Friday, November 25, 2022

🛑 होईल समदं ठिक

 🛑 होईल समदं ठिक


          कौशल्याधिष्ठित प्रशिक्षण आम्हां सर्व शिक्षकांसाठी महत्त्वाचे होते. नेरुर माड्याची वाडी माध्यमिक विद्यालयातील एक दिवस सर्वच उपस्थितांसाठी अविस्मरणीय ठरला असेल. माझ्यासाठीही हा प्रशिक्षण दिवस अनमोल असाच होता. 

          प्रत्येक तालुक्यातील दहा निवडक शिक्षकांची निवड करण्यात आली होती. तसं पाहिलं तर सगळेच शिक्षक निवडकच असतात. त्यातून निवडून काढणं जिकिरीचे काम असावे. किंवा स्वतःहून प्रशिक्षणाला जाणारे मोजके असावेत. कारण प्रशिक्षण करण्यापेक्षा शाळेत काम करणं काही शिक्षकांसाठी अधिक महत्त्वपूर्ण असतं. अर्थात सर्व शिक्षक हे शाळेत शिकविण्यासाठीच असतात , तरीही शाळेचा एक एक दिवस विद्यार्थ्यांसाठी अतिशय मोलाचा असतो. आपल्या वर्गशिक्षकांची ते आतुरतेने वाट पाहत असतात. 

          प्रत्येक शिक्षकासाठी प्रशिक्षण हे नवनवीन अनुभवांची शिदोरी उघडण्यासारखं असतं. ते उघडून बघितल्याशिवाय आणि त्याचा परिपूर्ण आस्वाद घेतल्याशिवाय त्याची चव कशी समजणार ? जेवणात विविध प्रकारच्या संतुलित आहाराचे सेवन करताना जशी तृप्ती होते , तसा तृप्तीचा ढेकर कालच्या प्रशिक्षणात घेता आला. 

          प्रारंभीच माड्याची वाडी शाळेच्या वाद्यचमूने केलेलं उत्साहवर्धक स्वागत  भारावून टाकणारं होतं. अतिथींचं असं झालेलं स्वागत आमच्यासाठी तसं नवीन नव्हतं. आतापर्यंत आम्ही पदाधिकारी , अधिकारी यांचं स्वागत केलं होतं , आज आमचं असं धुमधडाक्यात झालेलं स्वागत भाव खाऊन गेलं. 

          सिंधुदुर्ग शिक्षण विभाग , माड्याची वाडी शिक्षण संस्था आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्या वतीनं घेतलं गेलेलं कौशल्य विकासाचं प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकाला खूप अनुभुती देऊन गेलं. असं आगळं आणि वेगळं प्रशिक्षण कदाचित प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातील पहिलंवहिलं आणि अविस्मरणीय असावं असं म्हटलं तरी वावगं ठरु नये. 

          औपचारिक स्वागतासाठी जास्त वेळ खर्च न करता प्रत्यक्ष प्रशिक्षणाला आरंभ झाला. माड्याची वाडी विद्यालयाने केलेले शैक्षणिक प्रयोग व व्यावसायिक होण्याचे धडे देणारी संस्कार शाळा पाहून सगळे शिक्षक अचंबित झालेले दिसले. विद्यालयाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक आणि कर्मचारी आपापलं दिलेले काम मनापासून करत होते. प्रत्येकाचं सादरीकरण आत्मविश्वासयुक्त होतं. त्यात नाटकी भाव अजिबात नव्हता. येथील सर्व शिक्षक मुलांकडून हे सर्व कधी करुन घेतात हा प्रश्न आम्हां प्रत्येकाला पडला. कार्यानुभव विषयांच्या तासिका एकत्र करुन शुक्रवारी आणि शनिवारी जास्तीचा वेळ देऊन हे सर्व उपक्रम राबवले जातात. शाळेचा एक ठराविक वेळ असला तरी अभ्यासक्रम पूर्ण करुनच या उपक्रमांची नियोजनपूर्वक अंमलबजावणी केली जाते हे विशेष आहे. 

          या कार्यशाळेत शाळेने केलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. मधुमक्षिका पालन प्रत्यक्ष दाखवण्यात आले. शाळेतील दोन मुलींनी मधमाश्यांना न घाबरता त्याचे सादरीकरण केले होते. त्यांना प्रशिक्षित करणाऱ्या चेंदवणकरसरांसारखी माणसं या क्षेत्रात कार्यरत असतील तर मुलांचं व्यावसायिक प्रशिक्षण खऱ्या अर्थाने होऊ शकतं. टाकाऊ पासून टिकाऊ हे ब्रीदवाक्य मानून केलेलं वेल्डिंगचं कामही तसंच. आय बी टी च्या माध्यमातून मुलांना प्रशिक्षित करताना शाळेतील अभ्यासात हुशार नसणाऱ्या पण व्यावसायिकतेकडे वळू शकणाऱ्या ऐशी टक्के पटसंख्येचा केलेला विचार अतिशय योग्य वाटतो. नोकरीसाठी शिक्षण घेण्यापेक्षा स्वतः व्यावसायिक होऊन दुसऱ्यांना नोकरी देणारं शिक्षण इथं दिलं जातं. 

          इथल्या स्वच्छता गृहातही भिंतींवर गणिताची महत्त्वाची सूत्रे प्रत्येकाचं लक्ष वेधून घेणारी अशीच. खाद्यपदार्थ विभागातील प्रत्येक पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवलेले. स्थानिक जत्रेतील त्यांचे स्टॉल्स शाळेचं आर्थिक उत्पन्न आणि विद्यार्थ्यांचं अर्थार्जनाचं ज्ञान वाढवणारे आहेत. एकदा का या मुलांचा व्यवसायातील आत्मविश्वास वाढला की ही मुले आयुष्यात कधीही कमी पडू शकणार नाहीत हा आत्मविश्वास देणारे शिक्षक या शाळेला लाभले आहेत हे नाकारुन चालणार नाही. गुरुने दिलेला ज्ञानरुपी वसा ही मुले पुढे पुढे नक्की चालवतील याचीही खात्री झाल्याशिवाय राहत नाही. 

          मुलांनी केलेली हस्तकला , आधुनिक शेतीतील केलेले विविध नवनवीन प्रयोग पाहून हे बघू की ते बघू असे होऊन गेले. हे सगळं एका दिवसांत पाहत असताना त्याचं ऑटोमॅटिक ट्रेनिंग आमच्या मेंदूत नोंद होत गेलं. 

          डॉ. प्रसाद देवधर यांनी केलेले भगीरथ प्रयत्न येथे अधोरेखित करणारे आहेत. प्रत्येक उपलब्ध वस्तूचा केलेला जाणीवपूर्वक वापर हे त्यांच्या यशाचं गमक आहे. आपणही असा विचार केला तर आपल्याला जमू शकतं हा विश्वास या प्रशिक्षणानं प्रत्येकाला दिला. 

          प्रत्येक शिक्षकाला यात बोलतं करताना त्यांच्याकडून अपेक्षित काढून घेण्याची कला डॉ. देवधर यांनाच जमू शकते. त्यांनी खूप कमी वेळेत ते दाखवून दिले आहे. ठरवलं तर शिक्षकच ही गोष्ट करु शकतात यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. या विश्वासाकडे त्यांनी जास्त लक्ष दिलेलं होतं. काही शिक्षकांनी आपल्या सादरीकरणात केलेलं विश्लेषण नवनवीन अनुभवांची भर घालणारं होतं. कमी निधीचा कसा छान वापर करता येतो हेही त्यांनी सांगत असताना त्यांचे प्रत्यक्ष अनुभव खूप शिकवून जाणारे होते. 

          यावर खूप लिहिण्यासारखे असले तरी हे प्रशिक्षण एका छोट्या लेखात बंदिस्त होणारे नक्कीच नाही. माननीय शिक्षणाधिकारी धोत्रे साहेबांनी दिलेली प्रेरणा प्रत्येक शिक्षकाला अनमोल असणार आहे. ' एक कौशल्यपूर्ण दिवस ' असंही  शीर्षक या दिवसाला शोभू शकतं. प्रशिक्षणात भेटलेले सर्वच घटक एकमेकांमध्ये तरतरी पेरण्याचं काम करुन गेले हे या प्रशिक्षणाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. 

          मी घरी आलो , तेव्हा टीव्हीवर एक मालिका सुरु होती. त्यात एका बाळाचा जन्म झाला होता. बाळ हलत नव्हतं. श्वास घेत नव्हतं. त्याची आई डोळ्यांत पाणी आणून आपलं बाळ रडण्याची वाट बघत होती. दवाखान्यातील त्या प्रसंगी घरातील सारं कुटुंब बाळाला निश्चेष्ट पाहून पार हबकून गेलं होतं. आणि प्रत्येकानं बाळाच्या पायांना हात लावून म्हणायला सुरुवात केली होती , " होईल समदं ठिक " . बाळ काही सेकंदात पाय हलवू लागलं होतं. तोंड उघडून चिमुकलं तोंड उघडू लागलं होतं. बाळ एक दीर्घ श्वास घेऊन मोठ्यांदा रडू लागलं तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यांतून आनंदाचे अश्रू वाहू लागले होते. 

          आमच्या समोर असणाऱ्या विद्यार्थ्यांना असं जागं करण्याचं काम आपलं आहे , ते जागं करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असू शकते. आपण सर्व शिक्षकांनी आपल्या समोर असलेल्या मुलांसाठी असंच कौशल्यपूर्ण काम करण्याचं कौशल्य अंगी बाळगणं ही आजच्या काळाची गरज आहे आणि ही गरज प्रत्येक शिक्षकाला वाटेल तेव्हा प्रत्येक शाळा माड्याची वाडी झाल्याशिवाय राहणार नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली 

( 9881471684 )
















































































💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖

 💖 भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये एक अविस्मरणीय सायंकाळ 💖           कणकवली येथील भालचंद्र महाराजांच्या मठामध्ये कीर्तन महोत्सवाच्या निमित्...