Wednesday, December 30, 2020

माझ्या पहिल्या नेमणुकीची गोष्ट

माझ्या पहिल्या नेमणुकीची गोष्ट 

             १९९६ सालातली गोष्ट. मी नुकताच डी. एड्. झालो होतो. निकालही माझ्या मनासारखा लागलेला. अध्यापक महाविद्यालयात दुसरा आल्याचा आनंदही गगनात मावेनासा झालेला. निकाल दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ नुसता पाहत बसत असे. रात्री मस्त स्वप्नामध्ये रंगून जाई. स्वप्नातच एखाद्या शाळेत शिक्षक बनून गेल्याचा भास होत राही. मी खडबडून जागा होई. उगीचच जाग आली म्हणून पुन्हा झोपून तसंच स्वप्न पडावं याचा विचार करत असताना कधी झोप लागे कळतही नसे. 

नोकरी नसल्यामुळे दुकानात जावे लागायचे. आमचे दोन खुर्च्यांचे सलून होते. त्यात बाबा आणि काका काम करायचे. बाबांनी मला सलूनात काम करायला शिकवले होतेच. आता मला नोकरी मिळेपर्यंत तेच करायचे होते. बारावी सायन्समध्ये ७४ % गुण मिळवलेला मी त्यावेळी परिस्थिती नसल्यामुळे डी.एडला गेलो होतो. गिऱ्हाईकांची केसदाढी करताना मला सतत नोकरीची चिंता भेडसावत होती. 

मी आतल्या आत धुमसत होतो. बाबांनी सांगितलेली सगळी कामे मनापासून करत असलो तरी मी खुश नव्हतो. त्यावेळी आमच्या दुकानात येणाऱ्या वृत्तपत्रात जाहिराती पाहण्याचा मला छंदच जडला होता. एकदा एक अशीच जाहिरात वाचली.  ' शिक्षक पाहिजे ' या जाहिरातीने मला हायसे वाटले. एक दाढी झाली कि मी पुन्हा तीच जाहिरात वाचताना बाबांनी मला पाहिले. ते म्हणाले , तू आता आधी दुकानात काम कर . जाहिराती वाचून नोकरी मिळत नाही. मला रडूच कोसळले. मी रागाच्या भरात बाबांना उलट काहीतरी बोलून गेलो. भर दुकानात मला रडू आवरेना. मी स्फुंदून स्फुंदून रडू लागलो. रडता रडता बोलत होतो आणि बोलता बोलता रडत होतो. बाबांनी मला तोंड काळं कर असं म्हणून घरी पाठवलं. घरी आलो. आईला घडलेली घटना मोठ्याने हुमसून हुमसून सांगून टाकली. 

आईने मला जवळ घेतले. मला खूप धीर वाटला. आईच्या कुशीत शिरलो. आज माझी आई हयात नाही. पण तिच्या प्रेमाची ऊब मला नेहमीच पुढे जाण्यासाठी प्रेरणादायी असेल. तिने रात्रीच बाबांना सांगून टाकले. " आपला मुलगा आता मोठा झालाय, त्याला पाठवा नोकरीच्या शोधात. " बाबांना मग आईचे ऐकावेच लागले. मी कपडे भरुन तयारच होतो. नोकरीची जाहिरात रत्नागिरी जिल्ह्यातील होती. कणकवलीपासून एस्.टी. ने ४ तास तरी जायला लागतात. २१ वर्षांचा मी रत्नागिरी गाठली. 

माझे छोटे मामा रत्नागिरी येथे रहात असल्याने मला त्यांची मदत घेऊन नोकरी मिळवायची होती. दोघेही नोकरीला असल्याने त्यांचा आदर्श माझ्यासमोर होता. पटवर्धन हायस्कूलसारख्या रत्नागिरी शहरातील नावाजलेल्या शाळेत इंटरव्ह्यु द्यायचा म्हणजे सोपी गोष्ट नव्हती हे मला तिथे गेल्यानंतर समजलं. हायस्कूलच्या प्राथमिक विद्यामंदिरात एकच शिक्षक हवा होता. पण त्या एका जागेसाठी ४० पेक्षा जास्त उमेदवार आले होते. मी एकटाच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील होतो. सर्वजण रत्नागिरीतील होते. मी अगदी साध्या कपड्यात गेलो होतो. मोठ्या भावोजींनी मला एक पांढरा शर्ट आणि मातकट पँट दिली होती. ती मापाने खूपच मोठी होती. बाबांनी ती माझ्या मापाची करुन दिली होती. तरीही ती मला फिट बसत नव्हती. पट्टा लावला तरी खाली सुटत होती. त्यावेळी मी काटकुळा असल्यामुळे पँटचा नाईलाज होता. 

सगळ्या उमेदवारांकडे मी पाहून घेतले. भितीने पोटातला गोळा मोठा होत होता. मामा मला सोडून कामावर कधीच निघून गेले होते. आईबाबांची आठवण आली. संकटसमयी मला नेहमीच आईची आठवण अजूनही येते आणि जीव कासावीस होतो. धीर एकवटून सभागृहातील बेंचवर खिळून बसलो. प्रशासनाधिकारी आले. त्यांनी काय परीक्षा घेणार ते धीरगंभीर आवाजात समजावून सांगितले. ' आदर्श शिक्षकाची माझ्या मनातील कल्पना ' असा निबंध लिहिण्यास सांगण्यात आला. मी माझी शब्दशक्ती वापरुन निबंध लिहिला. त्यानंतर प्रत्येकाचे नाव पुकारुन बोलावले गेले. माझे सगळे कागदपत्र म्हणजे मी होतो. सगळे टापटिप , मी मात्र मलाच गबाळा वाटू लागलो. इतरांच्या कपड्यांना पाहून मला माझीच लाज वाटू लागली. 

बारावीचे मार्कलिस्ट बघून समोरचे परिक्षक खुश झालेले दिसले. योगप्रवेश परीक्षा पास झालेले सर्टिफिकेट पाहून ते अधिक चमकलेले दिसले. मला १२०० रु. इतका मासिक पगार सांगण्यात आला. तुम्हाला आम्ही पत्राने कळवू हे त्यांचे शेवटचे वाक्य मला दिलासा देणारे असले तरी एवढ्या भारी लोकांमधून माझी निवड होणार नाही याचीही खात्री झालेली. दोन चार दिवस थांबून परत कणकवलीला आलो. 

पुन्हा सलून एके सलून सुरू झाले. आणि पोस्टमनने पांढऱ्या लखोट्यातले माझ्या नावचे पत्र आणून दिले. मी ते वाचले. त्यात त्यांनी मराठीचा पाठ घ्यायला बोलावले आहे असा उल्लेख केला होता. मी आनंदाने उडीच मारली. बाबांनाही माझा अभिमान वाटला. त्यांनी मला जायला परवानगी दिली. जवळ घेऊन गोंजारले. मला ज्या प्रेमाची गरज होती ते मिळाल्याने मी त्यांना अधिकच बिलगलो. त्यांनी आम्हा भावंडांना त्यांच्या ऐपतीप्रमाणे सर्व गोष्टी देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे. 

रत्नागिरीला पोहोचलो. गाण्याची आवड असल्यामुळे शिकवण्यासाठी कविता निवडली. ३ रीच्या वर्गात ६० मुले दंगा करत होती. मी सुरेल आवाजात कविता गायला सुरूवात केली. मुले चिडिचूप गप्प झाली. मुलांशी गप्पा मारत, संवाद साधत ३० मिनिटे कधी संपली मला आणि मुलांनाही समजले नाही. माझ्यासारख्या आणखी १२ जणांना त्यांनी पाठ घ्यायला बोलावले होते.

२ दिवसांत कळवतो म्हणाले. मी रत्नागिरीतच थांबलो. त्यावेळी फोनची सुविधा माझ्या मामांकडेही नव्हती. मी दुपारी जेवून झोपलो होतो. पत्र्याच्या दरवाजावर कोणीतरी ठोठावले. मी जागा झालो. दरवाजात हायस्कुलचा शिपाईमामा दुसरे पत्र घेऊन उभा. मी पत्र वाचले. त्यात उद्या गणितचा पाठ घ्यायला या असे लिहिले होते. मी तयारीला लागलो. ४ थी अपूर्णांक घटक घेण्याचे ठरवले. कागदाच्या चपात्या बनवून पाठ घ्यायला गेलो. वर्गातील मुले अवखळ दिसली. त्यांच्या वयाचा होऊन त्यांना कागदाच्या चपात्या खायला देत खेळातून पाव, अर्धा, पाऊण , पूर्ण या संकल्पना समजेपर्यंत शिकवल्या. मुलांनी कृतीयुक्त सहभाग घेतल्यामुळे माझा हा पाठसुद्धा चांगला झाल्याचे दिसत होते. पण मनात धाकधूक होतीच, कारण यावेळी माझ्यासारखे अजून ५ जण पाठ घ्यायला आले होते. प्रशासनाधिकारी जोगसर आले आणि माझ्या गळ्यात हात घातला. ते म्हणाले ,  " तुला घरी कोणत्या नावाने हाक मारतात रे ? " ते मला माझे आजोबाच वाटले. मला नातवाला ते विचारत होते असं वाटून मीही सांगून टाकले ' बाळू ' . ते अतिशय प्रेमाने अधिक जवळ येऊन मला म्हणाले , " बाळू , तू उद्या येऊन तुझी ऑर्डर घेऊन जा." आता मात्र मला ते स्वप्नच वाटलं. पण त्यावेळी मी खरंच मला करकचून चिमटा काढून बघितला. माझी नेमणूक झाली हे माझं जागेपणीचं स्वप्नंच होतं माझ्यासाठी कायमचं.


@ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली





शाळा सुरु होण्यातील स्वानंद

 कधी एकदा शाळा सुरु होते असे सर्वांनाच झाले आहे. मी तर एक शिक्षक आहे. मला लागलेली ओढ मीच सांगू शकतो. विविध संपर्क माध्यमे वापरून आता अगदी कंटाळा आला आहे. मुलांना मंदिरात बोलावून अभ्यास देत असताना मार्गदर्शन करावे लागे. एक दिवस आड करून मुलांशी संवाद साधताना मुलांनाही आपल्या घराचा कंटाळा आल्याचे प्रकर्षाने जाणवतय. 

मी सुद्धा घराचा कंटाळा येत होता म्हणून शालेय परिसराकडे जात असे. मुलेसुद्धा ठरवलेल्या ठिकाणी वेळेअगोदर येऊन वाट बघत थांबलेली असत. त्यांना अभ्यास करता यावा यासाठी थोडे सुलभीकरण करून देण्याचा प्रयत्न करत होतो. स्वाध्यायकार्डे, स्वाध्यायपुस्तिका , साप्ताहिक अभ्यासमालिका यांचा वापर करत होतो. मुले बऱ्यापैकी प्रतिसाद देताना दिसत होती. माझाही उत्साह अधिक वाढत चालला. पण कोविड नियमावलीचे पालन करावयाचे होते. त्यात गफलत करून चालणार नव्हती. 

घाबरत घाबरत मुले आणि शिक्षक यांचे अध्ययन,अध्यापन चालले होते. दर आठवड्याला शासनाकडे अहवाल पाठवायचा होता. तो खरा पाठवायचा होता.ज्या विद्यार्थ्यांशी संपर्क झाला नाही, त्यांचीही आकडेवारी भरायची होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क करण्याशिवाय पर्यायच नव्हता. मग काय, लागलो कामाला. सर्व पालकांचे संपर्क क्रमांक गोळा केले. त्यांना फोन केले. मुलांशी थेट वैयक्तिकपणे बोलायला सुरुवात केली. 

कधी एका विद्यार्थ्याबरोबर बराच वेळ बोलल्याने तेच तेच इतरांबरोबर बोलून तोंड दुखू लागले. मग सहा जणांचे ग्रुप करून कॉन्फरन्स कॉल करू लागलो. जरा काम सोपे झाले. पण गणित, विज्ञान असे विषय समजून देण्यात अडचणी येऊ लागल्या. त्यासाठी व्हिडीओ तयार करून यु ट्युब वर अपलोड केले. शाळेत असताना दिवसामध्ये सहा तास मुलांच्या समोर असणारा मी आता सकाळपासून रात्रीपर्यंत मुलांसाठी मी आज काय करू शकतो ? याचाच विचार करू लागलो.

यासाठी विविध उपक्रम राबवू लागलो. अर्थात सर्व उपक्रम राबवताना मुलांशी प्रत्यक्ष संपर्क न करता राबवताना माझी जी तारांबळ उडाली ती माझ्या घरातले बघत होते. त्यांनी मला खूप सहकार्य केले. गुगल फॉर्म पासून चाचण्या बनवून त्या दररोज स्टेटसवर ठेवू लागलो. त्याला अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थी आणि शिक्षक दोन्ही माझ्या गुगल चाचण्यांची वाट पाहू लागले. मलाही हुरूप येत गेला. मुले अभ्यास करतायत म्हणून पालकही खुश. पण शाळा ती शाळा. तिचं वेगळेपण काहीही केलं तरी जाणवतच होतं. आता शाळा सुरु होणार असं समजलं आणि माझा जीव भांड्यात पडलाय. कधी एकदा शाळा सुरु होते आणि माझे विद्यार्थी शाळेत येतायत असं मला झालं आहे. 


© प्रवीण अशितोष कुबलसर , कणकवली ( ९८८१४७१६८४ )




Tuesday, October 29, 2019

भाऊबीज म्हणजे भावांसाठी आणि बहिणींसाठीचा आनंदमय दिवस

          असे अनेक दिवस साजरे केले जातात, पण भाऊबीज हा दिवस साजरा केला जातो तो फक्त बहिणींच्या आणि भावांच्या आत्यंतिक प्रेमभावनेचे प्रतीक म्हणूनच. भाऊ बहिणींकडे जातात, बहिणी त्यांना प्रेमाने ओवाळतात, साष्टांग नमस्कार करतात. आदरपूर्वक स्नेहभेट देऊ करतात. भेटवस्तू एक आठवणभेट असते. तिचे मूल्य करता येत नाही. ते अमूल्य असते प्रत्येकासाठी. माझ्या बहिणीने ती भेट दिलेली आहे, हा आनंद भावाच्या मनात सदैव दरवळत असतो. बहिणी वाट बघत असतात, भावांच्या येण्याची. त्यांना फक्त भावाचे येणे हवे असते. त्याने आणलेली भेटवस्तू त्यांच्यासाठी महत्त्वाची असली तरी त्याचसाठी भाऊबीज होत नसते. माझ्या घरी भाऊ आला याचा आनंद ती बहीण मिरवीत असते. दिवाळीच्या सर्व दिवसांमधील अत्यंत आनंदाचे क्षण असतात ते तिच्यासाठी. भावाचे आदरातिथ्य करताना काही चुकणार तर नाही ना, ही भीतीसुद्धा असते तिला. आपण दिलेली भेट माझ्या भावाला आवडेल तरी, कि भाऊ नाराज होईल असे अनेक प्रश्न तिला नेहमीच पडत असावेत.
          पण भाऊ मात्र निरपेक्ष भावनेने तिच्या घरी गेलेला असतो. आपल्या कुटुंबातील आनंद जपता जपता त्याला आपल्या बहिणींना सुद्धा सुखी पहावयाचे असते. तिच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या लकेरी पाहण्यासाठी भाऊ तिच्या घरी धावून जात असतो. तो आपल्या मिळकतीमधील आपल्या बहिणीला साजेल असा उपहार नेण्याचा नक्कीच प्रयत्न करीत असतो. त्याची किंमत कमीसुद्धा असेल , पण त्यात भावाची माया भरलेली असते. ती वस्तू माझी लाडकी बहीण वापरणार आहे, हा विश्वास त्याला असतो. बहिणीचे सर्व कुटुंब सुखी बघताना भावाला जो आनंद होत असतो , तो आनंद फक्त भावांनाच माहित असतो. कधी भावाच्या डोळ्यात आनंदाचे उबदार अश्रू येतात. तो भाऊ हळुवार पुसून पुन्हा कुणाला जाणवू देत नसतो. अपार श्रद्धा असते त्याची आपल्या बहिणीवर. ती बहीण मोठी असो नाहोतर छोटी असो, बहीण म्हणजे आईच असते. आईनंतर लगेचच प्रेमाने कुरवाळणारी ती ताई असते किंवा आक्का असते. छोटी असली तर कुशीत शिरणारी पपी देखील असते.
           माझ्या बहिणी किती याचं  उत्तर संख्येत देणं चुकीचं ठरेल. कारण माझ्या अनंत बहिणी आहेत. ताई, आका, पपी , पिंक्या, बिंटा , आरती, सीमा, भारती , मुन्नी, सरिता, ज्ञानी, चित्रा , क्रांती, शांती, गायत्री, तृप्ती, नीलिमा, सुविधा, सुप्रिया, मनाली आणि बायग्या आका अशा सर्व बहिणी आज मला आठवतात. याचा अर्थ असा नव्हे कि त्या मला आजच आठवतात. प्रसंगानुरूप त्यांची आठवण येतच असते. पैकी चार बहिणींची लग्ने अजून झालेली नाहीत. बाकी सर्व बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी सुखात आहेत. बहिणी सख्ख्या , चुलत, मामे, आत्ये असा भेद आमच्याकडून कधीच झाला नाही. तो कधी होणार नाही याची काळजी घेणं ही  आमची जबाबदारी असणार आहे. पण फक्त भाऊबीजेपुरतं भावाबहिणीचं नातं मला मान्य नाही. माझ्या दृष्टीने ज्या दिवशी माझ्या बहिणी माझ्या घरी येतील, तेव्हा तेव्हा माझ्यासाठी रक्षाबंधन आणि भाऊबीजच असते. म्हणूनच मी गेल्या वर्षांपासून माझ्या प्रिय बहिणींकडे जाण्याचे टाळायला लागलो आहे. माझे हे चुकीचे असेल कदाचित. पण काही बहिणींकडे गेलो आणि काही बहिणींकडे गेलो नाही तर  मात्र ज्यांच्याकडे गेलो नाही त्यांना वाईट वाटणे साहजिकच आहे. पण म्हणून काय माझ्या प्रिय बहिणींबद्दलचे प्रेम काही कमी होत नाही. उलट मी गेलो नाही म्हणून तर मला माझ्या सर्व बहिणी अगदी खूप जवळ आल्यासारख्या वाटत आहेत. त्यांच्या माझ्या बालपणीच्या आठवणी तर अगदी  ताज्यातवान्या होऊन माझ्यासमोर नाचू लागल्या आहेत. आज मला सगळ्या बहिणींचे फोन आले. शुभेच्छा मिळाल्या. मी धन्य झालो. माझ्या सर्व बहिणींची माया मला माझ्या आयुष्यात अधिक पुढे नेण्यासाठी बळ देते आहे असे म्हटले तर ती अजिबात अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण माझ्या सर्व बहिणी निःस्वार्थी आहेत, हे मी निक्षून सांगू शकतो. माझ्यावर  निरपेक्ष भावनेने प्रेम करणाऱ्यां माझ्या सगळ्या बहिणी मला महानच वाटतात. त्यांनी कधी आम्हा भावांचा राग केला नाही. भावांकडून कधीच कसलीच अपेक्षा ठेवली नाही. आम्ही फक्त त्यांच्यासोबत आहोत हा आधारच त्यांना हवा असतो. त्यासाठी त्या आसुसलेल्या असतात. आज माझा भाऊ न्हानू किंवा सर्वांचा अण्णा बहुतेक बहिणींच्या गृही जाऊन भाऊबीज साजरी केली. त्याने तो आनंद साजरा केला. तो दरवर्षीच जातो. कधी चुकवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून होत नाही. जेवढे जमेल तेवढे सर्व बहिणींना खुश ठेवण्याच्या त्याच्या प्रयत्नांना माझे सलाम आहेत. तो माझ्यापेक्षा लहान असला तरी मनाने माझ्यापेक्षा खूपच मोठा आहे. तो रागावतो, रुसून बसतो, पण त्यात त्याचे प्रेमच लपलेले असते. तो जेव्हा खुश असतो, तेव्हा त्याचे डोळे पाहावे , मी असा खुश झालेला माझा न्हानू बऱ्याचदा पाहिला आहे. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी तो माझ्याकडे आला  आणि मला घट्ट कडकडून मिठी मारली. त्यात जे प्रेम होते , ते त्याचे प्रेम मला सतत मिळत राहावे असे वाटत राहते. मी मोठा असल्यामुळे कधी कधी कठोर होतो, पण मी सुद्धा हळवा आहे. माझ्या भावाला उदंड आयुष्य लाभो. कधी कधी वाटते, आपल्या परमप्रिय भावाला भाऊबीज केली तर ? भावाभावांमधली नाती अधिक सुदृढ होण्यासाठी असेही घडायला हवे. आम्हाला भरपूर बहिणी आहेत, म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. ज्यांना बहिणी नाहीत त्यांचे काय होत असेल ? ज्यांना भाऊ नाहीत त्यांचे काय होत असेल ? कल्पनाच केलेली बरी. सर्व बहिणी आणि भाऊ जिथे असतील तिथे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होवोत. त्यांच्यावर येणारे संकट वळून आमच्यावर येवो, आणि त्या आलेल्या सर्व संकटांना पार करण्याचे सामर्थ्य सर्व भावांमध्ये येवो. सर्व माझ्या बहिणींना भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा बाळू किंवा लाडका दादा. 

Friday, October 25, 2019

Happy Diwali 2022

🏮🏮Happy Diwali 2022

          नमस्कार ....🏮🏮HAPPY DIWALI 🏮🏮सुसंधी , आशा आणि आकांक्षा यांनी उजळून जावो तुमचं जीवन.....साजरा करा...उत्सवी आनंद....तुमच्या जीवनात येऊदे पुन्हा एक नवी पहाट..पुन्हा एक नवी आशा..तुमच्या कर्तृत्वाला..पुन्हा मिळू दे एक नवी दिशा....दीपोत्सवाने आपले जीवन आनंदाने व सुखाने उजळू दे...आपणां सर्वांना दिवाळीच्या ' पवित्र ' शुभेच्छा ....आरोग्य आणि संततीसौख्य लाभो...सार्वजनिक क्षेत्रात यश मिळो...आध्यात्मिक ओढ लागो...भाग्य उजळो...मोठ्या पराक्रमाचे वर्ष जावो...गृहसौख्य लाभो...आणि नोकरी व्यवसायात भरभराट होवो...इच्छित फलप्राप्ती होवो.

शुभेच्छुक ....प्रवीण कुबल आणि समस्त कुबल परिवार...कणकवली .



Thursday, August 15, 2019

तुझा हात माझ्या हाती असू दे

काय असते रक्षाबंधन ?

          आम्ही भावंडे रक्षाबंधन येण्याची नेहमी वाट बघत बसतो. तेवढेच बहिणी भावांच्या आठवणी जागृत होतात. पण एक वर्षाने येणारे हे रक्षाबंधन खूपच उशिराने आल्यासारखे वाटत राहते. भाऊ बहिणीच्या येण्याची  आतुर होऊन वाट बघत असतो. बहीण कधी एकदा राखी बांधून भावाला भेटून जाण्यासाठी व्याकुळ झालेली असते. दोन्हीकडून प्रेमाने व्याकुळ होणे सुरूच राहते. कित्येक वर्षांपूर्वीचे रक्षाबंधन आठवते, त्यावेळी मोठ्या थोरल्या राख्या असत. स्पंजच्या राख्या, लोकरीच्या राख्या , मण्यांच्या राख्या आणि दरवेळी येणारे ट्रेंड्स अशा राख्या बघत राहायला आवडतात. बहिणींना ही  घेऊ कि ती घेऊ असे होऊन  जात असेल. भारीवाली राखी माझ्या लाडक्या भाऊरायासाठी म्हणत बहीण आपल्याकडे साठलेले सर्व पैसे खर्च करून राख्या घेत राहतात. खूप बहिणी असलेले भाऊ आपल्या हातात किती राख्या बांधल्या आहेत त्या मोजत राहतात. संध्याकाळपर्यंत संपूर्ण हात भरून जातो. लहानपणी छोट्या हातात मोठ्या राख्या बांधल्या जात, आता मात्र उलटे झाले आहे, मोठ्या हातांमध्ये छोट्या राख्या बांधण्याची फॅशन येऊ लागली आहे.
            काहीही झाले तरी दिवसभर राख्यांनी बांधलेले दोन्ही हात फिरवत आम्ही दोघे भाऊ सर्वांना दाखवत सुटत असू. कोणी कोणती राखी बांधली याचे सर्वांनाच अप्रूप असे. जेवढी मोठी राखी तेवढी अधिक माया असे आम्हाला त्यावेळी वाटत असे. आता मात्र ती माया कमी झाली की  काय ? कारण आता खूपच छोट्या राख्या बाजारात येत आहेत, आणि अतिशय महागड्या सुद्धा आहेत. राखी कसलीही असो, भगिनीप्रेम मात्र त्यात पुरेपूर भरलेले दिसे. भावाकडून कोणतीही अपेक्षा कधीही न बाळगणाऱ्या आमच्या बहिणी अजूनही  तश्याच आहेत. त्यांच्यात कोणताही बदल झालेला नाही. राख्या छोट्या झाल्या , पण माया अधिक मोठी झाल्याचे आजही लक्षात येते. खूप लांब गेलेल्या बहिणी फक्त अंतराने लांब गेल्या , पण अंतःकरणाने खूप जवळ येत आहेत. लहानपणीच्या गोड आठवणी जपत अधिक प्रेमभराने डोळ्यात आनंदाचे अश्रू आणत आहेत. बंधुप्रेमाने भारावून जात , फोनवरून बोलत आहेत. व्हिडिओ कॉल  करून जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत.
            ताईने दिलेली प्रेमाची शिकवण , आकाने दिलेली प्रेमाची चापटी , पपीने लटक्या रागाने केलेला तोंडाचा
ओ आजच्या सेल्फीपेक्षा खूपच भारी आहे. आईचे रक्षाबंधन , मामांची ओवाळणी यामुळे रक्षाबंधन आमच्यासाठी आनंदोत्सव असे. आम्हाला त्या दिवशी खूप सारा खाऊ मिळत असे. मामाचे आमच्याकडे येणे आम्हाला नेहमीच सुखावणारी गोष्ट असे. त्यांची गोड स्मित हास्याची लकेर आम्हाला आमच्यात स्फुल्लिंग पेरून जात असे. आज त्यांनीही आठवण येते आणि जीव कासावीस होतो. त्यांच्यासोबतच दिवस अविस्मरणीयच होते. आई गेल्यांनतर दर  राखीपौर्णिमेला ते आईच्या प्रतिमेला हार घालण्यास येत ते बघताना आम्हालाही त्यांचे बहिणीवर असलेले निर्व्याज प्रेम दिसत असे. आम्ही त्यांच्याकडूनच बहिणीवर कसे प्रेम करावे ते शिकलो. आई आणि भाईमामांच्या अश्या आठवणी आहते कि ती भावंडे कधी वाद खेळताना दिसली नाहीत. आज आम्ही मात्र बारीक सारीक कारणांचा  बाऊ करतो. वाईट वाटून घेतो. प्रतिष्ठेचा प्रश्न बनवतो. दुसऱ्यांना दोष देत बसतो. आपलेच बरोबर , दुसऱ्याचे चुकले म्हणून कुढत बसतो. हे कसले प्रेम ? ही  असेल निव्वळ देवघेव आणि लोकांना दाखवण्यासाठी केलेली राखीपौणिमा.
            आजसुद्धा राख्या पोष्टाने येतात, लवकर येतात, कधी उशिराने येतात. त्यात अगदी तश्याच भावना पाठवलेल्या असतात. त्या फक्त समजणे भावासाठी मोठे काम असते. आम्ही दोघेही भाऊ आमच्या सर्व सख्ख्या , चुलत बहिणींना, मामेबहिणींना  कधीही अंतर दिलेले नाही आणि पुढे देणार नाही. त्यांनी राख्या पाठवो अगर न पाठवो ...त्या सर्व बहिणी आमच्या दोघांसाठी  सर्वश्रेष्ठच आहेत. त्यांनी आम्हांला कधीही हाक मारावी, आम्ही नक्कीच त्यांच्यासाठी धावून जाऊ. जगातील माझ्या सर्व बहिणींसाठी जगात जेवढे पाणी आहे तितक्या शुभेच्छा.

















             

Saturday, August 10, 2019

माझी पूर्वपत्नी ऐश्वर्या : एक अपूर्ण स्वप्न

          आज माझ्या पूर्व पत्नीचा म्हणजे ऐश्वर्या कुबल हिचा जन्मदिवस. आज ती हयात नाही. पण तिच्या आठवणी सदैव माझ्यासोबत आहेत. ती जाऊन आता १२ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तिची आठवण रोज मला येते. आज तिची मुलगी म्हणजे आमची मुलगी हर्षदा उर्फ छकुली १२ वीत  शिकत आहे या गोष्टीचा आनंद आहे. ती अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. बोलते तशी, वागते तशी, तिचा माझ्या मुलीला फक्त चारच  वर्षाचा सहवास लाभला. तिची मम्मी तिला सोडून जाताना ती फक्त चार वर्षांची छकुली होती. तिला आपल्या मम्मीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला कधी एकदा बघतो असे झाले होते. पण नियतीला असे घडणे मंजूर नव्हते. गरोदरपणात ८ व्या महिन्यात मुलगा पोटातच दगावल्याने माझी पत्नी असह्य वेदना सहन करत होती. शेवटी डॉक्टरच हतबल झाले. त्यांनी हात टेकले. त्यांच्याने पुढील उपचार करताना होणारा धोका आम्हाला समजावून सांगितला. पण आम्ही बाळ गेले तरी आपली पत्नी व्यवस्थित असेल या भावनेने डॉक्टरांना धन्यवाद देत राहिलो. डॉक्टर आम्हाला दिलासा देत होते. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून होतो. पण डॉक्टर देव नसतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या समोर अखेरचा श्वास घेताना माझी ऐशू माझ्याशी शेवटची बोलत होती. तिला अतिशय घाम आला होता.
          तिला समजले कि आता मला जगणे शक्य नाही, तिला रक्तदाबाने घेरले. अतिशय कमी रक्तदाब असल्याने तिने आपले डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केले , पण व्यर्थ.....तिचे प्राण निघून गेले होते....परत पुन्हा न येण्यासाठी. ....मी एकटा पडलो होतो...सात वर्षे जिने मला अतिशय प्रेमाने साथ दिली ती माझी प्रिय पत्नी अखेरच्या घटका मोजत होती. ते पाहत असताना मी पुरता ढासळून गेलो होतो. मी..तेव्हा मी राहिलो नाही....अक्षरशः वेड्यासारखा बरळत राहिलो. डॉक्टरांना काहीबाही बोललो...तेव्हा माझा राग अतिशय अनावर झाला होता...मी पिसाळलेल्या माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर जे बडबडत होतो ...ते आता आठवले तरीही माझा थरकाप होतो...मला खूप त्रास झाला सत्य स्वीकारायला. पण अखेर सत्य स्वीकारणे भाग होते. माझ्या मुलीचा चेहरा मला दिसू लागला. तिला जेव्हा आपला भाऊ गेल्याचे समजले तेव्हा मी तिला कसे तरी समजावून सांगितले...म्हणालो, बाळा, तुझा भाऊ  खूप चांगला होता , पण तो देवाला आवडला असेल म्हणून त्याने त्याला आपल्याकडे नेले.....हे सांगितल्यानंतर ती एवढी रडली कि म्हणाली...पप्पा, मला माझा भाऊ हवा होता हो...माझ्याशी खेळायला तुम्ही मला भाऊ आणून देणार होतात ना ? मग मी आता कोणाशी खेळू ? गेले आठ महिने मला तुम्ही मला बाळ येणार ...बाळ येणार म्हणून सांगत होतात ...मग असं कसं  झालं ?  ....आणि तिला समजावताना माझ्या नाकी नऊ आलेल्या...आता तर तिची मम्मा देखील हे जग सोडून गेली होती...आता हे तिला कसं  सांगायचं ?  ....मन घट्ट केलं आणि तिला म्हणालो, बाळा, आपलं बाळ गेलं देवबाप्पाकडे....मग त्याला सांभाळायला कोण ? त्या बाळाला सांभाळायला तुझ्या मम्मीला देवबाप्पाकडे जावं लागलं....हे ऐकल्यानंतर तिने जो हंबरडा फोडला होता....तो मला आज आठवतो आणि हा लेख लिहितानाही माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.....खूप कठीण काळीज केलं आणि माझ्या प्रिय पत्नीचं जाणं गिळून टाकलं...ठरवलं कि आता मला माझ्या मुलींसाठी छकुलीसाठी जगायचं आहे...तिच्याशी नंतर वर्षभर मी इतकी मैत्री केली कि ती आपल्या मम्मीला विसरली...त्यासाठी मला तिची मम्मा आणि पप्पा या दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या.आता मी दुसरे लग्न करून चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न  करत आहे.  दुसरी पत्नीदेखील जीवापाड प्रेम करणारी मिळालीय. पण तरीही कधीतरी अनेक प्रश्न मनात  काहूर आणून जातात...मग मी काही क्षणांसाठी फक्त आणि फक्त माझ्या ऐश्वर्याचाच होऊन जातो. आज माझ्या पूर्व पत्नीच्या मृतात्म्यास शांती लाभावी म्हणून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 


Thursday, August 8, 2019

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथ

                                                आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथ - भाग १
          आज आमच्या बाबांचा वाढदिवस . ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्याच दिवशी आमच्या घरात एक क्रांतिकारक जन्माला आले. आमच्या आयुष्यात क्रांती घडवणारे अनोखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले तो हाच दिवस. आमचे बाबा आता ७४ वर्षांचे झाले. मला समजायला लागल्यापासून आमच्या सर्वांवर अतिशय प्रभाव असणारे आमचे बाबा अजूनही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरली. आमचे पिरगळलेले कान  याची साक्ष आहेत. आमच्या पाठीवरील दिलेली प्रेमाची थाप आमच्या  अंगावर एक एक मूठ मांस चढवत गेलेली. त्यांनी दिलेला आश्वासक प्रत्येक शब्द त्यांनी पाळला . आज आपण शब्द देतो, पण किती पाळतो. परंतु बाबा शब्दाला पक्के. त्यांनी एकदा शब्द दिला कि काहीही झाले तरी , त्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील पण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ. त्यांनी कधी कशात माघार नाही घेतली. सर्व कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत असा त्यांचा दंडक अजूनही आहे.
          त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे. त्यांनी आम्हाला नेहमी पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कधी मागे ओढले नाही. आम्ही अभ्यासात नेहमी पुढे असावे यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका धरत. कधी कधी आम्हीच घाबरत घाबरत आमचे प्रगतीपत्रक दाखवत असू. चांगले गुण  मिळूनसुद्धा  ते प्रगतीपत्रक दाखवताना पोटात भीतीचा भलामोठा गोळा येई. आता बाबा काय म्हणतात कोण जाणे.पण त्यांनी आमच्याकडे पाहिलेली प्रेमाची नजर आमची भीती पळवून लावी. आम्ही मग सर्वजण त्यांच्या मांडीवर बसून स्वर्गसुख घेत असू. त्यांची मांडी आमच्यासाठी राजाची गादीच असे. कारण त्यावर बसायला मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यावर मी बऱ्याचदा हक्क सांगत असे. त्यावरून आम्हा पाच भावंडांमध्ये वाद होत. पण मी काही केल्या माझे आसन सोडण्यास तयार नसे. शेवटी मी विजयी मुद्रा करून त्यांच्या मांडीवर ठाण  मांडून बसत असे आणि मी कसा जिंकलो आणि बाकी कसे हरले याचा आनंद घेत असे. म्हणून मी त्यांचा लाडका होतो असे नाही. त्यांना आम्ही सर्व भावंडे लाडकीच होतो. कोणालाही त्यांनी कधी कमी स्थान दिले नाही. माझा छोटा भाऊ , आम्ही मोठी भावंडे त्याला न्हानू म्हणतो. त्याच्या उचापती करण्यामुळे त्याला बऱ्याचदा बाबांचा मार खावा लागला आहे. त्याच्यावर आईचे जीवापाड प्रेम होते. त्याला अचानक आकडी येत असे. तो रागाने आपले डोके भिंतीला किंवा जमिनीला आपटून घेत असे. त्यामुळे त्याला आईकडून कमरेवर घेऊन भरवणे होत असे. बाबा त्याला जवळ घेऊन समजावत असत. पण एकाच दिवसात तो ते विसरून जाई आणि आपल्या खोड्या सुरूच ठेवी. त्यामुळे त्याला प्रसाद मिळे. मार खाऊनही त्याला पुन्हा खोड्या करणे जमत असे. त्यामुळे त्याला बाबांची भीती वाटे. आपण कोणतीही गोष्ट केली तर बाबा आपल्यावर रागे भरतात असा  त्याचा समज त्यामुळे अधिक दृढ होत गेला. आता मात्र तो बाबांसाठी जे काही करतो आहे, ते बघून आम्हाला आमचा पूर्वीचा न्हानू आठवतो आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. कारण आता आमचा न्हानू खूप ग्रेट झालेला आहे. त्याने फक्त बाबांबद्दल गैरसमज असतील तर ते घालवून शुद्ध व्हावे. कारण काहीही झाले तरी बाबा आपल्याला आपल्या  हिताचेच सांगतात. न्हानूच्या नोकरीसाठी बाबानी केलेले प्रयत्न आणि त्यावेळी त्यांची होणारी घालमेल मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. बाबांनी आम्हा सर्वांना सुखात साथ दिलीच, पण दुःखात  ते आमच्या जास्त सोबत राहिलेले आहेत.
          मला डी एड ला पाठवण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यामुळे आज मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. आमचे बाबा शिक्षक बनू  शकले नाहीत, काही काळ त्यांनी शिक्षकी पेशाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्यांचे स्वप्न होते कि माझ्या मुलांना मी शिक्षक बनविन. त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले. आज त्यांचे दोन्ही मुलगे शिक्षक आहेत.  बाबा सगळ्यांना शिक्षकच वाटतात. त्यांनी शाळेत शिकवले कमी , पण आमच्या आयुष्यरूपी शाळेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे शिकवले ते शाळेपेक्षाही अधिक लाखमोलाचे आहे. त्यांच्याबरोबर माझे बऱ्याचदा वाद होतात, पण मी चुकीचा आहे हे मला नंतर पटते, पण माझे बोलणे ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. त्यांच्यासारखा मी कधीच होऊ शकत नाही. मी त्यांना बराच त्रास दिलेला आहे, त्यांचे मन दुखावले आहे. आजच्या दिवशी मला या गोष्टीचा त्रास होत आहे. मी बाबांना न दुखावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन . 

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...