असली तरी मी कधीही त्या शाळेत गेलेलो नव्हतो .  नडगिवे हे गाव शिडवणे पासून जवळ म्हणायला हरकत नाही .  एका खाजगी शाळेच्या आणि तेसुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्यांची सर्वे परीक्षा घेण्यासाठी माझी निवड झाली होती.  असं काही वेगळं करण्यासाठी शिक्षक म्हणून मी नेहमीच उत्साही असतो .  यावेळीही माझा उत्साह नेहमीसारखाच होता .  

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...