🛑 भाईमामा : द ग्रेट मामा
प्रत्येकाला मामा असणे खूप गरजेचं असतं. आईचा भाऊ म्हणून आपल्या भाचरांची काळजी घेणारा मामा सर्वांनाच नेहमीच हवाहवासा वाटत असतो. ज्यांना एकही मामा नसेल त्यांना मामा नसल्याचं दुःख सतत सतावत असणार.
आम्ही भावंडे मात्र मामांच्या बाबतीत अतिश्रीमंत आहोत. आम्हाला सहा मामा. चार सावत्र आणि दोन सख्खे. आबामामा , नानामामा , अण्णामामा आणि भाऊमामा हे चार सावत्र मामा. भाईमामा आणि बालामामा हे माझ्या आईचे सख्खे भाऊ.
आज यापैकी पाच मामा हयात नाहीत. बालामामा हे माझ्यासाठी नेहमीच आयडॉल ठरले आहेत. रत्नागिरीत असताना त्यांनी मला दिलेली शाबासकीची थाप अजूनही पाठीवर तशीच आहे.
मोठ्या सर्व सावत्र मामांचे अनेक उत्तम संस्कार मनावर कोरले गेले आहेत. ते सुसंस्कार होते म्हणून मी आज असा आहे.
मला आज माझ्या भाईमामांबद्दल सांगायचे आहे. ते जाऊन आज आठ वर्षे होत आहेत. त्यांच्या आठवणी अजुनही ताज्याच आहेत. मी त्यांना कधीही विसरु शकणार नाही.
भाईमामा म्हणजे एक शांत संयत व्यक्तिमत्त्व. एक हाडाचे प्राथमिक शिक्षक. घरात मवाळ , पण शाळेत जहाल. जहाल म्हणजे कडक शिस्तीचे. त्यांचं हसू ओठातल्या ओठातच. त्यांचं प्रेम पोटातल्या पोटात. प्रेम आहे पण ते सहसा कळू द्यायचे नाही असा त्यांचा स्वभाव.
मी मोठा होत असताना भाईमामांना अगदी जवळून बघत आलोय. दर शनिवारी ते आमच्या दुकानात येत. सहजच. फक्त आम्हाला भेटायचे निमित्त असे. ते एखाद्या शनिवारी आले नसले तर आम्हाला त्यांची आठवण येत राही. अजूनही येते.
ते आले की एक चैतन्य दुकानात शिरत असे. मग आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत असू. येताना त्यांनी चहा आणि शेवचिवडा यांची ऑर्डर हमखास दिलेली असे. बोलता बोलता टकल्यांच्या हॉटेलमधील आम्हांला सगळ्यांना आवडणारा शेवचिवडा समोर येत असे. आम्ही सर्व मिळून चिवडा फस्त करण्याची आठवण अजूनही जात नाही. हे अप्रतिम क्षण पुन्हा कधीही येणार नाहीत.
भाईमामांनी आम्हांला अनेकदा आर्थिक आधार दिला आहे. मानसिक आधार तर ते नेहमीच देत असत. त्यांना पान खाणे आवडायचे. पान तयार करण्याची त्यांची पद्धत आगळी होती. एखादे सुंदर पान निवडून त्याच्या सर्व शिरा काढून नंतर चुना लावत असताना तंबाखुची निवडक पाने त्यात टाकली जात. मग त्याला एक विशिष्ट घडी घालून पानाची तोंडात उडी पडे. हे करत असताना त्यांच्या गप्पा सुरुच असत. माझे मात्र त्यांच्या या हालचालींकडे अधिक लक्ष असे.
मी शिक्षक झाल्यानंतर लवकर नोकरीला लागण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. नोकरीच्या पहिल्या दिवशी माझ्यासोबत आले. आदल्या दिवशी रात्री त्यांनी मला केलेले मार्गदर्शन मी कदापि विसरणार नाही. ते म्हणाले , " हे बघ भाच्या , तू मागे मागे राहू नकोस. मी मागे राहिलो. मी कधी चारचौघात बोललो नाही. पण तू मात्र तसे करु नकोस. प्रत्येक वेळी संधी तुझ्याकडे चालून येईल , त्या सर्व संधींचे सोने करणे फक्त तुझ्या हातात आहे. "
त्यांचे हे मार्गदर्शन मला नेहमीच पुढे जाण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आज मामा नाहीत , पण त्यांचे ते अनमोल शब्द सदैव माझ्यासोबत असतात.
सेवेतून निवृत्त झाल्यानंतर एक दोन महिन्यांतच ते आजारी पडले. त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या कुटुंबाने डोंगराएवढे प्रयत्न केले. लाखो खर्च केले. परंतु आठ वर्षांपूर्वी ते आम्हाला कायमचे सोडून निघून गेले. एका मार्गदर्शक तत्त्वाचा अंत झाल्याची भीती माझ्या मनात वाटून गेली. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे मी माझ्या आठवणींच्या कुपीत अगदी जपून ठेवली आहेत.
©️ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१