Saturday, November 11, 2023

🛑आली दिवाळी

 🛑 दिवाळ सण आला

          दरवर्षी दिवाळी सण येतो. प्रत्येक वर्षाला नवीन आकर्षण असते. तो येतो तेव्हा उत्साह घेऊनच येतो. माणसं तीच असतात, त्यांच्यात उत्साह मात्र नवीन येत असतो.

          शाळांना सुट्ट्या लागतात. दिवाळीची सुट्टी हिवाळी सुट्टी म्हणून देण्यात येते. यंदा हिवाळी सुट्टीत हिवाळा जाणवताना दिसत नाहीय. नोव्हेंबर आला तरी गारवा, थंडी कुठे अनुभवायला मिळताना कठीणच झालेली दिसते आहे. कपाटातील स्वेटरे तशीच पडून आहेत.

          उद्या नरक चतुर्दशी. अनेक ठिकाणी नरकासुराचे मोठाले देखावे मांडले जातात. स्पर्धा भरवल्या जातात. अगडबंब राक्षस जाळले जातात. भावना महत्वाची असल्याने सगळेच त्यात सहभाग घेताना दिसतात.

          सकाळी लवकरच फटाक्यांच्या अतिशबाजीने जाग येते. शहरात रात्री बारा वाजल्यानंतर फटाके सुरु होतात, ते सकाळी दिसू लागले तरी वाजतच असतात. कानठळ्या वाजवणारे बॉम्ब बोंब मारत असतात. रोशनाईने शहरे झगमगून उठतात. लोकांच्या रोमारोमात चैतन्य संचारु लागते. तेही त्या आवाजाचा एक भाग बनून जातात.

          अभ्यंग स्नान करताना सुगंधी उटण्याचे सार्थक होते. अंग सुगंधाने दरवळू लागते. गरमागरम पाण्याचा शिडकावा अंगावर घेताना शहारे येतात. नवीन फोडलेला सुगंधी साबण अंगावर चोळताना पूर्वीची दिवाळी आठवून शहाऱ्यांची संख्या वाढत जाते.

          बाहेर पेटणाऱ्या पणत्या, आकाशकंदील हसत हसत नव्या दिपवर्षाचे स्वागत करताना अधिक सुंदर दिसू लागतात. आईने केलेल्या फराळाचा वास तोंडात पाणी आणू पाहत असतो. नवीन खरेदी केलेले कपडे आज घालताना खूप मस्त वाटत असते. कांदेपोहे, चकल्या, करंज्या आणि लाडवांची ताटे समोर येऊ लागतात. फराळ खाण्याचा अतिआग्रह केला जातो. हे खाऊ कि ते खाऊ असे होऊन जाते. गोड पदार्थांपेक्षा तिखट व कुरकुरीत पदार्थांचा फडशा पाडला जातो.

          जवळच्या मंदिरात काकड आरती सुरु होते. अजित कडकडे आणि सुरेश वाडकरांची गाणी कानांना तृप्त करु लागतात. परिवारासह मंदिरात जाताना वाटेतले विविध प्रकारचे आकाशकंदील, आकर्षक रांगोळ्या पाहताना मनाला अपार आनंद होऊ लागतो.

          तुळशी वृंदावनासमोर कडू कारेटांची फोडलेली रांगोळी दिसू लागते.



Friday, November 10, 2023

तुम्ही लिहित आहात का ?

 🔴 तुम्ही लिहित आहात का ? 

          हल्ली बरेच दिवस काहीतरी लिहावं असं वाटतंय !!! खरंच , लिहावं आणि मोकळं व्हावं असं वाटत असेल प्रत्येकालाच. पण वेळ कुठे मिळतोय लिहायला ? लिहायला सुचतंय खूप. लिहायला बसायला वेळ कसा तो मिळत नाही. 

          लिहायला बसलो कि काहीतरी काम समोर येऊन उभं राहतं. मग तेच काम महत्त्वाचं वाटतं. लिहिणारा मग ते काम करण्यात दंग होतो. लिहिणं राहूनच जातं. माझं हल्ली अगदी असंच होतंय. 

          मघाशीच माझा एक लेखक मित्र भेटला. त्याने आपली गाडी काहीशी स्लो केली. त्यालाही गडबड होतीच. तरीही त्याने मला हाच प्रश्न विचारला , " अरे प्रवीण , तू लिहितो आहेस ना ? " मी त्याला माझ्या कामांची यादी पुढे केली. त्यालाही ते पटलं. तो म्हणाला , " तुझं म्हणणं अगदीच बरोबर आहे मित्रा , पण तू तुझं लिहिणं सोडू नकोस " त्याच्या म्हणण्यात तथ्य होतं. मी त्याचं ते म्हणणं गंभीरपणे घेतलं आणि लिहायला सुरुवात केली. 

          माणसाने आपल्या जगण्यात आवडीच्या गोष्टी केल्या नाहीत , तर त्याचं जगणंच निरस होऊन जातं. मला वाचनाची आवड आहेच , पण त्याहीपेक्षा लेखनाची अधिक आवड आहे. मी एकदा लिहायला बसलो कि थांबता थांबत नाही. माझा लेख पूर्ण होईपर्यंत व्यत्यय आला नाही तर मी माझं भाग्यच समजतो. पण व्यत्यय आला नाही असं होतच नाही मुळी. 

          मी एक शिक्षक आहे. शिक्षकाने जसं सतत वाचत राहायला हवं , तसंच त्यानं प्रसंगानुरुप लिहीत सुद्धा राहायला हवं. लिहायला वेळ मिळत नसेल तर वेळ काढायला हवा. तुमच्या मनात आलेले विचार व्यक्त करायला हवेत. एकदा का तुमची लिहिण्याची सवय गेली की पुन्हा तुम्हाला लिहिताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागेल. 

          लिहिता म्हणजे तुम्ही नक्की काय करता ? तर तुमच्या मनातील विचारांना वाट करुन देत असता. एकदा विचार सत्यात प्रकटले की तुम्ही तुमच्या विचारांना योग्य दिशा मिळालेली असते , विचारांचा निचरा झालेला असतो. अन्यथा विचारांचा कचरा झाल्याशिवाय राहणार नाही. 

          तुमचे अनमोल विचार वाचण्यासाठी अनेक वाचक उत्सुक असू शकतात. त्या वाचकांची तहान भागवणे हेही तुमच्या लेखनाचे ध्येय असू शकते. तुम्ही स्वतः ताणतणावमुक्त होऊन जाता ही गोष्ट वेगळी. सतत सर्जनशील संकल्पना निर्माण करण्याची तुमची क्षमता वापरली कधी जाणार ? 

          तुमचे मित्र तुम्हाला एखादी चांगली गोष्ट सांगत असतील तर नक्की ऐका. तुम्ही तुम्हाला एका चांगल्या वाटेने नेत आहात हीसुद्धा चांगलीच गोष्ट आहे. नाही का ? 



💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...