🔴 तुम्ही लिहित आहात का ?
हल्ली बरेच दिवस काहीतरी लिहावं असं वाटतंय !!! खरंच , लिहावं आणि मोकळं व्हावं असं वाटत असेल प्रत्येकालाच. पण वेळ कुठे मिळतोय लिहायला ? लिहायला सुचतंय खूप. लिहायला बसायला वेळ कसा तो मिळत नाही.
लिहायला बसलो कि काहीतरी काम समोर येऊन उभं राहतं. मग तेच काम महत्त्वाचं वाटतं. लिहिणारा मग ते काम करण्यात दंग होतो. लिहिणं राहूनच जातं. माझं हल्ली अगदी असंच होतंय.
मघाशीच माझा एक लेखक मित्र भेटला. त्याने आपली गाडी काहीशी स्लो केली. त्यालाही गडबड होतीच. तरीही त्याने मला हाच प्रश्न विचारला , " अरे प्रवीण , तू लिहितो आहेस ना ? " मी त्याला माझ्या कामांची यादी पुढे केली. त्यालाही ते पटलं. तो म्हणाला , " तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे मित्रा , पण तू तुझं लिहिणं सोडू नकोस " त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. मी त्याचं ते म्हणणं गंभीरपणे घेतलं आणि लिहायला सुरुवात केली.
माणसाने आपल्या जगण्यात आवडीच्या गोष्टी केल्या नाहीत , तर त्याचं जगणंच निरस होऊन जातं. मला वाचनाची आवड आहेच , पण त्याहीपेक्षा लेखनाची अधिक आवड आहे. मी एकदा लिहायला बसलो कि थांबता थांबत नाही. माझा लेख पूर्ण होईपर्यंत व्यत्यय आला नाही तर मी माझं भाग्यच समजतो. पण व्यत्यय आला नाही असं होतच नाही मुळी.
मी एक शिक्षक आहे. शिक्षकाने जसं सतत वाचत राहायला हवं , तसंच त्यानं प्रसंगानुरुप लिहीत सुद्धा राहायला हवं. लिहायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढायला हवा. तुमच्या मनात आलेले विचार व्यक्त करायला हवेत. एकदा का तुमची लिहिण्याची सवय गेली की पुन्हा तुम्हाला लिहिताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल.
लिहिता म्हणजे तुम्ही नक्की काय करता ? तर तुमच्या मनातील विचारांना वाट करुन देत असता. एकदा विचार सत्यात प्रकटले की तुम्ही तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळालेली असते , विचारांचा निचरा झालेला असतो. अन्यथा विचारांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही.
तुमचे अनमोल विचार वाचण्यासाठी अनेक वाचक उत्सुक असू शकतात. त्या वाचकांची तहान भागवणे हेही तुमच्या लेखनाचे ध्येय असू शकते. तुम्ही स्वतः ताणतणावमुक्त होऊन जाता ही गोष्ट वेगळी. सतत सर्जनशील संकल्पना निर्माण करण्याची तुमची क्षमता वापरली कधी जाणार ?
तुमचे मित्र तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगत असतील तर नक्की ऐका. तुम्ही तुम्हाला एका चांगल्या वाटेने नेत आहात हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे. नाही का ?

No comments:
Post a Comment