🛑 असा रंगारी श्रावण
आषाढ महिना संपला कि श्रावण महिन्याची चाहुल लागते. तो येतो आणि जो आनंद होतो , तो शब्दबद्ध करणं खूपच कठीण असतं. हा स्वानंद अनुभवावा लागतो. तो अनुभवल्याशिवाय कळणार नाही.
बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाही श्रावण महिन्याने भुरळ घातली. त्यांनी लिहिलेली कविता सर्वश्रुत आहे. ' श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे ' ही कविता म्हणताना साक्षात श्रावण समोर उभा राहतो. इतकी त्यांच्या काव्यात ताकद आहे.
श्रावणात सर्व निसर्ग बहरुन जातो. पावसाला उधाण आलेलं असतं. हिरव्यागार झाडावेलींना पाहताना डोळे निवून जातात. आकाशात विविध रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य त्यात भर घालत असतं. पशुपक्षी आनंदात नाचू लागतात. शेतकरी सुखावतात. त्यांची शेती करतानाची कार्ये उत्स्फूर्तपणे सुरु असतात.
या महात हिंदू धर्मातील विविध सण येतात. पावसाच्या रिमझिम रेशीमधारा बघतच रहाव्याशा वाटतात. फुलांची बाग अधिक आनंदाने हसताना दिसते. विविध रानभाज्या खुलून दिसतात.
गावाकडे घराघरात श्रावण सोमवारी शंकर महादेवाची व्रतवैकल्ये केली जातात. उपवास केले जातात. लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्यांनाही झोपाळ्यावर झोके घेण्याचा आनंद घेता येत असतो. मंगळागौर , नागपंचमी , रक्षाबंधन , नारळीपौर्णिमा , गोकुळाष्टमी , गोपाळकाला असे सण श्रावण महिन्याचे मुकुटच असतात. मांसाहार न करता पूर्ण शाकाहारी राहण्यासाठी निसर्गदेवता श्रावण महिन्याच्या रुपाने माणसाला साद घालत असते.
भक्तीभावाने भारावून गेलेली माणसे श्रावणाची वाट पाहत असतात. एखाद्या ग्रंथाचे वाचन सुरु करण्यासाठी श्रावण महाचे औचित्य लागत असते.
असा हा श्रावण सर्वांचाच लाडका ऋतू असतो.
©️ प्रवीण कुबलसर

.jpeg)














