Saturday, August 10, 2019

माझी पूर्वपत्नी ऐश्वर्या : एक अपूर्ण स्वप्न

          आज माझ्या पूर्व पत्नीचा म्हणजे ऐश्वर्या कुबल हिचा जन्मदिवस. आज ती हयात नाही. पण तिच्या आठवणी सदैव माझ्यासोबत आहेत. ती जाऊन आता १२ वर्षांपेक्षा जास्त काळ लोटला आहे. तिची आठवण रोज मला येते. आज तिची मुलगी म्हणजे आमची मुलगी हर्षदा उर्फ छकुली १२ वीत  शिकत आहे या गोष्टीचा आनंद आहे. ती अगदी आपल्या आईच्या वळणावर गेली आहे. बोलते तशी, वागते तशी, तिचा माझ्या मुलीला फक्त चारच  वर्षाचा सहवास लाभला. तिची मम्मी तिला सोडून जाताना ती फक्त चार वर्षांची छकुली होती. तिला आपल्या मम्मीच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला कधी एकदा बघतो असे झाले होते. पण नियतीला असे घडणे मंजूर नव्हते. गरोदरपणात ८ व्या महिन्यात मुलगा पोटातच दगावल्याने माझी पत्नी असह्य वेदना सहन करत होती. शेवटी डॉक्टरच हतबल झाले. त्यांनी हात टेकले. त्यांच्याने पुढील उपचार करताना होणारा धोका आम्हाला समजावून सांगितला. पण आम्ही बाळ गेले तरी आपली पत्नी व्यवस्थित असेल या भावनेने डॉक्टरांना धन्यवाद देत राहिलो. डॉक्टर आम्हाला दिलासा देत होते. आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवून होतो. पण डॉक्टर देव नसतो, हे तेव्हा मला कळले. माझ्या समोर अखेरचा श्वास घेताना माझी ऐशू माझ्याशी शेवटची बोलत होती. तिला अतिशय घाम आला होता.
          तिला समजले कि आता मला जगणे शक्य नाही, तिला रक्तदाबाने घेरले. अतिशय कमी रक्तदाब असल्याने तिने आपले डोळे पांढरे केले. डॉक्टरांनी आपल्या पद्धतीने पुरेपूर प्रयत्न केले , पण व्यर्थ.....तिचे प्राण निघून गेले होते....परत पुन्हा न येण्यासाठी. ....मी एकटा पडलो होतो...सात वर्षे जिने मला अतिशय प्रेमाने साथ दिली ती माझी प्रिय पत्नी अखेरच्या घटका मोजत होती. ते पाहत असताना मी पुरता ढासळून गेलो होतो. मी..तेव्हा मी राहिलो नाही....अक्षरशः वेड्यासारखा बरळत राहिलो. डॉक्टरांना काहीबाही बोललो...तेव्हा माझा राग अतिशय अनावर झाला होता...मी पिसाळलेल्या माणसासारखा हॉस्पिटलच्या बाहेर जे बडबडत होतो ...ते आता आठवले तरीही माझा थरकाप होतो...मला खूप त्रास झाला सत्य स्वीकारायला. पण अखेर सत्य स्वीकारणे भाग होते. माझ्या मुलीचा चेहरा मला दिसू लागला. तिला जेव्हा आपला भाऊ गेल्याचे समजले तेव्हा मी तिला कसे तरी समजावून सांगितले...म्हणालो, बाळा, तुझा भाऊ  खूप चांगला होता , पण तो देवाला आवडला असेल म्हणून त्याने त्याला आपल्याकडे नेले.....हे सांगितल्यानंतर ती एवढी रडली कि म्हणाली...पप्पा, मला माझा भाऊ हवा होता हो...माझ्याशी खेळायला तुम्ही मला भाऊ आणून देणार होतात ना ? मग मी आता कोणाशी खेळू ? गेले आठ महिने मला तुम्ही मला बाळ येणार ...बाळ येणार म्हणून सांगत होतात ...मग असं कसं  झालं ?  ....आणि तिला समजावताना माझ्या नाकी नऊ आलेल्या...आता तर तिची मम्मा देखील हे जग सोडून गेली होती...आता हे तिला कसं  सांगायचं ?  ....मन घट्ट केलं आणि तिला म्हणालो, बाळा, आपलं बाळ गेलं देवबाप्पाकडे....मग त्याला सांभाळायला कोण ? त्या बाळाला सांभाळायला तुझ्या मम्मीला देवबाप्पाकडे जावं लागलं....हे ऐकल्यानंतर तिने जो हंबरडा फोडला होता....तो मला आज आठवतो आणि हा लेख लिहितानाही माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आहेत.....खूप कठीण काळीज केलं आणि माझ्या प्रिय पत्नीचं जाणं गिळून टाकलं...ठरवलं कि आता मला माझ्या मुलींसाठी छकुलीसाठी जगायचं आहे...तिच्याशी नंतर वर्षभर मी इतकी मैत्री केली कि ती आपल्या मम्मीला विसरली...त्यासाठी मला तिची मम्मा आणि पप्पा या दोन्ही भूमिका बजावाव्या लागल्या.आता मी दुसरे लग्न करून चांगले आयुष्य जगण्याचा प्रयत्न  करत आहे.  दुसरी पत्नीदेखील जीवापाड प्रेम करणारी मिळालीय. पण तरीही कधीतरी अनेक प्रश्न मनात  काहूर आणून जातात...मग मी काही क्षणांसाठी फक्त आणि फक्त माझ्या ऐश्वर्याचाच होऊन जातो. आज माझ्या पूर्व पत्नीच्या मृतात्म्यास शांती लाभावी म्हणून मी तिला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. 


Thursday, August 8, 2019

आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथ

                                                आमचे बाबा : एक अनमोल ग्रंथ - भाग १
          आज आमच्या बाबांचा वाढदिवस . ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्याच दिवशी आमच्या घरात एक क्रांतिकारक जन्माला आले. आमच्या आयुष्यात क्रांती घडवणारे अनोखे व्यक्तिमत्त्व जन्माला आले तो हाच दिवस. आमचे बाबा आता ७४ वर्षांचे झाले. मला समजायला लागल्यापासून आमच्या सर्वांवर अतिशय प्रभाव असणारे आमचे बाबा अजूनही आमच्यासाठी मार्गदर्शकच आहेत. त्यांनी दिलेली शिकवण आम्हाला प्रगतीच्या दिशेने नेणारी ठरली. आमचे पिरगळलेले कान  याची साक्ष आहेत. आमच्या पाठीवरील दिलेली प्रेमाची थाप आमच्या  अंगावर एक एक मूठ मांस चढवत गेलेली. त्यांनी दिलेला आश्वासक प्रत्येक शब्द त्यांनी पाळला . आज आपण शब्द देतो, पण किती पाळतो. परंतु बाबा शब्दाला पक्के. त्यांनी एकदा शब्द दिला कि काहीही झाले तरी , त्या दिलेल्या शब्दाला जागण्यासाठी जीवाचा आटापिटा करतील पण पूर्ण केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांचा आत्मविश्वास प्रबळ. त्यांनी कधी कशात माघार नाही घेतली. सर्व कामे वेळच्या वेळी झाली पाहिजेत असा त्यांचा दंडक अजूनही आहे.
          त्यांच्याबद्दल आमच्या मनात आदरयुक्त भीती आहे. त्यांनी आम्हाला नेहमी पुढे पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. कधी मागे ओढले नाही. आम्ही अभ्यासात नेहमी पुढे असावे यासाठी ते नेहमीच आग्रही भूमिका धरत. कधी कधी आम्हीच घाबरत घाबरत आमचे प्रगतीपत्रक दाखवत असू. चांगले गुण  मिळूनसुद्धा  ते प्रगतीपत्रक दाखवताना पोटात भीतीचा भलामोठा गोळा येई. आता बाबा काय म्हणतात कोण जाणे.पण त्यांनी आमच्याकडे पाहिलेली प्रेमाची नजर आमची भीती पळवून लावी. आम्ही मग सर्वजण त्यांच्या मांडीवर बसून स्वर्गसुख घेत असू. त्यांची मांडी आमच्यासाठी राजाची गादीच असे. कारण त्यावर बसायला मिळणे ही साधी गोष्ट नव्हती. त्यावर मी बऱ्याचदा हक्क सांगत असे. त्यावरून आम्हा पाच भावंडांमध्ये वाद होत. पण मी काही केल्या माझे आसन सोडण्यास तयार नसे. शेवटी मी विजयी मुद्रा करून त्यांच्या मांडीवर ठाण  मांडून बसत असे आणि मी कसा जिंकलो आणि बाकी कसे हरले याचा आनंद घेत असे. म्हणून मी त्यांचा लाडका होतो असे नाही. त्यांना आम्ही सर्व भावंडे लाडकीच होतो. कोणालाही त्यांनी कधी कमी स्थान दिले नाही. माझा छोटा भाऊ , आम्ही मोठी भावंडे त्याला न्हानू म्हणतो. त्याच्या उचापती करण्यामुळे त्याला बऱ्याचदा बाबांचा मार खावा लागला आहे. त्याच्यावर आईचे जीवापाड प्रेम होते. त्याला अचानक आकडी येत असे. तो रागाने आपले डोके भिंतीला किंवा जमिनीला आपटून घेत असे. त्यामुळे त्याला आईकडून कमरेवर घेऊन भरवणे होत असे. बाबा त्याला जवळ घेऊन समजावत असत. पण एकाच दिवसात तो ते विसरून जाई आणि आपल्या खोड्या सुरूच ठेवी. त्यामुळे त्याला प्रसाद मिळे. मार खाऊनही त्याला पुन्हा खोड्या करणे जमत असे. त्यामुळे त्याला बाबांची भीती वाटे. आपण कोणतीही गोष्ट केली तर बाबा आपल्यावर रागे भरतात असा  त्याचा समज त्यामुळे अधिक दृढ होत गेला. आता मात्र तो बाबांसाठी जे काही करतो आहे, ते बघून आम्हाला आमचा पूर्वीचा न्हानू आठवतो आणि त्याच्याबद्दलचा अभिमान अधिक दुणावतो. कारण आता आमचा न्हानू खूप ग्रेट झालेला आहे. त्याने फक्त बाबांबद्दल गैरसमज असतील तर ते घालवून शुद्ध व्हावे. कारण काहीही झाले तरी बाबा आपल्याला आपल्या  हिताचेच सांगतात. न्हानूच्या नोकरीसाठी बाबानी केलेले प्रयत्न आणि त्यावेळी त्यांची होणारी घालमेल मी प्रत्यक्ष अनुभवली आहे. बाबांनी आम्हा सर्वांना सुखात साथ दिलीच, पण दुःखात  ते आमच्या जास्त सोबत राहिलेले आहेत.
          मला डी एड ला पाठवण्याचा निर्णय त्यांचाच होता. त्यामुळे आज मी एक चांगला शिक्षक बनू शकलो. आमचे बाबा शिक्षक बनू  शकले नाहीत, काही काळ त्यांनी शिक्षकी पेशाचा अनुभव घेतलेला आहे, म्हणून त्यांचे स्वप्न होते कि माझ्या मुलांना मी शिक्षक बनविन. त्यांनी त्यांचे स्वप्न सत्यात उतरविले. आज त्यांचे दोन्ही मुलगे शिक्षक आहेत.  बाबा सगळ्यांना शिक्षकच वाटतात. त्यांनी शाळेत शिकवले कमी , पण आमच्या आयुष्यरूपी शाळेत त्यांनी आम्हाला वेळोवेळी जे शिकवले ते शाळेपेक्षाही अधिक लाखमोलाचे आहे. त्यांच्याबरोबर माझे बऱ्याचदा वाद होतात, पण मी चुकीचा आहे हे मला नंतर पटते, पण माझे बोलणे ते सहन करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. त्यांच्यासारखा मी कधीच होऊ शकत नाही. मी त्यांना बराच त्रास दिलेला आहे, त्यांचे मन दुखावले आहे. आजच्या दिवशी मला या गोष्टीचा त्रास होत आहे. मी बाबांना न दुखावण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करीन . 

Monday, August 5, 2019

नागपंचमीचा सण

नागपंचमीचा सण 
          काल आम्ही आमच्या किर्लोस गावी गेलो होतो.  आमची किर्लोस आता आंबवणेवाडी या नावानेदेखील ओळखली जाते. आमचा आंबवणे गाव आता महसुली गाव झाला आहे. नागपंचमीच्या दिवशी पाऊस अगदी बेसुमार पडत होता. आमच्या वरवडे कासरल बंधाऱ्यावरून पाणी वाहून जाताना दिसत होते. पाण्याचा वेग वाढत चाललेला दिसत होता. तरीही आमची घरी जायची ओढसुद्धा तितकीच वाढत चालली होती.  कधी एकदा घरी पोहोचतो असे झाले होते. ही  ओढ नागोबासाठी  आणि आमच्या घराच्या माणसांसाठी अधिक होती. नदीच्या पलीकडे आमचा गाव असल्यामुळे काहीही झाले तरी नदी पार करून जाणे भागच होते. मग आम्ही ठरवले कि, गाडी अलीकडेच ठेवून लोखंडी साकवावरून जायचे. 
          आम्ही गाडी अलीकडे सुरक्षित ठिकाणी लावली आणि चालत- चालत आमच्या घराच्या दिशेने निघालो. वाटेतील वर्षा ऋतूचा वर्षाव धो- धो सुरु होताच. पण त्यातही एक अनोखी गंमत अनुभवत शेतीच्या मेरेवरून चाललो होतो. चालता- चालता  नदी कधी आली ते समजले देखील नाही.  नदीच्या वर आम्ही फक्त १०-१५ फुटांवरून साकवावरून जात होतो. नदीचे पाणी अतिशय वेगाने समुद्राला भेटायला चालले होते. तो वेग इतका भयानक होता कि तो वेग पाहून आमचे डोळे गरगरायला लागले. पण नदीचे ते रौद्ररूप पाहून निसर्ग आपल्यावर इतका का कोपला आहे याचा प्रश्न मला पडला. 
          लांबलचक लोखंडी साकव एकदाचे पार करून आम्ही आमच्या शेतमळ्यांमध्ये प्रवेश केला. शेत छान डुलत होतं . आम्हाला जणू बोलावत होतं . आमचं  स्वागत करत होतं . बऱ्याच दिवसानंतर हिरवे हिरवे गार गालिचे पाहण्याची संधी उपलब्ध झाली होती. आम्ही ते आमच्या डोळ्यात साठवून ठेवत होतो. निसर्गाने दिलेले ते अविस्मरणीय क्षण टिपताना आमची त्रेधा होत होती. काय पाहू आणि काय नको असे झाले होते. मस्त मजेत रमत गमत आम्ही आमच्या घरी कधी पोचलो ते समजलेदेखील नाही. 
          आमची श्रीगणेश चित्रशाळा समोरच होती. त्यात प्रथम प्रवेश केला. गणेशाच्या अप्रतिम मातीच्या मूर्ती पाहून पुन्हा जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा आम्ही भावंडे मातीच्या मूर्ती बनवताना तासनतास आमच्या चित्रशाळेत बसून आमच्या  बाबांची,काकांची बोटे मातीत कशी लीलया फिरत त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत असू. नागोबा बनवून त्यांना रंग देण्यास बाबा आम्हास सांगत. आम्ही नागोबा बनवून ते रंगवताना आमचे भान हरवून जात असे. कोण आनंद होई त्याचे शब्दात वर्णन करणे खरेच कठीण आहे. 
           घरी आलो. मस्त वाफाळलेला चहा घेतला. आमच्या बाबांनी  बनवलेला, भावाने रंगवलेला मातीचा नागोबा पाटावर घेऊन मी घरी  आणला. सोबत सर्व लहान मुले जल्लोष करत होतीच.बबली आणि गुड्डी नागोबा विकून आलेले पैसे मोजण्यात दंग झाली होती.
           बाबानी नागोबाचे पूजन सुरु केले. नागोबा पूजन सुरु असताना आम्ही सर्व मंडळी त्यांच्या भोवती बसून होतो. लाह्यांचा नैवेद्द्य,  दुर्वा, फुले,बेलाची पाने आणि सुंदरशी रांगोळी असा सोहळा संपन्न होत होता.  सुखकर्ता  दुःखहर्ता ,  लवथवती विक्राळा अश्या आरत्या म्हणत सर्वांनी नागोबाचे मनोभावे पूजन केले. नंतर  केळीच्या पानावर भोजन वाढण्यात आले. साधा पांढरा भात , गोडी डाळ, कारल्याची भाजी,  जिलेबी,पापड, वाटाणे- बटाट्याची तिखट भाजी, मोदक असा मस्त बेत काकींनी केला होता. त्यांनी त्यात आपले प्रेम भरभरून ओतले होते. सर्वांनी आपापली पाने  संपूर्णपणे स्वच्छ केली होती. स्वाद काही औरच होता त्या  भोजनाचा. वर्षातून एकच असा दिवस असतो ज्या दिवशी आम्ही घरातील सर्व मंडळी एकत्र असतो. काहीही झाले , किंवा कितीही अडचणी आल्या तरी आम्ही सर्व कुटुंबीय या दिवशी एकत्र  येतोच.
           त्यालाही कारण तसेच आहे. बाबांच्या बालपणीची गोष्ट आहे. नागपंचमीचा दिवस होता. सर्वजण जेवायला बसले होते. माझे बाबासुद्धा जेवत होते. आजीने खीर बनवली होती. माझ्या बाबांना ती खूपच आवडली. त्यामुळे त्यांनी खीर पुन्हा पुन्हा मागून घेतली. आजी जेवली नव्हती. आजोबा जेवल्याशिवाय आजी जेवायला बसत नसे. सर्वांची जेवणे  झाली. आता आजी जेवायला बसली. बाबा तिच्या जवळच रेंगाळत होते. जेवल्यानंतर मुलांनी खाल्लेली खिरीची पाने आजी  चाटू लागली. ते माझ्या बाबांनी पाहिले  व आजीवर ओरडले. म्हणाले, आज सणादिवशी तू आमची पाने चाटून खातेस म्हणजे काय ? हे काही बरोबर नाही. सर्व भावंडांनी ते ऐकले व बाबांवरच ओरडायला लागली, ' तू आईच्या वाटणीची सर्वच्या सर्व खीर फस्त केलीस , त्यामुळे आईसाठी अजिबात खीर उरली नाही. तुझ्यामुळेच तिला आमची सर्वांची पाने चाटण्याची  वेळ आली आहे. तूच या गोष्टीला जबाबदार आहेस.'  हे ऐकल्याबरोबर माझ्या बाबांच्या सर्व प्रकार लक्षात आला. ते सरळ आजीच्या कुशीत शिरले आणि मोठ्याने रडू लागले. आजी म्हणाली , ' अरे बाळा, तू खीर खाल्लीस तेव्हाच माझे पोट  भरले, पण मी केलेली खीर कशी होती ती मला  बघायची होती, म्हणून मी माझ्या मुलांनी उष्टी पाने चाटून खात होते, तू वाईट वाटून घेऊ नकोस , आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील तेव्हा तू मला आणखी चांगले पदार्थ खाऊ घालशील आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करशील ना ? आजीचे ते शब्द ऐकून त्यादिवसापासून माझ्या बाबांनी लहानपणीच ठरवले कि काहीही झाले तरी आपण आपली परिस्थिती बदलायचीच. म्हणून नागपंचमीचा तो दिवस बाबांच्या आणि आता आमच्याही आयुष्यातील एक अविस्मरणीय सण  आणि अविस्मरणीय क्षण बनला आहे तो यासाठीच. 
          संध्याकाळी नागाचे विसर्जन केले आणि आम्ही परत कणकवलीला येण्यासाठी बाहेर पडणार होतो. पण बाहेर पावसाने अगदी उधाण मांडले होते. तो आम्हाला बाहेर पडायला  देत नव्हता. शेवटी आम्ही थांबण्याचा निर्णय घेतला. रात्रीपर्यंत नदीचे पाणी आमच्या घराच्या खालच्या कोपऱ्यापर्यंत येऊन पोहोचले होते. सर्वजण झोपण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते, पण पावसाचे पाणी आमच्या घरात घुसेल या भीतीने अनेकांची झोपच उडाली होती. सकाळी दुसऱ्यादिवशी आज पाणी वाढलेच होते. कमी होण्याची शक्यता नव्हतीच. शेवटी खाजगी गाडी करून आम्हाला आमच्या कणकवलीत घरी यावे लागले. शासनाने सर्व शाळांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केल्याचे आम्हाला समजले आणि जीव भांड्यात पडला. कारण आम्हाला शाळेत जायचे नव्हते. दोन दिवसांच्या पणिमय आठवणी सर्वांच्या डोळ्यात पाणी आणत


































होत्या. 

Sunday, July 14, 2019

माझा भाचा - तुषार उर्फ साईश

          आज आमच्या साईशचा वाढदिवस....माझ्या मोठ्या भाच्याचा मला सार्थ अभिमान आहे...तो एक चांगल्या मामाचा चांगला भाचा आहे...खूप आदर आहे मला त्याच्याबद्दल ...एवढं Higher शिक्षण घेऊनही त्याच्यामध्ये मीपणा नाही....तो आमचा आदर करतो...कारण अगदी लहान असतानाचा आमचा सर्वप्रथम भाचा आहे तो..
          आम्हीही शिकत असताना त्याचा जन्म झाला..डी.एड. सुरु होते माझे तेव्हा...शाहिरी प्रशिक्षण , योगप्रवेश परीक्षा, मुलांचे क्लास घेणे, बाबांचे जेवण पोचवणे, दुकानात दाढ्या करणे ( पाय पोचत नसले तरी )...जराही जीवाला उसंत न देता कामे सुरु होती...ताईने एका गोंडस बाळाला जन्म दिला ही आमच्यासाठी तेव्हा अतिशय महत्त्वाची बाब होती...तेव्हा आमच्या घरात आनंदोत्सव साजरा करण्यात आला होता..एक हलकेच आळस देणारं, भोकाड पसरुन रडणारं बाळ, टुकूर टुकूर माझ्याकडे बघणारं बाळ आम्हाला परमानंद देऊन गेलं होतं..त्याला मांडीवर घेतलं कि सगळा दिवसभराचा शीण निघून जात असे...मज्जा ..मज्जा होती..पहिल्यांदा त्याला घेताना भिती वाटत असे...पण नंतर अलगद उचलून घ्यायची सवय झाली...रडणारा बाळ गाणं म्हटल्यावर रडायचा थांबत असे...त्यामुळे मी गाणं म्हणण्याचा सपाटाच लावला...
          बालगीतांपासून समूहगीतांपर्यंत सगळी गाणी माझी गाऊन संपत असत.म्हणायचा थांबलो कि आमचा गोट्या रडू लागे..मग पुन्हा माझ्या आवाजाचा रेडिओ गर्जू लागे...मग काही काळानंतर आमची ताई डोंबिवलीला राहायला गेली..मी त्यावेळी भावोजींची ताईला आलेली पत्रे वाचून भारावून जात असे...त्यांच्या सुंदर हस्ताक्षरातील पत्रे वाचताना ते जवळच असल्याचा क्षणभर भास होई...पण त्यामुळे त्यांच्याबद्दल आम्हाला कमालीचा आदर वाटू लागला...त्यांचे हसणे, बोलणे आम्हाला आवडू लागले होते...
          ताईला मी सायकलवरुन स्टँडवर व स्टँडवरुन रेशनदुकानापर्यंत सोडण्याचे काम करत असे...साईशचा जन्म आमच्यासाठी महत्त्वपूर्ण होता...भावोजींचे आणि ताईचे बाळाबरोबरचे प्रेमळ बोलणे मला गुदगुल्या करत असे...एवढे प्रेमळ भाषेतील शब्द आम्ही पहिल्यांदाच ऐकले होते...मला आमच्या घरातले बाळू म्हणायचे..हे नाव मला आवडत नसे...कारण रागाच्या भरात त्याचा उच्चार बाळग्या किंवा बाळगो असा केला जाई आणि मला ते नाव म्हणूनच अजिबात आवडत नसे...त्यानंतर साईश मोठा होत असताना त्याचं बालपण बघता आले तेव्हा तेव्हा आम्हाला ते पाहताना आनंदाच्या उकळ्या फुटत असत...असा माझा लाडका भाचा तुषार कधी हुशार झाला ते समजलेदेखील नाही...
          एकदा तो पाटगांवात आला होता...तेव्हा तो ५ वी , ६ वीत असेल कदाचित ...मी त्याला सहज विचारले कि तू मोठेपणी कोण होणार आहेस...त्यावेळी त्याने दिलेले उत्तर आठवले कि अजूनही आम्हाला हसू येते...तो म्हणाला, बघूया आता मला माझे पप्पा - मम्मी काय बनवतात ते...ते उत्तर आज खरेच वाटते...
          आई वडिलांनी त्याला जसा घडवला आहे..तसाच तो बनला आहे...तो एक अत्यंत हुशार मुलगा आणि समंजस भाचा असून तो ज्या क्षेत्रात जाईल त्याचे सोने केल्याशिवाय राहणार नाही असे त्याला माझे उदंड आशीर्वाद आहेत...त्याचे भवितव्य उज्ज्वल असेल यांत मला किंवा कोणालाही तिळमात्रही शंका असायला नको.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 ) कणकवली.


माझी मुलगी - तनिष्का

          माझी २ नंबर मुलगी तनिष्का ....आज तिचा वाढदिवस...ती २ वर्षांची होती...तेव्हाची गोष्ट ..मी नुकतेच नवीन सलून सुरु केले होते. तो दिवस पहिला रविवारचा होता.आमचे अचानक ठरले राधानगरीला जायचे. उन्हाळ्याचे दिवस होते. दुकानाचे सोमवारी उद्घाटन केले होते मागच्या. हा त्यानंतरचा १ ला रविवार असूनही मी बाबांना आणि संतोषला दुकानात ठेवून मी , माझी पत्नी ईश्वरी व छोटी मुलगी तनिष्का उर्फ गुड्डीला आमच्या TVS Sport टू व्हिलरने घेऊन निघालो होतो. 
          १० वाजता सकाळी सुटलो. ११ वा. फोंडाघाटात होतो. पोहोचायला फक्त अर्धा तास बाकी होतो. उन्ह मी म्हणत होतं. माझ्या गाडीचा वेग थोडा वाढला होता. गाडी एजिवड्याच्या पुढे आली होती. अचानक काय झाले समजलेच नाही. पत्नीच्या हातात आमची गुड्डी गाढ झोपी गेली होती. पत्नीसुद्धा उन्हाचा कडाका सहन करु शकत नव्हती. काय झाले हे समजायला वेळच मिळाला नाही. गाडीचे मागचे चाक ट्यूब फुटल्याने लडबडले. गाडीच्या मागच्या चाकातील संपूर्ण हवा निघून जाऊन टायरदेखील फुटला होता. 
          माझी बेसावध पत्नी अचानक घडलेल्या पंक्चरमुळे स्वतःला आणि गुड्डीला आवरु शकली नाही. ती १०-१२ फुटांवर दूरवर फेकली गेली. मला तीव्र धक्का बसला ..पण मी पुढे जाऊन गाडी कंट्रोल केली. गुड्डी पत्नुच्या हातून निसटून आपटली होती. तिच्या डोक्याला थोडा मार बसल्याने रक्त येऊ लागले. तिची मम्मी जवळच जमिनीवर निश्चेष्ट पडून कण्हत होती..मुलगी पडली तरी ती उठून तिला उचलून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिला मी कसेतरी उठवले व पाणी पाजले. तिला मुका मार लागला होता. हातापायांना खरचटले होते. 
          माझ्या मुलीच्या डोक्याचे रक्त माझ्या हातावर सांडले होते. गुड्डीने ते रक्त बघितले. तिला वाटले ते माझेच रक्त आहे.ती रडू लागली. तिला मी समजावून सांगितले कि ते माझे नसून तुझे रक्त आहे. तेव्हा ती चिमुकली मला जे बोलली ते आठवले कि आजही माझ्या पायाखालची जमीन सरकते....
          ती म्हणाली होती, " पप्पा , मला लागले तरी चालेल...तुम्हाला लागले नाही ना ? ...." मी गारच झालो आणि माझ्याच डोळ्यातून पाणी वाहू लागले ...मला रडू आवरेना....मोठ्या संकटातून आम्ही वाचलो होतो...
          समोरचा मैलाचा दगड एक फुटावरुन माझ्याकडे बघून भेसूरपणे हसताना मला दिसला...जर आमच्यापैकी कुणीही त्याच्यावर आपटलो असतो तर .........ती कल्पनाच सहन होत नाही.....ती माझी मुलगी आता ७ वीत आहे....तिला कधीही दुखावणार नाही आसा मी त्याचक्षणी निश्चय केला होता....आणि मी तो पाळणारच....माझी गुड्डी म्हातारी- शितारी होऊ दे ...अशी माझ्या तिला अनंत शुभेच्छा .
          Happy Birthday Guddi.

©️ प्रवीण अशितोष कुबलसर
( 9881471684 ) कणकवली.


माझी पत्नी - ईश्वरी

          मी आणि माझी पत्नी ईश्वरी 

          २००८ पासून आज 14 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला, नवीन संसार थाटला...कारण माझी प्रथम पत्नी कै.सौ.ऐश्वर्या हिच्या अकाली दुःखद निधनामुळे माझी मुलगी फक्त ४ वर्षांची असल्याने तिला कमालीचा मातृशोक झाला होता. म्हणून मला दुसरे लग्न करावे लागले. अर्थात मलाही सहचारिणी गेल्याचे अतोनात दुःख झाले होते. ही उणीव भरुन काढणे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. शिक्षिका पत्नीच्या जाण्याने तिच्यासोबतच्या २००० ते २००७ पर्यंतच्या आठवणी उचंबळून येत होत्या. शाळा, मुलीची देखभाल, पत्नीचा वियोग यांचे व्यवस्थापन करणे मला जिकिरीचे झाले. मी विमनस्क झालो होतो..तिच्याशिवाय जीवन जगणे मला असह्य झाले होते. शाळेतून आल्यानंतर मी मला एका बंद खोलीत स्वतःला कोंडून घेत असे. आणि मार्च २००८ मध्ये माझ्या आयुष्यात दुसऱ्या पत्नीने ( राणी नारायण टिपुगडे - राधानगरी ) हिने प्रवेश केला. समायोजन होईपर्यंत एक वर्षाचा काळ लोटला. तिने माझ्या मुलीला हर्षदा ( छकुली ) हिला चांगलेच आपलेसे केले. तिने केलेले हे सहकार्य माझ्यासाठी अत्यंत मोलाचे असेच आहे. आज माझ्या पत्नीला ३२ वर्षे पूर्ण होत आहेत...३३ व्या वर्षात पदार्पण करत असताना तिने गेल्या ११ वर्षात मला जे समजून घेतलेले आहे ती गोष्ट मला महत्त्वाची वाटते....पूर्वपत्नीला विसरु न देता ईश्वरीने मला जी साथ दिली आहे ती अखंड आहे...तिला तिचे पुढील आयुष्य वैभवशाली जाण्यासाठी मी अधिक जोमाने , प्रेमाने व जबाबदारीने वागण्यासाठी ईश्वर मला शक्ती देवो आणि आपणा सर्वांच्या सदिच्छा पाठिशी राहोत म्हणजे झाले.


Tuesday, July 2, 2019

माझी आई

          माझी आई म्हणजे एक सुंदर स्वप्न .....आज २ जुलै २०१९ ...१० वर्षांपूर्वी आज माझी आई मला सोडून देवाघरी गेली. तिची आठवण येते आणि खूप उणीव भासते. आम्ही ५ भावंडे ...ताई, आका, मी बाळू , न्हानू  आणि पपी ....सर्वजण आज अगदी मजेत आणि तिच्या छत्रछायेखाली सुखासमाधानात आयुष्य उपभोगताना ती सर्वत्र असायला हवी होती. ती खूप सहनशील होती. आम्ही लहान असताना आम्हाला ती कधी मनाला लागेल असे बोलली नाही. तिचा सहवास आम्हाला नेहमीच हवाहवासा वाटणारा.... कधी तिच्या कुशीत जायला  मिळते यासाठी आम्हा भावंडांमध्ये चढाओढ लागत असे. ती बिचारी सर्वांना आनंद देण्याचा नेहमीच प्रयत्न करताना नेहमी चेहऱ्यावर हास्य ठेवत असे. तिने आपले दुःख कधीच आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला नाही. आपले दुःख आपल्याकडेच ठेवून नेहमी आनंदात जगण्याचा अनमोल मंत्र आईने आम्हा सर्व भावंडांना दिला.
             दिसायला अगदी साधी...पण खूप प्रेमळ स्वभावाची आमची आई सर्वांशी खूप कमी बोलत असे. खूप चर्चा करत वेळ घालवण्याचा तिचा स्वभाव नव्हता. ती नेहमी आपल्या कामात दंग असे. जगाशी प्रेमाने वागावे असे तिनेच आम्हाला शिकवले. ती न बोलता आम्हाला खूप काही शिकवून जात असे. अजूनही आठवण येते आणि सर्रकन अंगावर काटा उभा राहतो. आता ती असती तर तिला किती आनंद झाला असता. नातवंडांबरोबर गमतीजमती करता आल्या असत्या. दररोज झोपताना तिची नामजप केल्याशिवाय मी कधीच झोपत नाही. तिला आठवत झोपी जावे...जगातील सर्व समस्या आपोआप कमी होऊन शांत झोप लागते असा माझा नेहमीच अनुभव आहे.
              कामात माझी आई पटाईत होती. जेवण बनवणे, उसळ, चपाती, भाकरी, पुरणपोळ्या , टोमॅटोची आमटी ( आम्ही पूर्वी सार  म्हणत असू ) , फोडणीचा भात , पिठी, वडे सागोती, भजी  असे पदार्थ बनवून ती आम्हाला जेवू घाली. जे घरात असे त्यात ती माऊली आम्हाला कधीच कमी पडू देत नसे. पण आम्हाला जेवायची घाई झालेली असे, ती बनवत असतानाच आम्ही दोघे भाऊ त्यावर फडशा पडत असू. ती शांतपणे त्यात आनंद मानायची. कारण कधी आम्ही एवढे जेवत असू कि आम्ही तिच्या वाटणीचे जेवणही फस्त करीत असू. मग ती म्हणे कि ' तुम्ही जेवलास कि माझा पॉट भरला '. आता आमच्याकडे भरपूर अन्न आहे,  खायला खूप आहे, पण पूर्वीची मजा येत नाही. आई नसल्यामुळे तिची उणीव जगातील दुसरी कोणतीही व्यक्ती भरून काढू शकत नाही हे सत्य आहे.    

आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी

 ​ 🍽️ आमच्या शाळेतील ' अन्नपूर्णा ': सौ. समिता सुतार वहिनी 👩‍ ​          गेली काही वर्षे सौ. समिता सुतार वहिणी आमच्या शाळेत 'श...