Sunday, June 29, 2025

सिंधुदुर्गातील माझ्या नोकरीचा पहिला दिवस: २७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण

सिंधुदुर्गातील माझ्या नोकरीचा पहिला दिवस: २७ वर्षांपूर्वीची अविस्मरणीय आठवण

    आज सकाळी कोसळणाऱ्या धो-धो पावसाने मला २७ वर्षांपूर्वीच्या एका दिवसाची आठवण करून दिली. तो दिवस माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता – सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील माझ्या शिक्षकी पेशाचा पहिला दिवस. २९ जून १९९८ रोजी मी कणकवलीहून देवगडला, माझ्या बाबांसोबत सकाळी लवकरच एसटीने ६० किलोमीटरचा प्रवास करत रवाना झालो होतो.

    पंचायत समिती देवगडच्या ऑफिस आवाराबाहेर आम्ही अनेक नव्याने रुजू होणारे शिक्षक जमलो होतो. आमच्यासाठी तो दिवस अत्यंत महत्त्वाचा होता, पण हजर करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी तो रोजचाच कामाचा भाग होता. त्यांच्यासाठी हे काही नवीन नव्हते, कारण त्यांनी यापूर्वीही अनेक शिक्षकांना वेगवेगळ्या दिवशी रुजू करून घेतले असेल. पण आम्हांला मात्र या दिवसाचे खूप महत्त्व होते. आम्ही उत्सुकतेने शिक्षण विभागातील मंडळींची वाट पाहत होतो. अधिकारी त्यांच्या दैनंदिन वेळेप्रमाणे उपस्थित होऊ लागले. गटशिक्षणाधिकारी साहेब आणि त्यांच्या हाताखालील शिक्षण विस्तार अधिकारीही लवकरच येऊन कामाला लागले होते.

    त्यांना अडचणीतील शाळा नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांना द्यायच्या होत्या. आम्ही पहिले चार शिक्षक लवकर पोहोचल्यामुळे आम्हांला गढीताम्हाणे गावातील सडेवाडी, कालवी वाडी, तेली वाडी आणि दादरा वाडी या चार शाळांमध्ये रुजू होण्याचे आदेश मिळाले. देवगड तालुक्याची मला काहीच माहिती नव्हती, ना माझे तिथे कोणी नातेवाईक होते. बाहेर धो-धो पाऊस कोसळत होता आणि ऑर्डर स्वीकारल्यामुळे त्या शाळांमध्ये हजर होण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता. माझी ओळख असली तरी त्याचा मला त्यावेळी काहीच उपयोग झाला नाही, कारण मला मिळाली होती ती एक खूपच अडचणीची शाळा. गेली अनेक वर्षे त्या शाळेत कोणीही शिक्षक हजर झाला नव्हता. माझी पहिलीच नेमणूक असल्यामुळे मला तिथे जाणे भागच होते. सोबत माझे बाबा होते. तेव्हा मोबाईल फोन नव्हते, त्यामुळे जलद संपर्क साधणे शक्य नव्हते. स्वतःच्या गाड्या नसल्यामुळे एसटीशिवाय प्रवास करणेही शक्य नव्हते.

    गढीताम्हाणे गाव तळेबाजारापासून चार-पाच किलोमीटर खाली होते. जाताना वाटेत एक मोठी खाडी होती. पहिल्या दिवशी पावसातून ती खाडी ओलांडणे शक्य नाही, असे समजले. त्यामुळे पुन्हा कणकवलीला येऊन दुसऱ्या दिवशी, म्हणजेच ३० जून १९९८ रोजी तळेरेमार्गे जाण्याचे ठरवले. माझा पहिला दिवस प्रवासातच संपला होता.

    आजचा दिवस, ३० जून १९९८! कणकवली-रत्नागिरी गाडी पकडून आम्ही (बाबा सोबत होतेच) तळेरे गाठले. तिथून दुसरी कणकवली-पाटगाव बस पकडली आणि फणसगावला उतरलो. फणसगावहून गढीताम्हाणे गाडीने गढीताम्हाणे गावी पोहोचलो. जाताना वाटेतच सड्यावर धनगरवाडीत माझी शाळा शांतपणे माझ्याकडे बघून हसताना दिसली. मला मनात प्रश्न पडला, "मी कशाला हसतोय? रत्नागिरीतील दोन चांगल्या नोकऱ्या सोडून माझ्या जन्मभूमीत मी कशाला आलो?" तरीही, स्वतःच्या जिल्ह्यात नोकरी मिळाली हे एकमेव सुख खुणावत होते, त्यामुळे मुग गिळून गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता.

    आम्हाला मोठ्या एक नंबर शाळेत हजर व्हायचे होते. आम्ही तिथे पोहोचलो, मुख्याध्यापक अजून आले नव्हते. ते आल्यावर त्यांना कालच्या तारखेने हजर करून घेण्याची विनंती केली, पण ते शिस्तबद्ध होते. त्यांनी मला आजच्याच तारखेने हजर करून घेतले. माझ्या शाळेवर मोठ्या शाळेतील 'लक्ष्मण बारकू चौधरी' नावाचे शिक्षक कामगिरीवर होते, त्यामुळे त्यांच्याकडे चार्ज होता. आता आम्हांला त्यांच्यासोबत माझ्या नवीन शाळेमध्ये, दादरावाडीत हजर व्हायला जायचे होते. रस्ता चांगला होता, पण आम्हाला एकही वाहन मिळाले नाही. शेवटी, चालत चालत सहा किलोमीटरचा प्रवास करावा लागला. त्यावेळी काय वाटले ते वाटले, पण काय करणार, नोकरी मिळाली होती ना?

    एकदाचे शाळेत पोहोचलो. मुले आमची वाटच बघत शाळेच्या व्हरांड्यात थांबली होती. लक्ष्मण चौधरी दिसताच एक मुलगा धावत त्यांच्याकडे आला आणि त्याने त्यांच्याकडून चावी घेतली. माझी शाळा आता उघडली गेली होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या सेवेला सुरुवात झाली होती.

    मी त्या शाळेत साडेसहा वर्षे अतिशय आनंदाने शैक्षणिक कामकाज केले. त्या संपूर्ण काळात मी एकटाच स्कुलमास्टर म्हणून काम करत होतो. माझ्या शाळेत त्यावेळी एकोणीस विद्यार्थी असूनही मला दुसरा शिक्षक कधीच मिळाला नाही. त्यामुळे मला सुट्टीवर जाणेही शक्य नव्हते. त्या वाडीत राहणे मला सुरुवातीला जमले नाही, त्यामुळे मी गावात राहत असे. दररोज शाळेत जाण्या-येण्याचा १२ किलोमीटरचा प्रवास मी चालत करत असे. या प्रवासाची आता मला सवयच झाली होती.

    आजच्या नवनियुक्त शिक्षकांना कितीतरी सोयीच्या शाळा मिळतात, त्यांना आमच्या काळातील या समस्यांना नक्कीच तोंड द्यावे लागत नाही, हे मी स्वतः बघतो आहे. तरीही, त्यांना आताच्या काळात काही समस्या भेडसावत असतील असे वाटत असेल, तर आमच्या समस्या कितीतरी भयंकर होत्या, हे वाचून तरी त्यांना "आम्ही सुखी प्राणी आहोत" असा दिलासा नक्कीच मिळेल!

लेखक : प्रवीण अशितोष कुबलसर ( मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं .  १  ) 



Saturday, June 28, 2025

🔴 कणकवलीच्या शैक्षणिक वाटचालीतील 'खळाळता झरा' – सचिन तांबे सर!

🔴 कणकवलीच्या शैक्षणिक वाटचालीतील 'खळाळता झरा' – सचिन तांबे सर!

         कणकवली बीआरसीमध्ये गेली अनेक वर्षे आपल्या उत्साह आणि प्रामाणिकपणाने एक वेगळीच ओळख निर्माण केलेले सचिन तांबे सर हे खरंच एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांचे कार्य आणि त्यांची व्यक्ती म्हणून असलेली उंची यामुळे ते मला नेहमीच भावतात. कणकवली तालुक्यात विविध प्रशिक्षणांच्या निमित्ताने त्यांची भेट होते, आणि जेव्हा त्यांच्या हाती सूत्रसंचालनाची धुरा असते, तेव्हा ते त्या क्षणाचे अक्षरशः सोनं करतात.

          त्यांच्या ओठातून निघणारे शब्द कधी हास्याची उधळण करतात, तर कधी संवेदनशील मनाला अंतर्मुख करतात. त्यांचे बोलणे वरवरचे नसते; ते नेहमीच पोटतिडकीने बोलतात, त्यांच्यातील अतरंगी शिक्षक सतत जागा असतो. माणूस म्हणूनही ते खूप मोठे आहेत; त्यांना ओळखण्यासाठी वेळ लागतो, सहवास लागतो. अन्यथा त्यांच्याबद्दल गैरसमज होण्याची शक्यताच अधिक.

          सचिन सर शिस्तबद्ध आहेत, सर्वांचा आदर करतात आणि नेहमी टापटीप राहतात. त्यांचे 'मेकअप किट' त्यांच्यासोबत असते आणि ते कधीही अव्यवस्थित दिसत नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू राहावे यासाठी ते खूप प्रयत्न करतात, कारण मनातील दुःख लपवून 'मी सुखी आहे' हे दाखवण्याचा त्यांचा तो प्रयत्न असतो. अर्थात, खऱ्या मित्रांसोबत ते कधीतरी मनातील गुपितं उघड करतात आणि मोकळे होतात.

          त्यांना वर्तमानपत्रे वाचण्याचा नुसता नाद नाही, तर ती त्यांची आवडच आहे. अनेक वर्तमानपत्रे वाचून त्यातील महत्त्वाच्या बातम्या हायलाइट करणे, त्यांची कात्रणे गोळा करून चिकटवणे हा त्यांचा अनोखा छंद आहे. पण ते इथेच थांबत नाहीत, तर त्या कात्रणांचे फोटो काढून आपल्या व्हॉट्सॲप ब्रॉडकास्ट ग्रुपद्वारे सर्वांना पाठवतात. मिळालेले ज्ञान इतरांपर्यंत पोहोचावे, हा त्यांचा उदात्त हेतू असतो.

          एखाद्या शाळेत गेल्यावर तेथील संपूर्ण वेळेचा ते मुलांसाठी सदुपयोग करतात, पूर्ण वेळ मुलांना देतात. त्यांच्यातील आदर्श शिक्षक त्यांनी कायम जागृत ठेवला आहे. आमच्या शेजारी, अगदी जवळच्या खोलीत ते राहायला असल्यापासून मी त्यांना ओळखतो. 'आपलं घर, आपण आणि आपली मुलं' यापलीकडे ते कधी गेले नाहीत, पण नोकरीच्या ठिकाणी सर्वांशी मिळून मिसळून वागणं त्यांना उत्तम जमतं, म्हणूनच ते अधिक लोकप्रिय आहेत.

          सर्व शिक्षकांना माहीत आहे की, सचिन तांबे म्हणजे खळाळता झरा आणि चैतन्याचा पूर! त्यांच्या येण्याने प्रशिक्षणात अक्षरशः जान येते. गंभीर प्रशिक्षणही कसं खेळकर करावं, हे त्यांना खूप चांगलं माहीत आहे. प्रशिक्षण म्हटलं की कपाळाला आठ्या घालून आलेल्या शिक्षकांना मी त्यांच्या नुसत्या प्रवेशानेच हसतमुख होताना पाहिलं आहे. त्यांचं वक्तृत्व आणि सूत्रसंचालन खरंच वाखाणण्यासारखं आहे. त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत आणि अनेक अधिकारी त्यांचा आदर करतात.

          अशा या सचिन तांबेंनी नुकतंच डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण केले आहे. ते जर पूर्णवेळ शिक्षक असते, तर त्यांना नक्कीच आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित केले गेले असते. आजच्या नवनियुक्त शिक्षकांनी सचिन सरांच्या नित्याच्या अध्यापनातून खूप काही शिकले पाहिजे, कारण एखादा नवोपक्रमशील शिक्षक जे करू शकतो, त्याहीपेक्षा जास्त सचिन तांबे सर एखाद्या शाळेमध्ये गेल्यानंतर करत असतात. त्यांच्या या शैक्षणिक कार्याला माझा सल्यूट!

©️लेखक: प्रवीण अशितोष कुबल सर

💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...